सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ श्रावण… ☆ सौ शालिनी जोशी

श्रावण म्हणजे सण आणि उत्सवांचा राजा. सृष्टीही नटलेली असते. म्हणून श्रावणाचे वर्णन गीतकार ‘हासरा नाचरा श्रावण’ असे करतात. प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व. सोमवार- शिवपूजन, मंगळवार- मंगळागौर, बुधवार -बुध पूजन, गुरुवार – ब्रहस्पती पूजन, शुक्रवार जिवंतिका (जिवती), शनिवार -अश्वत्थ, मारुती पूजन.

नागपंचमी – श्रावण शुद्ध पंचमी. भारतीय संस्कृती निसर्ग प्रधान. वृक्ष प्राणी इत्यादी निसर्गाच्या विविध रूपाना देव मानणारी. देव देवता नागरूपाने प्रगट होतात असे मानणारी. म्हणूनच शंकराने आपल्या गळ्यात तर गणपतीने आपल्या कमरेला नागाला स्थान दिले. तर विष्णु शेषशाही झाला. संपूर्ण पृथ्वी शेषाने आपल्या पुस्तकावर तोलली आहे असे मानले जाते. समुद्रमंथनाच्या वेळी वासुकी सर्पाचा दोरीसारखा उपयोग केला गेला. इतका नागकुळाचा देवांशी संबंध. जिथे देवांची व मानवी शक्ती अपुरी पडते, तेथे अशा अमानवी शक्ती योजल्या जातात.

व्यवहारिक दृष्टीने शेतीचे नुकसान करणारे उंदीर हे नागाचे खाद्य. म्हणून नाग हा शेतकऱ्यांचा मित्र झाला. श्रावणाच्या सुरुवातीला पाऊस थोडा कमी झालेला असतो. सर्वत्र हिरवगार झालेले असते. त्यामुळे नाग आपल्या शरीराचे उष्णता कायम ठेवण्यासाठी उन्हात येऊ लागतात. त्यांच्याविषयी भीती व त्यांची उपयुक्तता जाणून नागाची पूजा सुरू झाली. मग मोठ्या दगडी किंवा धातूच्या नाग प्रतिमांची पूजा देवळात, तर घरोघरी मातीच्या नागांची पूजा करतात. त्याला दुर्वा, लाह्या व दूध वाहतात. नाग कधीच दूध पीत नाहीत. पण ती प्रथा पडली. अनवधानाने देखील नागाची हत्या होऊ नये. म्हणून या दिवशी उकरत नाहीत. घरात चिरत व भाजत नाहीत. कणकेचे पुरण घालून केलेले दिंड नैवेद्याला करतात. ते उकडलेले असतात.

लोककथा मधून नागाला स्त्रियांचा भाऊ मानले आहे. या सणाला स्त्रिया माहेरी येतात. एकत्र जमून गाणी म्हणतात. खेळ खेळतात. नवीन वस्त्र घालतात. मेहंदी काढतात. झोपाळ्याचा आनंद लुटतात. म्हणून स्त्रियांसाठी हा महत्त्वाचा सण. या दिवशी यमुनेचे पाणी दूषित करणाऱ्या कालिया नागाला श्रीकृष्णाने दूर पाठवले. साऱ्या मानव जातीचा मित्र असणाऱ्या नागाबद्दल कृतजंता व्यक्त करायचा हा दिवस असला तरी गारुडी त्याचा गैरफायदा घेतात. दात काढलेले नाग घरोघरी फिरवून पैसे गोळा करतात. बत्तिसशिराळ्याला जिवंत नागाच्या पूजेची प्रथा होती. यापेक्षा प्रतिमापूजन श्रेष्ठ. नागाना त्यांचे त्यांचे अधिवासात राहू द्यावे. हल्ली सर्पमित्र गावात वावरणाऱ्या नागांना सहजपणे पकडून जंगलात सोडतात.

नागपंचमी म्हटली की ग. दि. मांचे गीत आठवते ‘फांद्यावरी बांधिले व मुलीने हिंदोळे। पंचमीचा सण आला डोळे माझे ओले।’. राजस्थान, गुजरात, केरळ, तामिळनाडू मध्येही नाग पूजेची प्रथा आहे.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted