विभावरी कुलकर्णी
🌈 इंद्रधनुष्य 🌈
☆ मोक्ष… भाग – १ ☆ विभावरी कुलकर्णी ☆
ओतूरच्या कपर्दिकेश्वराची भावयात्रा – –
माणसाचा स्वभाव मोठा गमतीशीर असतो. कुणी जर म्हणाले, “चला, आज मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे, ” की माणसे अगदी मनापासून सावरून बसतात, कान टवकारतात आणि उत्सुक्तेने ऐकू लागतात. पण तेच जर कुणी म्हटले, “आज आपण जरा ज्ञान-माहिती किंवा एखादे तात्विक भाषण ऐकूया, ” की लगेच लोकांचा धीर सुटतो. पूर्वीच्या काळी अशा वेळी लोक सतरंजीचे दोरे काढत बसत असत. पण आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात सतरंजीच्या दोऱ्यांची जागा आपल्या हातातील मोबाईलच्या अंगठ्याने घेतली आहे. माहिती किंवा भाषण सुरू झाले की, अंगठा भरकन वर सरकतो आणि स्क्रीन स्क्रोल (Scroll) होते! म्हणूनच, हे कोणते शुष्क भाषण नाही; तर ही एका साध्या, निखळ आणि गमतीशीर भावयात्रेची रंजक कथा आहे.
आषाढ संपून जेव्हा श्रावण महिना सुरू होतो, तेव्हा निसर्गासोबतच माणसाचे मनही एका वेगळ्याच मांगल्याने न्हाऊन निघते. श्रावण म्हणजे सण, उत्सव, व्रतवैकल्ये आणि उपवास यांची एक अखंड पर्वणीच! मंदिरातून येणारा घंटानाद, धूपाचा सुगंध आणि वातावरणात असणारा एक सात्विक गारवा मनात वेगळाच उत्साह भरतो. त्यातही ‘श्रावणी सोमवार’ या दिवसाचे महत्त्व तर काही वेगळेच! वर्षभरात इतर वेळी फारसा देवधर्म न करणारी माणसेही श्रावणी सोमवारी आवर्जून उपवास करतात आणि महादेवाच्या दर्शनाला जातात.
आता हे सगळे वाचून तुम्हाला वाटले असेल, की मी नेहमीप्रमाणे श्रावण महिन्याचे अथवा महादेवाचे मोठे कौतुक सांगत बसणार आहे की काय? पण तसे अजिबात नाही हो! श्रावणाचे महत्त्व तर आपल्या सर्वांना बालपणापासून माहीतच आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात तर गावोगावी, डोंगरदऱ्यांत शंकराची अथांग मंदिरे पसरलेली आहेत.
माझेही अगदी तसेच होते. दरवर्षी श्रावण महिना जवळ आला, की माझ्या आतला भाविक जागा व्हायचा. मग चालू व्हायची शोधमोहीम! ‘या श्रावणात नक्की कोणत्या शिवमंदिरात दर्शनाला जायचे? ‘ मग तशाच देवाची आवड असणाऱ्या मैत्रिणींना फोन करणे, प्लॅन आखणे हे माझे ठरलेले गणित.
मागच्या वर्षी असाच श्रावण महिना उजाडला आणि मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये चर्चा सुरू झाली. अनेक मंदिरांची नावे समोर आली, पण शेवटी ओतूर येथील ‘कपर्दिकेश्वर’ मंदिरावर शिक्कामोर्तब झाले. ओतूरच्या कपर्दिकेश्वराचे वेगळेपण मी अगदी लहानपणापासून ऐकून होते. अगदी लहान असताना घरातील मोठ्या माणसांसोबत तिथे गेले होते, पण बालवयात घेतलेले ते दर्शन काळाच्या ओघात विस्मृतीत जमा झाले होते. म्हणूनच या श्रावणी सोमवारी कपर्दिकेश्वराच्याच दरबारी जायचे, असा पक्का बेत आखला गेला.
ज्या ठिकाणी आपण जातो, त्या जागेची थोडीफार पार्श्वभूमी आणि इतिहास आपल्याला माहीत असावा, हा माझा जुना नियम. म्हणून मी नेहमीप्रमाणे आपल्या ज्ञानी ‘गुगल बाबांना’ शरण गेले. गुगल बाबांनीही एका क्लिकवर कपर्दिकेश्वराचा सविस्तर आणि सचित्र इतिहास माझ्यासमोर उघडून ठेवला. ते वाचून मी अगदी अचंबित झाले!
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक पुरातन शिवमंदिरे आहेत. त्यातील काही मंदिरे तर शेकडो वर्षांची जुनी आहेत. पुणे शहराच्या उत्तरेला असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील ओतूर नावाच्या शांत शहरामध्ये, मांडवी नदीच्या सुंदर तीरावर हे ‘कपर्दिकेश्वर मंदिर’ वसलेले आहे. या मंदिराला तब्बल ९०० वर्षांचा प्रदीर्घ आणि पावन इतिहास आहे! दरवर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी महादेवाचा मोठा उत्सव आणि भव्य यात्रा भरते.
पण या मंदिराचे सर्वात मोठे आश्चर्य आणि प्रमुख आकर्षण म्हणजे ‘तांदळापासून बनवलेली आणि एका लिंबावरती उभी असणारी शिवलिंगाची पिंडी! ‘
हो, अगदी बरोबर ऐकलेत तुम्ही! कोरड्या तांदळाचे दाणे जोडून बनवलेली ही अत्यंत नाजूक आणि अद्भुत पिंडी एका छोट्याशा लिंबावर संतुलित (Balance) करून उभी केली जाते. हे नयनरम्य रूप पाहण्यासाठी आणि महादेवाच्या कृपेचा वर्षाव अनुभवण्यासाठी प्रत्येक श्रावणी सोमवारी तिथे तब्बल एक लाखाहून अधिक भाविक हजेरी लावतात. यात्रेनिमित्त मंदिराच्या परिसरात कुस्त्यांचे भव्य फड रंगतात.
तसेच, या मंदिराला आणखी एक महान आध्यात्मिक परिमाण लाभले आहे. मंदिराच्या अगदी शेजारीच संत तुकाराम महाराजांचे गुरु श्री बाबाजी चैतन्य महाराज यांचे संजीवन समाधी मंदिर आहे. महाराष्ट्रातील प्रमुख तीन संजीवन समाधींपैकी ही एक मानली जाते. विशेष म्हणजे, ज्या मंत्राने संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायात दुमदुमून जातो, त्या ‘राम कृष्ण हरी‘ या जगप्रसिद्ध महामंत्राचे उगमस्थानही हेच पावन क्षेत्र आहे!
मंदिराचा अलौकिक इतिहास आणि नामकरण
गुगल बाबांनी मंदिराच्या स्थापनेची ही कथा अत्यंत रंजकपणे सांगितली होती. सन १२०० च्या शतकात श्री बाबाजी चैतन्य महाराज मांडवी नदीच्या तीरावर एकाग्र चित्ताने अनुष्ठानाला बसले होते. अनुष्ठान करत असताना त्यांनी भक्तीभावाने नदीकाठच्या वाळूचे एक शिवलिंग तयार केले. वाळूचे शिवलिंग बनवत असताना, त्या वाळूमध्ये महाराजांना अचानक एक छोटीशी ‘कवडी’ सापडली. आश्चर्य म्हणजे, जेव्हा त्यांनी ती कवडी निरखून पाहिली, तेव्हा त्या चिमुकल्या कवडीच्या पोटात त्यांना नैसर्गिक शिवलिंग आढळून आले!
संस्कृत भाषेमध्ये ‘कवडी’ला ‘कपर्दीक’ असे म्हटले जाते. याच कवडीत सापडलेल्या शिवलिंगावरून या मंदिराचे नाव ‘कपर्दिकेश्वर’ असे पडले. पुढे सन १२-१३ व्या शतकात या शिवलिंगाची रीतसर भव्य मंदिरामध्ये स्थापना करण्यात आली.
मंदिराचे भौगोलिक स्थान तर अप्रतिम आहे. चंद्राकार वळण घेणाऱ्या मांडवी नदीच्या तीरावर, हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत हे पुरातन, भव्य दगडी मंदिर दिमाखाने उभे आहे. शिवलिंगाच्या स्थापनेच्या काळापासूनच येथील पुजाऱ्यांनी एक अनोखी परंपरा सुरू केली. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर कोरड्या तांदळाची भव्य पिंडी बांधायची आणि ती एका लिंबावर तोलून धरायची! शतके उलटली, पिढ्या बदलल्या, पण ही तांदळाच्या पिंडीची अद्भुत परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि निष्ठेने सुरू आहे.
या मंदिरात वर्षभर अनेक सण उत्साहात साजरे होतात:
१. पवित्र श्रावण महिन्यातील सर्व सोमवार
२. महाशिवरात्रीचा उत्सव
३. त्रिपुरारी पौर्णिमा
४. बाबाजी चैतन्य महाराजांचा पावन समाधी सोहळा
ही सर्व माहिती वाचल्यानंतर माझ्या मनातील ओतूरला जाण्याची उत्कंठा हजार पटीने वाढली होती.
माझा असा वैयक्तिक विचार आहे, की ज्या ठिकाणी आपण दर्शनाला किंवा फिरायला जाणार असू, त्याची माहिती आधीच मिळवावी; आणि तिथे जाऊन आल्यावर मिळालेला आनंद आणि अनुभव इतरांना सांगावा.
त्यानुसार, ठरलेल्या श्रावणी सोमवारी आम्ही सर्व मैत्रिणी भल्या पहाटेच गाडी काढून ओतूरच्या दिशेने निघालो. मनात कपर्दिकेश्वराच्या दर्शनाची तीव्र ओढ होती, तांदळाची ती अद्भुत पिंडी डोळ्यांत साठवून घ्यायची होती आणि लहानपणी पाहिलेली ती जत्रा पुन्हा एकदा अनुभवायची होती. गाडीत जाताना आम्ही आपापसात गप्पा मारत होतो “आपण पहाटेच निघालोय, म्हणजे सकाळी लवकर पोहोचू. फार गर्दी नसेल. तासभरात दर्शन आटोपले की मग आजूबाजूला अजून कुठे कुठे फिरता येईल? ” आम्ही तर दुपारच्या नंतरचा प्लॅनही गाडीतच आखून टाकला होता.
पण आमचा खरा हेतू त्या ‘मोक्षदात्या’ कपर्दिकेश्वराचे दर्शन घेणे हाच होता.
सकाळी सकाळी आम्ही ओतूर येथे पोहोचलो. पण तिथे पोहोचताच आमचा पहिला अंदाज चुकला! मंदिराच्या २ किलोमीटर आधीच भव्य गाडी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. पुढे गाड्या नेण्यास सक्त मनाई होती. गाडी पार्क करून आम्ही बाहेर आलो, तर समोर अथांग जनसागर पसरला होता! पार्किंगपासून मंदिरापर्यंतचा तो २ किलोमीटरचा रस्ता म्हणजे एक भलीमोठी आणि रंगीबेरंगी जत्रा होती.
त्या जत्रेतील दुकाने पाहून कोणत्याही स्त्रीचे मन भुलून जावे, असा तो नजराणा होता! निरनिराळी चमकणारी ज्वेलरी, काचेच्या आणि धातूच्या बांगड्या, स्वयंपाकघरासाठी लागणारी नवनवीन भांडी, नक्षीदार पिशव्या, हेअर पिन्स, रंगीबेरंगी क्लिप्स… अगदी काय बघू आणि काय नको, अशी आमची अवस्था झाली होती. सोबतच विविध खाद्यपदार्थांचे आणि मिठाईचे खमंग स्टॉल्स सुटलेल्या वासाने आमची परीक्षा घेत होते.
पण आम्ही अगदी निग्रहाने, मनावर दगड ठेवून त्या सगळ्या मोहाकडे दुर्लक्ष केले. गर्दी इतकी अलोट होती, की एकमेकींचा हात सुटण्याची भीती होती. म्हणून आम्ही एकमेकींचे हात घट्ट धरून चालत होतो. मैत्रिणी एकमेकींना समजावत होत्या, “आधी दर्शन घेऊया. मग येताना निवांत खरेदी करू! ” कारण पुढे काय वाढून ठेवले आहे, याची आम्हा कोणालाच कल्पना नव्हती.
— क्रमशः भाग पहिला
© विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




