श्री प्रदीप केळुस्कर 

?जीवनरंग ?

☆ हे देवा म्हाराजा…- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(त्याने मुलाला हाक मारली “झिला, हो धंदो काय चालणा नाय, इतक्या माणसाक दोन वेळा तोंडात घालूक व्हया कायतरी, काय तरी धंदो पाणी करूंक व्हयचं. तू असा कर, मी तुका भाजी घेऊन देताय, तुझ्याकडे होयत्त फुरफ़ुरा आसा, तेच्या पाठी भाजी बांध आणि सगळे बाजार कर. येताना मिरची, कोथिंबीर, टमाटे, आला आणलंस, की हय मी विकीन, तुजा काय मत ‘.

सतीश म्हणाला ” होय बाबानू, मी माज्या गाडयेर भाजी घेऊन जाईन, त्या पैशातून थोडी मिरची, कोथिंबीर आणीन बाकीचे पैसे परत तुमच्यकडे, परत भाजी घेऊक होई मा ‘.) 

इथून पुढे – – 

प्रभाकरने मनावर घेतलेच. गावात फिरून बाराशे रुपयाची भाजी खरेदी केली, सतीशने भाजी गाडीच्या मागच्या बाजूला बांधली आणि गाडीला किक मारून निघाला.

प्रभाकरला अंदाज होता अंदाजे सतराशे अठराशे रु यायला पाहिजेत. त्यातील दोनशे रु पेट्रोल खर्च वजा केले तरी चारशे रु फायदा. तीन चार बाजार केले तर आठवड्याला पंधराशे रु मिळायला हरकत नाही, म्हणजे माहिन्यला सहा हजार रु कमीतकमी. पुढे अजून भाजी खरेदी करू…

प्रभाकर पानपट्टी स्टॉलवार बसून झिलाची वाट पाहत होता.

चार वाजता मुलगा आला, गाडी घेऊन.

” काय भाजी खपली सगळी, मी म्हंटलाय ना, आमच्या गावच्या भाज्येक खुप मागणी आसा म्हणून, पैसे किती इले?

सतीशने खिशातून सहाशे रु काढून दिले.

“अरे इतकेच, बाकी भाजी रवली की काय ‘.

” नाय हो बाबानू, वासू गावलो, तो म्हणालो बिअर पिऊया, म्हणून चार बाटले बिअर पिलव, तेका आठशे रु सरले, तरी चकण्याचे पैसे वासून दिले ‘. ” म्हणजे भाजीच्या पैशाची दारू पिलात,?

” नाय हो बाबानू, बिअर म्हणजे दारू न्हय, काळ्या बाटलीतून गार पाणी असता, डोक्या हलक्या होता, तुमका एक बाटली हाडलंय, देव..

” अरे… च्या, भाजयचे पैसे सरवलंस तू, आणि वार सांगतंस, बिअर म्हणजे दारू न्हय, आता भाजी घेतलंय, तेंका काय देव मी ‘.

आणि प्रभाकर रडू लागला.

प्रभाकर परत चिंतेत पडला, संसार कसा चालवावा? पैसे कसे मिळवावे? कुठल्याही धंद्यात यश नाही त्यात मुलगा बेजबाबदार. त्याला कशाचे काही पडलेले नाही, व्यसनी झाला आहें, किती शिव्या घातल्या तरी निर्लज्ज. मोहिनी च्या लग्नाचे बघायला हवे म्हणून बायको डोके खाते आहें, भाऊ किरण आपल्यावर विसंबून, त्याची बायको मात्र मेहनती,. एवढ्या माणसांना शिजवायचे काय..

प्रभाकरला रात्र रात्र झोप येत नव्हती, एक दिवस सकाळी पाच वाजता कोणी दार ठोठवले म्हणून प्रभाकरने दार उघडले, तर वाडीतला गणू.

” काय रे, सकाळी सकाळी खय?

“अरे रात्री सादेव गेलो.

“अरे, मग माका कसा कळवलात नाय ‘. “रात झालेली, त्यात तुका हल्ली झोप नसता म्हणून म्हंटला पहाटे कळविया ‘. बरा बरा, मी येतय ‘

प्रभाकरने मुलाला हाक मारली आणि सहदेव गेला असे सांगून तू लाकडे तोडायला जा, असे सांगून तो खान्द्यावर टॉवेल टाकून सहदेवच्या घरी गेला.

सहदेवच्या घरी हळूहळू वाडीतील तसेच नातलगे जमा होऊ लागली होती, प्रभाकर घरात गेला आणि त्याने सहदेवच्या मुलांना जवळ घेतले, त्यांना शांत केले आणि तो सहदेवच्या प्रेतापाशी येऊन बसला.

त्याच्या मनात आले, सहदेवच्या अंगात यायचे, त्याच्यामुळे माणसे यायची, मी गाऱ्हाने घालायचो आणि त्याने अंग सोडल की त्याला त्याला पकडून शांत करायचो, त्यामुळे आपल्याला दोन पैसे मिळायचे आणि लोक येऊन नमस्कार पण करायचे. आता सहदेव पण गेला. वार बंद, म्हणजे वाऱ्याला येणारी माणसे बंद म्हणजे आपली कमाई (तशी ती चार महिने बंदच होती) पण आता कायमची बंद.

म्हणजे ही कमाई यापुढे नाही. काही तरी करायला हवे.

स्मशानात पण वाडीतल्या लोकांची आणि गाववाल्यांची हीच चर्चा आणि काळजी

“सादेव गेलो आता देवा धर्माचा कसा होतला? सगळ्यांच्या अडी अडचणीक सादेव होतो म्हणजे सदेवाच्या अंगातलो देव होतो. सदेवाच्या मुखातून देव अडी अडचणी दूर करी, आता पुढे काय?

सहदेव ला पोचवून प्रभाकर आणि त्याचा मुलगा सतीश घरी आले, प्रभाकरला वाटतं होत, पुढे फक्त अंधार आहें, आता हा अंधारातून वाट कशी मिळणार? सहदेवची जागा मोकळी झाली आहें, देव आणि भक्त या मधील जागा मोकळी आहें, कोण भरून काढणार ही पोकळी?

विचार करता करता प्रभाकरला आयडिया सुचली. ही कल्पना आधी का नाही सुचली, असे त्याला वाटले, तो मनोमन खूष झाला, असे झाले तर सगळ्या विवंचना सुटणार होत्या.

सादेव चें सुतक होते तो पर्यत तो गप्प बसला. सुतक संपल्याबरोबर त्याने मुलाला बोलावले, आजूबाजूला कोणी नाही असे पाहून हळू आवाजात तो बोलू लागला

” झिला, आता सादेव गेलो, आमच्या देवाचा वारा त्याचार येय, आता आमी पोरके झालाव, पण सदेवा नंतर कोणाच्या अंगात देवाचा वारा येऊक व्हया सांग?

“कोणाच्या बाबानू…

“अरे माज्या ‘

तुमच्या?

अरे सदेवाच्या वाऱ्याक गाऱ्हाणं कोण घाली सांग?

तुमी बाबानू..

तेना वारा सोडला काय सदेवक कोण पाठसून धरी?

तुमी बाबानू..

मग सदेवा नंतर कोणाच्या अंगात वारा येतला सांग?

तुमच्या बाबानू… पण देव तुमच्या अंगात येत?

“अरे नाय इलो तर तेका हाडूचो लागतलो?

” खायसून हडतलात?

“ता मी काय ता बघताय, तू एक काम कर, देवाचा गाऱ्हाणं मी घाली ता पाठ कर आणि मी वारा सोडलंय काय मागसून माका घट्ट पकड आणि जमिनीवर झोपऊन शांत कर ‘

” होय बाबानू ‘

“आणि हय कोंनांक सांगायचं नाय, सांगाल्स तर तुझी चामडी सोलीन ‘

” होय, अरे हो बिन पैशाचो धंदो आसा, माझ्यानंतर तुका गावातलो.

“होय बाबानू ‘

मग माज्या मागे म्हण आणि वारा येताना हय गाऱ्हाणं घाल

“हें देवा म्हराजा.. बारा गावच्या, बारा राठीच्या…

प्रभाकरचा मुलगा दोन दिवसात मस्त गाऱ्हाने घालू लागला. मग प्रभाकरने त्याला अंग सोडले की आपल्याला मागून कसे पकडायचे हें शिकवले.

माघी पंचमीला देवाची जत्रा, दरवर्षी लांबून लांबून या जत्रेला माणसे येत, माहेर वशिणी आपल्या मुलांना देवाच्या पाया खाली घालायला येत, चाकरमानी मुद्दाम मुला बाळांना घेऊन येत, यंदा तसे लोक आले, जत्रा भरली

कोकणातील जत्रा, लहान मोठी दुकानें आली, खाजे, बत्तीशी वाले आले, चहा भजी वाले होते. फ़ुगेवले, आईस फ्रूट वाले आले. माणसे येत होती, देवाला नारळ ठेवत होती, राऊळ गाऱ्हाने घालत होता.

पण लोकांमध्ये उत्साह नव्हता कारण सादेव च्या अंगातील वारे या वर्षी नव्हते. लोक लांबून लांबून त्या करिता येत होती.

देवाचे मानकरी गप्प बसून होते, या वर्षी देवाचे वारे नाही, म्हणजे मजा नाही, नुसती जत्रा कसली, असल्या जत्रा गावात अनेक ठिकाणी होतात, पण सदेवाच्या अंगातील वारे…

सगळे मानकरी बसले होते, त्या ठिकाणी प्रभाकर आला आणि ज्येष्ठ मानकऱ्यांना म्हणाला

‘अन्नानू, ढोल वाजूवून बघूया, सादेव नंतर कोणाच्या अंगात देव येता काय?

देव तसो आपणाक निराधार करुचो नाय,खायतरी आपली कुड ठेऊन जातलो ‘

अण्णांनी परवानगी दिली आणि ढोल वाजू लागले.

“ढुंम ढुंम ढुंम, ढुंम ढुंम ढुंम…

त्या बरोबर प्रभाकरचा मुलगा गाऱ्हाने घालू लागला..

देवा म्हराजा… बारा गावाच्या…

त्या क्षणी सू… सू.. करत प्रभाकर मान हलवत देवा समोर येऊन घुमू लागला. त्या बरोबर सगळे मानकरी जागा सोडून सरसवले आणि एकच गल्ला सुरु झाला

,”वारा इला, वारा इला, प्रभ्याच्या अंगात देव इलो ‘

बाहेर जत्रेत ही बातमी पसरली आणि जत्रा सोडून लोक देवळात धावली. मग मानकरी देवाची खात्री करू लागले आणि प्रभाकरच्या वाऱ्याला प्रश्न विचारू लागले.

अर्थात देवाने बरोबर उत्तरे दिली आणि मानकऱ्यांनी मान हालवली त्या बरोबर लोकांनी जल्लोष केला आणि जत्रेला उत्साह आला.

मग दर सोमवारी, गुरुवारी माणसे जमू लागली, प्रभाकरचा मुलगा गाऱ्हाने घालू लागला, मग प्रभाकर घुमू लागला, लोक पाचशे, सातशे रु ठेऊ लागली आणि सतीशला शम्बर दोनशे रु देऊ लागली. त्याची तो बिअर आणून पिऊ लागला.

प्रभाकरची परिस्थिती सुधारली, रंगीत टी व्ही आला, फ्रीझ आला, मुलाकडे मोटर सायकल आली, मुलीचे धडक्यात लग्न झाले, घर बांधण्यासाठी एका भक्ताने चिरे पाठवले, एकाने सळी पाठवली, दुसर्याने लोखंड, कोणी सिमेंट…

आता प्रभाकर मजेत आहें. त्याला पंचक्रोशीत मान आहें, त्याच्याकडे आमदार खासदार सुद्धा अडचणी मिटवायला येतात.

रोज संध्याकाळी प्रभाकर घरी असतो, तेंव्हा त्याचा पोरगा फ्रीझ मधून गार बिअर काढून ग्लासात ओतून त्याच्या हातात देतो आणि त्याला म्हणतो

” बाबानू, बिअर घेवा, बिअर म्हणजे दारू न्हय, दारू वाईट, बिअर घेतला की टेन्शन कमी होता ‘.

आणि प्रभाकर त्याच्या हातातील बिअरचा ग्लास ओठाला लावतो.

समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted