प्रतिमा रवींद्र कुलकर्णी

अल्पपरिचय 

प्रतिमा रवींद्र कुलकर्णी .

शिक्षण – B Com,  B J, M Phil ( मराठी साहित्य )

  • १९९८ पासून आकाशवाणीवरून  विविध कार्यक्रमांचे लेखन व सादरीकरण
  • गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने दिवाळी अंकासाठी कथा, कविता व नियतकालिकांमधून सदरलेखन  प्रसिद्ध

प्रकाशित साहित्य : (४ पुस्तके)

  • स्वप्नझुला (कवितासंग्रह)
  • कविता उलगडताना (आस्वादक समिक्षा संग्रह)
  • सोनबावरी (ललितलेख संग्रह) व
  • रुजवाई (कथासंग्रह )

? विविधा ?

☆ प्रवाह आणि लाटा! प्रतिमा रवींद्र कुलकर्णी 

‘काय करु, ताई ? कालपासून गिऱ्हाईकच नाही. ’ फळवाला नाराजीने म्हणाला.  गिऱ्हाईक या शब्दाचे मूळ काय बरं असेल ? मी विचारात पडले आणि मला संस्कृतमधला ग्राहक हा शब्द आठवला आणि मग याच्यासारखेच कितीतरी शब्द आठवले.  संस्कृतमधल्या मिष्ट म्हणजे गोड चे मराठीत गोडमिट्ट झाले.  मुष्टीचे मुठीत रूपांतर झाले.  पत्रल चे पातळ झाले आणि ‘शाटी’चे साडी झाले.  संस्कृतमधून मराठीत येताना शब्दांचे रूपरंग बदलते.  अभिजनांच्या भाषेतून आलेल्या मूळ शब्दाला लोकभाषेचा मुलामा चढतो.  पण अशा बदललेल्या शब्दांना बोलीभाषेत अपभ्रष्ट शब्द म्हटले जाते.  भ्रष्ट होणे म्हणजे खाली पडणे किंवा घसरणे.  भ्रंश म्हणजे विकृत होणे किंवा बिघडणे.  त्यामुळे मूळ संस्कृत शब्दाच्या बिघडलेल्या रुपाच्या शब्दाला अपभ्रंशाने आलेला शब्द असे म्हटले जाते.  असे कितीतरी शब्द आता आपल्या भाषेत रुळून गेलेले आहेत कि त्याचे मूळ रुप आठवावे लागते.  आपल्या बोलीभाषेतल्या या शब्दांत आपल्या मातीचा गंध जाणवतो.  उदा.  ग्रामीण भागात उशीर या अर्थी वाढूळ (किंवा वाढवेळ) हा शब्द सहजतेने वापरला जातो.  त्याचे मूळ संस्कृतातल्या ‘वृध्दवेला ‘ (म्हणजे वाढलेला (वाढीव ) वेळ ) या शब्दात आहे.  काळाच्या प्रवाहात शब्दांची ही बदलत गेलेली रूपे !

अपभ्रंश ही संज्ञा केवळ शब्दांसंदर्भात वापरली जाते असे नाही, तर ते विशिष्ट काळातल्या भाषेचे नाव होते.  संस्कृत भाषेतून प्राकृत आणि त्यातून आधुनिक भाषा परिणत होत असतानाचा एक टप्पा म्हणजे अपभ्रंश भाषा.  साधारणतः सहाव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंत ती बोलली जात असे.  विशेषतः पाली, मागधी, महाराष्ट्री या प्राकृत भाषांच्या या काळातल्या रूपांना अपभ्रंश भाषा म्हटले जाते.  सिद्ध, जैन, बौद्ध अशा धर्मोपदेशकांनी जनसामान्यांची बोली अनुसरत आपले कार्य केले.  पुढे परिणत होऊन आधुनिक बंगाली, गुजराती, मराठी यासारख्या विकसित भाषांचा जन्म झाला.  संस्कृतमधून आलेले मूळ शब्द अपभ्रंश प्राकृतच्या संगतीने मराठीत परिणत झाले.  संस्कृतमधून प्राकृत आणि त्यांचे मराठीकरण झालेल्या शब्दांची काही उदाहरणे – अग्रतः – अग्गदो – आघाडी.  सत्यम् – सच्छम – साच.  मयूर – मोरो – मोर.  ही रुपे पाहताना प्राकृत -अपभ्रंश भाषेची आपल्या आजच्या मराठीशी जवळीक लक्षात येते.

भाषेतली ही स्थित्यंतरे त्यांच्या लिखित नमुन्यांमधून जाणवतात.  प्रत्येक काळानुरूप तिच्यात झालेले वैशिष्टपूर्ण बदल जाणवतात.  मंगळवेढयाच्या ताम्रपटातली( इ. स.  ४८८ – शके ४१०) शके ६५८ मधील चिकुर्डे ताम्रपटातली आणि शके १०५१ च्या चालुक्यराज सोमेश्वर रचित अभिलषितार्थ चिंतामणी या ग्रंथातली भाषाशैली वेगळी जाणवते.  शके १११० च्या विवेकसिंधू (मुकुंदराज ) मध्ये ‘ जैसे अमृत चाखे आपुले चवी । तैसे स्वसुख अनुभवी ” असे अध्यात्मज्ञान येते.  

शके ११२८ मधल्या पाटणच्या शिलालेखात ‘कापासी दामाचा विसोवा, आसुपाठी मगरे दिन्हला ‘ आसू म्हणजे त्यावेळचे चलन व कापूसविक्रीसंदर्भात हे लेखन असावे.  बारा-तेराव्या शतकातल्या महानुभाव ग्रंथात – आबैसी गोसावियाते पुसिले ( आबाईसा नावाच्या शिष्येने चक्रधरांना विचारले ) अशी भाषा येते.  याच काळातल्या ज्ञानेश्वरीप्रमाणेच उकारांत वळणाची भाषा तेराव्या शतकातल्या पंचतंत्र (मराठी ) मध्ये ‘पिंगलकु पुसे, दमनकु सांघे ‘ पहायला मिळते.  यानंतरच्या काळातल्या रामदास, तुकाराम, एकनाथ अशा संतांच्या मांदियाळीने विपुल लेखन केले त्यातून त्या त्या काळातील समाजभाषेचे दर्शन घडते.  बखरवाङमयातून, ऐतिहासिक पत्रव्यवहारातून वापरलेल्या भाषेतून अरबी, फारसीचा प्रभाव जाणवतो.  पेशवाई काळापासून मोरोपंत, महीपती, वामनपंडित यांच्या काव्यातून संस्कृतप्रचुरता आढळते.  त्यानंतरच्या काळात इंग्रजांच्या प्रभावामुळे इंग्रजी शब्दांचा वापर वाढत गेला.

भाषेची ही प्रत्येक शतकांत बदललेली रूपे म्हणजे बदलत गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब ! संस्कृतीचे बदलत गेलेले रूप भाषेच्या इतिहासातून उलगडत जाते.  त्या काळातले लेखन आणि शब्दसंपत्तीवरून अनेक गोष्टींचा अंदाज येतो.  समाज, संस्कृती आणि भाषा यांच्यावर इतरांचा प्रभाव पडणे हे अपरिहार्य असते.  त्यामुळे प्रारंभापासून अखेरपर्यंत तिचे स्वरूप एकसारखे राहत नाही.  नव्या कल्पनांसोबत नव्या शब्दांची भर पडत जाते.  कधी जुन्या शब्दांचे नवे अर्थ रूढ होतात तर कधी कल्पना कालबाह्य झाल्यामुळे शब्दही नाहीसे होतात.  शब्दांच्या या भरती आणि ओहोटीमुळे भाषेच्या प्रवाहात लाटांचे उसळणे अपरिहार्य ठरते.

 

© प्रतिमा रवींद्र कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted