श्रीमती उज्ज्वला केळकर
विविधा
☆ लोक म्हणतात… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
लोक म्हणतात, हे कर… ते कर, ‘असं कर… तसं कर,,, ‘
‘हे करू नको… ते करू नको… ‘आमचं ऐक… कल्याण होईल. ‘
आपण त्यांचं ऐकून घ्यायचं, पण आपल्याला हवं तेच करायचं.
कधी चूक होईल. निर्णय चुकतील. लोक म्हणतील
‘आम्ही म्हंटलं नव्हतं तेव्हा… ’
हेही आपण ऐकून घ्यायचं.
हो… हो… म्हणत राह्यचं. पण निर्णय चुकला म्हणून उदास, निराश व्हायचं नसत.
दु:ख होईल. कष्ट त्रास सोसावे लागतील. सोसूयात, पण पुढे पुढे जात राहू या. चुका होतील,
पण, त्यातून नवीन काही
शिकायला मिळेल. आत्मविश्वास वाढेल. अनुभव येतील, तशा चुका कमी होतील यशोकंद हाती येईल. आनंदी आनंद होईल. रामदासांचे म्हणणं
मनावर कोरायचं. ऐकावे जनाचे, करावे मनाचे मग वाटचाल ठाम होईल.
यशोमार्गी घेऊन जाईल
—–
कळतं पण वळत नाही.
आयुष्य : एक प्रवास. करायचा बिनधास्त. कळतँ, समजतं, माहीत असतं, पण कृतीत काही उतरत नाही. कळतं पण वळत नाही.
रोज रात्री झोपताना ठरवते, वादे वादे जायते तत्वबोध: तत्वबोध: कुठले?
जायते कंठशोष: म्हणून मग ठरवते, ‘ त्यांना एकट्यांनाच बोलू द्यायचे. उत्तर मुळी द्यायचेच नाही. मग कसे होतील वाद? एका हाताने टाळी मुळी वाजतच नाही.
पण रात्रीचे सगळे सकाळी विसरते. उठल्यापासून बोलाचाली सुरू होते.
किती तरी वेळ वाद मुळी थांबतच नाही. कळतं, पण मुळी वळतच नाही.
मुले आणि हे घरभर पसारा करतात. माझ्या डोक्याच्या शिरा तडतडतात.
मी बोल बोल बोलते. कळतं याचा काही उपयोग नाही. पसारा आवरल्याशिवाय गत्यंतर नाही. कळतं सारं, पण बोलल्याशिवाय रहावत नाही. ‘ कळतं, पण वळत नाही.
हे म्हणतात, ‘एकमत असेल, तर तुझ्या मताप्रमाणे. दुमत असेल, तर माझ्या ‘
मी म्हणते, ‘ एकमत असेल, तर तूमच्या मताप्रमाणे. दुमत असेल तर माझ्या
हीच गुरुकिल्ली सुखी सहजीवनाची. लक्षात ठेवायचं, विसरायचा नाही. ‘
आमच्या यांना कळतं, पण वळतच नाही.
कामवाली उशिरा आली तर…. न सांगता रजेवर राहिली तर, रागावायचं नाही.
‘काम नीट कर. भांडी नीट विसळ. धुणं घट्ट पीळ. ’ म्हणायचं नाही.
‘तुम्हीच करा मग वैनी’ म्हणाली तर मनावर घ्यायचं नाही. कळतं सगळं, पण वळत नाही.
आरोग्यासाठी हवा योगा आणि व्यायाम. रोज जायचं फिरायला नको नुसता आराम’. नको नुसत्या टीव्ही, सीरिअल्स, नको नुसते गाणे
व्हाट्स अप मध्ये डोके घालून नको नुसते बसणे
सगळं सगळळं कळतं आहे. पण वळत मुळीच नाही. कुत्र्याचे शेपूट वाकडे झाल्याशिवाय रहात नाही.
मुले-नातवंडे मोठी झाली. कामासाठी बाहेर जाऊ लागली.
कधी उशिरा घरी येऊ लागली. ‘का रे झाला उशीर? ‘ विचारायचं नाही.
‘निदान फोन तरी करायचास! ‘ म्हणायचं नाही.
‘आम्हाला आमचं कळतं ‘ त्यांचं उत्तर असतं.
आपण खंतावायचं नाही. ‘चिंता, काळजी वाटते’, म्हणायचं नाही.
सारं सारं कळतं, पण वळत नाही. वळत नाही.
© सौ उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





