सौ. गौरी गाडेकर

?  विविधा ?

☆ तुमचा बॉस हरमनप्रीत कौरसारखा असेल तर? – मूळ लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर ☆

२ नोव्हेंबरला भारताने इतिहास घडवला. २०२५च्या विमेन्स क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल जिंकून.

प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा क्षण. स्त्रियांच्या क्रीडाक्षेत्रातील ऐतिहासिक क्षण.

फटाके, जयघोष आणि तिरंगी सोहळ्यावर मात केली एका छोट्याशा कृतीने.

संघाच्या विजययात्रेच्या वेळी कप्तान हरमनप्रीतने एक असामान्य गोष्ट केली – तिने दोन ख्यातनाम महिला क्रिकेटपटूंना आमंत्रित केले. झूलन गोस्वामी आणि मिताली राज या त्या दोन निवृत्त दिग्गज क्रिकेटपटू. त्यांच्या हातात विश्वचषक देऊन हरमनप्रीतने त्यांनाही विजययात्रेत सामील करून घेतलं.

या एकाच कृतीने नेतृत्वसंस्कृतीचं एक उत्तम उदाहरण जगासमोर सादर केलं.

या एका साध्या कृतीमुळे तिचे नेतृत्वगुण झळाळून उठले.

हरमनप्रीतने त्यांच्याकडे ‘भूतकाळ’ म्हणून नाही, तर ‘पाया’ म्हणून बघितलं. त्यांनीच तर या पिढीला स्वप्नं बघायला उद्युक्त केलं होतं.

त्यांना आमंत्रित करून तिने जे उदाहरण घालून दिलं, त्यामुळे तिची उंची कमी झाली नाही, उलट कित्येक पटींनी वाढली. कारण स्वतःला सुरक्षित समजणारा नेताच आपल्या प्रकाशझोतात इतरांना सहभागी करून घेतो.

आणि हे करून तिने स्वतःच्या संघाला मौल्यवान देणगी दिली – विश्वास, नम्रता आणि संघवृत्तीची संस्कृती.

आता, आपण क्रिकेट थोडं बाजूला ठेवून आपल्या कामाच्या जागेकडे वळूया.

आजकाल बऱ्याच ऑफिसांतील नेते असुरक्षित कप्तानाप्रमाणे वागतात.

ते इतरांचे योगदान कमी लेखतात. त्यांना मान्यता दिलीच तर हातचं राखून देतात. एखादा चांगली कामगिरी करतोय, असं वाटलं, तर त्यांना आपलं महत्त्व कमी होण्याची भीती वाटते.

आणि मग त्यांना आश्चर्य वाटतं, की ‘आपली टीम उत्साही, कार्यप्रवृत्त का नाही? ‘

उत्तर सोपं आहे. कार्यसंस्कृती ही वरून खाली झिरपत असते.

जर नेता राजकारण करत असेल, तर त्याची टीम धोका पत्करायला तयार होणार नाही.

जर नेता सगळ्यांचं श्रेय स्वतःकडे घेत असेल, तर त्याच्या टीममधील लोक कामाची जबाबदारी घेणं टाळतात.

जर नेता इतरांचं यश साजरं करत नसेल, तर टीम यश साजरं करणं सोडूनच देते.

निकृष्ट नेतृत्वामुळे सामर्थ्यशाली टीमचाही विचका झालेला मी अनेकदा पाहिला आहे. याचं कारण कौशल्याचा अभाव नसून मानसिक सुरक्षिततेचा अभाव हेच आहे.

जेव्हा नेत्याचं वागणं विश्वासाऐवजी भीतीवर आधारित असतं, तेव्हा त्याच्या टीममधील लोकांचं कौशल्य, हुशारी विझून जाते.

कल्पना करा, जर हरमनप्रीतने विश्वचषक हातात घेऊन फक्त आपल्या संघासमवेत फेरी मारली असती, ते उज्ज्वल यश स्वतःच मिरवलं असतं, तर त्यातून ‘हा माझा विजय आहे’, हा संदेश जगाला मिळाला असता.

पण झूलन आणि मितालीला त्यात सामील करून तिने ‘माझ्या विजया’चं रूपांतर ‘आपल्या परंपरे’त केलं.

संस्कृती अशीच घडत असते – विशिष्ट कार्याविषयीच्या वक्तव्यामुळे ती निर्माण होत नाही, तर यासारख्या नम्र क्षणांनी ती विकसित होत असते.

कॉर्पोरेट नेत्यांना त्या विजययात्रेपासून बरंच काही शिकण्यासारखं आहे.

खरे नेते त्यांच्या टीमशी स्पर्धा करत नाहीत, ते त्यांना पूर्णत्व देतात.

ते पुष्टीकरणाच्या पाठी धावत नाहीत, ते निष्ठा निर्माण करतात.

त्यांना आपली जागा कोणी घेईल, अशी भीती वाटत नाही, उलट ते आपली जागा घेऊ शकतील, अशी माणसं तयार करतात आणि त्यांचा आदर करतात.

अशा तऱ्हेने कायम टिकणारी कार्यसंस्कृती तयार होते, जिथे यश हे एकदाच घडणारी घटना नसते, तर ती एक सातत्यपूर्ण परंपरा असते.

मी जेव्हा झूलन आणि मितालीला साश्रू नयनांनी तो चषक उंचावताना बघितलं, तेव्हा माझ्या मनात एक विचार चमकून गेला – नेतृत्व म्हणजे चषक मिळवणं नव्हे, तर तुमच्यासमवेत चषक धरण्यासाठी कोण योग्य आहे, याची जाण असणं, हे खरं नेतृत्व.

अशाच प्रकारे तुम्ही असा संघ तयार करू शकता, जो फक्त एकदाच जिंकून थांबणार नाही, तर तो नेहमी जिंकतच राहील, तुम्ही गेल्यानंतरही.

आणि त्या एकाच कृतीमुळे हरमनप्रीतने फक्त विश्वचषकच जिंकला असं नाही, तर तिने त्याहूनही दुर्लभ अशी गोष्ट जिंकली – मनं आणि आदर – तिच्या संघाचा आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांचा.

मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात

मराठी अनुवाद : सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments