सुश्री तृप्ती कुलकर्णी
पुस्तकावर बोलू काही
☆ किमया… लेखक : श्री माधव आचवल ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
पुस्तक : किमया
लेखक : श्री माधव आचवल
☆ सौंदर्यातलं अध्यात्म… ☆
खरंतर पुस्तक वाचण्याची कुठलीही एक वेळ किंवा जागा अशी नसते. पण काही पुस्तकं काही विशिष्ट वातावरणात वाचली तर ती जास्त जवळची वाटतात असा माझा अनुभव.
भरपूर पाऊस पडून गेल्यानंतर तजेलदार ऊन असावं… हिरव्यागार झाडीत एक निवांत क्षणी आराम खुर्ची टाकून, ऊन सावल्यांचा खेळ बघत ओल्या मातीचा सुगंध, पानांची ओली काया, त्यावरती पडणारे सूर्याचे किरण, मधूनच उडणारे पक्षी त्यांचा मधुर चिवचिवाट, डोलणारी फुले बघत असताना खुर्चीच्या समोर टीपॉय वर कॉफीचा मग आणि हातामध्ये ‘माधव आचवल’ यांचे ‘किमया’ पुस्तक असावं.
असं का? कारण ‘माधव आचवल’ यांचं हे ‘किमया’ पुस्तक बंद दारात, खिडकीआड बसून वाचण्याचं नाही. हे पुस्तक वाचण्यासाठी रंग, रूप, रेषा, आकार या सगळ्याचा अनुभव घेता येईल अशा मोठ्या अवकाशातच ते वाचलं जायला हवं. कारण पुस्तकातला आशय इतका मोठा, प्रगल्भ आहे की कुठल्याही चौकटीत राहून आपल्याला तो समजूनच घेता येणार नाही. त्यासाठी मनाच्या चौकटी मोकळ्या करायला हव्यात. निसर्गाने केलेली सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण बघायला हवी. झाडं, झुडपं, पान, फुलं, वस्तू, यंत्र, माणसं, सारं सारं काही बघण्यासाठी सगळ्यांमधलं रेषेचं मूलभूत लयदार एकत्व शोधायला हवं. अशा मुक्त वातावरणात हळूहळू का होईना आपल्याला ते दिसू लागतं आणि मग लेखकाच्या शब्दांचं बोट धरून आपण जसं जसं ते बघायला लागतो, अनुभवायला लागतो तेव्हा आपल्याही नकळत आपण एका वेगळ्या उंचीवरून जग न्याहाळायला लागतो. आणि नेहमीच्याच गोष्टी, नेहमीच्याच वस्तू, वास्तु, माणसं, यंत्र, निसर्ग आपल्याला वेगळ्या दृष्टीने दिसायला लागतात. तेव्हा आपोआप एक भावना मनात निर्माण होते ‘एकोहं बहुस्याम! ‘
जगण्यामध्ये एकरूपता, एकतानता साधायची असेल तर काय प्रकारची साधना करावी लागेल हे सांगणारं खरं म्हणजे हे पुस्तक. हे नुसतं आकृत्या, रेषा, रंग, प्रकाश, अंधार, लय, ताल, रूप इ. बद्दल बोलत नाही.
मला या पुस्तकांमधून जगण्यातलं त्यापेक्षा सौंदर्यातलं अध्यात्म दिसतं. प्रत्येक गोष्ट, स्थिती, कृती किती बारकाईने, तिच्या असण्याच्या-नसण्याच्या संदर्भासह मांडली गेलीये, ते बघून थक्क व्हायला होतं. आपल्या रोजच्या जीवनामध्ये इतक्या प्रकारचं सौंदर्य, इतक्या प्रकारची अभिव्यक्ती, समृद्धपण दडलेलं आहे हे उलगडून सांगणारं अतिशय अप्रतिम म्हणावं असं हे पुस्तक. मनाला ताजेपणा आश्वासकपणा देणारं ठरतं. आणि म्हणूनच कधी मन उदास असेल, निराश असेल, आयुष्यात काहीच घडत नाही असं वाटत असेल, तर सरळ सगळे व्यापताप क्षणभर बंद करून मोकळ्या जागी बसावं. आणि हे पुस्तक वाचायला घ्यावं माहित नाही. किमया या शब्दांत आहे, या दृष्टीत आहे की, आपल्याला समृद्ध करणाऱ्या निसर्गात, भवतालात, पण ती घडते हे नक्की.
माधव आचवल यांचे खूप खूप उपकार आहेत की त्यांनी हे पुस्तक लिहिलं. अन्यथा सौंदर्याकडे आध्यात्मिक दृष्टीने बघण्याची इतकी सुरेख पद्धत मला तरी गवसली नसती.
परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





