सौ शालिनी जोशी
विविधा
☆ पाऊले… ☆ सौ शालिनी जोशी ☆
माझी मुलगी भक्ती म्हणाली मला मोत्याची गौरीची पावले करायची आहेत. मनात आले का बरे असावे एवढे पावलांना महत्त्व गौरीचे पावले, संतांचे पाय,भगवंताचे पद,सद्गुरु चे चरण,महात्म्यांच्या पादुका अशा विविध प्रकारे आपण पावलांचा उल्लेख करतो.
याला कारण पाय हे अधिष्ठान आहेत.त्याचे वर सर्व शरीराचा भार म्हणजे शरीराचे सर्व कर्तुत्व सामर्थ्य या पायात सामावलेले.म्हणून चरणांच्या किंवा चरण चिन्हांच्या दर्शनाने त्या महात्म्याच्या सामर्थ्याचा प्रत्यय येतो.पदस्पर्शाने किंवा त्यावर डोके ठेवल्याने ते सामर्थ्य आपल्यात प्रवाहित होते असे म्हणतात.हीच चरणांची महती म्हणून संतांच्या प्रत्यक्ष मूर्ती नसल्या तरी चालतात. त्यांच्या पादुकांना चरणांच्या प्रतिमेला नमन केले जाते.क्षेत्राच्या ठिकाणी त्या त्या संत महात्म्यांच्या पादुका असतात. त्यांच्या पदस्पर्शाने ती भूमी पावन झालेली असते. त्याचे क्षेत्र होते.अशा संतांच्या पदस्पर्शाने तेथील रजःकणही पावन होतात त्यांचे वास्तव्य सूक्ष्म रूपाने तेथे राहते.
पुराणकथातही चरणांचे महत्त्व सांगितले आहे. रामाच्या पदस्पर्शाने गौतम पत्नी अहिल्याचा उद्धार झाला. ती शाप मुक्त झाली. तर वामन अवतारात भगवंतांनी चरणाने बळीला पाताळा ढकलले. राम वनवासात गेल्यावर लक्ष्मणाने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य केले.
गौरीच्या पावला नाही असेच महत्त्व आहे.गौरी घरात आणण्यापूर्वी तिच्या मार्गावर हळदीकुंकू व रांगोळीची पावले काढली जातात. त्यावरून ती घरात येते हा तिच्या स्वागताचा प्रकार.मान सन्मानाने तिला घरात आणून या पावलावरून घरभर फिरवले जाते. घरातले वैभव दाखविले जाते.तिचा वास अखंड घरात असावा म्हणून ही पावले नेहमी आत येणारी असतात आणि बाहेर जाणारी अलक्षमीची. कोणी श्रेष्ठ पूज्य व्यक्ती घरी आल्यास त्याची पाद्य पूजा करतात लग्नातही जावयाचे व बहिणीचे पाय धुतले जातात यात त्यांच्या सन्मानाचा हेतू असतो.आदर व्यक्त केला जातो. लग्नातील सप्तपदी हा विधी दोघांनी आयुष्यभर सहकार्याने एकमेकांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावयाचे आहे असे दाखवतो.
पावलावर पाऊल ठेवणे असा एक वाक्प्रचारही आहे म्हणजे चांगल्या माणसाचा आदर्श ठेवून तसे वागणे.आणि पाऊल वाकडे पडणे म्हणजे मार्ग चुकणे. पाऊलवाट म्हणजे पायी चालता येईल अशी अरुंदवाट पुढील मार्ग दाखवणारी म्हणून संतांच्या पाऊलवाटेने आपण चालावे असे म्हणतात.बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी आपल्याकडे एक म्हण आहे म्हणजे बाळाच्या पायांच्या हालचालीवरून पुढील त्याच्या कर्तुत्वाचा अंदाज येतो. मेंदिने रंगलेल्या पावलांनी नववधू घराचा उंबरठा ओलांडते तेव्हा पायाने तांदळाचे माप आज सांडते.लक्ष्मी रूपाने आलेली ही वधू घरातील लक्ष्मी घरातच ठेवते. नर्तकीचे नृत्यही तिच्या पायाणच्या हालचालीच्या तालावरच होत असते.वारकऱ्यांची पावले पंढरीचा मार्ग चालतात तेही विठ्ठलाच्या चरण स्पर्शाच्या ओढीने. स्वातंत्र्यवीरांच्या पावलावर पाऊल ठेवून सैनिक देशाचे रक्षण करतात. एव्हरेस्टवर उमटलेली आणि अंटार्टिकावर उमटलेली भारतीयांची पावले देखील आपली सत्ता दाखवणारी तर चंद्रावरील माणसाचे पावले चंद्रालाही गवसणी घालणारी.अशा प्रकारे पावलेही समृद्धीकडे नेणारी प्रगतीचा मार्ग दाखवणारी म्हणूनच म्हटले आहे.
एक एक पाऊल चालनिश्चयाने
नकोय बावरून जाऊ नियतीच्या भयाने.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈






👌 👌