श्री जगदीश काबरे

? पुस्तकावर बोलू काही ?

“ऐवज एक स्मृतिबंध” –  लेखक : अमोल पालेकर  ☆ परिचय – श्री जगदीश काबरे

०`पुस्तक : ऐवज एक स्मृतिबंध

लेखक : अमोल पालेकर 

प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन, पुणे

संपर्क : ८०८७२८८८७२

प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांचे हे आत्मचरित्र वाचायला घेतले तेव्हा वाटले होते की, या चरित्रात त्यांच्या चित्रपटीय आणि नाटकीय आयुष्यात घडलेल्या घटनांची तसेच पडद्यामागच्या अनेक गोष्टींची चटकदार माहिती आपल्याला वाचायला मिळेल. पण पालेकरांच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपट आणि नाटकांनी जसे धक्के दिले तसेच या पुस्तकाने पालेकरांचा एक वेगळाच पैलू समोर आणला. जी सृष्टी माणसाला प्रसिद्धी वलयात गुंगवून टाकते त्या सृष्टीत राहून प्रसिद्धीचा झोत सातत्याने असूनही जमिनीवर राहून विचार करणारी अमोल पालेकरांसारखी माणसे थोडीच असतात, असे हे पुस्तक वाचून लक्षात आले. प्रत्येक गोष्टीचा खोलात जाऊन विचार करत प्रेक्षकानुनयापासून दूर राहत ते त्यांचे मनवांच्छित काम करत राहिले. म्हणूनच जगराहाटीपेक्षा वेगळ्या प्रकारचे चित्रपट आणि नाटक करण्याचे धाडस त्यांच्या अंगी आले. हे करत असताना वेळोवेळी त्यांनी स्वतःचेही परखड आत्मपरीक्षण कसे केले ते खालील परिच्छेदावरून स्पष्ट होते.

“मी कोण हा प्रश्न अॅरिस्टॉटल, फ्रॉईड, देकार्त (Aristotle, Freud, Descartes) ह्यांसारख्या विचारवंतांपासून ते पार विसाव्या शतकातल्या ‘4E दृष्टिकोना ‘पर्यंत तत्त्वज्ञ, मानसतज्ञ, साहित्यिक अशा अनेकांनी, तसंच विचार करू शकणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाने किसून काढला आहे. मीही त्यातलाच एक! आत्मभान ते 4Es (embodied, embedded, enactive & extended cognition) म्हणजेच जगताना नेणिवेमध्ये शोषला गेलेला भोवताल डचमळून वर येताना, स्वतःच्या जागृत अवस्थेत मिसळत ‘मी’ स्वतः बनतो. माझी ‘जाणीव-नेणिवेतली समज’ ते ‘माणसं परिसर निर्जीव गोष्टींशी संलग्न असलेलं माझं अस्तित्व’, अशा दोन प्रवाहांच्या निर्मितीला ऐंशी वर्षांचा मी साक्षीदार आहे. मार्क्स-लेनीन यांनी संबोधलेलं ‘वस्तुनिष्ठ वास्तव’ असो वा सार्थच्या अस्तित्ववादात संबोधलेल्या ‘मानवी आकस्मिकता’ असोत, त्या सगळ्यासकट ‘मी’ तयार झालो आहे. “

“या सगळ्या परिसरात ‘मी’ चाचपडत असतो. त्या चाचपडण्याची जाणीव होते, विशेषतः एखाद्या रात्री झोप लागली नाही की अंधारात स्वतःकडे बघत असताना! म्हणजे मी आडवा पलंगावर – नजर वर छताकडे; त्याच छतावर मला उलटा करून समांतर तरंगत ठेवला – नजर माझ्या शरीराकडे. माझ्याकडे बघत तरंगणाऱ्या माझ्या शरीराला जितका ‘मी’ समजलो असेन तितका कदाचित मला स्वतःलाही समजलेला नाही. उलटसुलट विचार, पानी-कम-चायच्या चालीवर कौतुक-कम-टीका, भीती, असुरक्षितता, आनंद, प्रेरणा, नैराश्य, गडद, फिका आणि त्याच्या अधलंमधलं सगळं… काय काय त्याने टिपलं असेल माझ्यातलं!”

“सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यातले बदल घडत असताना तो निरखत असेल. भोवताल बदलत राहतो तसा मीही बदलत राहतो. मला मात्र बदल होत असताना पकडता येत नाहीत. काही वर्षांनी मागे वळून पाहताना कधीकधी झालेले बदल लक्षात येतात. सतत सावध असणं वा राहावं लागणं हा शाप आहे माझ्या मते. त्या जागृत अवस्थेतून आलेली अस्वस्थता, भीती शरीरासोबत गारठून जाते. त्याच अस्वस्थतेतून रात्री डचमळ होत राहते. विशेषतः मागच्या दशकात गारठून राह्यलेली अस्वस्थता विरघळतच नाही… I feel I’m fossilized. आजूबाजूला इतकं सगळं बदललंय म्हणजे रस्ते-पूल उड्डाण मार्ग इमारती-बोगदे; तशीच माणसं मला माहीत असलेली, नसलेली, जवळची, लांबची, न दिसणारी… सगळीच बदललेली. जहरी, विष प्यायलेली माणसं नंगानाच घालत आहेत; ते विष दुसऱ्याकडे नुसतं बघूनही पसरत जातंय… एखाद्या साथीच्या विषाणूसारखं. माझ्यात ते शिरू शकत नाही कारण मी स्वतःला जपतो आहे, माझ्याभोवतीचा तो बर्फ अजूनतरी अभेद्यच राह्यला आहे. पण माझी आतली घुसमट इतकी विलक्षण आहे की माझ्यातल्या उत्सर्जित कार्बन डायऑक्साइडमुळे माझ्याच ठिकऱ्या होऊन मी बर्फाबाहेर येईन असं वाटण्याइतकी वेळ आली आहे. “

“एवढं कसं काय सगळं बदललं? का बदल जोखण्यात मी नाकामी राह्यलो? चाकूने भोसकून, खून करून पाण्यात लोटून दिलेल्या प्रेतातून लाल रक्त पृष्ठभागावर पसरत राहावं, तसा पाण्याचा लांबवर पसरलेला पृष्ठभाग केशरी दिसतोय. तो पसरत सगळी झाडं, डोंगर, दऱ्या, आभाळ एकरंगी करत समुद्राकडे झेपावतोय. पंचमहाभूतंच केशरी झाली तर माझ्या ठिकऱ्या होणंच इष्ट. मात्र त्या ठिकऱ्या काळ्या रंगाच्या असू देत. संपतानाही निषेधाची नोंद घेतली जावी – इतिहासाने नाही तरी तरंगत माझ्या पार्थिवाकडे बघत असलेल्या ‘तो’ने!” (पृष्ठ क्रमांक ८९-९०)

सोपं नसतंच असं स्वतःचं परखड निरीक्षण करून स्वतःला सोलण्यात! महात्मा गांधींनी जसे सत्याचे प्रयोग केले आणि स्वतःविषयीचं नागडं सत्य जगासमोर ठेवलं, त्याचप्रमाणे या पुस्तकात पालेकरांनी स्वतःविषयी पडखड परीक्षण करून त्यांच्या कमतरतांनाही तेवढ्याच निरपेक्षपणे जगजाहीर केलं आहे. हे पुस्तक नुसतेच स्मरणरंजन नसून एका सामान्य माणसाचा उत्तुंग व्यक्तिमत्वात रुपांतरीत होत जाणारा वैचारिक प्रवास आहे. वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यात घडणाऱ्या घटनांना कुठलाही आडपडदा न ठेवता तेवढ्याच स्वच्छपणे मांडणे हे क्वचितच आत्मचरित्रांमध्ये दिसून दिसून येते. हे इंद्रधनुष्य अमोल पालेकर यांनी या पुस्तकात लीलया पेलले आहे. त्याबद्दल त्यांना standing ovation च द्यायला हवे. वाचताना कुठेही कंटाळा येणार नाही, बोजड वाटणार नाही, शब्दबंबाळ होणार नाही आणि पाल्हाळीकही वाटणार नाही, एवढ्या कुशलतेने एखाद्या कसलेल्या लेखकाने लिहावे अशा पद्धतीने हे चरित्र उठावदार झालेले आहे. अमोल पालेकरांनी त्यांचे विचार एवढ्या अप्रतिमरीत्या शब्दबद्ध केलेले आहेत की प्रत्येक वाचकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

परिचय : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted