श्री जगदीश काबरे
☆ “लग्न आहे सहजीवन…” – भाग १ ☆ श्री जगदीश काबरे ☆
१) अमोल आणि मृणाल, दोघंही शिक्षित, शहरी मध्यमवर्गातले. दोघंही कॉर्पोरेट नोकरीत असून चांगल्या पगाराच्या बळावर त्यांनी स्वतंत्र घर घेतलं. लग्नाच्या सुरुवातीला दोघंही समानतेची भाषा बोलणारे, फसव्या पद्धतीने ‘लिबरल’ भासणारे. पण काही वर्षांत मृणालला जाणवायला लागलं की अमोलच्या या आधुनिकतेच्या कवचाखाली पारंपरिक पुरुषी वर्चस्व लपलेलं आहे. घरातील छोट्या निर्णयांपासून मोठ्या गुंतवणुकीपर्यंत, अमोल आपली मर्जी लादायचा. मृणालचं मत विचारात घेतल्याचा आभास असायचा, पण शेवटचा निर्णय ‘अमोलचा’च असायचा.
कधी कधी मृणालला वाटायचं की अमोलला स्त्री सक्षमीकरणावरच संशय आहे. जेव्हा ती प्रमोशन मिळवून त्याच्याहून अधिक पगार घेऊ लागली, तेव्हा अमोल काही बोलला नाही—पण त्याचं शांत राहणंही एक प्रकारचं अबोल बंड होतं. त्याचा आत्मविश्वास गडगडायला लागला होता. तिच्याशी त्याचा संवाद कमी होत गेला. ही दुरी केवळ मनाची नव्हती, तर शरीराचीही झाली होती. अमोलला स्वतःच्या आतली कोंडी जाणवायची, पण त्याला शब्द सापडायचे नाहीत. ऑफिसमध्ये बॉसकडून पडणाऱ्या ओरड्यानंतरही तो घरी येऊन ‘सर्व काही ठीक आहे’ असा चेहरा ठेवायचा. रडणं त्याला लाजिरवाणं वाटायचं. ‘पुरुष रडत नाहीत’ हेच त्याचं ब्रीद होतं. आणि त्याच ब्रीदामुळे तो हळूहळू मृणालपासून तुटत गेला. मृणाल अनेकदा संवाद साधायचा प्रयत्न करायची. तिला केवळ ‘सहवास’ नको होता, तर ‘सहजीवन’ हवं होतं. पण अमोलच्या पुरुषत्वाने तिच्या आवाजाला स्पेस दिलीच नाही. एक दिवस तिने थेट सांगितलं, “तुझा पुरुषी माज मला बोचतोय. तुझं अबोलपण हा माझ्यावर मूक अन्याय करतोय. ” त्या रात्रीनंतर अमोल पहिल्यांदा स्वतःशी प्रामाणिक राहून विचार करू लागला. त्याने मानसोपचारतज्ज्ञांची भेट घेतली. त्याला समजलं की त्याचं पुरुषपण त्याच्यासाठीही तुरुंग ठरलं आहे. त्यानं संवाद साधायला शिकायचं ठरवलं. आता दोघंही एकत्र जोडीनं ‘सहजीवन’ या कल्पनेचा नव्यानं अर्थ शोधू लागले आहेत.
२) धोंडू हा विदर्भातला एक शेतकरी. त्याचं शिक्षण जेमतेम, पण समाजात प्रतिष्ठा टिकवण्यासाठी तो बायकोला कायम ‘दुसऱ्या क्रमांकाची माणूस’ मानतो. सौदामिनी ही सुशिक्षित, पण सासरी आल्यावर तिचं शिक्षण ‘घर सांभाळण्यापुरतं’ मर्यादित झालं. धोंडू कधीच तिच्या मताला किंमत देत नाही. तिने बँकेत नोकरी करावी, घराला हातभार लावावा हे तिचं स्वप्न आहे. पण धोंडूचं उत्तर एकच — “बाई माणूस बाहेर नको. ” ही पुरुषी वृत्ती धोंडूला ‘पुरुष’पणाचं आभास देत राहते. परिणामी तो भावनिकदृष्ट्या कोरडा, एकटा होतो. त्याच्या या वृत्तीमुळे सौदामिनीने घरातच संवादाचं दार बंद केल्यावर त्याला समजतं की, ‘पुरुष’ असणं म्हणजे माणूसपण गमावणं आहे. तिच्या दूर जाण्याने तो स्वतःला प्रश्न विचारतो, पण तोवर खूप उशीर झालेला असतो. त्यांच्या जीवनात संवाद, समानतेची वाट सापडत नाही, आणि ते केवळ नावापुरतं नातं उरतं.
३) रोहन आणि नेहा, दोघंही अमेरिकेहून परतलेले, मुंबईत स्थायिक. दोघांचं शिक्षण, राहणीमान आणि विचार प्रदेशात राहिल्यामुळे आधुनिक झाले होते असं म्हणणं धाडसाचंच ठरलं असतं. कारण रोहनच्या वागण्यात अजूनही सूक्ष्म पुरुषसत्ताक वर्तन शिल्लक राहिलं होतं. जेव्हा नेहा तिच्या संशोधनात आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळवते, तेव्हा रोहन हसून तिचं कौतुक करतो. पण आतून मात्र पुरुषी अहंकाराला ठेच बसल्यामुळे तो अस्वस्थ होतो. तिच्या सन्मानप्राप्त लेखावर ‘बायकोची उपलब्धी’ म्हणून इंस्टाग्राम पोस्ट करतो, पण घरी “माझ्या नोकरीला तुझ्या पेक्षा महत्त्वाचं समज” असं वारंवार बजावतो. नेहाचं बोलणं तो मधेच तोडतो, तिच्या वेळेचा आदर करत नाही, आणि स्वतःला घरात निर्णयकर्ता मानतो. ‘इक्वल पार्टनर’ ही भाषा केवळ फेसबुकपुरती राहते. नातं शारीरिकदृष्ट्या जवळ पण मानसिकदृष्ट्या दूर होतं. हळूहळू नेहा थकते. तिचं मन तोडणाऱ्या पुरुषी वागणुकीला ती ‘मेक्सिकोमध्ये झालेल्या एका चर्चेत’ आवाज फोडते. ती रोहनला थेट विचारते, “तू माझा नवरा आहेस की बॉस? ” हा प्रश्न त्याच्या पुरुषत्वाला हादरा देतो. यथावकाश दोघं थेरपी घेतात. यातून रोहनच्या मनात असलेली पुरुषपणाची झाकलेली पितृसत्ता उघड होते. मग तो मानसोपचार तज्ञाकडून समुपदेशन घेत स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो. हा सकारात्मक बदल नेहाला सुखावतो.
४) अर्जुन आणि समीर हे समलैंगिक जोडपं असतं, पण त्यातही एकात‘पुरुषी’ होण्याची स्पर्धा आहे. अर्जुन अधिक मर्दानी दिसणारा, व्यायाम करणारा, आर्थिकदृष्ट्या वरचढ. त्याला वाटतं, तोच निर्णय घेणारा असावा. तो समीरला अनेकदा ‘थोडं मॅनली हो’ म्हणतो, त्याच्या भावनिक गरजा उडवून लावतो. त्याच्या मते ‘बायल्यासारखा काय वागतोस’ हे म्हणणं सामान्य आहे. हे बघून समीर अनेकदा गप्प बसतो. पण त्याच्या अस्वस्थतेने नातं कमकुवत होतं. LGBTQ+ समुदायामध्येही पितृसत्ताकतेचं पुनरुत्पादन पुरुषपणाच्या द्वारे होत आहे, हे यातून स्पष्ट होतं. एका गटात समानतेसाठी लढताना, त्या गटातही वर्चस्ववादी पुरुषत्व पुन्हा उगवतं. सहजीवनात हळूहळू समीरचं मन अर्जुनपासून दुरावतं. मग अर्जुनला उमगतं की त्याचं ‘अल्फा’पण केवळ भौतिक आहे, प्रेममधील माणुसकी त्याने हरवली आहे.
५) विठोबा, ७२ वर्षांचा. पत्नी काही वर्षांपूर्वी गेली. मुलगा परदेशात. गावाकडे राहतो. आयुष्यभर त्याने ‘पुरुष म्हणलं की कठोर असावं’ हेच घोकलं. बायकोचं बोलणं कधी ऐकलं नाही. ती मन दुखावून शांत बसायची. तो ‘बायकांचं काही असं नसतं’ असं म्हणायचा. आता एकटेपणात त्याला आठवतं की, बायकोने कधीतरी सांगितलं होतं की, ’तुझं मन मला कधीच उघडलं नाही. ” तो दिवसेंदिवस अधिक शांत आणि अधिक एकलकोंडा होत जातो. गावातील किशोरवयीन पोरांमध्ये एखादा हळवा संवाद ऐकला की, त्याचे डोळे पाणावतात. आता त्याला जाणवतं की सहजीवन म्हणजे केवळ संगत नव्हे, तर संगतीत आपलं मन उघडणंही असतं. पण हे उमगायला त्याला सत्तर वर्षं लागली.
मित्रांनो, वरील सर्व उदाहरणं भिन्न सामाजिक गटांतील असली तरी त्यातील पुरुषी वृत्तीमुळे एकाच मातीतील आहेत… पितृसत्ताक शिकवण, भावनिक अभाव, संवादाचा आळस आणि वर्चस्वाची सवय. हीच वृत्ती सहजीवनाला हळूहळू पोखरत नेते. संवादाऐवजी आदेश, सामायिकतेऐवजी मालकी, सहजीवनाऐवजी सत्ता या गोष्टी जेव्हा नात्यात शिरतात तेव्हा प्रेम दमते, जिव्हाळा तुटतो, आणि माणसं हरवतात. सहजीवन टिकवण्यासाठी प्रत्येक पुरुषाने ‘पुरुष’ होण्याच्या संकल्पनेवर नव्याने विचार करायला हवा. फक्त पायघोळ, हुकमी बोलणं, वा आर्थिक जबाबदारीनं पुरुष होणं पुरेसं नाही; तर आपल्या जोडीदाराच्या आत्म्याशी नातं जोडणं, तिच्या समोर हळव्या क्षणातही उभं राहणं हे खरे पुरुषपण ठरावे लागेल. वरील उदाहरणातून दिसून येतं की पुरुषी वृत्तीने पुरुषालाही तणावाच्या गर्तेत ढकललं आहे. समाजाने पुरुषपणाची चौकट एवढी अरुंद करून ठेवली आहे की, त्यात माणूस मावत नाही आणि स्त्रीला तर त्यात श्वास घेणं अशक्य होतं. सहजीवन यशस्वी होण्यासाठी केवळ प्रेम, जबाबदारी आणि सोबती पुरेसे नसतात, तर समतेची जाणीव, भावनिक परिपक्वता, आणि संवादाची क्षमता लागते. पुरुषाने स्वतःच्या आत डोकावून पाहिलं, तर सहजीवनचं वळण अधिक सुसह्य आणि सहानुभूतीशील होण्यासाठी त्याला त्याची पुरुषी मानसिकता सोडून स्त्रीकडे आपल्यासारखीच एक व्यक्ती म्हणून पहायची गरज आहे.
निसर्गात कोणतीही गोष्ट साचून राहिली की सडते. प्रवाहीपणा, बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण आपली जातिसंस्था, कुटुंबसंस्था, विवाहसंस्था समाजातील रूढी परंपरा गतकालानुगतिक जशाच्या तशा आहेत त्यामुळे आतल्या आत सडत आहेत. काळ बदलला तसे संदर्भही बदलले. या सर्वामध्ये बदल करून बदलत्या समाजरचनेप्रमाणे सुटसुटीत प्रवाहित होत काळानुरूप जगण्याची गरज आहे. म्हणूनच पुरुषी वर्चस्व झुगारून देण्याची सुरुवात कुटुंबातील स्त्रियांनाच करावी लागेल. वैचारिक दुर्बलता मागे टाकून प्रगतीची उत्तुंग झेप घेण्यासाठी योनिशुचितेचे अवडंबर दूर करून नैसर्गिकतेने जगणे आवश्यक आहे. बलात्कारासारखी एखादी घटना घडली तर तो अपघात समजून योनिशुचितेला महत्त्व न देता सहजपणे इतर दुर्घटनांप्रमाणे त्याकडे बघावे. अर्थात त्यासाठी मानसिक तयारी करणे आवश्यक आहे. पण आजच्या आधुनिक काळातही आपल्या समाजात स्त्रीची समानता आभासीच आहे. जी काही थोडीफार समता व स्वातंत्र्य स्त्रीला दिलेले दिसते, ते शिक्षणाने आलेल्या समाजभानामुळे, स्त्रीला झालेल्या तिच्या मानवी हक्कांच्या जाणिवेमुळे व कायद्यामुळे आणि एकंदर जगातच वाहणाऱ्या स्वातंत्र्य, समता इत्यादी तत्त्वांच्या विचारप्रवाहामुळे. परंतु मुळात जाऊन पाहिले तर सरंजामी वृत्तीतून येणारी पुरुषी वर्चस्वाची मानसिकता व त्यातून निपजणारी विवेकहीनता बदललेली नाही. उलट अंत:करण हेलावून टाकणाऱ्या प्रसंगी ती वाढलेलीच दिसते आणि तिने नृशंस हिंसेचे रूपही घेतलेले दिसते. कारण अजूनही भारतीय पुरुषाच्या मानसिकतेत मनुस्मृतीतील… स्त्री ही व्यभिचारी असते, स्त्रीला स्वातंत्र्य देणे धोक्याचे असते, स्त्री ही पुरुषाला मोहात पाडणारी असते, अशी स्त्रीला कमी लेखणारी वचने आणि गुरुचरित्रात पतीला उलट उत्तर देणारी स्त्री पुढच्या जन्मी कुत्री होते, परपुरुषाकडे तिची नजर जरी गेली तर ती पुढच्या जन्मी डुक्करीण होते, स्त्रीचे जर घराबाहेर लक्ष गेले तर ती पुढच्या जन्मी घुबड होते, अशी पतिव्रतेची कर्तव्ये सांगून तिच्यावर पुरुषाच्या बंधनात राहण्यासाठी दिलेली वचने याचे गारुड आहे.
क्रमशः…
© श्री जगदीश काबरे
(लेखक विज्ञान प्रसारक आहेत.)
jetjagdish@gmail. com
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





