सौ. ज्योती विलास जोशी
विविधा
☆ सेल्फी… ☆ सौ. ज्योती विलास जोशी ☆
आज-काल कधीही कुठेही आणि निमित्त असो वा नसो.. सेल्फी काढणारे दर्दी नेहमीच दिसतात. तोंडाचा चंबू करून सेल्फी काढण्यात त्यांना एक वेगळाच आनंद मिळत असतो. आताशा आरशाची जागा या सेल्फीने घेतली आहे. मोबाईल मधल्या कॅमेऱ्याच्या सेल्फी मोडवर थांबूनच मेकअप करायचा, केशरचना बदलायची आणि सेल्फी काढायचा. दुसऱ्या मिनिटाला नेमके आपण कसे दिसतो? असं पाहायचं…. मनानं ते पसंत केलं तर ठीक. नाहीतर पुन्हा पहिले पाढे पंंचावन्न! रोल, कॅमेरा, ॲक्शन असा मनानं ‘ग्रीन सिग्नल’ दिला की मग क्लिक होतो हा सेल्फी. इथवर हे हौशी थांबत नाहीत… फोटो ‘पोस्ट’ करून त्याला किती ‘लाईक’ मिळाले हाही छंद हे सेल्फी प्रेमी जपतात..
फोटोत स्वतःला बंदिस्त करून घेण्याची ही टेक्नॉलॉजी नवीन म्हणता म्हणता जुनी होऊ लागली आहे पण त्याचं फ्याड मात्र वाढत चाललं आहे. त्याचा आनंद घेता घेता दुष्परिणामही दिसायला लागलेत. सेल्फीचं फ्याड इतकं की त्यापासून झालेल्या अनेक अपघातांचे व्हिडिओ जेव्हा आपण पाहतो तेव्हा हृदयाचा थरकाप होतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. या छंदाचा अतिरेक आता मनोविकारात गणला जाऊ लागलाय…
शरीराचं बाह्य रूप जोवर मनाजोगंत होत नाही तोवर त्याचा मेकअप करून अनेकदा सेल्फी काढला जातो. एकूणच मनाची पसंती येईपर्यंत हा कार्यक्रम सुरू असतो. परंतु जे मन सरते शेवटी या क्लिकला हिरवा कंदील दाखवतं त्या मनाचा सेल्फी काढावा असं त्या शरीराला कधी वाटत नाही का? आपल्या मनाचा सेल्फी आपल्याला काढता आला तर? …. असा कधी आपण विचार केलाय का? आपण जेव्हा कोणाही व्यक्तीकडे व्यक्ती म्हणून पाहतो तेव्हा सर्वप्रथम आपण त्याचं बाह्यरूप पाहतो. याच शरीराला नियंत्रित करणारे ‘सॉफ्टवेअर’ म्हणजे मन आहे. हे आपल्या लक्षात येत नाही. शरीराच्या सेल्फीत मनाचं प्रतिबिंब धूसर दिसतं. शरीर सुडौल दिसावे यासाठी आपण जिम्नेशियम, योगासनं, झुंबा अशा विविध गोष्टींचा आधार घेतो. चेहरा सुंदर दिसावा यासाठी मेकअप करतो. प्लास्टिक सर्जरी करतो. हे सर्व करताना मन शरीराला साथ देतं. तेच मन स्थिर करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी, मनःशांतीसाठी आपण काही वेगळे करतो का? नाही ना? मनाला आपण गृहीत धरतो… डावलतो….
आरसा आपल्या शरीराचं प्रतिबिंब दाखवतो. न की मनाचं….. निंदकाचे घर असावे शेजारी या उक्तीप्रमाणं आपल्या अवतीभवती असलेले लोक आपल्याला आरसा दाखवत असतात. अंतर्मनाचा प्रवास सुखकर होण्यासाठी अंतरंगाच विश्लेषण करणारे हे बाहेरच्या जगातले प्रवासी! त्या आरशातलं आपलं प्रतिबिंब पहायची आपल्याला गरज भासत नाही. थोडक्यात आपण त्या लोकांकडे दुर्लक्ष करतो. शरीर सौंदर्य हे सर्वांना जन्मतः मिळालेलं आहे. त्यात आपण बदल करू शकत नाही. आपलं मनही जन्मतः सुंदरच असतं परंतु जगरहाटीत ते कलुषित होत जातं कारण त्यावर सभोवतालच्या वाईट विचारांची पुटं चढत जातात ती दूर करून त्याचं मूळ सुंदर रूप आपल्याला गवसलं तर त्या सारखा आनंद दुसरा नाही. त्यासाठी आपल्याला मनाला सुंदर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.. सुंदर मनाचा सेल्फीही किती सुंदर असेल ना?
© सौ ज्योती विलास जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






