सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही ?

☆ एक प्रवास.. तिच्यासोबत…  लेखक : श्री दिनेश कुंभार ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

पुस्तक : एक प्रवास.. तिच्यासोबत

लेखक – दिनेश कुंभार

नर्मदा परिक्रमा हा विषय तसा आता वाचकांना नवा नाही. जगन्नाथ कुंटे यांच्याप्रमाणेच आणखीनही बऱ्याच जणांनी आपल्या नर्मदा परिक्रमेचे सविस्तर अनुभव लिहिले आहेत आणि सर्व प्रकारच्या वाचकांच्या ते पसंतीसही आले आहेत.

अतिशय खडतर अशी समजली जाणारी, तुमच्या निश्चयाची परीक्षा पाहणारी, आणि तुमच्या जीवन विषयक दृष्टिकोनात अमुलाग्र बदल घडवून आणणारी अशी ही परिक्रमा आहे असं म्हणतात. या परिक्रमे दरम्यान येणारे अनुभव हे इतके विचक्षण आणि विलक्षण असतात की प्रत्येक परिक्रमावासीला याबद्दल व्यक्त व्हावं असं वाटतं. आणि अगदी याच भावनेतून दिनेश कुंभार यांनी आपल्या नर्मदा परिक्रमेचं अनुभव कथन करणारे एक छोटेखानी पुस्तक लिहिले आहे. केवळ 72 पानांच्या या पुस्तकामध्ये नर्मदा परिक्रमेचं वर्णन बसवणं हीच खरंतर एक मोठी कसोटी आहे. आणि त्यामध्ये ही आपलं लेखन अतिशय रंजकपणे, रसाळपणे मांडणं आणि त्यातून परिक्रमेच्या परिपूर्ततेचा अनुभव देणे हे खरंच एक उत्तम लेखक असल्याचे लक्षण आहे. दिनेश कुंभार यांनी लेखक म्हणून हे मोठं कौशल्य प्राप्त केलं आहे आणि ही गोष्ट हे पुस्तक वाचून कुणीही मान्य करेल.

त्यातही मला विशेष भावली ती म्हणजे या पुस्तकाला मिळालेली प्रस्तावना. आतापर्यंतच्या वाचलेल्या पुस्तकांमध्ये प्रस्तावना ही बरीचशी वैचारिक पातळीवरती आणि पुस्तकातल्या मजकुराबद्दल वैशिष्ट्य सांगणारी असते, परंतु या पुस्तकातली प्रस्तावना विषयाबद्दल लेखकाबद्दल बोलतेच पण त्याहीपेक्षा स्वतःच्या दृष्टिकोनातून या परिक्रमेचं केलेलं निरीक्षण मांडते. केवळ निरीक्षण असंच नव्हे तर त्या बाबतीत स्वतःची मतदेखील पडताळून मांडली गेली आहेत हे जाणवतं. अतिशय प्रगल्भ आणि समर्पक अशी प्रस्तावना आमच्या लेखिका मैत्रीण वर्षा पतके थोटे यांनी या पुस्तकाला दिली आहे. आणि खरोखरच ती अतिशय वाचनीय झाली आहे‌. तर पुस्तक प्रस्तावनेपासूनच आपल्या मनाची पकड घेतं आणि आपण दिनेश कुंभार यांच्यासोबत कारमध्ये बसून या परिक्रमेला सुरुवात करतो.

पायी परिक्रमा करण्याची इच्छा असूनही काही वैद्यकीय कारणामुळे त्यांना ती करता आली नाही. परंतु परिक्रमा करण्याची आस अत्यंत तीव्र असल्यामुळे पायी नाही तरी कार चालवत का होईना पण मी परिक्रमा करीनच हा त्यांचा दृढ निश्चय यातल्या अगदी पहिल्या पानापासून वाचक म्हणून आपल्याला जाणवत राहतो. आतापर्यंतच्या वाचलेल्या परिक्रमांमध्ये पायी परिक्रमांचे अनुभव जास्त होते पण या परिक्रमेचे वैशिष्ट्य म्हणजे कारने जाणाऱ्या परिक्रमावासीयांना ज्या काही अडथळांना तोंड द्यावे लागत असेल किंवा जे काही फायदेही होत असतील ते मला या पुस्तकातून वाचायला मिळाले. शेवटी परिक्रमा तुम्ही कशी करता, कोणत्या माध्यमातून करता याला केवळ महत्त्व नसून तुम्ही काय भावनेतून ती करता आणि येणाऱ्या अनुभवांना काय दृष्टिकोनातून सामोरे जाता यावरच तिचं महत्त्व अवलंबून आहे आणि त्या दृष्टीने ही परिक्रमा एक सुंदर अनुभूती देणारी आहे हे निश्चितपणे म्हणता येईल.

परिक्रमेमध्ये अचानकच त्यांच्या प्रिय आजोबांचं होणार निधन आणि त्याच्या आधी काही क्षण त्यांचं आजोबांशी झालेलं फोनवरचे संभाषण, त्यानंतर त्यांच्या मनात परिक्रमा पूर्ण करतानाच येणारे दुःखाचे कड आणि जीवनाच्या अंताबद्दलची एक विष्षण जाणीव ही सतत पाझरत राहते. पुढील सर्व प्रवास एका गंभीर पण काहीशा अंतर्मुख विचारातून सुरू राहतो. आणि नर्मदा मय्येच्या प्रवाहात आपलं दुःख हलकं करत राहतो. या प्रवासात अनाहूतपणे भेटणारी माणसे त्यांच्याशी होणारा संवाद, त्यातल्या काही जणांबरोबर होणारा दीर्घ काळचा प्रवास, काही जणांशी होणारं दृढ नातं, तपश्चर्या करणारे तेजस्वी व्यक्तिमत्वाचे साधू तसेच अघोरी साधू, नर्मदा नदीत उतरल्यानंतर येणारी अनुभूती, जीवावर बेतणारे प्रसंग, अडचणीच्या प्रसंगी नर्मदा मायेचा केलेला धावा आणि त्या वेळेला त्या अडचणीतून मार्ग सापडणं अशा सगळ्याच गोष्टी अतिशय संक्षिप्तपण भावपूर्ण स्वरूपात वाचायला मिळतात.

दिनेश कुंभार यांची लेखन शैली अतिशय साधी सरळ आणि ओघवती आहे. प्रत्येक प्रसंग आपण समक्ष हजर राहून पाहत आहोत असा भास निर्माण होतो. त्यांच्या लेखन शैलीचं वैशिष्ट्य बघता कवितेचा किंवा प्रतिमा, रूपकांचा त्यांच्या लेखनावर खूप प्रभाव आहे असं जाणवतं. उदाहरणार्थ विसाव्यासाठी थांबले असताना नर्मदेच्या पाण्यातल्या त्यांना दिसलेल्या प्रतिबिंबाचं हे वर्णन पहा, “रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विटांच्या भट्ट्या अर्धवट पाण्यावर तोंड काढून पाहत होत्या. त्या विटांच्या आडून वर येणाऱ्या सूर्यबिंबाचं प्रतिबिंब पाण्यावर पडल्याने संपूर्ण वातावरण भगवे वस्त्र पांघरून उभं असल्याचा भास निर्माण झाला होता. ” याचप्रमाणे गुहेत गेल्यानंतर तिथला थंडाव्याबद्दल बोलताना ते अगदी सहजपणे म्हणतात, “गार वातावरणानं घट्ट आलिंगन दिलं. ” मंदिरातील दिवे लागण्याच्या प्रसंगांचं वर्णन करताना ते सहज लिहून जातात, “त्या प्रसन्न मंदिरातील दिवे लागताच निशा एखाद्या लावण्यवतीसारखी उजळली. संधिप्रकाशात दिव्यांचा उजेड म्हणजे निषेच्या अंगावरील लखलखणारे दागिने जणू भासत होते. ” अशा अतिशय सुंदर उपमा त्यांनी लिहिलेल्या आढळतात. जे वाचताना आपण रंगून जातो.

नर्मदा परिक्रमा ही बहुतेक जण अध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टिकोनातून करतात. त्यामुळे त्याबद्दल लिहिताना अनेकदा आत्मचिंतन जास्त प्रमाणात दिसून येतं. या पुस्तकातही आत्मचिंतन, वैचारिक मंथन आलेलं आहेच. परंतु त्याहीपेक्षा यात जाणवतो तो एका निरीक्षकाचा, केवळ कुतुहल म्हणून चाललेला अभ्यास. आणि या अभ्यासातून निरीक्षणातून येत जाणारी परिपक्वता. याची चुणूक आपल्याला या पुस्तकाच्या मुखपृष्ठ आणि शीर्षकापासूनच जाणवते. एकूणच भवतालाबद्दल सजग असणाऱ्या, नदीबद्दल ओढ असणाऱ्या, निसर्गाप्रती, माणसाप्रती कृतज्ञता भाव असणाऱ्या कुणालाही हे पुस्तक निश्चितच आनंद देईल.

प्रवासाची आवड असणाऱ्या सर्वांनीच आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे.

एक उत्तम स्नेहभेट पाठवल्याबद्दल दिनेश कुंभार यांचे मनापासून आभार!

परिचय – तृप्ती कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted