डाॅ. मीना श्रीवास्तव
जीवनरंग
☆ तुटकी पेन्सिल – भाग २ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
डॉ. हंसा दीप
(घरी परतताना अंशू माझ्यावर अपमानजनक शब्दांची बॉम्बफेक करायला जणू टपलेलेच होते. “तू जर थोडी काळजी घेतली असती तर ही परिस्थिती भोगावी लागली नसती. तुझ्या घरातल्या लोकांचे काय काय झाले हे तुला माहिती नव्हते कां?”)
इथून पुढे – –
आता मात्र माझ्या धैर्याची कमाल मर्यादा संपली होती. “जरा सांगता कां मी कोणती काळजी घेतली नाही?”
“ठीक आहे! सगळ्यांची फोड करून सांगू का बाई? पाव-भाजी कोण चापून खातं चांगलं वरून भरभरून लोणी घालून?”
“मी… पण… ”
अंशूने मला पुढे बोलूच दिले नाही आणि मला थांबवत रागाने बोलताच राहिले, “आणि हो, रव्याचा शिरा, बदामाचा शिरा, झालंच तर मुगाचा शिरा घरात सगळ्यात जास्त कोणाला आवडतो? छोले भटूरे, बटाट्याची भाजी व पुऱ्या सारखं सारखं कोण बनवतं? आरोग्याला पोषक असलेल्या सॅलडला ‘गवत-पालापाचोळा’ सारखी शेलकी नांवे ठेवत कोण हात लावत नाही? दिवसातून चार वेळा चहा कोण पीत असतं? आणि ऐका बाईसाहेब! कोणाच्या ताटात सर्वात जास्त जिलेब्या आणि गुलाबजाम असतात?”
अंशूच्या रंगाचा पारा खरोखरच अस्मानाला भिडला होता.
मी अगदी असहाय्यपणे रडायला लागले होते. जणू ते प्रत्येक क्षण भरल्यापोटी मलाच हिशेब मागत होते आणि माझे गणित अगदीच कच्चे असल्याने मी रडवेली होऊन त्या अंकांच्या जुलूमाचे ओझे सहन करीत आसवांच्या प्रत्येक थेंबात माझी असहाय्य स्थिती व्यक्त करत होते. ऐकिवात होते की बायकोचे अश्रू नवऱ्याच्या रागावर पाणी फेरतात. उलट इथे तर त्यांनी जणू आगीत तेल ओतले. त्यामुळे अंशूचा क्रोधाग्नी अजूनच भडकला. “आता असं रडून काय उपयोग आहे? निदान माझ्याबद्दल विचार करून तरी स्वतःची काळजी घ्यायला हवी होतीस ना. जसं कांही तुला माहित नाही की तू गेल्यानंतर माझे काय होईल! मी जिवंत असूनही मेल्यासारखाच असेन. “
कुणास ठाऊक की हे प्रेम होते, आरडाओरडा होता की राग! जे काय असेल ते, पण माझ्या भावनांचा बांध पार फुटून जाण्यासाठी पुरेसे होते. आतून माझी शकले होत असतांना देखील माझे अंतरिम विचार-तर्क माझ्या बचावाची खिंड लढवीत प्रयत्नांची शिकस्त करीतच होते. “पण कुठे ना कुठे कांही तरी दिसायला हवे होते. मला कुठेही ना वेदना होत आहेत ना कोणती लक्षणे आढळली आहेत!”
“लक्षणे गेली खड्ड्यात. कोविडच्या काळातही लोक लक्षणांशिवाय मरत होते ना. तुला माहिती नाही का?”
आता निराशेने आणि अगतिकतेने कळस गाठला होता. हृदयाच्या आत इतके दिवस साचलेले दुःख वितळून गेले होते व अश्रूंच्या रूपात डोळ्यांतून झरझर पाझरत होते. माझे सगळे आवडते पदार्थ माझ्याभोवती फेर धरून ता-थई-थईच्या तालावर नाचत होते. मरणासन्न मंद प्रकाशाने माझा चेहरा फिकुटला होता. मला कधीही अन्नाची हाव नव्हती, पण या घडीला माझ्यावर लादलेला हा प्रचंड आरोप स्वीकारण्याशिवाय मला गत्यंतर नव्हते.
“खाऊ शकते, म्हणून कधीतरी त्या गोष्टी खाते. ” असे शब्द माझे शस्त्र असायचे.
घरी परतल्यावर, अंशूने दोन्ही मुलांना अशा प्रकारे समजावून सांगितलं की त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माझ्यासोबत संपूर्ण वेळ राहण्याचा निर्णय घेतला. असे वाटत होते की जणू डॉक्टरांनी अंशूला माझ्याविषयी अशी कांही माहिती दिली आहे, जी मला ठाऊक नव्हती आणि ती इतक्या टोकाची होती की मी आता या आजारातून वाचू शकणार नाही. माझ्या माघारी तिघेही गुपचूप हेच बोलत असावेत असे मला वाटायला लागले.
मी कांही गोष्टी ऐकल्या, तर कांही ऐकून न ऐकल्यासारख्या केल्या.
“पोरांनो! आईला सांगू नका बरं. त्या आपल्या घरासमोर राहणाऱ्या विसूकाकांची अगदी अशाच अवस्थेत चाचणी केली होती. बिचारे ट्रेडमिलवर जे बेशुद्ध पडले ते कधीच उठले नाहीत. “
“त्यांचं सोडा हो बाबा. इतकं देखील दूर जाण्याची गरज नाही. खुद्द आमच्या मामांना पण असंच झालं ना. आठवतंय? घरी जातांना रस्त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. “
याचा एकंदरीत अर्थ असा होता की मी ट्रेडमिलवर पडणार हे निश्चित झाल्यासारखेच होते. जाण्यापूर्वी घर व्यवस्थितपणे लावून जाण्यासाठी माझ्याकडे अद्याप आठ दिवस उरले होते. मात्र सर्वप्रथम मी माझ्या शैक्षणिक जबाबदाऱ्या अशा रीतीने पूर्ण केल्या की जेणेकरून, मी गेल्यावर उर्वरित सत्रात माझ्या विभागाला आणि माझ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये.
मी माझ्या दोन्ही मुलांजवळ माझ्या दागिन्यांच्या पेटीचे सविस्तर वर्णन केले: “सर्व दागिने बँकेच्या लॉकरमध्ये आहेत. माझ्या सवयीप्रमाणे मी घरातल्या कानाकोपऱ्यात लहान सहान दागिने लपवलेले आहेत. पोरी, तुला न बघता वस्तू फेकून देण्याची सवय आहे. तेव्हा आता तरी काहीही फेकण्यापूर्वी ते नीट तपासून पाहत जा. जितके आठवते आहे ते एका ठिकाणी ठेवते आहे. घर आणि गाडी यांच्याविषयी कांही समस्या असेल तर तुमचे पप्पा बघून घेतील. “
या दिवसांत गवत- पालापाचोळा (सॅलड) खातांना, अगतिक अवस्थेत अधूनमधून आसवांचे थेंब टपकायचे, जणू डोळ्यांच्या कोपऱ्यात ते वाटच बघत असायचे की मी केव्हां थोडी तरी उदास होईन आणि त्यांना बाहेर वाहत येणाची संधी मिळेल. रागाच्या भरात मी माझा अतिप्रिय चहा पिणे देखील बंद केले. ही मी स्वतःला दिलेली खूप भयानक अशी अंतिम शिक्षा होती. त्याचा माझ्या मनावर आणि मेंदूवर विघातक परिणाम असा झाला की त्या ठणक्याने माझे डोके फुटायची वेळ आली होती.
दवाखान्यातून सतत फोन येत होते: “ही पाच ते सात तासांची चाचणी आहे. त्याच्या चोवीस तास आधीपासून कॅफिन (चहा-कॉफी) घेणे बंद करा. बारा तास आधीपासून काहीही खायचे नाही. सकाळी उठल्यावर थोडेसे पाणी पिऊन या. सोबत काही नाश्ता नक्की घेऊन या. “
प्रत्येक सूचनेबरहुकूम परिस्थितीचे गांभीर्य वर्धमान होत होते. मी रोगग्रस्त असल्याची भावना माझ्या डोक्यात अधिकाधिक तीव्रतेने रुजत गेली.
आता शेवटचे कार्य उरले होते. ते म्हणजे माझी अमूल्य संपदा सोपवणे. “अंशू, हे सगळे माझ्या रचनांचे बाड आहे. त्यातील बहुतेक रचना प्रकाशित झाल्या आहेत, पण काही प्रकाशित व्हायच्या बाकी आहेत. कृपया मी गेल्यावर या कथांचा संग्रह प्रकाशित कराल. ” हे सांगता सांगता माझा कंठ दाटून आला आणि त्यातून आवाज देखील फुटेना. आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांना सोडून जातांना त्यांच्या शेवटच्या स्पर्शाने कासावीस होऊन आतल्याआत घुसमटत धाय मोकलून रडत असते तसे माझे झाले होते.
परिस्थितीचे गांभीर्य जाणून घेत अंशूने मला आश्वासन दिले, “काळजी करू नकोस, मी तुझे पुस्तक छापून त्याचे प्रकाशन देखील करीन. “
त्या दिवसांत अंशू क्षणभरही माझी साथ सोडत नव्हते. या वागण्याने माझे दिवस भरले आहेत या जाणीवेची पुष्टीच होत होती. मध्यरात्री मी जराशीही हालचाल केली तर ते लगेच विचारायचे, “काय झालं? कांही होतंय कां?”
कहर म्हणजे मधेच रात्री झोप उघडल्यावर मी उठून टॉयलेटकडे जायला निघाल्यावर त्यांचा विचित्र प्रश्न असायचा, “तू टॉयलेटला कां जाते आहेस?”
“टॉयलेटला कोणी कां जात असतं?” या असंबद्ध प्रश्नावर हसावं की रडावं हे कळेनासे होऊनही अंशूवर चिडायची सोय नव्हती. ही नाजूक वेळ वादविवाद करण्याची नव्हती. चाचणीच्या दोन दिवस आधीपासून माझी झोप, माझे जेवण, इत्यादी नित्यक्रमांवर बारकाईने लक्ष दिल्या जात होते. त्या रात्री झोपणे खूपच अवघड झाले होते. मी कित्येक वेळा उठून बघत घड्याळाचे काटे पाहत होते की अजून त्याचा गजर कां होत नाहीय.
शेवटी एकदाची ती काळरात्र सरली आणि मी सर्व आवरत आंघोळ करून तयार झाले.
मी दवाखान्याच्या परिसरात गेल्यावर एका रुग्णाच्या भूमिकेत जात तेथील खुर्चीत स्वतःला अक्षरशः कोंबले. नर्सने माझ्या नांवाचा पुकारा करताच अंशूने मला घट्ट आलिंगन दिले, जणू तो त्यांचा शेवटचा चैतन्याने भरलेला आणि भारलेला स्पर्श होता, ज्याला ते स्वतःच्या अंतरंगात आतवर त्याचा अनुभव समाहित करण्याचा प्रयत्न करीत होते. मला रुग्णांचा गणवेश असलेला एक गाऊन घालण्यास सांगितले गेले. माझ्या छातीवर तारांसह अनेक चिकट पॅचेस जोडले गेले. अंगात गणवेश आणि मास्कने नाकतोंड झाकून लगबगीने यंत्रमानवासारखे सर्वत्र संचार करणारे तेथील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, इत्यादी व्यावसायिक तर मला मृत्यूची प्रमाणपत्रे बनवणारे यमदूतच प्रतीत होत होते.
मला एका किओस्कमध्ये बसवण्यात आले आणि सांगण्यात आले, “प्रथम, तुम्हाला आयव्ही इंजेक्शनद्वारे शिरेत (व्हेन) किरणोत्सर्गी रसायनाचे इंजेक्शन टोचण्यात येईल. ठराविक काळानंतर, हे ट्रेसर (माग काढणारे रसायन) तुमच्या शरीरातील शिरांतून मधून कसा प्रवास करते त्याचे एका इमेजिंग मशीनद्वारे अनेक फोटो घेतल्या जातील. यामुळे हृदयाच्या रक्तप्रवाह मंद झालेल्या आणि हृदयाला इजा पोचलेल्या क्षेत्रांचा नेमका शोध घेण्यास मदत होईल. ”
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या नर्सला दहा मिनिटे उलटून गेल्यावर देखील आयव्हीसाठी माझ्या हाताची शीर सापडली नाही. यासाठी तिने माझ्या दोन्ही हातांमध्ये दोन-तीन वेळा जोरात सुई घुसवली. जर हे अन्य वेळी घडले असते तर, मी तिला अशा भेदक नजरेने पाहिले असते की ती पुढील वेळेस रुग्णावर असे अत्याचार करण्यास धजावली नसती. पण आता या क्षणी परिस्थिती वेगळी होती. मरणाच्या दारात असलेल्याने कुणास शिव्या-श्राप देणे योग्य नव्हते.
– क्रमशः भाग दुसरा
मूळ हिन्दी कथा : ‘ टूटी पेन्सिल ‘.
मूळ हिन्दी लेखिका : डॉ. हंसा दीप
अधिव्याख्याता, टोरोंटो विद्यापीठ, कॅनडा
संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada
दूरभाष – 001 + 647 213 1817, ई-मेल – hansadeep8@gmail.com
मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे (पश्चिम)
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







