श्री जगदीश काबरे

☆ “लग्न आहे सहजीवन…” – भाग २ ☆ श्री जगदीश काबरे ☆

 (अशी पतिव्रतेची कर्तव्ये सांगून तिच्यावर पुरुषाच्या बंधनात राहण्यासाठी दिलेली वचने याचे गारुड आहे.)

हे बदलायचे असेल तर, स्त्रियांनी आई झाल्यावर अगदी लहानपणापासूनच आपल्या मुलांना वाढवतांना मुलगा/मुलगी असा भेद खेळणी देतांना वा घरातील कामे सांगण्यात करू नये. मुलांवर स्त्री ही एक व्यक्ती आहे, असे बिंबवून तिचा आदर करण्याचे संस्कार करायला हवेत. मुलींना मुलांसारखेच स्वसंरक्षणाचे बाळकडू पाजायला हवे. मुलांना ‘तू बायल्या सारखा का वागतो? हातात बांगड्या भरल्या आहेस का? मुलीसारखा मळूमुळू काय रडतोस? ‘ अशाप्रकारचे स्त्रीला कमी लेखणारे, दुय्यम समजणारे आणि भेदभाव कारणारे संस्कार करू नयेत. वयात येणाऱ्या मुलामुलींना योग्य शब्दात शास्त्रीय माहिती दिली तर मुले, मुलींकडे फक्त शारीरिक दृष्टीने बघणार नाहीत. शारीरिक बदल ही एक नैसर्गिक घटना आहे आहे असे समजुन एकमेकांकडे निकोप दृष्टीने पाहायला शिकतील. घरातील मुलींना त्यांच्या आवडीचे शिक्षण दिले पाहिजे. शिवाय त्यांना शारीरिक सामर्थ्य कमावण्यासाठी, स्वत:चे संरक्षण स्वत:ला करता यावे यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. शाळेमध्ये आठवडय़ातील काही तास मुलामुलींसाठी पाककलेचे दिले पाहिजेत. रोजच्या आहारातील खाद्यपदार्थ सर्व विद्यार्थ्यांना करता आलेच पाहिजेत. हा विषय सक्तीचा असावा. सायकल किंवा स्कूटर चालवणे, पोहणे ही कौशल्ये शाळेतच विकसित व्हावीत. त्यात मुलगा-मुलगी असा फरक केला जाऊ नये. मुलीचा व्यक्तिमत्त्व विकास झाला की तिला आपोआप समाज आदराने वागवेल. मुलाला लहानपणीच जर घरातील कामे करण्याची सवय लावली तर त्याची पुरुषी वर्चस्वाची मानसिकता आपोआप कमी होईल. अशाप्रकारे जर घरातच मुलामुलींना समान वागणूक देऊन वाढवले तर पुढच्या पिढीत बलात्काराचे प्रमाण नक्की कमी होईल.

पण स्त्रीला उडण्यासाठी आकाश उपलब्ध करून दिलं गेलं तरी पक्षी म्हणून भरारी मारू देण्यापेक्षा पतंग बनवून त्याच्या दोऱ्या स्वत:च्या हातात ठेवण्याचा दुटप्पीपणा हे या पुरुषप्रधान समाजाचे वैशिष्ठ्यच जणू. असे पुरुष नेहमीच म्हणत असतात की, ’आमच्या घरात आम्ही स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं आहे बरं का! ’ नमूद करण्याची गोष्ट म्हणजे फक्त पुरुष हेच पुरुषप्रधान संस्कृतीचे घटक नसतात, तर या पुरुषप्रधान संस्कृतीला बळकट करणारा प्रत्येक घटक हा पुरुषप्रधानच असतो. म्हणूनच स्त्रियासुद्धा पुरुषप्रधान वृत्तीच्या असू शकतात. स्त्रियांचा लढा, त्यांचे प्रश्न याकडे केवळ स्त्रीवादी दृष्टिकोनातून न पाहता मानवतावादी दृष्टीने पाहिले तरच शोषण थांबून खरी समानता प्रस्थापित होईल. आज मात्र कळप-समूह-समाज ही आजवरची कालसंक्रमणा विसरून उलट दिशेने भूक आणि वासना या आदिम प्रेरणेपर्यंत आपण प्रवास करतो आहोत, असे सद्यस्थितीवरून वाटते. बाहेरच्या रावणाची भीती घालून स्त्रीसाठी परंपरेच्या लक्ष्मण रेषा आखल्या गेल्या. मातृत्वाचे गोडवे व अन्नपूर्णेचे वरदान यांच्या अवाजवी महतीने तिला चूल व मूल यामध्येच आजन्म कैद केले. संसाराच्या गाभाऱ्यात एकदा प्रतिष्ठापना झाली की तिने आयुष्यभर देवपण ‘सोसायचं’ हा दंडकच झाला. तिची देवता म्हणून पूजा करण्याऐवजी, माणूस म्हणून आदर केला तर तिच्या अस्तित्वाला खरा अर्थ येईल.

आपल्याकडे आदर्श पुरुष व आदर्श स्त्री यांच्या संकल्पना अगदी विरोधाभास दाखवणाऱ्या आहेत. ज्या पुरुषाकडे नेतृत्व कौशल्य आहे, आत्मविश्वास, धडाडी आहे तो आदर्श पुरुष व स्त्री मात्र खाली मान घालून जगणारी, वडीलधाऱ्यांचे ऐकणारी, कुटुंबासाठी खपणारी ती आदर्श. मुळात ही संकल्पनाच स्त्री-पुरुष समानतेला सुरुंग लावणारी आहे. म्हणून समाजाच्या मानसिकतेत बदल होणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत समानता प्रत्यक्षात येणे अवघड आहे. समानता म्हणजे दोघांनी एकमेकांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरणनिर्मितीचा प्रयत्न करणे व निर्भेळ सहजीवन अनुभवणे. प्रत्येक स्त्री-पुरुषाने असे करण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने समानता अस्तित्वात येईल.

पण आजपर्यंत स्त्रीमध्ये लख्खपणे दुय्यमत्वाची जाणीव रुजवण्यासाठी पुरुषसत्ताक पद्धतीने तिच्यावर कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक संस्कार लहानपणापासून असे केले आहेत की, त्यात परावलंबीत्वाची भावना, असहाय्यतेची भावना वाटूच नये. शारीरिक सौंदर्य, कपड्याचे महत्त्व यातच त्या गुंतून राहाव्यात आणि शारीरिक क्षमतेकडे, तिच्या बौद्धिक विकासाकडे जाणूनबुजून तिला दुर्लक्ष करण्यास भाग पाडावे. तसेच तिला फक्त लैंगिक देहधर्मात जखडून ठेवावे. अशाप्रकारे संस्कृती नामक सोन्याच्या पिंजऱ्यात स्त्रीला जखडून ठेवले आहे. त्यामुळे स्त्री अबला नसूनही तिला अबला बनवले गेले आहे. पुरुषांमध्ये रुजवले जाणारे स्वातंत्र्य, निर्णय क्षमता, तर्कनिष्ठता, आत्मविश्वास हे गुण स्त्रीमध्ये संस्काराच्या रूपाने कधी रुजवले जात नाहीत. त्या उलट प्रत्येक स्त्रीला स्वयंपाक करता आलाच पाहिजे. विणकाम, भरतकामात रस वाटलाच पाहिजे. मातृत्वाची ओढ तर अनिवार्यच आहे. त्यामुळे तिने घरकाम, स्वयंपाक, आलेगेले, नातेवाईक, सासू-सासरे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पतीदेव यांची सेवा, त्याग, प्रेम या गोष्टी अंगी बाणवल्या पाहिजेत, असे संस्कार केले जातात.

स्त्री-पुरुषांमधील नैसर्गिक फरकांना, शारीरिक, मानसिक क्षमतांना चुकीच्या पद्धतीने मांडून त्यांच्या सामाजिक स्तरामध्ये पुरुषी वृत्तीने दरी निर्माण केली आहे, हे लक्षात घेऊन २१ व्या शतकातील शिक्षित तरुणींनो, आता तरी पुरुषी मानसिकतेचा हा कावा लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी तुम्ही जिद्दीने उभ्या राहाल काय? लग्न, परावलंबन, मातृत्व, मुलांचे संगोपन, स्वयंपाकपाणी आणि घरकाम या स्त्रियांच्या गुलामगिरीच्या बेड्या आहेत, हे कधीतरी तुमच्या लक्षात येईल काय? ही कामे फक्त स्त्रियांचीच आहेत असे कोणी ठरवले, हा प्रश्न तुमच्या मनात का येत नाही? तेव्हा स्वतःमधील आंतरिक शक्ती ओळखून आपल्या मुलांमध्ये, स्त्री ही एक व्यक्ती आहे, तिलाही पुरुषासारखे मन असते, तीही पुरुषाएवढीच हरप्रकारे सक्षम आहे, असा स्त्री-पुरुष समानतेचा संस्कार रुजवून भावी पिढीतील पुरुषाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांना बदलण्यास भाग पाडाल काय? तसे झाले तर पुरुषही लग्न हा मालकी हक्काचा संस्कार नसून सहजीवनाचा सत्कार आहे हे लक्षात घेऊ लागतील.

 – समाप्त –

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments