श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ उगवतीचे रंग – लता अजून गाते… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
तसं तर लताचा आज जन्मदिन नाही किंवा स्मृतिदिनही नाही. मग मी का लिहितो तिच्यावर? तर माझ्यासाठी ती अजूनही गातच असते. दिवसभरात कानावर तिची कुठली ना कुठली तरी गाणी पडत असतात. त्या माध्यमातून ती माझ्याशी बोलत असते आणि गातही असते. आता तुम्ही म्हणाल की लतासाठी एकेरी शब्द वापरणारा हा कोण शहाणा? पण खरं सांगू? आपल्या जवळच्या माणसाला कोणी आहो जाहो करतं का? आपली आई आपल्याला सगळ्यात जवळची असते. तिला करतो का आपण आहो जाहो? तशीच आहे लता माझ्यासाठी!
खरंतर आज ती आपल्यात नाही. पण असं कधीच वाटत नाही. ती अजूनही गात असते. तिचं कोणतेही गाणं कानावर पडलं की मन त्यात हरवून जातं. ते गाणं पूर्वी जरी ऐकलं असलं तरी आता ते ऐकताना त्यातील नवीन अर्थ, नवीन सौंदर्य प्रतीत होतं. त्यातून ती जणू बोलतच असते माझ्याशी! हा अबोल संवाद असतो. आणि बऱ्याच वेळा एकतर्फी. ती बोलत असते आणि मी ऐकत असतो. तो दैवी स्वर, त्यातील भावभावना जिवंत होऊन हृदयाला हात घालतात. (लताचं लहानपणीच नाव हृदया होतं असं म्हणतात. किती सार्थ नाव! ) गाणं ऐकताना कधी कधी डोळे नकळत पाणावतात, हातही नकळत जोडले जातात. तिच्या दिव्यत्वाला प्रणाम करण्यासाठी. कोणी असंही म्हणेल की असं कुठे असतं का? याचं आपलं काहीतरीच! कोणाला असंही वाटेल की हा वेडा आहे, भावनाप्रधान आहे. पण मला ते मान्य आहे. कुठलं तरी वेड असल्याशिवाय त्यातील आनंद कसा घेता येईल? परमेश्वराच्या भक्तीत रंगलेल्या अनेकांची अवस्था, संशोधनात गढून गेलेल्या शास्त्रज्ञांची अवस्था वेड्यासारखीच तर होती. जगाच्या दृष्टीने ते वेडेच होते आणि व्यवहारात कुचकामी. पण अशा अवस्थेमुळेच ते आपल्या ध्येयाच्या जवळ पोहोचू शकले. भक्तांच्या पदरी भक्तीचा आनंद आणि फळ त्यांच्या पदरात पडलं. परमेश्वराची प्राप्ती झाली. शहाण्या आणि व्यवहारी माणसांपासून परमेश्वर बहुधा चार हात लांबच राहत असावा.
लताच्या आठवणीशिवाय जावा असा एक दिवसही जात नाही. कोणीतरी कुठल्या ना कुठल्या प्रकारे तिची आठवण करून देत असतोच. नाहीतर आपल्या गीतातून ती समोर येतेच. आपण एखादा काम करत असावं आणि जवळपास हळू आवाजात एखादं गाणं सुरू असावं तसं लताचं एखादं ऐकलेलं गाणं काम करत असताना देखील मनामध्ये बॅकग्राऊंडला वाजत राहतं. त्याचे प्रतिध्वनी उमटत राहतात.
परवा कोणीतरी लतादीदी आणि पुलं देशपांडे यांनी एकमेकांना पाठवलेली पत्रे समाजमाध्यमांवर टाकली होती. या पत्रांनी लतादीदींच्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या. कधी फारशी शाळेत न गेलेली लता लंडनहून पुलंना किती सुंदर पत्र लिहिते! त्यांची आपुलकीने चौकशी करते. पुलं तिच्यापेक्षा वयाने मोठे म्हणून पत्राची सुरुवात तिने त्यांना ‘ चरणस्पर्श ‘असं म्हणून केली आहे.
या पत्राला पुलंनी दिलेले उत्तर फार सुंदर आहे. ते म्हणतात की मी वयाने मोठा असल्यामुळे तुला ‘चरणस्पर्श’ असे म्हणू शकत नाही. “आणि तुझ्या लक्षावधी गीतातल्या एकाही चरणाला स्पर्श करावा असा गळा देवाने मला न देता नुसताच घसा दिला आहे. पूर्वीचे राजे मुलुख पादाक्रांत करायचे. तू तर सारे जग ‘ पदाक्रांत ‘ केले आहे. तुझे हे सार्वभौमत्व चिरकाल टिको हीच इच्छा.” पुलंनी ‘ चरणस्पर्श ‘ जरी केला नसला तरी आपल्यासारख्या लाखो वाचकांच्या हृदयाला ‘ हृदयस्पर्श ‘ केला आहे इतके त्यांचे पत्र सुंदर आहे! ते वाचल्यावर लताबाई आणि पुलं समोर असते तर त्यांचा ‘ चरणस्पर्श ‘ केल्याशिवाय राहवले नसते. असो. पण तो योग आता नाही.
पुलंबद्दल सुद्धा रोज काही ना काही तरी समाजमाध्यमांवर येतच असते. कोणी त्यांच्यावरील एखादा लेख टाकतो, कोणी त्यांचे एखादे पत्र प्रसारित करतो, कुठेतरी त्यांच्या बटाट्याची चाळ किंवा सुंदर मी होणार यासारख्या नाटकांचे प्रयोग सुरू असतात. कोणीतरी कुठल्यातरी कार्यक्रमात त्यांच्या पत्रांचे वाचन करत असतो. कोणीतरी अप्रकाशित पुलं कार्यक्रम सादर करतो, कोणाच्यातरी कार मध्ये पुलंच्या कथांचा ऑडिओ सुरू असतो तर कुठेतरी जीए आणि सुनीताबाईंच्या पत्रांचा वाचन सुरू असतं. लतादीदी आणि पुलं सर्वव्यापी आहेत. लतादीदी आणि पुलं यांना चिरंजीवित्वाचा वर मिळाला आहे. त्यांनी रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवले आहे. पुण्यात एकदा रस्त्यावर पुस्तक विक्री करणाऱ्या एका पुस्तक विक्रेत्याकडे मला पुलंचं रवींद्रनाथ: तीन व्याख्याने हे पुस्तक मिळालं. ते मला एवढं आवडलं की त्यावरून रवींद्रनाथांबद्दल अधिक जाणून घेण्याची आणि त्यांच्याबद्दल लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यातूनच माझं आनंदयात्री रवींद्रनाथ हे पुस्तक जन्माला येतंय.
म्हणूनच म्हणतो की लता, खरं म्हणजे तू आणि पुलं म्हणजे जित्याजागत्या लिजन्ड्स आहात. रोज तुमचा कुठल्या ना कुठल्या कारणाने कुठेतरी उल्लेख होतच असतो आणि हो केवळ महाराष्ट्रातच नाही, केवळ भारतातच राहील तर पुलंच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे तुम्ही दोघांनी जग पादाक्रांत केले आहे. पूर्वी मी बद्रीनाथ केदारनाथ सहल केली होती, तिथे त्या हिमालयातील उंच आणि दुर्गम शिखरांवर तुझे स्वर ऐकू येत होते. एवढेच काय पण गेल्या जूनमध्ये मी स्वित्झर्लंडला गेलो तेव्हा तेथील आल्प्स पर्वतावर देखील तुझ्या गीतांचे स्वर कानी पडले. माझा रोम रोम पुलकित झाला. मन अभिमानाने भरून आलं. माझ्यासारख्या तुमच्या भक्ताला अजून काय हवं! तुम्ही केवळ देश नाही जोडलात, तर विविध देशातील भारतीयांना एका सूत्राने बांधून ठेवलं. एकाने सुरांनी जग जिंकलं तर दुसऱ्याने शब्दांनी!
मी सुरुवातीला म्हटलं ना की तू अजूनही गातेस, माझ्याशी बोलतेस, ते खरंच आहे. अनेक लेखक, गीतकार तुझ्याबद्दल रोज काहीतरी बोलत असतात. अन्नू कपूर, शिरीष कणेकर, सुधीर गाडगीळ किंवा कोणीतरी तुझे किस्से किंवा आठवणी सांगत असतो. रंगोली कार्यक्रमातील निवेदिका तुझ्याबद्दल बऱ्याच वेळा काहीतरी सांगत असते. गावोगावी होणाऱ्या संगीत मैफलित तुझ्या गाण्यांशिवाय आणि आठवणींशिवाय कार्यक्रम होऊच शकत नाही. गायिका आणि संगीतातील तज्ज्ञ असलेल्या मृदुला दाढे यांच्यासारखं कोणीतरी तुझ्या गाण्यांचं विश्लेषण करीत असतं. ‘ कांटोसे खींचके ये आचल ‘ या गाईड चित्रपटातील गीताच्या सुरुवातीचा आलाप लताने कसा म्हटला आहे, आणि तोच किती योग्य आहे हे त्या सोदाहरण स्पष्ट करून सांगतात. पण मला वाटतं गाताना तू स्वतः देखील एवढा विचार कधी केला नसशील कारण तुझं गाणं हे नैसर्गिक होतं. एखाद्या फुलासारखं ते आपोआप आतून उमलून येत होतं. तुझं गाणं म्हणजे एखादी सुंदर कलाकृती! एखादी सुंदर रांगोळी असावी किंवा एखादा अस्सल सोन्याचा सुंदर घडवलेला दागिना असावा तसं तुझं गाणं! ज्यांना त्याचं विश्लेषण करायचं आहे त्यांनी ते खुशाल करावं. पण ज्याप्रमाणे परमेश्वर सर्व विश्व व्यापून दशांमुळे उरला आहे असं म्हटलं जातं तशीच तू देखील या विश्लेषणाच्या पलीकडे दशांगुळे उरलेली असतेसच!
कवयित्री बहिणाबाई कधी शाळेत गेल्या नव्हत्या. त्या निरक्षर होत्या असे म्हटले जाते. लौकिक अर्थाने त्या शिकलेल्या नव्हत्या. परंतु त्यांच्या कविता किती सुंदर आहेत! अनेक शिकलेले लोक त्यांचा आपापल्या परीने अर्थ लावत बसतात. अनेक लोक त्यांच्यावर पीएचडी करतात. तसंच तुझ्या गाण्यांचं आणि संगीताचंही असावं असं मला वाटतं.
तुझं संगीत म्हणजे खरोखरच नक्षत्रांचं देणं आहे. त्याचं मोल, त्याचं तेज कधीही कमी होत नाही. हे नक्षत्रांचं देणं कितीही वाटलं तरी रिक्त न होणारं. आमचीच ओंजळ अपुरी पडते ते घ्यायला. तुझ्या गीतांबाबत असं म्हणावसं वाटतं की तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला. केवळ आयुष्य स्पर्शून नाही गेला तर आयुष्य समृद्ध करून गेला! तुझ्या गीतांबाबत बोलायचं तर तूच गायलेल्या ‘ किनारा ‘ या चित्रपटातील गीताची आठवण येते. ‘ नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा
मेरी आवाज ही पहचान है गर याद रहे…!
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







