श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ “सैनिकांना देश काय देतो ?” ☆ श्री संभाजी बबन गायके

“चांगला शिकलेला असतास तर आज चांगल्या कंपनीत नोकरी करीत असतास, अर्धशिक्षित आहेस म्हणूनच तिकडे सीमेवर पाठवलाय तुला… कुणाचे पैसे बुडवून तुमचं काही चांगलं होणार नाही… तुम्ही लोक असं करता म्हणून तुमची मुलं अपंग म्हणून जन्माला येतात… आणि तुम्ही लोक शत्रूच्या हातून मारले जाता! मी पाहतेच तू काय करतोयेस ते… मी पण फौजी कुटुंबातीलच आहे… तू जर चांगल्या कुटुंबातला असतास ना तर असा पंधरा सोळा लाख रुपयांचं कर्ज घेऊन जगला नसतास… !” 

वरील वक्तव्ये आहेत एका तथाकथित रिकवरी एजंट महिलेची. सी. आर. पी. एफ. अर्थात सेन्ट्रल रिजर्व पुलिस फोर्समध्ये आणि सध्या सीमेवर तैनात असणा-या कुणा एका सैनिकाने एच. डी. एफ. सी. बँकेतून सुमारे सोळा लाखाचे कर्ज घेतलेले आहे. या कर्जाबाबत कर्जदार आणि बँक यांच्यात काही परिस्थिती निर्माण झालेली आहे. एच. डी. एफ. सी. बँक म्हणते की ही महिला त्यांची कर्मचारी नाही. याचा अर्थ ही महिला कर्ज वसुलीच्या कामावर नेमल्या गेलेल्या कुणा खाजगी संस्थेची प्रतिनिधी आहे. कर्जाचे थकलेले हफ्ते वसूल करण्याच्या कामासाठी महिलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अधिक आक्रमक वसुलीसाठी काही बँका थेट बाहुबली लोकांची मदत घेताना दिसतात. असो.

प्रस्तुत विषयात या महिलेने संबंधित सैनिकाशी मोबाईलवर केलेल्या संभाषणाचा ऑडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर पाहिला जात आहे. पुढे संबंधित महिलेने याबाबत माफीनामा दिल्याचा ऑडीओ सुद्धा आला आहे. असो.

सामान्य लोकांमध्ये सैनिकांविषयी विशेषत: सामान्य सैनिकांविषयी किती आणि कोणकोणते गैरसमज आहेत हेच यातून काही अंशाने पुढे आले आहे. ही बाई तर स्वत:ला सैनिकी कुटुंबातील एक सदस्य म्हणवते… तिच्याच तोंडी जर सैनिकांबाबत अशी भयावह भाषा असेल तर इतर जनतेचे काय असेल? 

सैन्य पोटावर चालते हे जरी खरे असले तरी सैन्यामुळेच सामान्य जनता आपापले जीवन सुरक्षितपणे जगून पोट भरू शकते हे नाकारता येणार नाही! 

सैनिक अर्धशिक्षित असतात असाही एक मोठा गैरसमज समाजात आहे. अगदी सामान्य सैनिक म्हणून भरती व्हायचे असले तरी हल्ली किमान एस. एस. सी. उत्तीर्ण असावे लागते… आणि दहावी पास म्हणजे शिक्षित असे मानले जाते. (इथे मी सामान्य शब्द मी सैन्यसेवेतील अगदी प्रारंभिक पद अशा अर्थाने वापरला आहे. देशासाठी जीवाचा धोका पत्करण्यास तयार असलेला प्रत्येक सैनिक असामान्य म्हणावा!) 

 भारतीय सैन्याच्या ब्रिटीशकालीन जडणघडणीच्या काळात शालेय, पुस्तकी शिक्षणाचा प्रसार अगदीच नगण्य होता. शिवाय समाजाच्या तळागाळातील तरुण सैन्यात भरती होत असत. तत्कालीन आर्थिक हलाखीची परिस्थिती तर होतीच… आणि ही परिस्थिती ब्रिटीशांनी भारतीयांना दिलेली देणगीच होती, हेही खरे! पण पोटाची सोय एवढेच काही सैन्यात भरती होण्याचे एकमेव कारण नव्हते. भारतातल्या काही वंशाच्या लोकांच्या स्वभावात मूळातच असलेल्या लढवय्येपणाच्या भावनेचाही यांमध्ये मोठा वाटा होता. मर्दुमकी गाजवण्याची आंतरिक इच्छा हेही मोठे कारण होते. एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी लढणे आणि त्यासाठी प्राण देण्याची तयारी दर्शवणे हे शिकवून येत नाही! असो.

सैनिकांना सर्व काही फुकट मिळते, त्यांची मज्जाच असते, युद्ध काही नेहमी नेहमी होत नसतात, भरपूर पेन्शन असते, सैनिकी पुरवठा संस्थेत खूप कमी किंमतीमध्ये जीवनोपयोगी वस्तू मिळतात…. असे सामान्य लोकांना वाटते.

शिवाय, पहिलवान लोकांचा मेंदू त्यांच्या गुडघ्यात असतो त्या चालीवर सैनिकांची बुद्धीही तेवढीच असते, असाही एक मोठा मतप्रवाह आजही समाजात दुर्दैवाने आढळून येतो! भारतासारखी कृतघ्न प्रजा अन्य कुठेही आढळून येत नाही! अर्थात यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात तशी कमी आहे, किंवा त्यांची मते खुद्द सैनिकच हिशेबात धरत नाहीत… हे देशाचे सुदैवच म्हणावे लागेल!

जीविताचे रक्षण हेच मानवी अस्तित्वाचे मूळ आहे. मग आपल्या जीविताचे रक्षण करणा-यांच्या बाबतीत जनता असा विचारच कसा करू शकते. आपल्या कातड्याचे जोडे करून सैनिकांच्या पायांत घातले तरी त्यांचे उपकार फिटायचे नाहीत असं असताना जनता पैशांच्या हिशेबात सैनिकांना तोलते हे काही चांगले लक्षण नाही! 

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर सामान्य सैनिकांना दिले जाणारे पैसे साधारणपणे पुढीलनुसार आहेत. हाती शस्त्र धरून प्राण पणाला लावण्यात आघाडीवर असणारा शिपायाचा (सैन्यातला शिपाई म्हणजे कार्यालयातील प्यून नव्हे!) (अगदीच अक्षरशत्रू असण्याचा जमाना केंव्हाच मागे पडला आहे. सेनेत भरतीसाठी अनेक उच्चशिक्षित तरुण हजारोंच्या संख्येने प्रयत्न करीत असतात. त्यामुळे अशिक्षित, अर्धशिक्षित सैनिक असा प्रकार आता उरलेला नाही. ) सुरुवातीचा पगार साधारण एकवीस-बावीस हजार असतो. तो पुढे एकोणसत्तर हजारांपर्यंत जातो. पुढे बढती मिळत गेल्यावर यांच्या प्रवर्गातील सर्वांत उच्च पदावरील सैनिकाला दीड लाखांपर्यंत वेतन मिळू शकते. कोणत्या प्रदेशात, कोणत्या परिस्थितीमध्ये नेमणूक आहे, तिथे जीवितास किती धोका आहे यानुसारही अधिकचे वेतन, भत्ते दिले जातात. सैनिकी सेवा बजावत असताना मृत्यू आल्यास कुटुंबियांना दिली जाणारी आर्थिक नुकसान भरपाई सुद्धा उत्तम रकमेची असते. सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन असतेच. इतर अधिकारी वर्गाचे वेतन यांच्यापेक्षा अर्थातच अधिक आहे. नव्याने अंगीकारल्या गेलेल्या अग्निवीर योजनेत पहिल्या वर्षी सुमारे एकवीस हजार हाती पडतात आणि बाकीची रक्कम विशेष योजनेत जमा होते, जी सैनिकाचा कार्यकाळ संपल्यावर त्याला हिशेब आणि नियमानुसार परत दिली जाते. इतर खात्यांतील नोक-यांत प्राधान्य, कर्जसुविधा असे लाभ आहेत. शिवाय सैनिकी कर्तव्यावर असताना मृत्यू आल्यास अधिकृत वारसांना सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत आर्थिक नुकसान भरपाई दिली जाते.

दहा-बारा लाख प्रत्यक्ष सैनिक, त्यांना साहाय्यक इतर सेवा करणारे तितकेच लोक यांचा समावेश असणारी सैन्य ही एक मोठी यंत्रणा आहे. कारभार अत्यंत व्यापक आणि वर्षानुवर्षे चालत आलेली आर्थिक व्यवस्था आहे. त्याबाबत न्याय व्यवस्था आहे. एवढे सर्व असले तरी सैनिकांना जे काही मिळते ते त्यांनी त्यांचे प्राण पणाला लावलेले असतात म्हणून. या सेवेत तंदुरुस्ती सातत्याने टिकवून ठेवावी लागते. सतत प्रशिक्षण घेत राहावे लागते. घाम गाळावा लागतो. नागरी जीवनापासून, कुटुंबापासून दीर्घकाळ दूर राहावे लागते, एकाकीपणा असतो. भारतीय प्रदेशांच्या विविधतेमुळे विविध शारीरिक समस्यांना, विकारांना सामोरे जावे लागते. या सेवेत प्राणार्पण करणा-यांचे वय इतर जनतेच्या मानाने खूप कमी असते… जवान म्हणजेच मराठीत तरुण. देशासाठी मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या कुटुंबांची आर्थिक बाजू जरी बरी दिसत असली तरी त्याही कुटुंबाला, विशेषत: पत्नी, आई, वडील यांना कित्येकदा आर्थिकी वाद, कुचंबणा, समाजकंटक, दुर्लक्ष, दफ्तरदिरंगाई यांना सामोरे जावे लागते. या यादीत आणखी कितीतरी गोष्टींची भर घालता येईल.

घराच्या रक्षणासाठी वेतन देऊन रक्षक नेमला आणि चोरी झालीच नाही म्हणजे रक्षकाच्या वेतनावर केलेला खर्च वाया गेला असे म्हणणे हास्यास्पद नव्हे काय? विमा काढला पण विकार झालाच नाही हा विचारही तसाच. सैनिकांचे कामच आहे प्राणार्पण करणं, त्याचे त्यांना पैसे मिळतात असे म्हणणारे लोक इतरत्र आढळत असतील असे वाटत नाही.

अपहरण झाले, शस्त्राचा धाक दाखवला गेला, गुंडांनी मागितले, कुणी ऑनलाईन अटकेची भीती दाखवली, जीवघेणा आजार झाला उपचारांसाठी जवळचे सर्वस्व द्यायला लोक सहजी राजी होतात. इथे तर आपल्या जीविताच्या रक्षणाचा प्रश्न आहे, आपल्या इभ्रतीचा, अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि ही इभ्रत प्राणांचे मोल देऊन राखण्याचे काम करण्यासाठी तरुण रक्त (आपल्याकडे सैन्यसेवा अनिवार्य नाही!) स्वयंस्फूर्तीने, देशसेवेच्या, मातृभूमीच्या रक्षणाच्या प्रेरणेने पुढे येत असतात… हे जगण्याची आस असणा-या तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांच्या पथ्यावर पडणारी बाब नव्हे काय? आणि आपल्या देशासमोरची सध्याची भयावह परिस्थिती पाहता रुपयातले बारा आणे जरी खर्ची पडले तरी ते कमीच पडतील, असे वाटते! 

प्रस्तुत लेखातील आरंभी उल्लेख केलेल्या महिलेने क्षमायाचना केली आहे, सैनिक तिला क्षमा करतीलच…. कारण आपण ज्यांचे रक्षण करण्यासाठी प्राण तळहातावर घेतलेले आहेत…. त्यांपैकी काहीजण असे अशिक्षित, अर्धशिक्षित निपजतील याची त्यांना अपेक्षा असेलच! जय हिंद!

(ता. क. :-बी. एस. एफ, सी. आर. पी. एफ., इंडियन आर्मी, टेरीटोरिअल आर्मी इत्यादी इत्यादी विभाग, नावे ही देशरक्षणाच्या व्यापक कार्याच्या सोयीसाठी निर्माण केलेल्या व्यवस्था आहेत.. यातील प्रत्येकजण सैनिकच!)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted