श्री हेमंत तांबे
विविधा
☆ दुनिया जिंकण्या आधी स्वतःला जिंकूया! ☆ श्री हेमंत तांबे ☆
तुम्हाला ते मुकेश अंबानींचं “दुनिया मुठ्ठी में” हे वाक्य आठवतं काय? दुनिया मुठीत ठेवून तुम्ही काय मिळवता? आणि खरंच तशी ती तुमच्या मुठीत येते काय?
इतिहास ते आज वर्तमान जर आपण समाजाचं बारीक निरीक्षण केलं तर दिसून येईल की, माणसाचं आयुष्य म्हणजे एक धावण्याची निरंतर स्पर्धा झालंय. प्रत्येकजण काहितरी जिंकण्यासाठी धावतोय. कोणी पैसा धन दौलत मिळवण्यासाठी धावतोय, तर कोणी सत्ता अधिकार मिळवण्यासाठी धावतोय. कोणी स्वतःचं नाव होण्यासाठी प्रसिद्धी किर्ती मिळवण्यासाठी धावतोय, तर कोणी दुसऱ्याला प्रभावित करण्यासाठी धावतोय! तुम्ही एक लाख लोकांना विचारलंत की, “सफलता म्हणजे निश्चित काय? ” तर 99. 99% लोक सांगतील दुसऱ्याच्या पुढं जाणं, दुसऱ्याला हरवणं, दुसऱ्या पेक्षा जास्त काहितरी मिळवणं म्हणजे सफलता! … जर आपण बारकाईनं लक्ष दिलं, नव्हे द्या. तर आपल्याला दिसून येईल की, दुसऱ्याला जिंकण्याच्या नादात किंवा या रॅट रेस मध्ये तुम्ही आतून हरलेले असता, आतून तुम्ही भिकारी झालेले असता. करोडो रुपये तुमच्या कडे असूद्यात, लोकांकडून तुमच्या विजयासाठी टाळ्यांचा कडकडाट होवो, आपल्या मनाला जोपर्यंत आपण जिंकत नाही, तोपर्यंत आपण शांत समाधानी आनंदी नसतो. कारण अंततः तुम्ही एकटेच असता आणि एकट्यालाच तर जगायचं असतं!…
तुमच्या रात्रीची झोप, तुमच्या हृदयातील शांती, तुमच्या आतील मौन आणि ध्यान हिच तर तुमची खरी धन, दौलत, संपदा असते. पण आपण बाह्यांगी पाहिलं तर आपण जगभर वेगवेगळ्या गोष्टींसाठी धावत असतो, जग जिंकण्याची, सर्वोच्च होण्याची, प्रत्येकावर अधिकार गाजवण्याची आपली इच्छा पूर्ण होतच नाही. विजय जेवढा मोठा, आपली इच्छा त्याहून मोठी होत जाते. आज तुम्ही एक स्पर्धा जिंकलीत तर उद्या दुसरी स्पर्धा आयोजित झालेली असते. बाहेरचा विजय अंतहीन आहे, बाहेरची स्पर्धा अंतहीन आहे, कारण ती तुमच्या इच्छेवर इर्षेवर अवलंबून आहे. खरं म्हणजे आपल्या आतील युद्धभूमीवर आपण मिळवलेला विजय महत्वाचा. तिथला विजय आपल्याला सौंदर्य, तृप्ती, शांती, आनंद देतो. जी व्यक्ती तिथं जिंकते त्या व्यक्तीचं जीवनच एक उत्सव बनून जातं! तुकोबा म्हणतात तसं, “निरंजनी आम्ही बांधियेले घर | निराकार निरंतर राहिलो आम्ही || निराभास पूर्ण झालो समरस | अखंड ऐक्यास पावलो आम्ही ||” असं काही वैचारिक मंथन करताना कुणाचं नाव घेऊ नये, लालबागच्या राजा समोर त्याच्या भक्तांचे जोडलेले हात आणि चेहरे पाहा, थोडक्यात त्यांची देहबोली पाहा. ते दीन, पतित, अन्यायी, हरलेले किंवा त्यांची भावमुद्रा अतृप्त दिसते. खरं म्हणजे माझं जे इष्ट आहे त्यासमोर मी दीन, दरिद्री, दुःखी, अगतिक असेनच कसा? तिथं तर माझा चेहरा शांत, समाधानी किंवा आनंदानं उत्फुल्ल झालेला दिसला पाहिजे ना? त्या राजा समोर मी तर राजा सारखाच जाईन… कारण माझं तर त्याच्या कडे काही मागणंच असणार नाही, मला तर कसलीही हाव नाही आणि हाव तर तोही पूर्ण करू शकत नाही! … लक्षात ठेवा, मनाच्या गाभाऱ्यातील शांतता कधीही बाहेरून आत येत नाही. तुम्ही ज्ञानेश्वर, बुद्ध, महावीर, कृष्ण, राम यांचे चेहरे पाहा. तुम्हाला तृप्ती आणि शांती आतून बाहेर पडताना दिसेल. कारण बाहेरचं जिंकणं अस्थायी असतं, आज तुम्ही जिंकलात तर उद्या दुसरा कुणी जिंकेल. आज तुम्ही सर्वांत पुढं असाल तर उद्या दुसरा कोणी पुढं असणारच. बाहेरचं जिंकणं फक्त आणि फक्त तुमचा अहंकार वाढवतं, ज्यानं तुम्हाला आतून जास्त पिडा सुरू होते. म्हणून प्रथम आपण आपल्या मनाला जिंकलं पाहिजे. समर्थ रामदास कधीही दुसऱ्याला उपदेश करत नाहीत, तर मना सज्जना… ! म्हणून आपल्या मनाला उपदेश करताना दिसतात.
आपल्या आत क्रोध, वासना, इर्षा, हाव असते. जर यांना तुम्ही ओळखलं नाहीत, तर तुम्ही यांचे गुलाम होणारच. त्यामुळे बाहेरचं यश, पद, पैसा, प्रतिष्ठा तुम्हाला दास म्हणूनच वागवणार. समजा एखाद्यानं भरपूर धन दौलत मिळवली, पण रागात आपल्याच परिवाराला दुःखी केलंत तर? तुम्ही सत्तेची खुर्ची जिंकता, पण तिच खुर्ची दुसरा कुणी घेईल म्हणून तुम्ही सुखानं झोपू शकत नाही. आता सांगा हे जिंकणं झालं की हरणं? तुम्ही याला विजय म्हणू शकता का? तर नाही, हा पराभवच आहे. भले पूर्ण दुनिया तुम्हाला विजेता म्हणूद्या… तुम्ही खरे विजयी होता, जेव्हा तुम्हाला आंतरिक तृप्ती, समाधान, शांती मिळते! जे तुमच्या जवळ आहे त्यात तुम्ही सुखी, संतुष्ट, प्रसन्न असता, तेव्हा तुमच्या हृदयातील प्रेमाचा पाझर सुरू होतो, तेव्हा तुम्ही दुसऱ्याशी लढू शकत नाही किंवा लढू इच्छित नाही. लक्षात ठेवा जिंकणं दुसऱ्याच्या विरोधात असून असं चालेल? ते तर, आपल्याच भरकटलेल्या मना विरोधात असलं पाहिजे. जेव्हा आपण आपल्या मनावर विजय मिळवतो, तेव्हा बाहेरील जग स्वतः बदलतं. आता तुम्हाला दुसऱ्या कुणावर विजय मिळवण्याची गरज नसते, तर तुमचं जगणं हेच विजय झालेलं असतं! … जिंकण्याचा खरा अर्थ हा आहे की, आपल्या मनावर विजय मिळवणं. फारच कठीण आहे हे, पण जमलं तर फारच सुंदर आहे, तेव्हा तुम्ही खरे राजे असता. तुमच्या डोक्यावर मुकुट नसूदे, बसायला सिंहासन नसूदे, कोणी दासदासी किंवा सैन्य साम्राज्य नसूदे. राजा तर तुम्हीच असता, तुमच्या राज्याचा विस्तार व्हायला सुरुवात झालेली असते, हिच सुरूवात असते तुम्ही आनंदयात्री होण्याची!
गरज नसताना आपण दुसऱ्याला आपला प्रतिस्पर्धी मानत असतो, कधी भावाला तर कधी शेजाऱ्याला, कधी समाजाला तर कधी राजकीय सामाजिक अस्तित्वाला. आपण असं समजून जातो की यासर्व गोष्टी मला साह्यभूत होतील, तर आपण जिंकू आणि पुढं जाऊ. पण जरा थांबा व शांतपणं विचार करा की, कधी बाहेरची परिस्थिती तुम्हाला दुःखी करते? की दुःखाचं खरं कारण आपल्या अंतरंगात दडलंय? आपले खरे शत्रू बाहेर नसून आपल्या आतच असतात. आपल्यातील राग, अहंकार, मत्सर, द्वेष आपली मुळ शांतवृत्ती, तृप्ती, समाधान यांना नष्ट करत असतात. समोरच्यानं शिवी दिली तर आपण रागावतो (मी सुद्धा) पण त्या शिवीनं खरी जखम कुणाला झालेली असते? तर जखम आपल्यातील अहंकाराला झालेली असते. आता क्रोध तुमचा ताबा घेतो आणि पुढील गोष्टी घडत जातात. लोभ तुम्हाला गुलाम बनवतो आणि इर्षा तुमच्या हृदयात आग लावते. हे तर आपले जवळचे शत्रू आहेत. आपल्या मनाची शांती, आपली झोप हेच तर घालवतात!
आपण जिथं शरिरानं असतो तिथं खरं म्हणजे मनानं नसतो. आता आपलं पुढील ध्येय काय? पुढील पद कोणतं? आता कशावर, कुणावर आणि कसा विजय मिळवायचा? कुणाचा प्रतिकार कसा आणि कुणा मार्फत मोडून काढायचा? ही तुमची बेचैनीच सांगून जाते की, खरा पराभव तुमच्या आत झालेला आहे. तुम्ही ज्याला अलेक्झांडर द ग्रेट म्हणता, ज्यानं अख्ख्या जगाशी लढाई केली, ज्यानं दुसऱ्यांना हरवलं, तो खरा म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट इडियट होता. रात्री तो शांत झोपत नसे. आपल्याच सैन्यातील कोणी उठाव करील म्हणून कायम चिंतेत असायचा. त्याचे विचार चिंता यामुळं तो कायम अस्वस्थ असायचा. बाहेर मिळालेल्या विजया नंतरही आत तो हरलेला माणूस होता. हाच त्याचा खरा पराभव होता. तो जिथं जिथं गेला, तिथं तिथं त्यानं तलवारीच्या जोरावर राज्ये जिंकली. पण गोष्ट इथं संपत नाही. जग जिंकत जिंकत तो जेव्हा मृत्यूच्या द्वारावर गेला तेव्हा त्याला सार्वजनीन सत्याचा बोध झाला. एका चिरंतन सत्याची जाणीव त्याला झाली. त्यानं पूर्ण जग जिंकलं असेल किंवा नसेल, पण एवढं निश्चित की, जगज्जेता अलेक्झांडर हरला होता आपल्याच मनासमोर! त्याला स्वतःवर विजय मिळवता आला नाही. खरंतर त्याचं स्वप्न प्रत्यक्षात आलं नाही. विचार करा, ही केवढी मोठी विटंबना आहे की, जगज्जेता अलेक्झांडर हरला होता आपल्याच मनासमोर, त्याची इच्छा अपूर्णच राहिली, त्याच्या आत्म्याला शांती मिळाली नाही! जोपर्यंत तुम्ही आपले आंतरिक शत्रू कोण आहेत हे ओळखून त्यावर विजय मिळवत नाही, तोपर्यंत तुम्ही पराजयीच असता. आतले शत्रू तलवारीनं नाही, तर बोधानं जिंकले जातात. पण हा बोध होण्यासाठी बुद्ध म्हणतो ध्यानात जा, महावीर म्हणतो मौनात जा आणि कृष्ण म्हणतो योग आचरा. थोडक्यात आपल्या मनाशी संवाद साधा. अलेक्झांडर द ग्रेट इडियटला मरण्यापूर्वी काहीच काळ आधी बोध झाला. त्यानं त्याच्या अंतकाळी सर्वांना सांगितलं, “माझी तिरडी जेव्हा बांधाल, तेव्हा माझे हात तिरडी बाहेर दिसूद्यात. जगाला कळूदे की अलेक्झांडर द ग्रेट रिकाम्या हातानं गेला! ” अलेक्झांडर द ग्रेट इडियटचा मृत्यू आपल्याला ही शिकवण देतो की, तुम्ही कितीही प्रतिष्ठा, संपत्ती, साम्राज्य मिळवा शेवटी सर्व इथंच राहाणार आहे. सोबत जाणारच असेल तर तो तुमचा जीवनानंद! … आपल्याला अलेक्झांडर द ग्रेट इडियट होऊन चालणार नाही. आपल्याला आपल्या आतील युद्धभूमीवर विजय मिळवायचा आहे. जर आपण वासना, राग, लोभ, द्वेष व अहंकारावर विजय मिळवला तर, आणखी कशावरही विजय मिळवण्याची आवश्यकता नाही… दुनिया जिंकण्या आधी स्वतःला जिंकूया! 🙏
© श्री हेमंत तांबे
पाटगाव.
मो – 9403461688
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





