सौ शालिनी जोशी
विविधा
☆ नवरात्र… ☆ सौ शालिनी जोशी ☆
अश्विन – नवरात्र हे हिंदू धर्मातील देवीशी संबंधित असे व्रत आहे. ही आराधना प्रामुख्याने वर्षातून दोन वेळा केली जाते. १) वासंतिक नवरात्र– चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र शुद्ध नवमीपर्यंत, वसंत ऋतूच्या सुरुवातीला. २)शारदीय नवरात्र –अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत, शरद ऋतुच्या सुरुवातीला. इतरही नवरात्र आहेत उदाहरणार्थ नरसिंहाचे, शाकंबरीचे इ. यातील शारदीय नवरात्र जास्त प्रचलित आहे.
गणपती संपले की नवरात्राच्या तयारीला सुरुवात होते. यावेळी पावसाळा संपून पिके तयार झालेली असतात. पहिले पीक घरात आलेले असते. म्हणून हा कृषीविषयक लोकोत्सव म्हणजे निसर्गोत्सव किंवा सूर्जनाचे पूजन, निर्मिती शक्तीची उपासना. हा नऊ दिवसांचा उत्सव. येथे नऊ या संख्येचा निर्मिती शक्तीशी संबंध आहे. जमिनीत धान्य रुजत घातल्यावर नऊ दिवसांनी उगवते. गर्भधारणा झाल्यावर नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. म्हणून या दिवशी नऊ धान्यांची घटात माती घालून पेरणी करतात किंवा पत्रावळीवर माती पसरून त्यात नऊ धान्ये पेरतात. मध्ये घटावर कुलदेवतेची किंवा कुलदेवाची प्रतिमा ठेवतात. त्याची पूजा करतात. काही लोकांकडे फक्त कुलदेवतेच्या किंवा कुलदेवाच्या प्रतिमेची पूजा करतात. फुलांची माळ देवावर बांधतात. अखंड नऊ दिवस नंदादीप लावतात. नऊ दिवसानंतर उगवलेले शेत देवाला वाहतात. असा हा सृष्टीतील परिवर्तन शक्तीचा खेळ. धनधान्य, सुख, संपत्ती देणारा, आरोग्यवर्धन करून समाधान देणारा हा उत्सव.
या उत्सवाला दुसरेही एक अंग आहे. महिषासुरांच्या व इतर राक्षसांच्या त्रासाने प्रजा त्रस्त झाली होती. तेव्हा सर्व देवांचे तेज एकवटून एक शक्ती निर्माण झाली. तिने आपल्या पराक्रमाने महिषासुराचा वध केला. हे युद्ध नऊ दिवस चालले. म्हणून त्या देवीला महिषासुरमर्दिनी असे म्हणतात आणि नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा करतात. तिच्या शक्ती रूपाची ही पूजा. वाघावर आरुढ झालेली, हातात खड्ग आदी शस्त्रे व धारण केलेली असे या देवीचे रूप. म्हणून म्हणतात ‘या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपेण संस्थिताl नमस्तयै नमस्तयै नमस्तयै नमो नमःll
या देवीचे रोज वेगवेगळे रूप कल्पून तिला वेगवेगळी नावे दिली आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिधात्री अशी ही नऊ नावे. किंवा ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्या या शक्ती म्हणून पहिले तीन दिवस सरस्वती, नंतर तीन दिवस महालक्ष्मी आणि नंतरचे तीन दिवस महांकालीचे असे हे म्हणतात.
एकंदरीत दुष्ट प्रवृत्ती बरोबर लढून समाजाला सुखी करणाऱ्या स्त्री शक्तीचा हा गौरव म्हणजेच नवरात्रोत्सव. ही शक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये निर्माण व्हावी ही यामागील भावना. विश्वव्यापक, त्रिगुणात्मक आदीमायचे सगुण रूप म्हणजेच ही देवी. यावरून भारतीय संस्कृतीतील स्त्रीचे महत्व अधोरेखित होते. या काळात मंदिरातील देवीचे भक्ती केली जाते. तसेच घरात वावरणाऱ्या देवीकडे म्हणजे गृहिणीकडेही दुर्लक्ष करू नये. आर्थिक व्यवहाराचे शिक्षण घेऊन ती महालक्ष्मी होते. सरस्वती रूपाने ती सुशिक्षित झाली की मुलांवरती चांगले संस्कार करण्यास समर्थ होते. ती आरोग्य संपन्न होऊन स्वतःचे व घराचे संरक्षण करणारी महांकालीही होते. अशाप्रकारे नवरात्र म्हणजे निर्मिती शक्तीचा आदिशक्तीचा उत्सव, म्हणजेच स्त्री शक्तीचे सामर्थ्य ओळखून तिला चालना देण्याचा काळ. तिचा गौरव करून तिला प्रोत्साहन देण्याचा, ती शक्ती जागृत करण्याचा काळ.
हा उत्सव भारतभर साजरा केला जातो. पद्धत वेगळी असली तरी भाव एकच. संयम व उपासनेने शारीरिक व आत्मिक शुद्धी मिळवण्याचा हा काळ. म्हणून काही लोक नऊ दिवस उपवास करतात. तर काही धान्य फराळ करतात, जोगवा मागतात, देवीचा गोंधळ करतात. पंचमीला ललिता पंचमी व्रत करतात. अष्टमीला महालक्ष्मी व्रत करतात. कुमारी पूजन, ब्राह्मण व सवाष्ण भोजन करतात. होम हवन करतात.
नववा दिवस हा विशेष महत्त्वाचा याला खंडे नवमी म्हणतात. या दिवशी पांडवांनी शमीवृक्षात लपवलेले शस्त्रे बाहेर काढली. विराटाच्या वतीने कौरवांची लढून विजय मिळवला. म्हणून या दिवशी शस्त्र पूजन करतात. आता बदलत्या काळानुसार प्रत्येक जण आपापल्या व्यवसायात लागणाऱ्या यंत्रांचे, अवजारांचे, पुस्तकांचे, वाहनांचे पूजन करतात.
आता गणपतीप्रमाणे नवरात्र उत्सवही सार्वजनिक स्वरूपात साजरा करतात. मनोविकार, पापवाचना, दुष्टबुद्धी या शत्रूंचा नाश होण्याचे सामर्थ्य प्राप्त व्हावे या पवित्र भावनेतून हा सण साजरा व्हावा. 🙏.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈







