डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग  ?

☆ सार्थक… भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले

माधव खिन्नपणे वाड्याच्या पायरीवर बसून होता. यात्रेला गेलेले नाना माई दुर्दैवाने घरी परतलेच नाहीत. हौसेने माधव त्यांना यात्रा कंपनीबरोबर पाठवतो काय आणि गाडीला अपघात होऊन सगळेच्या सगळे प्रवासी दगावतात काय… माधवला अतिशय वाईट वाटलं. माझ्याच हाताला यश कसं नाही म्हणत तो उदास झाला.

शेजारच्या जानकीकाकू त्याच्याजवळ येऊन बसल्या. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या,

“अरे माधवा, या गोष्टी दैवाधीन असतात. तू कुठेही कमी पडला नाहीस बरं पुत्रकर्तव्यात. घे हा चहा, बरं वाटेल तुला. “ मायेने चहाचा कप त्याच्या हातात ठेवत काकू म्हणाल्या.. “ आणि आता जेवायला ये आमच्याकडे थोडे दिवस. का डबा पाठवू? ” माधवने मान हलवली.

“ काकू, आज चार दिवस झाले माईनाना जाऊन. कुसुम कुमुद आल्या आणि लगेच गेल्या. अमेरिकेला असलेला सुरेश उद्या पोचेल. तो म्हणाला होता, माझ्यासाठी थांबू नका. तू सगळे अंत्यसंस्कार करून घे. बरोबर आहे त्याचंही. माझ्या परीने मी सगळं नीट केलं हो. ” 

“अरे अगदी बरोबर केलंस माधव. मोठा मुलगा म्हणून सगळी कर्तव्ये पुरी केलीस हो. बघतोय ना आम्ही सगळे… चार मुलं तुम्ही नाना माईना. कुसुम कुमुद तर पक्क्या स्वार्थी. नवरे तसलेच त्यांचे.. हावरट. धाकटा सुरेश गेला परदेशात. कधी काय केलं कोणी आईबापांचं?  कधी नेलं का कौतुकानं परदेशात, का घर दाखवलं स्वतःचं?  मोठं कौतुक सांगते कुमी पण कधी आईबापांना नाही न्यावंसं वाटलं आपल्या शेतावर?

का कधी मूठभर धान्य नाही आलं माहेरी आईवडिलांसाठी. आम्ही काय बघत नाही का?  मी आणि माई घट्ट मैत्रिणी. त्या सगळं सांगायच्या हो मनातलं मला. त्यांना वाईट वाटायचं. एवढे न पेलवणारे खर्च करून लग्न करून दिली पण पोरींना कधी चुकूनसुद्धा बोलवावंसं वाटत नाही आईबापांना असं म्हणायच्या. जाऊ दे झालं.. पण तू काळजी घे हो स्वतःची “.

माई निघून गेल्या आणि माधव घरात आला. एवढ्या मोठ्या घरात आता अगदी एकटा उरला होटा तो. आठवणींनी फेर धरला माधवभोवती.

… लहानपणीचे दिवस आठवले माधवला. ही चार भावंडं त्या घरात. माधव सगळ्यात मोठा. पाठोपाठच्या बहिणी कुसुम कुमुद आणि धाकटा सुरेश… खूप सख्य होतं सगळ्या भावंडांचं. माधव मोठा म्हणून दादा दादा करत सगळी धाकटी त्याच्या मागे मागे असत. माधव अभ्यासात खूप हुशार नव्हता पण मेहनती होता.. प्रामाणिकपणे प्रयत्न करून नेहमी उत्तम गुण मिळवायचा. धाकटा सुरेश सगळ्यात हुशार आणि माई नानांचा लाडका. हे पोर आपले पांग फेडेल बघा नाना, असं माई नेहमी म्हणायच्या. कुमुद कुसुम डोक्याने अगदी बेताच्या.

नानांची साधी कारकुनाची नोकरी आणि एवढा मोठा प्रपंच. पण सुदैवाने स्वतःचा वाडा आणि चार भाडेकरू भाडे देत म्हणून त्यांचं नीट भागत असे. धान्य शेतावरून येत असे भरीला. मुलांचे लाड करणं फारसं शक्य नसलं तरी व्यवस्थित खायला प्यायला आणि कपडालत्ता कमी नाही पडू देत नाना.

या सगळ्या मुलात स्वभावाने अत्यंत लाघवी आणि गुणी होता तो माधव. आपल्या आईवडिलांवर त्याचं विलक्षण प्रेम. सगळ्या चारही मुलात माधव उंचापुरा आणि देखणा दिसायला लागला होता.

एक दिवस ही मुलं त्यांच्या गावाबाहेरच्या शेतात दिवसभर हिंडायला, गंमत करायला म्हणून त्यांच्या खंडकऱ्याबरोबर गेली. दिवसभर खूप खेळली, विहिरीत मनसोक्त पोहली. मनसोक्त चिंचा खाल्ल्या, पिठलं भाकरी ठेचा खाल्ला. येताना चारी भावंडे रमत गमत शेतातून येत असताना अचानक शेतकऱ्याचा बैल उधळला. बघेबघेपर्यंत तो या मुलांच्या जवळ आलाच. मुलं घाबरली. माधवने तिघांना आपल्याजवळ ओढले आणि तो पुढे उभा राहिला. जोरात येणाऱ्या बैलाने माधवला जोरात धडक दिली आणि तो वेगाने पुढे सुसाट धावत गेला. त्याच्या धडकेने माधव जोरात कोसळला आणि त्याच्या पायाला जबरदस्त मार लागला.

शेतकऱ्याने त्याला बसवलं, पाणी दिलं आणि गाडीत बसवलं. सगळ्यांना घरी आणून सोडले.

काय घडलं ते सांगितलं. माधवमुळे आज सगळी मुलं सुखरूप राहिली आणि त्याने बैल आपल्या अंगावर घेऊन मुलांना वाचवलं हेही त्याने नानांना सांगितलं.

नाना माधवला डॉक्टरकडे घेऊन गेले. माधवचे मांडीचे हाड दुखावले गेले होते. आणि बारीक चीर गेलेली दिसली एक्सरेत. डॉक्टरांनी त्याला हलकं प्लास्टर घातले. महिन्याने प्लास्टर काढले. माधवच्या वेदना पूर्ण थांबल्या होत्या. पण चालताना तो थोडा लंगडू लागला. त्या पायावर भार त्याला सहन होईना. जरी फ़िजिओ थेरपी घेतली तरी माधवच्या पायात दोष राहिलाच. तो जरा लंगडतच चालायला लागला.

नानांना वाईट वाटे की काहीही कारण नसताना माधवला हे व्यंग आले पण त्याहून जास्त वाईट त्यांना याचे वाटायचे की ज्या भावंडांसाठी त्याने हे केलं त्यांना त्याचं काहीच सोयरसुतक नव्हतं की नव्हती कृतज्ञता.

… नाना आपल्या मुलांना पुरते ओळखून होते.

दिवस भरभर निघून गेले. सुरेश शहरात निघून गेला. स्कॉलरशिपवर शिकला. कमी पडणारे पैसे न्यायला फक्त तो नानांकडे येई. इतकाच संबंध त्याचा घराशी. त्याला घराची, भावंडांची नाना माईंची ओढ कधीच नव्हती.

… कुसुम कुमुद दोघी लागोपाठच्या. दिसायला साधारण. जेमतेम मॅट्रिक झाल्या आणि म्हणाल्या..

” माईआम्हाला नाही पुढे शिकायचं. ” 

नानांनी निमूट स्थळं बघायला सुरुवात केली. या फक्त मॅट्रिक आणि दिसायला बेताच्या. मुलींना लांब गावचे कमी शिकलेले पण परिस्थितीने भक्कम, शेतीवाडी असलेले मुलगे मिळाले.

पार लांब बऱ्हाणपूर आणि अमरावती जवळचे. नाना माईनी रीतसर हुंडे मानपान करून लग्न लावून दिली.

सुरेश इंजिनिअर झाला आणि अमेरिकेला निघून गेला. माधवला आधीच बँकेत नोकरी लागली होती. ,

आता त्या वाड्यात उरले फक्त तीन जीव… म्हातारे नाना माई आणि माधव.

“अरे माधवा, सगळे आपला आपला मार्ग शोधून निघून गेले. तू का असा एकटा रहातोस?  अजूनही लग्नाचं वय गेलं नाही तुझं. किती मुली बघितल्या पण तू तयारच होत नाहीस. काय कमी आहे तुझ्यात माधव? देखणा तर अजूनही दिसतोस, बँकेत चांगली नोकरी आहे. आमच्यासाठी म्हणूनच केवळ प्रमोशन्स घेत नाहीस. काय म्हणावं तुला?  अरे, त्या सुरेशने तिकडे गोऱ्या मुलीशी लग्न केलेसुद्धा. कधी आईवडिलांना नाही, की भावाला नाही बोलवावेसे वाटले रे त्याला तिकडे?  गेलो असतो की आमचा खर्च करून. स्वार्थीच रे सगळे. ” 

“ त्या दोघी पोरी तसल्याच. ” माई उसासून म्हणाल्या. ” मध्ये नाना किती आजारी होते. मुलींना म्हटलं अग माधवला फार पडतेय ग एकट्याला. त्यांना हॉस्पिटलला ठेवलंय. माधवची फार तारांबळ होतेय. निदान दोघी आठ दिवस तरी या. ” माईनी डोळ्याला पदर लावला. “ पण नाही आल्या. निरोप आले फक्त की ‘ नाही ग जमत माई. मुलांच्या परीक्षा, सासरची कामे. किती म्हणून सांगू? तुम्हाला कल्पनाच नाही यायची तिकडे बसून. आहे ना तिथे माधव?  माई दोन नोकर आणखी ठेव की ग. सुट्टीत बघतो जमलं तर. ’ – असल्या या कार्ट्या. माधवा, तुझ्यासाठी जीव तुटतो रे बाळा. छानशी मुलगी बघ आणि कर लग्न. किती अडकशील आता आमच्यात? ”

नाना त्या दिवशी झोपाळ्यावर एकटेच बसले होते.

“ येरे माधवा. हे बघ. ” 

“ काय आहे हे नाना? ”

“अरे आम्ही आता पिकली पानं. माझ्या जोशी वकिलांकडून आमचे हे मृत्युपत्र तयार करून घेतलं आहे.

उद्या सरकारी कचेरीत रजिस्ट्रेशन आहे. बघून घे एकदा. ” 

माधवने बघण्यास नकार दिला पण नाना ठाम होते.

– – या मृत्युपत्राद्वारे नानांचा हा भला मोठा वाडा फक्त माधवला दिला होता. शेत माधवच्या नावे केलं होतं. मुलींना माईंचे अर्धे अर्धे दागिने वाटून घ्या असं लिहिलं होतं. आणि सुरेशला बँकेतल्या पन्नास हजारच्या एफ डी.. बस्स.

“ नाना, हे काय?  मला हे काही नको. मला हे काय करायचंय एकट्याला?  अशी चुकीची वाटणी नका करू. ”

नाना म्हणाले, “ बरोबरच करतोय आम्ही. मुली म्हणून, मुलगा म्हणून कोणती कर्तव्ये केली बाकीच्यांनी? अर्थात आमची अपेक्षाच नाहीये रे. पण मग या जगात तू एकटा पडशील. नाही मांडलास संसार की नाही केलंस लग्न. कोण घेईल तुझी काळजी बाबा पुढे? काही नाही तर तू वाडा विकून टाक आणि बदली घे करून शहरात. तुझं तू ठरव. पण आता यात बदल होणार नाही. मी याच्या चार कॉपी काढून घेईन आणि आमच्या पश्चातच तू तुझ्या भावंडाना त्या दे. ”, नाना थकून बोलायचे थांबले.

– क्रमशः भाग पहिला

***

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted