श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

महावस्त्राचे पदर – भाग ५ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

‘आजोबा’ (सुरकुत्यांमधील शहाणपण)

​’नात्यांचं महावस्त्र’ विणताना आपण आतापर्यंत आईची ‘मायेची पैठणी’, बाबांची ‘सह्याद्रीची ढाल’ आणि आजीच्या ‘संस्कारांची शिदोरी’ अनुभवली. या महावस्त्राला अधिक बळकट, समृद्ध आणि आदरयुक्त बनवणारा, कुटुंबाचा भक्कम पाया असणारा आणि अनुभवाचा समृद्ध सुवर्णकळस चढवणारा पुढचा महत्त्वाचा पदर म्हणजेच ‘आजोबा’! आजोबा हे नातं म्हणजे वात्सल्य आणि शिस्तीचा एक अद्भूत सुवर्णमध्य आहे. ते कुटुंबासाठी केवळ एक ज्येष्ठ व्यक्ती नसतात, तर ‘वात्सल्याची सावली आणि संस्कृतीचा वारसा’ असतात, ‘अनुभवाचे संचित आणि सुरकुत्यांमधील जिवंत शहाणपण’ असतात.

​मी आजी-आजोबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींना समृद्धीचे ‘महावृक्ष’ म्हणतो. जंगलातील वृक्ष आपण सगळ्यांनी पाहिले असतील. एक वृक्ष मोठा होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. कितीतरी उन्हाळे-पावसाळे त्यांनी पाहिलेले असतात; वादळ, वारा, पाऊस स्वतःच्या अंगावर झेललेला असतो. झाडाचे वय कसे काढतात, हे आपण विज्ञानातून शिकलो आहोत. झाडाच्या खोडाचा जेव्हा आडवा छेद घेतला जातो, तेव्हा त्यावर दिसणारी वर्तुळाकार वलये जेवढी जास्त, तेवढे त्या झाडाचे वय अधिक आणि ते झाड तेवढेच जुने व समृद्ध मानले जाते. अशाच सुरकुत्या जेव्हा आजोबांच्या अंगावर आपल्याला दिसतात, तेव्हा त्या केवळ वयाचे लक्षण नसून त्यांच्या समृद्ध आयुष्याचं आणि अथांग अनुभवाचं दर्शन घडवणाऱ्या असतात.

​त्यांचं हे मोठेपण व्यक्त करणारे ‘पितामह’ आणि ‘मातामह’ हे अतिशय सार्थ व वजनदार शब्द आपल्या संस्कृतीत आहेत. वडिलांपेक्षाही ज्यांचं स्थान वरचं आहे, अशी आदरणीय व्यक्ती म्हणजे पितामह! आईचे वडील आणि वडिलांचे वडील म्हणजेच आपले आजोबा. महाभारत काळात भीष्मांना ‘पितामह’ म्हणून ओळखलं जायचं आणि त्यांचा केवढा आदर त्या काळातली सगळी मंडळी करायची, हे आपण जाणतोच. आजी-आजोबांचे छत्र आणि त्यांची निर्मळ, अपार माया ज्यांना लहानपणी लाभली, ती मुलं खरोखरच खूप भाग्यवान! आई-वडिलांपेक्षा देखील संस्कारांचं खरंखुरं बाळकडू आजी-आजोबांकडून नातवंडांना मोठ्या प्रमाणात मिळतं आणि त्यामुळेच त्यांचं व्यक्तिमत्त्व नकळत समृद्ध होत जातं.

​आजोबांच्या चेहऱ्याकडे कधी आपण निरखून पाहिलं आहे का? त्यांच्या चेहऱ्यावरच्या आणि हातावरच्या प्रत्येक सुरकुतीत आयुष्यातील संघर्षाचा, कष्टाचा आणि यशाचा एक मोठा इतिहास दडलेला असतो. त्यांनी अनुभवलेलं जग, पाहिलेले ऋतूंचे बदल आणि आयुष्यात आलेले चढ-उतार हे संपूर्ण कुटुंबासाठी एखाद्या मार्गदर्शक दीपस्तंभासारखे असतात. जेव्हा संपूर्ण कुटुंब किंवा प्रपंच एखाद्या वैचारिक वादळात सापडतो, काय निर्णय घ्यावा हे सुचत नाही, अशा वेळी आजोबांचा एक शांत, धीरगंभीर शब्दही सगळ्या वादळाला शांत करतो आणि घरातील प्रत्येकाला जगण्याचं बळ देऊन जातो.

​शिस्त आणि हट्टाचा सुवर्णमध्य म्हणजे आजोबा! काळाचा एक काळ असा असतो जेव्हा हेच आजोबा आपल्या मुलांसाठी (म्हणजे आजच्या आई-वडिलांसाठी) अत्यंत कडक, करारी आणि शिस्तप्रिय ‘बाबा’ असतात. त्यावेळी त्यांचा घरात एक वेगळाच दरारा असतो. पण जेव्हा घरात नातवंडं जन्माला येतात, तेव्हा त्या जुन्या करारी शिस्तीचं रूपांतर एका अथांग, मुलायम मायेत कसं होतं, हे पाहणं निसर्गाचा एक चमत्कारच आहे. म्हणतात ना, ‘मुद्द्लापेक्षा व्याज जास्त प्रिय असतं’, आजोबांच्या बाबतीत हे तंतोतंत खरं ठरतं.

​मला आजोबांचं प्रेम दुर्दैवाने स्वतःच्या बालपणात लाभू शकले नाही; कारण माझे वडिलांचे वडील आणि आईचे वडील हे दोघेही माझा जन्म होण्याआधी, फार पूर्वीच देवानघरी गेले होते. परंतु आजोबा म्हणून माझ्या वडिलांचे जे निस्सीम प्रेम असायचे, ते माझ्या मुलांना मात्र भरभरून लाभले, याचा मला आनंद आहे. माझे वडील जेव्हा वारले, तेव्हा त्यांचे वय ८८ वर्षे होते. त्यांनी नातवंडांवर मायेची पाखर घालत त्यांना खूप प्रेम लावले. माझा मुलगा तर त्यांच्यावर अतिशय जीव लावायचा आणि त्यांच्याबद्दल त्याला प्रचंड आदर होता; तो त्यांना आदराने नेहमी ‘सरकार’ म्हणून हाक मारायचा!

​माझी मुलगी लहान असताना जेव्हा घरात ‘गुलाबाई’ बसवायची, तेव्हा तिचे लाड पुरवण्यासाठी आजोबा बाजारातून कौतुकाने वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ घेऊन यायचे. आजोबा म्हणून लाभलेले त्यांचे ते भरभरून प्रेम आणि मायेची ऊब माझी मुलं आजही विसरू शकत नाहीत. आजोबा असण्याचं आणि नातवंडं खेळवण्याचं हे कौतुक प्रत्येक घराचे भाग्य वाढवत असतं.

​आई-वडिलांचा ओरडा खाणाऱ्या, अभ्यास न केल्यामुळे किंवा हट्ट केल्यामुळे शिक्षा भोगणाऱ्या नातवंडांना हक्काची पाठराखण आणि संरक्षणाची भक्कम ढाल मिळते ती फक्त आजोबांच्यामुळेच! जेव्हा आई-बाबा मुलांवर रागावतात, तेव्हा आजोबा ढाल बनून मध्ये उभे राहतात. ते केवळ नातवंडांचे लाड करत नाहीत, तर वेळप्रसंगी मुलांची (आई-बाबांची) सुद्धा प्रेमळ शब्दांत कानउघाडणी करतात. “आम्ही तुम्हाला यापेक्षा जास्त मारलं असतं तर तुम्ही आज इथे नसता, मुलांना प्रेमाने शिकवा,” हा त्यांचा हक्काचा सल्ला घरातील वातावरण पुन्हा आनंदी करून जातो. घराचे, नात्यांचे आणि अगदी वास्तूचे जे सूक्ष्म कोने-कोपरे आई-बाबांना समजत नाहीत, ते आजोबांच्या एका शब्दाने उलगडतात.

​आजोबा हे आपल्या संस्कृती आणि मूल्यांचा जिवंत दुवा आहेत. रामायण-महाभारताच्या गोष्टी, जुने लोकव्यवहार, नात्यांमधील ओलावा, कौतुकाचे कौटुंबिक रीतीरिवाज आणि संस्कारांची खरीखुरी शिदोरी नातवंडांपर्यंत पोहोचवण्याचं काम आजोबा अगदी सहजतेने, हसत-खेळत करतात. त्यांच्या ओसरीवर किंवा बैठकीत बसून घालवलेला वेळ हा केवळ खेळ नसतो, तर मुलांच्या नकळत त्यांच्या कोऱ्या मनावर घडणारं एक समृद्ध सुसंस्कारी विश्व असतं. आई-बाबा आपल्याला या जगात कसं जगायचं, कसं कमवायचं हे भौतिक ज्ञान देतात; पण आजोबा आपल्याला आपल्या मातीशी, आपल्या मुळांशी आणि परंपरेशी घट्ट जोडून ठेवतात.

​निर्मळ मैत्रीचे हक्काचे ठिकाण म्हणजे आजोबा! वयाचे अथांग अंतर विसरून, आपल्या पांढऱ्या केसांची पर्वा न करता, नातवंडांच्या बालविश्वात लहान मूल होऊन रमेलेले आजोबा हे जगातले सर्वात उत्तम मित्र असतात. कधी ते नातवंडांबरोबर बुद्धिबळ खेळून त्यांना बुद्धिबळाचे डावपेच आणि धडे देतात, तर कधी त्यांना आनंद देण्यासाठी स्वतः घोडा बनून पाठीवर बसवतात. संध्याकाळच्या पाऊलवाटेवर त्या चिमुकल्या हातांचे बोट धरून चालताना जगाची ओळख करून देणारे आजोबा हे प्रत्येक घरातलं एक हळवं आणि अत्यंत आदरयुक्त पान असतं.

​घरातल्या या वटवृक्षाचे कौतुक फक्त घरापुरते मर्यादित नसते. समाजात, ओळखीच्या माणसांमध्ये किंवा गावात जेव्हा चारचौघे एकत्र येतात, तेव्हा आजोबा आपल्या नातवंडांच्या गुणांचे, त्यांच्या छोट्या-छोट्या यशाचे कौतुक एवढ्या मोठ्या अभिमानाने सांगतात की, ऐकणाऱ्यालाही त्यांच्या भाग्याचा हेवा वाटावा. नातवंडांचे गुण सांगताना त्यांच्या डोळ्यांत चमकणारा तो सार्थ अभिमान कोणत्याही पदवीपेक्षा मोठा असतो.

​कधी कधी मनात अशी शंका येते की, आपण भौतिक सोयी-सुविधा मिळवून खरंच प्रगती करत आहोत का? कारण आज एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, बदलत्या कौटुंबिक चौकटीमुळे हे चित्र खूपच बदलले आहे. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन ‘विभक्त कुटुंबे’ आली आणि शहरीकरणाच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये आजची लहान मुले आजोबांच्या या अथांग मायेला मुकत चालली आहेत. आजी-आजोबांमुळे भक्कम असणाऱ्या घराच्या भिंती आज केवळ एक पोकळ डोलारा म्हणून उभ्या राहत आहेत की काय, असे मला वाटते.

​आज ‘आजी-आजोबा’ म्हटले की अनेकांना थेट ‘वृद्धाश्रम’ डोळ्यांसमोर येतो. याला समाजाची प्रगती म्हणायचे की अधोगती? हा खरोखरच विचार करण्यासारखा गंभीर प्रश्न आहे. नात्यांचा हा भक्कम पदर आज काळाच्या ओघात विरत चाललेला आहे. मुले आजोबांच्या वात्सल्याच्या छायेला मुकत आहेत, ही आजच्या काळातील सर्वात मोठी हानी आहे. ‘नटसम्राट’ चित्रपटात किंवा नाटकात आजी-आजोबांचे आपल्या नातवंडांवर किती अथांग प्रेम असते, ते पाहून डोळे हमखास ओलावतात; परंतु आजकालच्या जगात घरात नातवंडांवर जीव लावणारी अशी ज्येष्ठ माणसे देखील काहींना नकोशी झालेली दिसतात.

​घराला घरपण आणि नात्यांच्या या महावस्त्राला भक्कम आधार देणारा हा ‘आजोबा’ नावाचा पदर संपूर्ण घराला आपल्या मायेच्या धाग्यात घट्ट बांधून ठेवतो. हा पदर जेवढ्या सन्मानाने आणि आदराने घरात जपला जाईल, तेवढा आपला समाज आणि आपली पुढची पिढी अधिक सुदृढ व सुसंस्कारी होईल.

 © श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted