उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
पुस्तकावर बोलू काही
☆ “घेई छंद” — लेखक : सुबोध भावे — शब्दांकन : अभय इनामदार ☆ परिचय – उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
पुस्तक : घेई छंद
लेखक : सुबोध भावे
शब्दांकन : अभय इनामदार
प्रकाशक: सुनिता नांदुरकर, रसिक आंतरभारती
सहप्रकाशक: मनोज अडसूळ.. ग्राफ्ट पब्लिकेशन्स
बालगंधर्व, ” ‘लोकमान्य’ टिळक आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटात भूमिका केलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या सुबोध भावे यांच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या लेखांचा संग्रह..
मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील एक चतुरस्त्र अभिनेता म्हणून आपण सुबोध भावे यांना ओळखतो. या पुस्तकाचे शब्दांकनकार अभय अरुण इनामदार आहेत.
प्रकाशकाच्या मनोगतात पुस्तक ‘उस्ताद’ असतात, जसं ‘उस्ताद’ ठरलेल्या वेळी रियाज करतात आणि शागिर्द समोर बसून ऐकतात. तसे हे पुस्तक व्यक्तीकेंद्रित न करता विचारकेंद्रित आहे..
पुस्तकाच्या अंतरंगात पाच विभाग केलेले आहेत..
पहिल्या विभागात सुबोध भावे यांनी त्यांची वैयक्तिक जडणघडण कशी झाली यावर भर दिला आहे. बालपणापासून पुण्यात वास्तव्य असल्यामुळे नाट्य, साहित्य क्षेत्र चांगले माहिती होते. लहानपणी शाळेत असताना नाटकात फारसा सहभाग घेतला नव्हता. परंतु कॉलेजला गेल्यानंतर रंगमंचावर त्यांचे मन रमले. कसं बसं कॉमर्स कॉलेज चालू होतं, पण नाटकात अधिक इंटरेस्ट होता. पुरुषोत्तम करंडक हा मानाचा करंडक कॉलेजला मिळवून देण्यात त्यांचा मोठा हातभार होता. पुढे या क्षेत्रातच त्यांनी प्रगती केली. हळूहळू टीव्हीवरील मालिकांमध्ये प्रवेश केला. पुण्यात भरत नाट्यगृहाच्या कट्ट्यावर बसून नाटकाच्या चर्चा करणे चालू असे. त्यांचे मन नोकरीत रमले नाही. जिच्याशी त्यांनी लग्न केले त्या मंजिरीने घराची बाजू सांभाळून धरली. आणि सुबोध भावे नाट्य-चित्रक्षेत्रात पूर्णपणे शिरले!
बालगंधर्वांची व्यक्तिरेखा साकार करताना त्यांना अनेक गोष्टींची जाणीव झाली. नाटकासाठी किंवा त्या सिनेमासाठी स्वतःची तब्येत योग्य कशी करावी लागते, व्यक्तिरेखेशी एकरूप होण्याच्या दृष्टीने त्यावेळेचा काळ, त्या व्यक्तीची वैशिष्ट्यं, त्याचं सादरीकरण या सर्व गोष्टी किती महत्त्वाच्या असतात ते सुबोध भावे यांच्या पुस्तकांमधल्या लेखांवरून दिसून येते.
‘बालगंधर्व’ मधील स्त्री व्यक्तिरेखेसाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागले हे या पुस्तकात त्यांनी
विस्तृतपणे लिहिले आहे. लोकमान्य टिळकांची भूमिका करताना केस पूर्ण काढलेले आणि त्याचवेळी इतर कुठल्या सिनेमा नाटकाचे प्रयोग आले की होणारी कसरत त्यांनी छान व्यक्त केली आहे. “कट्यार काळजात घुसली” या सिनेमाबद्दल सुबोध भावे म्हणतात की, “हा सिनेमा म्हणजे माझी ध्येयपूर्ती होती. ” या सिनेमाबद्दल त्यांच्या मनात एक उदात्त भावना होती. ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमात शंकर महादेवन आणि राहुल देशपांडे यांनी संगीताची बाजू सांभाळली. सचिन पिळगावकर यांनी खाॅ साहेबाची भूमिका साकारली. स्वतः सुबोध भावेंनी सदाशिवची भूमिका केली. या सिनेमाने सुबोध भावे यांना नावलौकिक मिळवून दिला.
लोकमान्य टिळकांची भूमिका करताना प्रथम त्यांच्या मनावर दडपण होते. लोकमान्य टिळकांची करारी, कणखर, भारदस्त व्यक्तिरेखा आपण साकार करू शकू की नाही, याबद्दल सुरुवातीला मनात भीती होती.. परंतु एकदा भूमिकेत झोकून दिल्यावर मनापासून काम करणे हे सुबोध भावेचे वैशिष्ट्य त्यातून व्यक्त होते.
एकंदर पुस्तक वाचताना असं जाणवलं की ‘ *बालगंधर्व* ‘, ‘ *लोकमान्य टिळक’* आणि ‘ *कट्यार काळजात* *घुसली* ‘ हे तीनही पिक्चर्स आपण बघितले आहेत. तेव्हाही ते आवडले होतेच, पण हे पुस्तक वाचल्यावर सुबोध भावेंच्या दृष्टिकोनातून ते पुन्हा पहावेत असा विचार मनात आला.
कोणत्याही भूमिकेसाठी कलाकाराला किती कष्ट करावे लागतात हे या सुबोध भावे यांच्या कथनातून दिसून येते. तसेच जे जे घडलं ते प्रांजळपणे वाचकांच्या समोर त्यांनी उलगडून दाखवलेले आहे आणि ते अधिक सच्चे आहे.
सुबोध भावे म्हणतात, ‘ हा पुस्तक प्रपंच सर्वांच्या सहकार्याने घडून आला. शौनक अभिषेकींमुळे शास्त्रीय संगीत आयुष्यात आले. गवयाची नजर मिळाली आणि माझ्या आयुष्यातील हा महत्त्वपूर्ण टप्पा संगीतामुळे मला अनुभवता आला. ‘
सुबोध भावे मूळचे पुण्याचे, सदाशिव पेठी वातावरणात वाढलेले, स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे गेलेला कलाकार म्हणून आपल्या मनात त्यांना कौतुकाचे स्थान आहे. हे पुस्तक वाचल्यावर ते कौतुक अधिकच मनात उतरते. अवश्य वाचावे असे हे पुस्तक ‘घेई छंद’
© उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






