सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ परिमळु… ☆ सौ शालिनी जोशी

अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु

तो मी म्हणे गोपाळु आला गे माये

माऊलींचा हा अभंग वाचला आणि परिमळु या ठिकाणी मन घुटमळले. परिमाळु किती सुंदर शब्द! त्यात गोडवा आहे. तरलता आहे. प्रेम आहे. परिमाळु म्हणजे आपण नेहमी म्हणतो तो सुगंधच. पण माऊलींचा तो अवचिता, झुळकला आणि अळुमाळु आहे. तीनही विशेषणे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तो अचानक येणारा, वाऱ्याच्या झुळके सारखा, थोडा थोडा आहे. कारण तो गोपाळाच्या (आत्मारामच्या) आगमनाची सूचना देणारा आहे. ज्ञानेश्वरांच्या विरही मनाला जाणवलेला आहे. त्यांच्यातल्या विरहिणीने केलेले हे वर्णन. ही भाषा माऊलीनाच शोभते.

परिमळु म्हणजे परिमल, सुगंध, गंध, सौरभ, दरवळ, सुवास असे बरेच शब्द असले तरी आपल्याला वास येतात ते फळांचे, फुलांचे. खरंतर वासाचा उगम पृथ्वीतत्वात आहे. गंध हा पृथ्वी तत्वाचा गुण. पहिला पाऊस पडल्यावर जो मृद्गंध परिसर सुगंधित करतो, सर्वांना हवाहवासा वाटतो, तो हाच. तो शुद्ध व पवित्र, ज्याला भगवंत आपली विभूती मानतात. ’ पुण्यो गंध: पृथिव्याम्’ (गी. ७/९) तो हाच. कारण पृथ्वी हे सगळ्या गंधांचे मूळ आहे. जे जे पृथ्वी तत्वातून निर्माण झाले, त्यात गंध हा गुण आला. पण प्रत्येकाचा गंध वेगळा. कसा ते शब्दाने सांगता येत नाही. तो अनुभवावाच लागतो.

हजारो प्रकारची फुले आहेत. पण गुलाबाचा गंध राजेशाही, मोगऱ्याचा गोडसर, सोनचाफ्याचा लपून न राहणारा. म्हणून गदिमा म्हणतात, ’ लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का? ’ सुगंध हा काव्य विषय झाला. तो कुपित भरून ठेवता येत नाही. मनाच्या कुपीतच त्याला स्थान. पण एक फुल हातात घेतलं की, ओंजळ मात्र सुवासाने भरून जाते.

केवडा, रात्रराणी, निशिगंध, शेवंती इत्यादी फुलांबरोबर फळांचे, पानांचे व मुळांचे वेगवेगळे गंध असतात. आंबा, फणस, पेरूचे वास घर भरून टाकतात. कढीलिंब, कोथिंबीर पानं खाद्य पदार्थाची चव वाढवतात. आलं, बासमती तांदूळ, केशर, कापूर, चंदन, मसाल्याचे पदार्थ किती म्हणून सुगंध सांगावे? त्याला सीमाच नाही. वासाचा मनाबरोबर शरीरावरही परिणाम होतो. म्हणून ‘आरोमा थेरपी’ नावाची वैद्यकशास्त्राची शाखा निघाली. त्याचा उपयोग मन शांत करण्यासाठी, ताण व अस्वस्थता कमी करण्यासाठी होतो. असा सुगंध जादूगार आहे. म्हणून दिवाळीत चंदनाचा साबण, मोगऱ्याचे तेल वापरतो. आयुर्वेदातही ज्येष्ठमध जटामांसी अशा सुगंधी वनस्पतींचा वापर केला जातो.

 या सुगंधापासून परफ्युम, उद्बत्त्या, सुगंधी मेणबत्त्या, अत्तरे, साबण, शाम्पू, सौंदर्यप्रसाधने, फर्शी पुसायचे द्रव्ये, कुंकू, अष्टगंध इत्यादी कितीतरी वस्तू तयार केल्या जातात. त्यामुळे उद्योगधंदे वाढले. असे आपले जीवन गंधमय आहे. सकाळी उठल्यावर वापरायची पेस्ट किंवा दंतमंजन शब्द तयार झाले. गंध, सुगंध, दरवळ, दर्प, वास, दुर्गंध सगळे वासाशी संबंधित पण वापरताना वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळा शब्द. मंदिरातील धुपाचा मंद दरवळ, सुगंध म्हंटल की अत्तराची कुपी, दुर्गंध म्हटलं की गटार, सुवास नाकाला हवाहवासा वाटणारा, उग्र दर्प काहीसा नकोसा, दुर्गंध म्हटलं की गटार नकोसा. वास सरसकट वापरला जाणारा, फुलवाल्याकडे संमिश्र दरवळ, भाजीवाल्याकडे कांदा, लसूण, कोबी, मुळे असे उग्र वास. कोऱ्या कपड्यांचा आणि कोऱ्या पुस्तकांचाही वेगळाच, घामाचा कुबट वास, तंबाखू तपकिरीलाही आणखी वेगळा वास. अशी ही गंध कहाणी वाढवावी तेवढी वाढवारी. पण एवढे मात्र खरे,

सुगंध हे निसर्गाचे देणे

नसे भाषा आकार रूप लेणे

तरीही हवाहवासा वाटतो

प्रपंच परमार्थात साथीदार तो

 

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments