सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ वाचू आनंदे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
बऱ्याच म्हणजे २५ वर्षा पूर्वीचा एक सिनेमा बघितला. त्यावेळी त्यात विशेष काही वाटले नव्हते. पण आता पुस्तक घेऊन वाचणे या विषयी जी अनास्था दिसते त्या मुळे हा सिनेमा काढणाऱ्यांचे कौतुक वाटले. त्याची कल्पना अशी आहे, सुरुवातीलाच एका ९ महिन्याच्या बाळाला त्याची आया पुस्तकातील चित्रे दाखवून माहिती व गोष्टी सांगत असते. त्या बाळाला
काही लोक पैशासाठी किडनॅप करतात. त्या नंतर या बाळाचा प्रवास सुरु होतो. त्याचा प्रवास आणि किडनॅप करणाऱ्यांना झालेला त्रास मजेशीर व बघण्या सारखा आहे. ज्यावेळी पोलीस घरी येऊन त्या बाळाचा प्रवास अर्थात लोकांनी सांगितलेला सांगतात. त्यावेळी ती आया आता बाळ कुठे असेल ते सांगते. कारण ते बाळ त्या पुस्तकातील चित्राच्या क्रमाने प्रवास करत अर्थात रांगत जात असते. त्या वरून ते बाळाला शोधतात. आणि ते बाळ त्या किडनॅपरची बिल्डिंग पण दाखवते. व ते पकडले जातात.
या वरून पुस्तकातील ज्ञानाचे महत्व नक्कीच लक्षात येते.
पुस्तक वाचनाचे पुढीलप्रमाणे काही फायदे लक्षात येतात.
ज्ञान वाढवणे
पुस्तके विविध विषयांची माहिती देतात. जसे इतिहास, विज्ञान, विविध शोध, विविध कला त्यांचा उगम आणि इतर अनेक माहिती मिळते.
त्या मुळे जगाची माहिती मिळून समज वाढते.
मेंदूसाठी व्यायाम
वाचन मेंदूला सक्रिय ठेवते. एखादे वाक्य किंवा माहिती वाचल्यावर त्याची मेंदूत साठवणूक होते. व मेंदूची कार्यक्षमता वाढते. आपल्या मेंदूची रचना अशी असते कि त्याला कायम नवीन माहिती हवी असते. त्यामुळे आपल्या मनाचे आरोग्य उत्तम राहते.
भाषा कौशल्ये
वाचनामुळे शब्द संपत्ती वाढते. नवीन शब्द शिकायला मिळतात. एकाच शब्दाचे अनेक अर्थ समजतात. पूर्वीच्या लोकांची भाषा समजते.
भाषेवर उत्तम प्रभुत्व मिळवता येते.
तणाव कमी होतो
वाचनामुळे मनःशांती मिळते. आपल्या मनातील मरगळ दूर करुन पुस्तके आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जातात. त्यामुळे
मानसिक तणाव कमी होतो. शांतता मिळते आणि आपल्याला मानसिक आराम मिळतो.
सर्जनशीलता वाढते
पुस्तके नवीन जगात घेऊन जातात. त्यामुळे कल्पनाशक्तीला वाव मिळतो. एक विचार वाचताना त्या सारखे अनुभव किंवा विचार आठवतात. नवीन विचार सुचतात.
सर्जनशील विचारांचा विकास होतो.
एकाग्रता वाढते
पुस्तकांच्या नियमित वाचनाने इतर गोष्टींचा विसर पडतो. काही वर्षांपूर्वी पुस्तके हेच विरंगुळ्याचे साधन होते. त्यातून ज्ञान, रंजन होत होते.
लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. अगदी आजारी व्यक्ती सुद्धा आपले दुखणे विसरत असे.
भावनात्मक विकास
वाचनामुळे विविध लोकांच्या भावना, विविध प्रसंगातील विविध दृष्टीकोन समजतात. वेगवेगळ्या प्रसंगी लोक कसे वागले होते ते समजते. त्यातील योग्य कि अयोग्य याचे वर्गीकरण केले जाते.
विचार करण्याची क्षमता
पुस्तकात विविध गोष्टींचे विश्लेषण विविध गोष्टीतून, विचारातून, उदाहरणातून केलेले असते. त्यातून आपली वैचारिक क्षमता वाढते. पुस्तके आपल्याला चिकित्सकपणे विचार करायला शिकवतात.
संज्ञात्मक कौशल्ये वाढतात
वाचनामुळे गंभीर विचार करण्याची सवय लागते.
जटील समस्या सोडवण्याची व त्याचे विश्लेषण करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे कठीण प्रसंगी कोणते निर्णय घ्यावेत याची कल्पना येते.
संवाद कौशल्य वाढते
योग्य व प्रभावी संवाद साधण्यासाठी आवश्यक शब्द, वाक्य पुस्तक वाचनातून समजतात.
ऐतिहासिक वारसा
पूर्वीच्या काळातील लोकांनी लिहून ठेवलेली माहिती, लावलेले शोध, आपल्या देशाचा इतिहास, वारसा समजतो.
असे म्हणतात की एखाद्या देशाला नेस्तनाबूत करायचे असेल तर तेथील वाचनालये नष्ट करावीत. इतके वाचन व पुस्तके यांचे महत्व आहे.
आरोग्य
वाचनामुळे आपल्या आरोग्यावर कोणतेही घातक परिणाम होत नाहीत. कोणतेही घातक प्रकाश किरण डोळ्यात जात नाही.
उलट शांत झोप लागते. आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते.
असे फायदेशीर वाचन करायलाच हवे. आणि त्यासाठी पुस्तके वाचायला हवीत. घरात एक पुस्तक आले तर घरातील सर्वजण ते वाचू शकतात. त्यावर चर्चा करु शकतात. त्या निमित्ताने कमी होत चाललेले सांभाषण वाढू शकते. वाचून चर्चा केलेला अभ्यास सुद्धा चांगला लक्षात राहतो.
असे महत्वाचे पुस्तक वाचन जपायलाच हवे.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.
सांगवी, पुणे
– ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




