सौ शालिनी जोशी
विविधा
☆ अनुभव हा गुरु… ☆ सौ शालिनी जोशी ☆
‘गुरु’ म्हणजे अज्ञान दूर करणारा, या दृष्टीने आपण ज्यांचे पासून काही शिकतो ते सारे गुरुच असतात. ‘जो ज्याचा गुण तो मी गुरु केला जाण’ असे सांगून अवधूत आपल्या २४ गुरूंची नावे सांगितात. खरे पाहता आई हा आपला पहिला गुरु. मग वडील, शिक्षक, समाज, निसर्ग, मित्र इत्यादी. प्रत्येकाकडून शिकण्यासारखे काहीतरी असते. अशी गुरूंची मोठी यादी त्याला अंत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, ‘ जे जे यातिचा व्यापारु। ते ते त्याचे तितके गुरु। याचा पाहता विस्तारू उदंड आहे। दा. ५/२/७१. हे सगळे खरे असले तरी हे सगळे गुरु झाले परके, आपल्या व्यतिरिक्त.
आयुष्याचा खरा अर्थ समजण्यासाठी ‘अनुभव हाच खरा गुरु’ आहे. दुसऱ्याने दिलेली धनाजी पुंजी किंवा शिकवलेली अक्कल कधीही पुरेशी नसते. पण स्वानुभावावर मिळवलेले शहाणपण महत्त्वाचं. तेच आत्मविश्वास निर्माण करते. कायमच मनावर कोरले जात. कितीही वाटलं तरी कमी होत नाही. भूतकाळातील अनुभवाची शिदोरी वर्तमान आणि भविष्यातही मार्गदर्शक ठरते. म्हणून अनुभवासारखा गुरु नाही.
जन्मल्यापासून शेवटचा श्वास घेईपर्यंत आपण अनुभव घेत असतो. प्रत्येक अनुभव वेगळा असतो. समाजात वावरत असताना जे अनुभव येतात ते बरेच काही शिकवून जातात. हा गुण लहानपणापासून असतो. स्वाभाविक असतो. भूक लागल्यावर रडले की दूध मिळते हे तान्ह्या बाळालाही कळते. शिकवावे लागत नाही. तो त्याचा अनुभव त्याला तशी बुद्धी देतो. वय वाढेल तशी अनुभवाची शिदोरी वाढत जाते. शेजारी कसा आहे, याचा अनुभव आला की आपण त्याच्याशी संबंध ठेवायचा का नाही ठरवतो. कामात प्रथम चुक होवू शकते पण एकदा अनुभव आला की आपण ती चूक परत करत नाही. अनुभवातून मिळालेले ज्ञान ध्येयपूर्तीपर्यंत नेते. एडिसनने (थॉमस हल्वा एडिसन) बरेच शोध लावले. फोन, ग्रामोफोन, बल्ब इत्यादी. पण बल्बचा शोध लावताना त्याला १000 वेळा प्रयत्न करावा लागला. याचा अर्थ त्याचे आधीचे प्रयत्न फुकट गेले असे नाही. तर प्रत्येक प्रयत्नात तो नवीन नवीन शिकत गेला. अनुभवत गेला. तेव्हा बल्ब लागला. दिव्याला हात लावला की भाजते. असा एकदा अनुभव माझ्यावर लहान मुलही दिव्याला हात लावायला जात नाही. तो अनुभव कायम लक्षात राहतो. मेंदूवर कोरला जातो. अनुभव डोळसपणे पाहिला की अनेक सूचना आपोआप मिळत जातात. अनुभव हाच शिक्षक होतो. सांगितलेल्या वेळेला एखादा आपल्या घरी आला, नाही तर आपली तारांबळ उडते. पुढील सर्व कार्यक्रम विस्कळीत होतात. यातून दिलेल्या वेळेच्या महत्त्वाचा धडा आपल्याला मिळतो. आपण वेळेच्या बाबतीत तत्पर होतो. अनुभवातून मिळणारे ज्ञानग्रहण करायची, योग्य वेळी त्याचा उपयोग करायची इच्छाशक्ती हवी. पारख करायची दृष्टी हवी. अशा प्रकारे अनुभव हा स्वतःच्या ताब्यात असलेला गुरु. म्हणून इतर गुरूंचे महत्त्व कमी होत नाही. पण त्या यादीत आणखीन एक भर.
गुरु किंवा शिक्षक यांचा आधी थिअरी मग प्रॅक्टिकल असा मार्ग असतो. पण अनुभव हा एकमेव गुरु आहे, जो आधी प्रॅक्टिकल देतो आणि मग थेअरी आपली आपण घोकावी लागते.
आपली भारतीय संस्कृती अनुभवजन्य ज्ञानाला महत्त्व देते. संतांच्या विचारांना, अभंगांना महत्त्व प्राप्त होते. कारण त्याला अनुभूतीचा स्पर्श असतो. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात ‘प्रत्ययाचे ज्ञान तेचि प्रमाण। येरे अप्रमाण सर्वकाही। तर संत तुकाराम म्हणतात, ‘ नका दंतकथा येथे सांगो कोणी। कोरडे ते मानी बोल कोण।।अनुभव येथे पाहिजे साचार। न चलती चार आम्हा पुढे।।’आम्हाला पुराणातील दंतकथा सांगू नका. अनुभवाशिवाय कोरडे ज्ञान कामाचे नाही. अनुभव संपन्न माणसाची यश नेहमीच पाठराखण करते. जीवन परिपक्व व परिपूर्ण बनते. अनुभव ज्याचे त्यानेच घ्यायचे असतात. त्यामुळे मिळणारी अनुभूती श्रेष्ठ असते.
अशाप्रकारे अनुभव हा गुरु व्यवहारात, प्रपंचात, समाजात, व्यवसायात आणि परमार्थातही क्षणोक्षणी नवीन अनुभव देणारा असतो. घेणाऱ्यावर त्याचे पूर्ण जबाबदारी असते. सर्वच बाबतीत हे शक्य होत नाही. तेव्हा मात्र मार्गदर्शक दुसऱ्या गुरूची गरज भासते. एकंदरीत अनुभव असो किंवा दुसरा कोणी गुरु असो, ‘गुरुवीण कोण दाखवील वाट?’ हेच खरे.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈






