श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “परत…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

व्हाॅटस्ॲप वर आपण पाठवलेला एखादा मेसेज आपल्यालाच परत येतो. काहिवेळा तो थोड्या वेळातच येतो, तर काहिवेळा त्याला यायला वेळ लागतो. पण परत येतोच. हे मेसेजेस साधारण असतात. यात गुपित काहिही नसतं.

पण व्हाॅटस्ॲप यायच्या आधी आणि आता सुध्दा आपलाच आणि गोपनीय मेसेज आपल्यालाच परत मिळण्याचा अनुभव काहि जणांना आला असेल. कुणाला सांगू नका किंवा सांगू नकोस अशी सुरवात करून दबक्या आवाजात खणखणीतपणे सांगितलेली गोष्ट कधीकधी आपल्यालाच परत ऐकायला मिळते. कधी त्यात कशाची भर पडते तर कधी काही वगळलं जातं. वर परत कुणाला सांगू नका याची जोड असतेच.

यावेळी आपले चेहर्‍यावरचे भाव कमालीचे निरागस असतात. ठेवावेच लागतात.

कुणाला सांगू नका. अशी सुरुवात करून सांगितलेली गोष्ट दोन प्रकारची असते. एकतर ती खरंच कोणाला सांगायची नसते. आणि दुसरा प्रकार म्हणजे सगळ्यांनाच समजावी हि ईच्छा असते. पण मी सांगितली हे समजू नये असं वाटतं.

मग ती गोष्ट वरच्या दोनपैकी कोणत्या प्रकारची आहे हे आपणच ठरवतो. पहिल्या प्रकारची असेल तर एखाद्यालाच, जवळ कोणी नसतांना, त्याला जवळ करत सांगतो. त्यालाही आपण जवळचे आहोत याचा आनंद होतो. पण यात त्याच्या जवळचं पण कोणीतरी असेल याचा विसर पडतो.

दुसर्‍या प्रकारची असेल तर मग ती कुठे, कशी, आणि साधारण किती जणांना सांगावी हे ठरवतो. बर्याचदा ते ठरलेलंच असत, फक्त आपण सांगायच्या संधीची वाट बघत असतो. अशी संधी आली नाही तर ती आणतो.

कुणाला सांगू नका अशी सुरुवात करून सांगितलेली गोष्ट जे पहिल्यांदा ऐकतात त्यांच्या चेहर्‍यावर त्यावेळी योग्य ते भाव आणि प्रतिक्रिया असतात. पण नंतर मात्र ते कुुणाला सांगू नका यातलं नका हे ते सोयीस्कर विसरतात, आणि कुणाला सांगू….. अशी त्यांची अवस्था होते.

आणि त्या अवघड वाटणार्‍या अवस्थेतून बाहेर पडण्याचा एक मार्ग काढला जातो. आणि मग परत दबक्या आवाजात खणखणीतपणे ती गोष्ट पुढे सरकल्यावर थोड मोकळं वाटतं.

कुणाला सांगू नका यानंतर सांगीतलेल्या गोष्टीवर अरेच्या, काय सांगतोस, खरंच का, मला शंका होतीच, या सारखे अनेक उद्गार बाहेर पडतात. यात वाटत नाही तसं….. , असं म्हणतांना आपल्याला काय वाटतं याची चर्चा होते.

कोणाला सांगू नका हि गोष्ट माणसांना सांगीतली तरी ती स्त्री वर्गात पोहोचते. आणि स्त्री वर्गात सांगीतली तरी ती पुरुष वर्गात पोहोचते.

यावर जाऊ देत… आपल्याला काय करायचय….. यावर चर्चा संपलीतरी पुढे आपल्याच काहितरी करायचंय…. याची कल्पना काही जणांना होते. कारण त्यांनी काही केलं नाहीतर हा बातमीचा प्रवाह थांबणार तर नाही नां, अशी शंका त्यांना येते. आणि मग ती बातमी तशाच विश्वासू व्यक्तीला त्याच पध्दतीने सांगून ते आपलं मन मोकळं करतातच, पण त्या बातमीला वाहण्यासाठी मोकळंपण करतात.

कोणाला सांगू नका. यात नात्यांचा भेद नसतो. नात्यातल्या, मित्रांच्या, शेजारच्या, वरवर ओळख असणाऱ्या, तोंड ओळख असणाऱ्या, किंवा ओळख नसणाऱ्या अशा सगळ्यांच्या गोष्टींचा समावेश त्यात असतो. बर्‍याचदातर अरे ते….. ते नाहि का….. अरे तिथे कायम असतात…… आठवत नाही का. असं म्हणत त्यांची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न होतो.

कोणाला सांगू नका…. ही कानातून पोटात गेलेली गोष्ट जास्तवेळ पोटात रहात नाही. ती परत तोंडातून बाहेर पडत कोणाच्यातरी कानातून त्याच्या पोटात जाते. आणि तिथून त्याच प्रकारे बाहेर पडते.

आत्ता मी काय सांगितलं यात खास असं काहीच नाही. आणि गोपनीय तर मुळीच नाही. त्यामुळेच कोणाला सांगू नका असं मुळीच म्हणणार नाही.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted