डॉ मकरंद पिंपुटकर

☆ कैलास  ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

राघव – पन्नाशी उलटून गेली होती त्याची. मान खाली घालून आजवर नोकरी केली, बाकी कधी काही छानछौकी केली नाही, पण आयुष्यात एकदातरी कैलास–मानसरोवरला जायचंच अशी त्याची तीव्र इच्छा होती. 

… आणि यावर्षी, अचानकपणे, ध्यानीमनी नसताना, ही त्याची इच्छा पूर्ण होण्याची संधी आली होती. पार्ल्याच्या जोशीकाकांच्या ग्रुपतर्फे त्याचा मित्र जाणार होता, पण वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला जमणार नव्हतं, त्यानं राघवला विचारलं, आणि, राघव, अर्थात, एका पायावर तयार झाला. पासपोर्ट – व्हिसाचे सोपस्कार पूर्ण झाले आणि त्याने पत्नी मीराला सांगितलं, “मी यावर्षी मानसरोवरला जाणार आहे.”

मीरा काही क्षण शांत राहिली. “एकट्यानं? ”

“यात्रेचा ग्रुप आहे. काळजी करू नकोस.”

मीरा त्याच्याकडे पाहत हसली. “तुम्ही इतक्या दूर चाललात… आणि मी तुमची काळजी करायची नाही? ”

राघव हसला. “अगं, खुद्द महादेव आहेत ना सोबत.”

मीरा काही बोलली नाही. तिने कपाट उघडलं. तिने हळूच एक छोटासा फोटो काढला. त्यात राघव, मीरा, त्यांची मुलगी, जावई आणि छोटासा नातू होता. तिने तो फोटो राघवच्या बॅगेच्या पुढच्या कप्प्यात ठेवला.

राघवने ते पाहिलं.

“हा फोटो कशाला? ”

मीरा काहीच बोलली नाही, फक्त मंद हसली. 

राघव हसला. “तुला माहिती आहे ना? मी परत येणार आहे.”

मीरा त्याच्याकडे काही क्षण पाहत राहिली. मग फक्त एवढंच म्हणाली, “कैलासाला जाऊन आल्यावर माणूस बदलतो.”

राघव निघाला. नेपाळमधून कैलासकडे जाणारा प्रवास सुंदर होता. डोंगर… धुकं… बर्फ… आणि त्या भव्य हिमालयाच्या कुशीतून जाणारा, वळणावळणाचा छोटासा रस्ता.

राघव अधूनमधून मोबाईलमध्ये फोटो काढत होता. एकदा त्याने मीराला व्हिडिओ कॉल करण्याचा प्रयत्न केला. नेटवर्क मिळालं नाही. त्याने मेसेज टाइप केला, “इथले पर्वत खूप सुंदर आहेत. तुला आवडले असते.”

मेसेज गेला नाही.

राघव हसला. “घरी गेल्यावर दाखवतो.”

तेव्हा त्याला ठाऊक नव्हतं की हा त्याचा साधा विचार त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार बनणार होता.

२६ ऑगस्ट २०२६.

सकाळची वेळ. नाश्ता करून नुकताच बसचा प्रवास सुरू झाला होता त्यांचा. 

… आकाश अचानक काळवंडलं.

पावसाचा जोर वाढला.

गाडीतील लोक अस्वस्थ झाले.

आणि अचानक…

दूरवरून एक भयानक आवाज आला.

गर्जना.

जणू संपूर्ण पर्वत तुटून खाली येत होता.

ड्रायव्हरने गाडी थांबवली.

“बाहेर पडा! जीव वाचवा! पळा! ”

लोकांना काहीच समजत नव्हतं.

पण पुढच्या क्षणी त्यांनी जे पाहिलं…

ते दृश्य ते आयुष्यभर विसरू शकणार नव्हते.

वरून पाण्याचा एक महाकाय लोंढा येत होता. बर्फ, दगड, झाडं, माती – त्या लोंढ्याच्या कचाट्यात जे सापडत होतं त्याला फरफटत नेत होता तो. रस्त्यावरची वाहनंही त्या पुरात खेळण्यांसारखी उलटत होती, इमारती कोसळत होत्या.

हे बघितलं, आणि सगळ्यांना परिस्थितीच्या भीषणतेची जाणीव झाली. लोक जीवाच्या आकांताने पळू लागले.

राघवही धावत होता.

पण एका क्षणी त्याचा पाय घसरला.

तो खाली पडला. पाठीवरची बॅग दूर फेकली गेली.

आणि त्याच क्षणी पाण्याचा जोरदार प्रवाह आला.

राघवने बॅग पकडण्याचा प्रयत्न केला.. पण ती त्याच्या हातातून निसटली.

आणि त्या बॅगेत होता… मीराने दिलेला तो फोटो.

राघव दूर जाणाऱ्या त्या बॅगकडे पाहत राहिला. “मीरा…”

लोकांनी त्याला ओढून उंच जागेवर नेलं.

रात्र झाली.

वाचलेले लोक एका छोट्या इमारतीत आश्रयाला होते.

.. बाहेर पाऊस.

.. आत भीती.

मोबाईल नेटवर्क नव्हतं, इलेक्ट्रिसिटी नव्हती. कुणाचा फोन लागत नव्हता. कुणाला आपल्या कुटुंबाची खबर नव्हती.

.. एक आई आपल्या मुलाला छातीशी धरून बसली होती.

.. एक वृद्ध माणूस सतत प्रार्थना करत होता.

आणि राघव…

एका कोपऱ्यात सुन्न बसला होता.

त्याच्या हातात मोबाईल होता.

त्याने पुन्हा नंबर लावला.

मीरा… 

कॉल लागला नाही.

पुन्हा.

काहीच नाही.

त्याने मोबाईल बंद केला. डोळे मिटले.

आणि त्याला आठवलं – मीरा त्याला विमानतळावर निरोप देताना म्हणाली होती, “लवकर या.”

राघवच्या डोळ्यांत पाणी आलं.

त्याने दोन्ही हात जोडले.

“महादेवा…”

काही क्षण तो गप्प राहिला.

मग कुजबुजला,

“नको मला कैलासाचं दर्शन…”

त्याच्या आवाजात हुंदका होता.

“नको मानसरोवराचं…”

त्याने डोळे घट्ट मिटले.

“मला फक्त…”

आवाज तुटला.

“…माझ्या मीराकडे परत जायचं आहे, मला घरी जायचं आहे. इथले फोटो मीराला दाखवायचे आहेत.”

पुढचा दिवस आणखी भयानक होता.

हिमस्खलनाचा धोका होता.

आणखी एक मोठा पूर येण्याची भीती होती.

बचावकार्यात असंख्य अडथळे येत होते.

सगळे जण जणू मृत्यूची वाट पाहत बसून राहिले आहेत असं वाटत होतं.

राघव एका दगडावर बसला होता.

त्याच्या शेजारी एक तरुण नेपाळी मुलगा होता.

तो म्हणाला, “अंकल, घाबरू नका. हेलिकॉप्टर येईल.”

राघव हलकंसं हसला.

“तुला खात्री आहे? ”

मुलगा म्हणाला,

“हो.”

“कशी? ”

मुलगा काही क्षण शांत राहिला.

मग म्हणाला,

“कारण माझी आई म्हणते… देव माणसांना एकटं सोडत नाही.”

राघव त्या मुलाकडे पाहत राहिला.

… आणि त्याला अचानक मीरा आठवली.

ती सुद्धा असंच म्हणायची.

“देवावर विश्वास ठेव.”

काही तासांनी…

दूरवर हेलिकॉप्टरचा आवाज आला.

सगळे बाहेर धावले.

हेलिकॉप्टर वरून गेलं.

थांबलं नाही.

लोकांच्या चेहऱ्यावरची आशा पुन्हा मावळली.

राघव खाली बसला.

त्याने डोळे मिटले.

तेवढ्यात पुन्हा आवाज आला.

धड्… धड्… धड्…

… हेलिकॉप्टर परत येत होतं.

यावेळी ते खाली उतरलं.

बचाव पथक धावत आलं.

एकामागून एक लोकांना बाहेर काढलं जाऊ लागलं.

राघवही उठला.

तेवढ्यात त्यांच्या यात्रा कंपनीतल्या एका तरुण कर्मचाऱ्याने त्याला आवाज दिला.

“साहेब, ये आपका है क्या? “

राघव वळला.

त्या तरुणाच्या हातात एक वस्तू होती.

राघवचे डोळे मोठे झाले.

ती त्याची बॅग होती. पुराच्या पाण्यात वाहून गेलेली. मातीने माखलेली… त्याने थरथरत्या हाताने ती बॅग उघडली, मीराने दिलेला फोटो त्यात होता, मातीने माखलेला, कडांनी फाटलेला.

पण…

मीराचा चेहरा अजूनही त्यात स्पष्ट दिसत होता.

राघवने तो फोटो दोन्ही हातांनी धरला.

काही क्षण तो त्याच्याकडे फक्त पाहत राहिला.

मग फोटो छातीशी धरून तो ओक्साबोक्शी रडू लागला.

तो तरुण म्हणाला, “बॅग दगडांमध्ये अडकलेली होती.”

राघव काहीच बोलला नाही, त्यानं आकाशाकडे पाहिलं, हात जोडले.

हेलिकॉप्टर वर उडू लागलं.

खाली दिसणाऱ्या दरीकडे राघव पाहत राहिला.

रस्ते गायब झाले होते.

पूल वाहून गेले होते.

सगळीकडे नुसते चिखलाचे साम्राज्य पसरलं होतं.

नद्या आपला रौद्र चेहरा दाखवत होत्या.

आणि त्या सगळ्याच्या मध्ये…

हिमालय शांत उभा होता.

राघवच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू आले.

तो फोटो हातात धरून म्हणाला,

“महादेवा… मी तुम्हाला भेटायला आलो होतो.”

त्याने फोटोतला मीराचा चेहरा पाहिला.

“पण तुम्ही मला परत पाठवलंत.”

मुंबईत विमानतळावर मीरा त्याची वाट पाहत होती.

राघव बाहेर आला.

दोघांची नजरानजर झाली.

मीरा काही क्षण तिथेच उभी राहिली, स्तब्ध, थबकलेली.

… मग ती धावत त्याच्याकडे गेली.

राघवने तिला घट्ट मिठी मारली.

इतकी घट्ट…

जणू पुन्हा कधीही सोडणार नव्हता.

.. मीरा रडत होती.

.. राघवही रडत होता.

काही मिनिटं दोघंही एक शब्दही बोलले नाहीत.

शेवटी मीरा कुजबुजली,

“कैलासाचं दर्शन झालं? ”

राघवने तिच्या डोक्यावर हात ठेवला.

“नाही.”

“मानसरोवर? ”

“नाही.”

मीरा त्याच्याकडे पाहत राहिली.

राघवने खिशातून तो फाटलेला, चिखलाने माखलेला फोटो काढला.

तो तिच्या हातात ठेवला.

“पण…”

त्याचा आवाज भरून आला.

“मला माझं मानसरोवर सापडलं.”

मीरा काही न समजल्यासारखी त्याच्याकडे पाहत राहिली.

राघव म्हणाला,

“मी देवाला भेटायला गेलो होतो.”

तो थांबला.

“पण मृत्यूच्या त्या क्षणी मला देव नको होता.”

.. त्याने तिचा हात घट्ट धरला.

“मला फक्त तू हवी होतीस, तुम्ही सगळे हवे होतात.”

मीराच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.

राघव हळूच म्हणाला,

“त्या दिवशी समजलं… देव कुठे असतो.”

“कुठे? ”

“आपल्या घरी, आपल्या माणसांत. जिथे कोणीतरी आपली वाट पाहत असतं.”

त्या रात्री राघवने तो फाटलेला फोटो देवघरात ठेवला.

मीराने त्याच्या शेजारी एक छोटासा दिवा लावला.

दोघे काही वेळ शांत बसून राहिले.

राघवने हात जोडले. त्याच्या डोळ्यांसमोर कैलास नव्हता… मानसरोवर नव्हतं.

होता…

एक छोटासा घराचा दरवाजा.

आणि त्या दारात उभी असलेली मीरा.

त्याने डोळे मिटले. आणि मनात म्हटलं—

“महादेवा, आयुष्यभर तुमच्यापर्यंत पोहोचण्याची इच्छा होती…

पण आता एकच प्रार्थना आहे—

माझ्या माणसांपासून मला कधीच दूर करू नका.”

कारण कधी कधी…

तीर्थयात्रा आपल्याला देवापर्यंत घेऊन जात नाही.

ती आपल्याला आपल्याच आयुष्याची किंमत समजावून सांगते.

कधी कधी…

हिमालय आपल्याला घाबरवतो, पूर आपल्याला वाहून नेतो, मृत्यू आपल्याला कवटाळतो…

आणि तरीही…

एखादा अनोळखी हात आपल्याला वाचवतो.

एखादा छोटासा फोटो पुरातून परत येतो.

आणि एखादी व्यक्ती विमानतळावर उभी राहून म्हणते—

“तुम्ही आलात… आता मला काही नको.”

तेव्हा जाणवतं…

कैलास कितीही उंच असो, मानसरोवर कितीही पवित्र असो…

आपल्या माणसाच्या मिठीत परत येण्यापेक्षा मोठी तीर्थयात्रा या जगात दुसरी नाही.

आणि कदाचित…

देवाकडे जाण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे—

आपल्या माणसांकडे परत येणं.

(नेपाळ – चीनमध्ये अडकलेले सर्व श्रद्धाळू सुखरूप घरी पोहोचोत, ही प्रार्थना.)

© डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
SADANAND AMBEKAR
0

आद. डॉ साहेब, नमस्कार।
तुमची रचना वाचून खूप छान वाटलं। मी २०१७ ऑगस्ट मधे कैलाश-मानसरोवर यात्रा सुखरूपपणे केली, पण तुमची रचना एक विशेष संदेश देऊन गेली। मी खूप ट्रैक केलेत, एक हप्त्या पूर्वी च फूलों की घाटी-श्री हेमकुण्ड गुरुद्वारा येथून आलो पण ही कथा—-दृष्टि बदलते। खूप खूप शुभकामना। आपण स्वस्थ प्रसन्न रहावे ही शुभेच्छा।-सदानंद, भोपाल।