श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “तक्रार निवारण केंद्र…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

आपण मोबदला देऊन घेतलेल्या वस्तू व सेवा याच्या बद्दल काही तक्रार असल्यास अशी तक्रार निवारण करायला निवारण केंद्र असतात.

यात प्रत्यक्ष भेटून, लिहून, किंवा तोंडी तक्रार देता येते. हल्ली ऑनलाईन तक्रार करता येते. ब-याचदा तर तक्रार करणारा आणि घेणारा समोरासमोर येत सुुध्दा नाहीत.

पण मला आठवतय आमच्यावेळी असणारं तक्रार निवारण केंद्र. हे साधारण आमचे आईवडील म्हणजे पालक आणि आम्हाला शिकवणारे म्हणजे गुरूजन म्हणजे शिक्षक यांच्यातच असायचं. आणि तक्रार…. साहजिकच ती आमच्या बद्दलच असायची. आणि आईवडील व शिक्षक यापैकी कोणालाही तक्रार करायची मुभा असायची.

या तक्रारीची नुसतीच दखल घेतली जायची नाही तर तीचं निवारण झालं की नाही याची शहानिशा व्हायची.

ब-याचदा तर मोठा भाऊ, बहीण कोणीतरी दोन तीन वर्षांच्या अंतराने मागच्या किंवा पुढच्या वर्गात असायचेच. याची व्यवस्थित माहिती शिक्षकांना असायची. काहिवेेळा तर त्यांचच उदाहरण दिलं जायचं. बघ जरा…… तो किंवा ती कशी….. आणि तू…… या तू म्हणण्याचा अर्थ कळायचाच…… शाळेतली तक्रार त्यांच्याच मार्फत घरी पोहचवण्याची व्यवस्था व्हायची. आणि ते सुुध्दा जशीच्यातशी आणि न चुकता ती तक्रार घरी व्यवस्थित पोहोचवायचे. स्पीड पोस्ट. किंवा एका दिवसात डिलेव्हरी…… त्यावेळी सुुध्दा होती.

या तक्रारीत तर आमच्यावरचे असणारे अधिकार सुध्दा एकमेकांना विश्वासाने सोपवले जायचे. म्हणजे शिक्षकांनी तक्रार केली तर तुमचा मुलगा….. अशी सुरुवात व्हायची. आणि आईवडील यांची तक्रार असेल तर….. तुमचा विद्यार्थी आहे…. घ्या ताब्यात…. अशीच सुरुवात करायचे.

तक्रारीच्या स्वरूपानुसार मग योग्य ती सुधारणा करण्याचा प्रयत्न व्हायचा. प्रयत्न बहुतेक यशस्वीच व्हायचा.

यात जागेवर ऊभा रहा. यापासून जागेवर पण बाकावर ऊभा रहा. अशा काही सौम्य पण अपमान वाटणा-या गोष्टी असायच्या. तर काहीवेळा वर्गाच्या दारात सुध्दा ऊभं रहावं लागायचं.

आजकाल एरी॓अल व्ह्यू हा शब्द ऐकू येतो. पण याचा अनुभव आम्ही शाळेत असतांनाच ज्या ज्या वेळी बाकावर ऊभं राहिलो त्या त्या वेळी घेतला होता. बाकावर ऊभं राहिल्यावर काही गोष्टी दिसायच्या. यात पुस्तकात धड्यांचे लेखक किंवा लेखिका यांच्या फोटोवर पेनच्या सहाय्याने चढवलेला चष्मा. किंवा त्यांना काढलेली निळ्या रंगाची दाढीमिशी दिसायची. ती वाकून पाहण्याचा प्रयत्न केला तर तेवढ्यात शिक्षक ओरडायचे, नीट, ताठ ऊभा रहा……. या आवाजात इतकं वजन असायचं, कि बाकावर ऊभा असलेला काय पण बाकावर बसलेला सुध्दा ताठ बसलेेला असला तरी परत सरसावून बसायचा. कधी कधी या ओरडण्यासोबत एक खडूचा तुकडा अचानक मीसाईल सारखा यायचा आणि त्याच काम करून जायचा. सर्जीकल स्ट्राईक.

वस्तू दुरुस्त झाल्यावर जसे काही स्क्रु पिळून घट्ट करतात तसेच काहीवेळा आमचे कानसुध्दा स्क्रू सारखेच पिळले नाही तर अक्षरश: पिरगळले जायचे. फक्त वस्तूंचे सगळेच स्क्रू पिळून घट्ट झाले का पहावे लागतात. आमच्या एका कानाचा स्क्रू पिळला जाणार अशी शंका आलीतरी सगळेच स्क्रू आपोआप ठिकाणावर गेल्याची जाणीव व्हायची.

ब-याचदा तर एक स्क्रू म्हणजे कान पकडल्यानंतर दुसरा स्क्रू म्हणजे कान पिळला जाऊनये म्हणून तो एका हाताने झाकायचा केविलवाणा प्रयत्न असायचा. पण मग त्या झाकलेल्या हातावरच असा फटका बसायचा कि न पिळताच तो स्क्रू रुपी कान ठणकायचा.

किल्ली फिरवून घट्ट केली कि काहीकाळ चालणारी खेळणी असतात. त्याच पध्दतीने आमचा कान पीरगळून एकदा किल्ली घट्ट केली की आमचं खेळणं बराचकाळ नीट चालायचं. पर्याय नसायचा. सारखी सारखी कोण किल्ली घट्ट करून घेणार…

अक्षराबद्दल काय बोलणार… अक्षर चांगलच असलं पाहिजे असाच कटाक्ष असायचा. अक्षर वाईट असेल आणि त्याच दर्शन शिक्षकांंना झालं, तर त्याचं आणि अक्षराचं दोघांच प्रदर्शन वर्गात होणारच याची खात्रीच असायची. वर… काय लिहितोस?… असा शेरा असायचाच.

अक्षरासाठी मग वहिची दोन पानं लिहून आणायची शिक्षा असायची. अशी दोन पानं करता करता एकदातर माझी एक पूर्ण वही भरली होती. सुदैवाने ते वर्ष संपलं म्हणून. नाहीतर घरी नवीन वही मागावी लागली असती. परत आता वही कशाला हवी? … ही विचारणा झालीच असती. मोठ्यांंची हिशोबासाठी वही असायची, पण आमच्या वह्यांचा हिशोब सुुध्दा त्यांच्याकडे असायचा.

पाढे पाठ असणं किंवा करणं हा शिस्तीचा भाग असायचा. पण तोच कधीकधी शिक्षेसाठी कारणीभूत ठरायचा. मग पाढे पाठ नसायची शिक्षा पाठीवर जाणवायची.

पण त्या तक्रार निवारण केंद्रात माया, आणि प्रेम काळजी, आणि आपुलकी होती हे खरं आहे. शिक्षणसंस्था, शिक्षण, शिकवणं आणि शिकणं या बद्दल शिक्षकांना आणि पालकांनासुध्दा आस्था व अभिमान असायचा.

विद्यार्थांचं अपयश हे शिक्षकांना स्वतःच अपयश वाटायचं, तर विद्यार्थांच्या यशाने शिक्षकांची छाती गर्वाने फुलायची आणि मान अभिमानाने ताठ व्हायची.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments