श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

☆ ब्रह्म सत्यम् जगन् मिथ्या… – भाग – ३ ☆ श्री सुनील देशपांडे 

पहिल्या दोनही लेखानंतर एका वाचकाने प्रश्न उपस्थित केला.

भक्ती, श्रद्धा, विश्वास, शरणागती या सर्वांना काहीच स्थान नाही का? तुम्ही फक्त ज्ञानमार्गाचा विचार केला आहे असे दिसते. पण भक्ती आणि कर्म मार्गाने सुद्धा काही वेळा आपोआप साक्षात्कार झाल्या प्रमाणे प्रमेये उलगडतात.

मुळात प्रश्न असा आहे आपल्याला सत्य हवे आहे की समाधान. भक्ती श्रद्धा विश्वास शरणागती या सर्व मार्गाने समाधान नक्की मिळू शकते.

ईश्वरी भक्तीच्या मार्गाने गेल्यानंतर समाधान मिळवणे हा वेगळा विषय आहे. आपला सध्या मुख्य चर्चेचा विषय आहे की आपल्याला सत्य हवे आहे की समाधान? वरील सर्व मार्ग हे समाधान मिळवण्याचे आत्मशांती मिळवण्याचे. मानसिक संतुलन मिळवण्याचे मार्ग आहेत. मला रामनामाच्या जपाने समाधान मिळते.

शांती मिळते. परंतु मुस्लिम किंवा ख्रिश्चन माणसाला रामनामाच्या जपाने या गोष्टी प्राप्त होतील का?

मी भक्ती मार्गाने जायचे ठरवले तर भक्ती कुणाची करायची म्हणजे समाधान मिळेल? याचे उत्तर मी लहानपणापासून ज्या ईश्वर मार्गावर श्रद्धा ठेवली आहे किंवा श्रद्धा ठेवण्यास मला शिकवले आहे त्याच मार्गाने गेल्यास मला समाधान मिळते. माझे सर्व प्रश्न सुटले आहेत असे सुद्धा मला वाटते. पण ते वाटणे हे खरे आहे का ते भासमान आहे? भासमान सत्य हे ब्रह्म मार्गामध्ये अपेक्षित नाही. चार प्रज्ञा ज्या दुसऱ्या लेखांत वर्णन केल्या आहेत त्या चारही प्रज्ञांच्या सहाय्याने जे उत्तर येते त्याला सत्य म्हणजेच आपली वाटचाल सत्याच्या मार्गाने चालू आहे याची खात्री किंवा याचा पुरावा असे म्हणू शकतो. आता तुम्ही असेही विचाराल की या चारही प्रज्ञा एकाच व्यक्तीच्या ठाई असू शकतील का?

नसतीलही. म्हणूनच जेव्हा एक शास्त्रीय तत्व किंवा गणित किंवा शोध लावला जातो तेव्हा जगातील त्या विषयातील सर्वाधिक ज्ञान असलेले शास्त्रज्ञ साधारणपणे 200 ते 300 असे शास्त्रज्ञ असतात त्यांच्या समुदायापुढे तुम्हाला तुमचे निष्कर्ष मांडायचे असतात. त्यांची उत्तरे समाधानकारक रीतीने म्हणजेच योग्य शास्त्रीय कसोटीवर सिद्ध करून द्यावी लागतात. हे सर्व शास्त्रज्ञ मिळून जे प्रश्न उपस्थित करतात ते चारही प्रज्ञां मधून आलेले प्रश्न असतात. त्यांची उत्तरे जर शास्त्रीय निकषावर योग्य ठरली तर मग ते तत्व किंवा गणित किंवा शोध हा चारही प्रज्ञांच्या निकषावर खरा उतरला आहे असे म्हणता येते. म्हणजेच ब्रह्म मार्गावरचे ते पुढचे पाऊल ठरते. अशा प्रकारची कसोटी लावण्याची तयारी ज्यांची असते त्यांनाच ब्रह्म मार्गावरचे प्रवासी म्हणता येईल. भक्ती, विश्वास, समर्पण या मार्गावर कसोटीला उतरवण्याची पद्धत नसते. शेवटी सत्य हे अनंतावर आहे. म्हणजेच ते कधीही सापडण्यासारखे नाही. जर कोणी मला अंतिम सत्य सापडले आहे असा दावा करत असेल तर तो दावा खोटा किंवा त्याला सापडलेले अंतिम सत्य हे भासमानच असणार हे उघड आहे. सत्य मार्ग आणि समाधान मार्ग हे दोन्ही भिन्न आहेत. मला माझ्या मनाचे समाधान होणे महत्त्वाचे आहे. मला माझ्या मनाची शांती महत्त्वाची आहे. मला आत्मसाक्षात्कार महत्त्वाचा आहे. .

त्यासाठी मला सत्य माहित असणे आवश्यक नाहीच. प्रभू रामचंद्रांनी लहानपणी चंद्र मागितला असताना त्यांना चांदीच्या आरशासारख्या पत्र्यावर चंद्राची प्रतिमा दाखवली आणि त्यांना चंद्र मिळाल्याचा आनंद झाला अशी एक कथा सांगितली जाते. याचाच अर्थ असा की मनाचे समाधान पाहिजे असेल तर भासमान सत्याने सुद्धा ते मिळू शकते. ईश्वराचे दर्शन झाले आणि माझ्या मनातले सगळे प्रश्न संपले असे म्हटले जाते. पण श्रीकृष्णाच्या सहवासात सुद्धा अर्जुनाचे प्रश्न संपले नाही १८ अध्याय सांगून सुद्धा अर्जुनाचे प्रश्न सुटले आहेत असे म्हटले जात नाही. फक्त लढण्यासाठी आवश्यक ते तत्व किंवा आपले कृत्य चुकीचे नाही याचे समाधान त्याला मिळाले. त्यानंतरही त्याला प्रश्न पडले असतील आणि त्यांनी ते श्रीकृष्णांना विचारलेही असतील. भक्ती, समर्पण, श्रद्धा, विश्वास, शरणागती हे सगळे मार्ग हे स्वतःच्या मनातील विचार थांबवण्याचे किंवा प्रश्न संपवण्याचे मार्ग आहेत. माझी श्रद्धा आहे म्हणजे मी प्रश्न विचारायचे नाहीत. माझा पूर्ण विश्वास आहे म्हणजे प्रश्न विचारायचे नाहीत. मी पूर्ण शरणागती किंवा समर्पण केले आहे म्हणजे प्रश्न विचारण्याचा संबंधच येत नाही. या सर्व मार्गांचा संबंध हा सत्यान्वेशी नाही. यात काही चुकीचे नाही. आपल्याला जे समजले आहे तेच आणि तेवढेच सत्य आहे असे समजल्यानंतर पुढे जाण्याचा प्रश्नच येत नाही. एकदा सत्याचे म्हणजेच ब्रह्माचे अनंतत्व स्वीकारले की आपण संपूर्ण समाधानी होऊ शकत नाही. एका विशिष्ट मार्गाने गेल्यानंतर सत्य सापडल्याचे समाधान मिळते ही गोष्ट महत्त्वाची. समाधान मिळवण्यासाठी हे सर्व मार्ग आहेत हे माझ्या वैयक्तिक सुखासाठी किंवा एका विशिष्ट समूहाच्या वैयक्तिक सुखासाठी असू शकतील. हे समाधान मिळवणे किंवा मानसिक शांतता मिळवणे मनातील कोलाहल संपवणे हे सुद्धा महत्त्वाचे नाही असे नाहीच. फक्त त्या मार्गाने गेल्यानंतर सत्य सापडत नाही समाधान मिळते एवढेच.

वाळवंटात मला दूरवर पाणी दिसले मी भरभर चालत पळत धडपडत त्या जागेपर्यंत पोहोचलो परंतु मला पाणी दिसले नाही. मृगजळ म्हणजे काय ते का दिसते ते कसे दिसते हे संशोधनाने वेगवेगळ्या निष्कर्षातून आणि वेग वेगळ्या प्रयोगातून सिद्ध होऊन समजले आहे.

परंतु समजा मला हे माहीत नाही. अशा परिस्थितीत तिथे गेल्यानंतर एखादी व्यक्ती तिथे असेल आणि त्याला मी म्हटले की मी लांबून इथे पाणी पाहिले होते पण येथे पाणी तर दिसत नाही कुठे गेले?

तेव्हा ती व्यक्ती काही गोष्टी अशाही सांगू शकेल तुझ्या मागील जन्मीचे पाप म्हणून ते पाणी गायब झाले आहे. परंतु तू मी सांगतो त्या पूजा अर्चा कर आणि सांगतो त्या मार्गाने जा म्हणजे तुझ्या गतजन्मीची पापे नष्ट होऊन तुला पाणी मिळेल. त्या माणसाने सांगितलेल्या पद्धतीने व मार्गाने मी गेल्यानंतर मला पाण्याची टाकी दिसली. तेथे अनेक माणसांची गर्दी ही दिसली त्यांनी असेच सांगितले की त्या साधू पुरुषाने सांगितलेल्या मार्गाने गेल्यानंतर हमखास पाणी मिळते. आमच्या मागील जन्मीची पापे त्याने धुवून, त्यांनी सांगितलेले जप केले त्यांनी सांगितलेल्या मार्गाच्या पूजाअर्चा केल्या, त्यानंतर आम्हाला हे पाणी मिळाले.

त्यात सत्य काय आहे? त्या जागी खरंच पाणी होते आणि ते गायब झाले होते? त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मृगजळ आहे हे माहीत असल्याने तो तिथे बसला आणि त्याने त्याचे तत्त्वज्ञान तुमच्यागळी उतरवले. त्याने माहित असलेला किंवा त्याने स्वतः भरून ठेवलेला एखादा छोटासा पाण्याचा साठा तुम्हाला दाखवला. तुम्ही त्याचे भक्त झालात.

अशा वेगवेगळ्या मृगजळाच्या जागा हेरून एका ठिकाणी साधू एका ठिकाणी मौलवी एका ठिकाणी पादरी अशा व्यक्ती बसल्या असतील आणि त्यांनी त्यांचे त्यांचे शिष्यगण तयार केले असतील. हे सर्व भासमान सत्याचे भक्त. मी सांगितलेल्या मार्गाने आल्यानंतर तुम्हाला हे पाणी मिळाले माझ्याच मार्गाने पुढे सत्यसागर अर्थात अंतिम सत्य तुम्हाला गवसणार आहे. मी त्या सत्य सागरात न्हाऊन आलो आहे. असे सांगून त्याने लोकांना अधिक भजनी लावले. त्या माणसाच्या मृत्यूनंतरही त्याचे फोटो लावून त्याच्या भक्तांनी टाळकुटत त्याचीच महती गाणे चालूच ठेवले. तरी त्यांना सत्य सापडण्याची शक्यता किंवा सत्याच्या मार्गा वरून एक पाऊल सुद्धा पुढे जाता येणार नाही हे नक्की.

मला काय हवं आहे? सत्यमार्ग की समाधान मार्ग? सत्य मार्गावर फक्त प्रश्न व प्रयत्न त्या प्रयत्नानंतर मिळणाऱ्या यशावर पुन्हा निर्माण होणारे प्रश्न आणि त्यांच्या उत्तरासाठी पुन्हा प्रयत्न असा हा न संपणारा अनंताचा मार्ग आहे.

शेवटी सत्य हे ब्रह्माच्या ठिकाणी म्हणजेच अनंताच्या ठिकाणी आहे आणि जग हे मिथ्या आहे. त्यामुळे मिळणारे समाधान शांती हे सर्व मिथ्या आहे भासमान आहे. म्हणजेच ब्रह्म सत्यम् जगन्मिथ्या. 

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments