श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “डोकेदुखी आणि गोळी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

मी थोडासा बेचैन होतो. कारण माझं डोकं दुखत होतं. आता माझ्या चेहर्‍यावरुन कदाचित काहीतरी दुखतयं हे जाणवत असेल. पण सांगता येत नव्हत. याला महत्वाची दोन कारणं होती.

पहिलं कारण, मंडळीपण सकाळचं पटापट आवरुन वेळेवर ऑफिस गाठण्याच्या तयारीत समोर येइल आणि दिसेल ते काम हातावेगळं करण्याच्या धावपळीत होती. रोजची रस्त्यावरची शिस्तबद्ध बेशिस्त रहदारी, आणि चुकवू म्हटले तरी मधे येणारे खड्डे या डोकेदुखीत माझ्या डोकेदुखीची डोकेदुखी तिच्या डोक्याला नको… असाच विचार होता. माझ्या डोकेदुखीची डोकेदुखी तिला नको… असा विचार मनात आल्यावर प्रसार आणि विस्तार या शब्दांची उगाचच आठवण झाली. तसच ज्योत से ज्योत जलाते चलो… हे इथे समर्पक नसलेले गाणंसुध्दा आठवलं.

दुसरं कारण… त्यांच म्हणणं असतं… घाईगर्दीत कमीतकमी मनाला पटेल अशी कारणं सांगत जा… उगाचच वेळ जातो.

हे म्हणजे माझ्या दुखण्यापेक्षा त्यांचा माझ्या डोक्याबद्दल असलेला नितांत आदर आणि विश्वास होता. आणि या आदर आणि विश्वासाला तडा जाणं कठिण होत.

माझं डोकं या बद्दल त्यांना असलेला आदर हा कायम महागाईच्या वाढत्या निर्देशांकासारखा वाढताच होता. त्यात घसरण कधी दिसलीच नाही. आणि दिसली तरी इतकी अल्पकाळ होती की जाणवली नाही. आता जाणवायला परत डोक्याचा संबंध आलाच…

पण कसं कोणास ठाऊक, माझी डोकेदुखी तीने हेरली असावी. जाताजाता तीने पटकन एक औषधाची गोळी टेबलवर ठेवली. आणि तोंडाने फक्त… हं… येवढाच पण विश्वास असणारा आवाज ऐकू आला. हं… या विश्वासदर्शक आवाजाची आता इतकी सवय झाली आहे की वेळ… काळ… आणि स्थळ… कुठलही असलं तरी हं… हा आवाज आल्यानंतर आता आपल्याला नक्की काय करायचं आहे याचा अंदाज घेण्याआधीच कधी कधी कृतीला सुरुवात होते. इतका विश्वास त्यांच्या नुसतं हं… म्हणण्यात आहे.

टेबलवरची गोळी हातात घेत मी सहज विचारलं. कोणती गोळी आहे. आणि होती घरात. मला लक्षातच नाही…

त्यावर परत ऊत्तर. मागच्याच आठवड्यात तुमचे गुडघे दुखत होते तेव्हा डाॅक्टरांनी लिहून दिलेलीच आहे. आणि या गोळीने गुडघा दुखायचा थांबत असेल तर डोकं का थांबणार नाही. नाहीतरी कधीतरीच ते जागेवर असतं. बाकी त्याचा मुक्काम तिथेच जाणवतो. आणि थोड्यावेळाने गुडघे दुखायची तक्रार होइलच. कारण आज सकाळपासून बराच वेळ गॅलरीत ऊभे राहून येरझारा जास्तच झाल्या आहेत. दोनदा तर चार मजले उतरुन चढून झाले आहेत. कशासाठी? … ते सावकाश सांगते संध्याकाळी. पण एकाच गोळीत दोन्ही कामं होतात का बघू…

मी निघते. ऊशीर होतोय. गोळी घेतलीत तर दोन्ही दुखणी थांबली नाहीत तरी एक थांबायला हंव. या विश्वासाने ओतप्रोत भरलेल्या वाक्याने समारोप झाला असला तरी, संध्याकाळच्या चर्चेची नांदी त्यात जाणवली.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments