श्री प्रसाद जोग

🌸 विविधा 🌸

☆ फादर्स डे ☆ श्री प्रसाद जोग

फादर्स डे – २१ जून

भारतात जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो.

अमेरिकेतल्या वॉशिंग्टनच्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड या मुलीने आपल्या वडीलांच्या आठवणीत या दिवसाची सुरुवात केली होती. हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची प्रेरणा त्यांना १९०९ मध्ये सुरु झालेल्या मदर्स डे पासून मिळाली.

अलौकिक प्रतिभेच्या जनकवी पी. सावळारामांना लता मंगेशकर यांनी विनंती केली आणि सांगितले वडिलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाणं लिहा

त्या वर कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला असं अप्रतिम काव्य सावळारामांनी लिहिलं आणि वसंत प्रभूंनी त्याला स्वरसाज चढवला. लता मंगेशकर यांनी हे गाणे खूप आर्ततेने गाऊन गाण्याला अजरामर केले.

त्या गाण्याची गोष्ट ठाण्याला मनोहर रसाळ यांच्या घरात जनकवी पी. सावळाराम यांच्या ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला’ या गाण्याचा जन्म झालेला आहे. ‘कृष्णा निवास’ या घराला ते भाग्य लाभले. १९६४ चा सुमार असेल. गानकोकिळा लताबाई मंगेशकर यांचा पी. साावळाराम यांच्यासाठी फोन होता. असा फोन आला की पी. सावळाराम यांना निरोप सांगितला जायचा. ते कृष्ण निवासमध्ये आल्यावर पुन्हा फोन खणखणायचा आणि मग लताबाई त्यांच्याशी बोलायच्या आणि विशिष्ठ विषयावर त्यांच्याकडे गाणं करून मागितले जायचे.

एकदा मास्टर दीनानाथांच्या पुण्यतिथीसाठी त्यांनी गाणं मागितल्यावर पी. सावळारामांनी क्षणार्धात ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला’ हे अजरामर गाण्याचे बोल ऐकविले.

कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला वैभवाने बहरुन आला, याल का हो बघायाला

तुम्ही गेला आणिक, तुमच्या देवपण नावा आले सप्तस्वर्ग चालत येता, थोरपण तुमचे कळले गंगेकाठी घर हे अपुले, तीर्थक्षेत्र काशी झाले! तुम्हावीण शोभा नाही, वैभवाच्या देऊळाला

सूर्य, चंद्र तुमचे डोळे दुरुनीच ते बघतात कमी नाही आता काही, कृपादृष्टीची बरसात पाच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यात पाठीवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळा

रेकॉर्ड मध्ये नसलेलं कल्पवृक्ष कन्येसाठी गाण्यातलं तिसरं कडवं साडेतीन मिनिटांच्या रेकॉर्डच्या मर्यादेमुळे या गीताचे दोनच अंतरे गाण्यात घेतले आहेत. एक नाईलाजाने सोडलेला अंतराही फारच हृद्य आहे. तो असा आहे:

तिन्ही सांजा येऊन मिळता, सांजवात लावित असता हात जोडलेले तुम्हां, माई सांगे तुमची गीता दु:ख मित्र तुमचा प्यारा, आठवण देऊन जाता मिठी आईची ती कंठी, थांबेनात अश्रुमाला।

या अंतऱ्यातील शेवटच्या ओळीसाठी ‘तुमच्याच मूर्तीला हो आम्ही घालू अश्रुमाला’ ही पर्यायी ओळ सुद्धा सावळाराम यांनी लिहून ठेवली होती.

प्रतिभावंत लेखक, कवी ह्यांच्या मनात अशा अनेक विषय घोळत असतात आणि त्यांच्या प्रभिभेला असं कारण कारण मिळाले, की त्या विचारांना शब्दरूप मिळते, आणि अजरामर साहित्य कृती चा जन्म होतो.

वडिलांप्रती असलेले प्रेम, जिव्हाळाआणि कृतज्ञता पी. सावळारामांनी किती अर्थपूर्ण शब्दात व्यक्त केली आहे.

 

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted