श्री दिवाकर बुरसे
🌸 विविधा 🌸
☆ धर्माच्या वाटेवरून अध्यात्माच्या क्षितिजाकडे ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
‘मी कसे जगावे?’ या प्रश्नापासून ‘मी कोण आहे?’ या अंतर्मुख प्रवासापर्यंत…
मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याच्याकडे नाव नसते, धर्माची जाणीव नसते, विचारांची निश्चित चौकट नसते. तो केवळ एक शक्यता असतो—जगण्याची, जाणण्याची, अनुभवण्याची आणि शोधण्याची.
हळूहळू त्याला शिकविले जाते—हे करावे, हे करू नये; हे पवित्र, ते अपवित्र; हे कर्तव्य, ते अकर्तव्य. तो ईश्वराचे स्मरण करायला शिकतो, प्रार्थना करतो, संस्कार स्वीकारतो, परंपरा शिकतो आणि जपतो.
परंतु या सर्वांच्या पलीकडे एक प्रश्न कधीतरी त्याच्या अंतर्मनाच्या द्वाराशी येऊन उभा राहतो—
“मी नेमका कोण आहे? ”
आणि त्याच क्षणी आणखी एक प्रश्न मनाला अंतर्मुख करतो—
“धार्मिक असणे म्हणजेच अध्यात्मिक असणे का? ”
धर्म ही बाह्य आचरणाची वाट आहे आणि अध्यात्म ही अंतःकरणात उजळत जाणारी यात्रा आहे का?
की या दोन्ही वाटा शेवटी एकाच सत्याकडे घेऊन जातात?
या प्रश्नांपासूनच धर्म आणि अध्यात्म यांच्यातील सूक्ष्म नाते समजून घेण्याचा प्रयत्न सुरू होतो.
दृश्य विश्वाच्या पलीकडे अदृश्याचा शोध
आपण ज्या विश्वात वावरतो ते दृश्य आहे. त्याला आकार आहे, रंग आहे, स्पर्श आहे, गंध आहे. भारतीय तत्त्वज्ञानाच्या विविध परंपरांमध्ये या दृश्य विश्वाचे विवेचन पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या संदर्भात केले जाते. त्याचबरोबर सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचाही विचार केला जातो. या घटकांच्या परस्परसंबंधातून प्रकृतीचे असंख्य आविष्कार प्रकट होतात.
आपले शरीरही याच प्रकृतीचा एक भाग आहे. जन्म, वृद्धी, परिवर्तन, क्षय आणि मृत्यू या सर्व प्रक्रियांना ते बांधील आहे.
परंतु प्रश्न इथेच संपत नाही.
या शरीराला जाणणारे ‘मी’ कोण?
नेत्र पाहतात; परंतु पाहणारा कोण?
कर्ण श्रवण करतात; परंतु ऐकणारा कोण?
मन विचार करते; परंतु त्या विचारांची जाणीव कोणाला होते?
याच शोधयात्रेतून अध्यात्माच्या प्रदेशाचा आरंभ होतो.
परमात्मा, ब्रह्म, ईश्वर किंवा चैतन्य—या संकल्पनांना विविध तत्त्वज्ञानपरंपरांनी निरनिराळी नावे आणि अर्थ दिले आहेत. मात्र त्यामागील मूलभूत जिज्ञासा एकच आहे—
दृश्याच्या पलीकडे अदृश्य काय आहे? आणि बाह्य विश्वाच्या पलीकडे माझ्या अस्तित्वाचे अंतिम स्वरूप काय आहे?
अध्यात्म म्हणजे या प्रश्नांना तयार उत्तरांनी झाकून टाकणे नव्हे; तर त्या प्रश्नांसमोर निःसंकोचपणे उभे राहणे.
अध्यात्म : स्वतःकडे वळलेली दृष्टी
‘अध्यात्म’ हा शब्द व्यापक अर्थाने आत्मतत्त्वाशी संबंधित चिंतन, आत्मशोध आणि अंतर्मुख साधना यांच्याशी जोडला जातो.
परंतु अध्यात्म म्हणजे केवळ नेत्र मिटून ध्यानस्थ होणे नव्हे.
अध्यात्म म्हणजे स्वतःच्या विचारांकडे पाहणे.
स्वतःच्या अहंकाराची जाणीव करून घेणे.
स्वतःच्या भयाचा मागोवा घेणे.
स्वतःच्या लोभाला प्रश्न विचारणे.
स्वतःच्या क्रोधाचे मूळ शोधणे.
आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे—स्वतःविषयीच्या आपल्या समजुतींचीच चिकित्सा करणे.
आपण ईश्वराचे स्मरण किती वेळा करतो यापेक्षा, त्या स्मरणामुळे आपल्यात किती नम्रता निर्माण झाली, हा प्रश्न अध्यात्म विचारते.
आपण किती ग्रंथ वाचले यापेक्षा, त्या वाचनामुळे आपल्या आचरणात काय परिवर्तन झाले, हा प्रश्न अध्यात्म विचारते.
कारण ज्ञान मस्तिष्कात साठविणे आणि ज्ञान जीवनात उतरविणे यात मोठा भेद आहे.
अध्यात्म म्हणजे काही क्षणांचा विधी नसून, संपूर्ण जीवनाकडे पाहण्याची एक अंतर्मुख दृष्टी आहे.
धर्म : केवळ उपासना नव्हे, तर जगण्याचे दायित्व
‘धर्म’ म्हटले की आपल्या मनात ईश्वर, देवालय, पूजा, उपासना, उत्सव, परंपरा, व्रते आणि धार्मिक विधी यांची चित्रे उभी राहतात. परंतु भारतीय विचारपरंपरेत ‘धर्म’ या संकल्पनेचा अर्थ यापेक्षा कितीतरी व्यापक आहे.
धर्म म्हणजे कर्तव्य, नैतिकता, सदाचार आणि जीवनाला व समाजाला धारण करणारी मूल्यव्यवस्था.
“धारयति इति धर्मः” — जे धारण करते, टिकवते, सांभाळते, त्याला धर्म असे म्हणण्याची व्याख्या याच व्यापक अर्थाकडे निर्देश करते.
अग्नीचा धर्म उष्णता देणे; जलाचा धर्म प्रवाहित होणे—अशा उदाहरणांत ‘धर्म’ म्हणजे एखाद्या वस्तूचा स्वभाव किंवा गुणधर्म असाही अर्थ अभिप्रेत असतो.
मग मनुष्याचा धर्म काय?
सत्य, करुणा, न्याय, संयम, कर्तव्यबुद्धी, प्रामाणिकता आणि अन्य जीवांच्या अस्तित्वाचा आदर—हे मनुष्यत्व टिकविणारे गुण असतील, तर त्यांना आपल्या जीवनात स्थान देणे हीच धर्माची खरी कसोटी ठरते.
म्हणूनच धर्म केवळ देवतेसमोर हात जोडण्यात नसतो.
देवालयातून बाहेर पडल्यानंतर आपण मनुष्यांशी कसे वागतो, यातही धर्म असतो.
धर्म विचारतो— ‘मी कसे जगावे?’
धर्म मनुष्याला जीवनासाठी एक चौकट प्रदान करतो.
काय योग्य?
काय अयोग्य?
माझे कर्तव्य काय?
माझे दायित्व काय?
समाजाशी माझे नाते कसे असावे?
या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न धर्म करतो.
भगवद्गीतेच्या संदर्भात कर्तव्य आणि स्वधर्माचा विचार मध्यवर्ती आहे. आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे, त्यामागील आसक्ती आणि स्वार्थ कमी करणे आणि कर्म अधिक व्यापक भावनेने करणे—हा विचार निष्काम कर्माच्या दिशेने घेऊन जातो.
म्हणजेच धर्म आपल्याला जगण्याची दिशा देतो.
परंतु दिशा प्राप्त झाली म्हणून प्रवास पूर्ण होत नाही.
इथेच अध्यात्म पुढे येते.
अध्यात्म विचारते— ‘मी कोण आहे?’
धर्म म्हणतो—कर्तव्य कर.
अध्यात्म विचारते—कर्तेपणाची जाणीव कुणाला आहे?
धर्म म्हणतो—सत्य बोल.
अध्यात्म विचारते—सत्यापासून मी स्वतः का दूर जातो?
धर्म म्हणतो—अहंकार सोड.
अध्यात्म विचारते—हा ‘मी’ नेमका कोण आहे, ज्याला मी अहंकार म्हणतो?
धर्म बाह्य आचरणाला शिस्त देतो; अध्यात्म अंतर्मनाला दर्पण दाखवते.
धर्म समाजाशी असलेले आपले नाते सुसंवादी करण्याचा प्रयत्न करतो; अध्यात्म स्वतःशी असलेले आपले नाते समजून घेण्याचा प्रयत्न करते.
म्हणूनच—
«धर्म कर्तव्य शिकवतो; अध्यात्म कर्त्याचा शोध घेते. »
मग धार्मिक व्यक्ती म्हणजे अध्यात्मिक व्यक्ती का?
हा प्रश्न टाळून धर्म आणि अध्यात्म यांचे नाते पूर्णपणे समजून घेता येणार नाही.
धार्मिक व्यक्ती अध्यात्मिक असते आणि अध्यात्मिक व्यक्ती धार्मिक असते, असे सरसकट म्हणता येईल का?
उत्तर आहे—नेहमीच नाही.
एखादी व्यक्ती नियमित पूजा करू शकते, धार्मिक विधी पाळू शकते, तीर्थयात्रा करू शकते, धार्मिक ग्रंथांचे वाचन करू शकते; परंतु त्याच वेळी तिच्यात अहंकार, असहिष्णुता, द्वेष, असत्य किंवा स्वार्थ कायम राहू शकतो.
मग तिच्या धार्मिक आचरणाचा अंतर्मनावर किती परिणाम झाला आहे?
हा प्रश्न विचारावाच लागतो.
त्याउलट एखादी व्यक्ती एखाद्या विशिष्ट धार्मिक परंपरेचे बाह्य आचरण करीत नसली, तरी ती सत्याचा शोध घेत असेल, स्वतःचे परीक्षण करीत असेल, करुणेने वागत असेल, लोभ आणि अहंकारावर संयम ठेवत असेल आणि जीवनाच्या अंतिम अर्थाचा शोध घेत असेल, तर तिच्यात अध्यात्मिक प्रवृत्ती असू शकते.
म्हणून—
धार्मिक असणे ही अध्यात्मिक असण्याची हमी नाही; आणि अध्यात्मिक असणे ही विशिष्ट धर्माचे अनुयायी असण्याची अट नाही.
मात्र याचा अर्थ धर्म आणि अध्यात्म परस्परविरोधी आहेत, असा अजिबात नाही.
उलट, त्यांच्या श्रेष्ठ स्वरूपात ते एकमेकांना समृद्ध करतात.
धर्म अध्यात्मासाठी भूमी तयार करू शकतो आणि अध्यात्म धर्माला अंतःकरण देऊ शकते.
विधी आणि अनुभूती यांच्यातील अंतर
भू – आरेखन (नकाशा) म्हणजे प्रवास नव्हे.
दिशा म्हणजे गंतव्य नव्हे.
शब्द म्हणजे अनुभूती नव्हे.
आणि धार्मिक विधी म्हणजे अध्यात्मिक अनुभूती नव्हे.
घंटानाद, मंत्रोच्चार, पूजा, ग्रंथवाचन—या सर्वांचे स्वतःचे महत्त्व असू शकते. ते मनाला एकाग्र करतात, परंपरेशी जोडतात, सांस्कृतिक स्मृती जिवंत ठेवतात.
परंतु पूजा संपल्यानंतरही मनातील क्रोध तसाच राहिला, प्रार्थना संपल्यानंतरही अहंकार तसाच राहिला, देवालयातून बाहेर पडल्यानंतरही मनुष्याबद्दलचा द्वेष तसाच राहिला—तर त्या साधनेचा अंतर्मुख परिणाम किती झाला, हा प्रश्न उरतोच.
धार्मिकतेचे बाह्य प्रदर्शन वाढले, म्हणून धर्माची अंतर्गत खोली वाढतेच असे नाही. प्रचंड ध्वनी, दिखाऊपणा, स्पर्धा, अनावश्यक व्यय आणि गर्दी—हे धर्माचे पर्याय होऊ शकत नाहीत.
ईश्वराच्या नामस्मरणाचा ध्वनी मोठा असण्यापेक्षा अंतःकरणातील कोलाहल शांत होणे अधिक महत्त्वाचे नाही का?
देवालयासाठी मोठी देणगी देणे पुण्यकारक असू शकते; परंतु आपल्या घरातील वृद्धाशी दोन प्रेमळ शब्द बोलणे, गरजू व्यक्तीला साहाय्य करणे, अन्यायाच्या वेळी सत्याच्या बाजूने उभे राहणे—हीसुद्धा धर्माचीच रूपे आहेत.
कारण धर्माची खरी परीक्षा पूजा सुरू असताना होत नाही.
पूजा संपल्यानंतर सुरू होते.
धर्म विभागतो की धर्माच्या नावाचा अहंकार विभागतो?
धर्माच्या नावाने इतिहासात संघर्ष झाले, भेद निर्माण झाले, मनुष्यसमूह विविध ओळखींमध्ये विभागले गेले—हे वास्तव नाकारता येत नाही. विद्यमान स्थितीही तशीच आहे.
परंतु त्याचा दोष धर्माच्या मूलभूत मूल्यांमध्ये आहे की धर्माच्या नावावर उभ्या केलेल्या अहंकारी ओळखींमध्ये?
धर्म जेव्हा करुणा, सत्य, संयम आणि कर्तव्य शिकवतो, तेव्हा तो मनुष्याला उन्नत करतो.
परंतु धर्म जेव्हा ‘माझेच सत्य अंतिम’ या अहंकारात परिवर्तित होतो, तेव्हा तो भिंत उभी करू शकतो.
अध्यात्माची खरी शक्ती इथेच जाणवते.
कारण आत्मशोध जितका सखोल होत जातो, तितका ‘मी’चा अहंकार विरघळण्याची शक्यता वाढते.
आणि ‘मी’च्या भिंती क्षीण झाल्या की ‘आपण’ची जाणीव विस्तारू शकते.
म्हणून अध्यात्म कोणत्याही धर्माचा विरोध करण्यासाठी नाही; तर धर्माला त्याच्या मानवी आणि नैतिक मुळाशी परत नेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
धर्माचा पाया, अध्यात्माची उंची
धर्म आणि अध्यात्म यांच्यात श्रेष्ठ-कनिष्ठ असा संबंध प्रस्थापित करण्याची आवश्यकता नाही.
धर्माविना अध्यात्म कधी कधी दिशाहीन होऊ शकते.
अध्यात्माविना धर्म कधी कधी केवळ बाह्य कर्मकांडात अडकू शकतो.
धर्म म्हणतो—कर्तव्य विसरू नकोस.
अध्यात्म म्हणते—कर्तव्य करताना स्वतःला विसरू नकोस.
धर्म जीवनाला शिस्त देतो.
अध्यात्म जीवनाला अर्थ देण्याचा प्रयत्न करते.
धर्म मनुष्याला सदाचार शिकवतो.
अध्यात्म त्या सदाचाराच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करते.
म्हणून धर्म आणि अध्यात्म यांच्यात संघर्षापेक्षा संवाद अधिक आवश्यक आहे.
एक बाहेरून आत जाणारी वाट आहे; दुसरी आतून बाहेर येणारी प्रकाशरेषा.
आणि अखेर…
मनुष्याने आयुष्यभर धर्म पाळला, परंतु मनुष्यत्व गमावले—तर त्याने काय प्राप्त केले?
त्याने असंख्य वेळा प्रार्थना केली, परंतु स्वतःच्या मनातील द्वेष ओळखला नाही—तर त्या प्रार्थनेने त्याच्यात किती परिवर्तन घडविले?
त्याने अध्यात्मावर शतावधी ग्रंथ वाचले, परंतु एखाद्या दुःखी मनुष्याच्या डोळ्यांतील अश्रू समजून घेतले नाहीत—तर त्या ज्ञानाचे प्रयोजन काय?
कदाचित धर्म आणि अध्यात्म यांचा अंतिम अर्थ याच ठिकाणी एकत्र येतो—
माणूस अधिक माणूस होणे.
मन अधिक निर्मळ होणे.
विचार अधिक व्यापक होणे.
कर्तव्य अधिक प्रामाणिक होणे.
अहंकार अधिक क्षीण होणे.
आणि आपल्या अस्तित्वाकडे पाहताना—‘मी’च्या पलीकडे ‘आपण’ची जाणीव जागृत होणे.
धर्माची खरी ओळख देवालयांच्या उंच कळसांत नसून, मनुष्याच्या आचरणात दिसते.
अध्यात्माची खरी ओळख ध्यानाच्या शांत कक्षात नसून, त्या शांततेतून बाहेर पडलेल्या मनुष्याच्या कृतीत दिसते.
शेवटी प्रश्न असा नाही की—
“मी किती धार्मिक आहे?”
किंवा,
“मी किती अध्यात्मिक आहे? ”
खरा प्रश्न कदाचित याहून अधिक साधा आणि अधिक कठीण आहे
“माझ्या धर्मामुळे माझ्यातील मनुष्यत्व वाढले का? ”
“माझ्या अध्यात्मामुळे माझ्यातील ‘मी’ थोडा कमी झाला का? ”
जर या दोन प्रश्नांची उत्तरे आपल्या अंतःकरणातून शांतपणे ‘हो’ म्हणून उमटली, तर कदाचित आपण धर्माच्या वाटेवरून अध्यात्माच्या क्षितिजाकडे निघालो आहोत.
आणि कदाचित ही यात्रा कुठल्यातरी देवालयात, तीर्थक्षेत्री किंवा ग्रंथाच्या पानावर संपणार नाही.
ती संपेल—त्या दिवशी, जेव्हा आपण स्वतःमध्ये डोकावून पाहू आणि जाणवेल की ज्याचा शोध आपण आयुष्यभर बाहेर घेत होतो, त्या शोधाचा आरंभ तर आपल्या स्वतःच्या अंतःकरणापासूनच झाला होता!!
©️ लेखक: दिवाकर बुरसे, पुणे
संपर्कः ९५५२ ६ २९ २ ४ ५
कृष्णाष्टमी ४ सप्टेंबर २०२६
☆
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





