दीपा नारायण पुजारी
विविधा
☆ यत्न तो देव जाणावा… ☆ दीपा नारायण पुजारी ☆
“आई, मला हे झाड काढून दे ना. ” चित्रकलेच्या वहीत चित्र काढत बसलेला चारू आईला म्हणाला. चारुच्या आईनं त्याला स्पष्ट नकार दिला. चारू थोडा हिरमुसला. आजी, आजोबा, दादा आणि बाबा कुणीच त्याला मदत करायला तयार नव्हतं. आता त्याला हे चित्र पूर्ण करावंच लागणार होतं. ते त्याचं काम होतं. त्यालाच करावं लागेल, शिकावं लागेल, आपलं काम आपणच करावं, असा एक महत्त्वाचा संस्कार एका नकारानं झाला होता. खरंच, आपणच आपल्याला घडवायचं असतं, कुबड्या न वापरता चालायला शिकायचं असतं हे मुलांच्या मनावर ठसवणं हे मोठ्यांनी शिकायला हवं.
शिकता शिकता, तरबेज होता येतं, मोठं होता येतं. आपला प्रयत्न आपला आपण करायचा असतो. ज्याचा त्यानं करायचा असतो. ‘यत्न तोचि देव जाणावा. ’, असं सांगत समर्थांनी सुद्धा प्रयत्नांवर जोर दिला आहे. काही जण मात्र सगळं दैवाच्या हवाली करून मोकळे होतात. दैव मोठं की प्रयत्न हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण दैवाला जीवनात थोडे महत्त्व असलं तरी माणसानं जास्तीत जास्त जोर प्रयत्नांना द्यायला हवा.
“म्हणोनी अभ्यासास काही सर्वथा दुष्कर नाही. ” असं सांगणारे ज्ञानेश्वर प्रयत्नवादाला महत्त्व देतात. आत्मोन्नतीचा असा प्रयत्न आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मदत करतो.
“असाध्य ते साध्य करता सायास
कारण अभ्यास”, तुका म्हणे.
अलौकिक बुद्धिमत्ता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, दोन टक्के प्रतिभा आणि अठ्ठ्याणव टक्के प्रयत्न आहे. जो स्वतः: साठी, स्वतः प्रयत्न करतो तो स्वतः, स्वतःचा मित्र असतो. जो प्रयत्न करणं सोडून देतो, दुसऱ्याची मदत घेतो, तो स्वतःच स्वतःचा शत्रू होतो. स्वत:ला पांगळा करतो, स्वतःला दुबळं बनवतो.
स्वतः प्रयत्न करणं याचा अर्थ मार्गदर्शनाची गरजच नाही असा नाही बरं. योग्य मार्गदर्शन मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. पण देणाऱ्याचा हात घ्यायचा नसतो हे ध्यानात ठेवावं लागतं. एका दिव्यानं दुसरा दिवा लागतो हे खरंच आहे. पण दुसऱ्या दिव्यात तेल, वात घालून तो सुसज्ज असेल तरच तो लागणार, हो ना? तेल, वात किंवा दिवा यातलं काही एक जरी जवळ नसेल, तर दिवा पेटणार कसा? या गोष्टी तयार ठेवाव्या लागतात. तसंच केवळ गुरुकृपा, उपदेश, गुरुसंगती यांनी प्रगती होत नाही. ज्ञान मिळत नाही. ते प्रयत्न पूर्वक प्राप्त करून घ्यावं लागतं. कोणीच कोणाला सर्व ज्ञान देऊ शकत नाही. स्वतःच कष्ट करून ते मिळवावे लागतं. आयतं काही मिळत नाही. म्हणून आत्मविश्वास पूर्वक, निष्ठेनं प्रयत्न करत राहणं हाच एक योग्य मार्ग आहे. आपण तो विसरता कामा नये. मार्गदर्शन घ्यावं पण मार्गक्रमण आपल्याला स्वतःलाच करायचं आहे हे लक्षात ठेवावं. सावधानता, सातत्य, चिकाटी या गोष्टी ध्येय प्राप्तीसाठी खूप महत्वाच्या आहेत. यात कुठंही उणीव निर्माण झाली तर अंध:पतन होणारच. म्हणतात ना, “सावधानता हटी तो दुर्घटना घटी. ” विवेक, सातत्य, उत्साह हे गुण आपल्याला आपला मित्र बनवतात. आळस, अळंटळं, अशा गोष्टी आपल्याला आपलाच शत्रू बनवतात.
जे अभ्यासाचं तेच आरोग्याचं. आरोग्य संपन्न राहणं अथवा आजारी पडणं, आपल्यावरच अवलंबून असतं. योग्य आहार, योग्य विहार असेल तर आरोग्य चांगलं राहतं. आजारी पडल्यावर डॉक्टर औषध देतात. पण ते वेळेवर आणि योग्य प्रमाणात घ्यावं लागतं. तसं न केल्यास आजार बरा होत नाही. म्हणूनच आपणच आपले शत्रू असतो.
“उद्धरेदात्मनात्मानाम् नात्मानमव साधयेत् |
आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मन: ||”
गीतेतील सहाव्या अध्यायातील हा श्लोक प्रत्येकानं लक्षात ठेवला पाहिजे. आचरणात आणला पाहिजे. चारुच्या पालकांनी तो आचरणात आणला आहे ना, तसा.
© दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
9665669148
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





