श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

“ध्यास ‘वंदे मातरम्’ चा” – लेखक : श्री मिलिंद प्रभाकर सबनीस ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

 (एका अमर राष्ट्रगीताची दीडशेवी वर्षपूर्ती होत आहे… त्या निमित्ताने…)

 

पुस्तक : ध्यास ‘वन्दे मातरम्’ चा

लेखक: मिलिंद प्रभाकर सबनीस

पृष्ठे: १६०

मूल्य: २३० ₹ टपाल ३५ ₹ एकूण २६५ ₹ घरपोच

वन्दे मातरम् हे शब्द शालेय जीवनात रोजच शाळा सुटताना उच्चारत असलो, तरी त्याबद्दलची फारशी माहिती आजही सर्वसामान्यांना नाही. शालेय विद्यार्थ्यांना तर बंकिमचंद्रांनी हे गीत लिहिलं, एवढीही माहिती फार कमी प्रमाणात असते.

अमरेंद्र गाडगीळ हे त्या काळातील बालकुमारांसाठी संस्कारक्षम आशयाच्या कथा लिहिणारे लेखक म्हणून प्रसिद्ध असले, तरी त्यांचा मूळ पिंड संशोधक, अभ्यासक अशा कोशकाराचा होता. अमरेंद्र गाडगीळ हे ‘वन्दे मातरम्’ या विषयावर मराठीत पुस्तक लिहिणारे पहिले लेखक. १९७३च्या सुमारास मराठीत प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे इंग्रजी, हिंदीसह आणखी काही भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले. १९७५च्या आणीबाणीच्या काळात या पुस्तकातील काही भागावर सरकारी यंत्रणेकडून आक्षेप घेण्यात आला. आणीबाणीच्या आसपास सरकारनं सुचवलेला भाग वगळून या पुस्तकाची आवृत्ती प्रकाशित झाली तरी आणीबाणी उठल्यानंतरच्या काळातल्या सर्व आवृत्त्या मात्र मूळ मजकुरासह प्रकाशित झाल्या व पुढे हे पुस्तक अधिकच लोकप्रिय झालं. पुस्तक पृष्ठसंख्येच्या दृष्टीनं छोटं असलं तरी आशयात्मकदृष्ट्या मोठं होतं. वन्देमातरम् विषयी अधिक उत्कंठा निर्माण करण्याचं सामर्थ्य अमरेंद्रांच्या शब्दांत होतं.

ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे या पुस्तकाबद्दल म्हणतात की – –

‘राष्ट्रभक्तीने भारलेले असंख्य असतात; पण वेदमंत्राइतकेच वंदनीय असणारे ‘वन्दे मातरम्’ हे आपले राष्ट्रीय स्तोत्र, राष्ट्रीय गीत! या गीताच्या जन्माला शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचे सुमंगल लेणे लाभले असताना, या परमपवित्र राष्ट्रीय गीताचा, जन्मस्थळाचा व त्याभोवती असलेल्या काहीशा निगूढ पदरांचा वेध घ्यावासा वाटणे, हे संवेदनच विलक्षण दुर्मीळ आहे.

अमरेंद्र गाडगीळ यांनी लिहिलेल्या बंकिमचंद्रांच्या छोटेखानी चरित्र पुस्तकातून ‘वन्दे मातरम्’ या मंत्राशी मिलिंद सबनीस यांचे भावोत्कट नाते जुळले. भले हे छोटेखानी पुस्तक असेल, पण त्यामुळे एका अद्भुत यात्रेसाठी मनाने पाऊल पुढे निघण्यासाठी ते आतुर झाले. पुढे मग निमित्ते कशी येत गेली आणि ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा समग्र संदर्भाने शोध घेण्याचा ध्यास लेखकाला कसा जडला, याचा प्रवास लेखकाने या पुस्तकात उलगडला आहे. ’

ही ध्यासयात्रा केवळ ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या जन्मस्थानाभोवती वा त्यातून प्रसरणाऱ्या मंत्रवत प्रार्थनालहरीपर्यंत न राहता, पुढे नव्या पिढीत हा राष्ट्रीय विचार रुजावा म्हणून त्यांनी अथकपणे जिवाचे जे रान केले, त्या घटनांचेही दर्शन या पुस्तकातून घडते. प्रत्येक देशभक्ताच्या संग्रही असावे असे हे पुस्तक.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments