श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

नाकी नऊच का?’ ☆ श्री दिवाकर बुरसे

जीव कासावीस होणे, घाबरा- घुबरा होणे या अर्थी ‘नाकी नऊ येणे’, ‘प्राण कंठाशी येणे’ असे वाक्प्रचार आपण वापरतो. ‘डोळ्यात प्राण आणून एखादी आई किंवा प्रिया दूरदेशी गेलेल्या आपल्या लेकराची किंवा सख्याची वाट पहाते. पण नाकी नऊच का? पाच किंवा सात का नाही? प्राण कंठाशीच का, पाठीत किंवा पोटात का नाही? डोळ्याऐवजी कानात प्राण आणून आई किंवा प्रिया का वाट पहात नाही? माझ्याप्रमाणे आपल्यालाही कधीतरी असे ‘पोरकट, भोचक, बालिश प्रश्न’ पडले असतीलच ना! असो, ‘अथ तो ज्ञानजिज्ञासा’!

शरीरात व बाहेर सर्वत्र वायुचा संचार असतोच. भारतीय शास्त्रानुसार आपल्या शरीरात दहा प्राणवायु आणि नऊ प्रमुख रंध्रे आहेत. (दोन डोळे, दोन कान दोन नाकपुड्या, तोंड, मूत्रद्वार आणि गुदद्वार) प्रत्येक रंध्राशी एक एक प्राण वसलेला आहे. व्यक्तीच्या मृत्युच्या क्षणी प्रथम या वायुद्वारे सर्व रंध्रांतून शरीरात साठलेली मलद्रव्ये शरीराबाहेर विसर्जित केली जातात. नंतर ही रंध्रे बंद होऊन सर्व नऊच्या नऊ प्राण कंठात एकत्र येऊन नाकातून बाहेर जातात. म्हणून ‘नाकी नऊ येणे’, ‘प्राण कंठाशी येणे’ म्हणजे मृत्यूच्या वेळेसारखा क्लेशदायक, गंभीर प्रसंग, अत्यवस्था निर्माण होणे होय. यालाच हिंदीत म्हणतात, ‘नाकमें दम आना।’

हिंदु शास्त्रानुसार शरीरात जे दहा प्रकारचे प्राणवायु असतात त्यांचे चलन, वलन, प्रसारण, निरोधन आणि आकुंचन ही महत्वाची कार्ये असतात. त्या दहातील मुख्य पंचप्राण वायु असे… प्राण, अपान, व्यान, उदान, समान. उप पंचप्राण वायु असे… नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय.

मुख्य पंचप्राणवायु व त्यांची कार्ये

१) प्राणवायुः हृदयात असून श्वास आत घेणे व बाहेर सोडणे तसेच अन्नाचे पाचन करणे हे त्याचे कार्य असते. नासिका, हृदय, नाभि, कुण्डलिनीच्या भोवताली आणि पदांगुष्ठ या ठिकाणी प्राणवायु रहातो.

२) अपानवायुः मूलाधारात वास करतो. मुख, गुह्य, लिंग, उरु, जानु, उदर, कटि, नाभि या ठिकाणी अपान वायु रहातो. मल,मूत्र, वीर्य इ. विसर्जित करणे हे त्याचे कार्य.

३) समान वायुः नाभिस्थानी वास. शरीरास संतुलित ठेवणे हे त्याचे कार्य. उदाराग्नि व सर्वांगात समान वायु रहातो.

४) उदान वायुः कंठस्थित हा वायु शरीराची वृद्धी करतो. सर्वसंधि आणि हात, पायामधे उदान वायु असतो.

५) व्यान वायुः सर्व शरीरांतर्गत देवाण-घेवाण करतो. कर्ण, नेत्र, कंठ, नाक, मुख, कपोल, मणिबंध येथे व्यान वायु रहातो.

उप पंचप्राणवायु व त्यांची कार्ये

१) नाग वायुः ढेकर देणे

२) कूर्म वायुः डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप

३) कृकल वायुः शिंक देणे.

४) देवदत्त वायुः जांभई देणे

५) धनंजय वायुः मृत्युच्या क्षणी नऊ वायु नवद्वारातून कंठात गोळा होऊन नाकावाटे निघून जातात हे आपण पाहिले. एकटा ‘धनंजय वायु’ मात्र मृत्युनंतरही शरीरात वास करून असतो. चार तासानंतर मृत देह फुगू लागतो, सडू लागतो, त्याचे विघटन होऊ लागते ते या दहाव्या धनंजय वायुमुळे!

मृत्युसमयी नऊ वायु कंठात जमून नाकावाटे बाहेर पडतात व दहावा धनंजय हा वायु शरीरातच रहातो ही सामान्य प्राणोत्क्रमणक्रिया होय. काही वेळा ‘अमुक एकाचा प्राण मुखातून गेला’ असे आपण ऐकतो. खरेच असे घडते का? तर हो, असेही घडते पण क्वचित. पुण्यवान व्यक्तीचे प्राणोत्क्रमण मुखातून होते अशी हिंदुधर्मात श्रद्धा आहे. त्यावेळी मृताचे तोंड वाकडे होते व उघडे राहते. नाभिखालील रंध्रातून प्राण गेल्यास मृत्युपश्चात त्या व्यक्तीचा आत्मा अधोगतीला जातो, अंधःकारमय मार्गाने पुढील प्रवास करतो तर नाभिवरील शरीराच्या एखाद्या रंध्रातून प्राणोत्क्रमण झाल्यास मृताच्या आत्म्याला सद्गती लाभते, तो आत्मा प्रकाशमय मार्गाने जातो अशी मान्यता आहे.

एखाद्याची अत्यंत उत्कटतेने वाट पाहणे म्हणजे शरीरस्थ नऊही प्राणवायु डोळ्यात एकवटून प्रतीक्षा करणे. यालाच ‘डोळ्यात प्राण आणून वाट पाहणे’ म्हणतात. डोळ्यातून प्राण गेल्यास मृत व्यक्तीचे नेत्र उघडे राहतात, विस्फारलेले दिसतात.

आता कळलं असेल, ‘नाकी नऊ येणे’, ‘प्राण कंठाशी येणे’, ‘डोळ्यात प्राण आणून वाट पाहणे’ म्हणजे काय ते!

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments