सुश्री शीला पतकी
🌸 विविधा 🌸
☆ “शिक्षण क्षेत्रातील काही भयावह…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
चार दिवसांपूर्वीचे वर्तमानपत्रात एक बातमी वाचली… क्लासेस मध्ये घडलेली घटना… शिक्षक फळ्यावर लिहित आहेत म्हणजे ते पाठमोरे आहेत… इतक्यात एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यांचा गळा चिरून टाकला… वर्गात गोंधळ त्या मुलाला दवाखान्यात… तोपर्यंत त्याचा प्राण गेलेला…! इतकी कृरता इतक्या कमी वयाच्या मुलांमध्ये येथे कुठून?
मी या बातमीने खूपच अस्वस्थ झाले. किती भयानक घडायला लागलेल आहे आणि हे एक दिवशी घडणार याची मला खात्रीच होती. कारण मी जी नापास शाळा चालवत होते त्यामध्ये येणारी सगळी मुलं ही आगाऊ खोडकर त्रास देणारी कोणती शिस्त नसणारी बेफिकीर असत. त्यांना शिकण्याची इच्छाच नसते. आई-वडिलांनी शाळेत डांबलेली मुले. कित्येक शाळेतून शिक्षकांचे मला फोन नाही आलेत की या मुलाला घेऊ नका फार त्रासदायक मुलगा आहे पण मी चॅलेंज म्हणून अशी मुलं स्वीकारायची आणि त्यांच्या चांगले बदल घडवून आणत होते. काही मुले मुळतः चांगल्या घरातून आलेली होती संस्कारी होती पण ही जी बेफिकीर मुले होती त्यांच्या खोड्यांना सुद्धा मर्यादा होत्या. काहीतरी चांगलं दिलं तर ऐकण्याची वृत्ती होती. आजकाल तसे राहिले नाही साधारणपणे 19-20 सालची घटना असावी.. इंग्रजीचे शिक्षक फळ्यावर एक मोठं वाक्य लिहीत होते. म्हणजे साधारण एक 30-40 सेकंद ते वर्गाला पाठमोरे… इतक्यात एका मुलाने समोरच्या मुलाचे डोळे बंद केले… दुसऱ्याने तोंड दाबले आणि दोघांनी त्याला बेदम मारले. हे अवघ्या काही सेकंदात घडले. शाळा सुरू झाल्यानंतर ची घटना… मुख्याध्यापकांचा मला फोन आला तातडीने मी घरातून शाळेत गेले. ज्याला मारलं होतं तो मुलगा खूप रडत होता त्याला मी जवळ घेतलं कुठे खूप लागलय का याची दखल घेतली पण सुदैवानं तोही दणकट असल्याने फारसा परिणाम झाला नव्हता. पण मी मात्र हाबकून गेले. मन विचार करायला लागले ह्या मुलाला जर काही झालं असतं तर…! हा सगळा जिवानिशीचा खेळ आहे… दिवसेंदिवस मुलं वाईट व्हायला लागलेत. एके दिवशी एका मुलाने दोन कबूतरच विकत आणली आणि ती शाळेत ठेवली शाळेच्या आवारा बाहेर पार्किंग मध्येएका खोक्यात.. त्यातून आवाज आल्यामुळे सगळ्याकडे हलकल्लोळ की आत नेमकं काय.. मग ती ज्याचे कबूतर होते त्याने मान्य केले की आपणच तो बॉक्स तिथे ठेवलाय आणि कबूतर हे प्रकरण काय आहे… तर काही ग्रामीण भागातील मुले अशी कबुतरे पकडून आणून विद्यार्थ्यांना विकतात त्याचे पैसे पूर्ण झाले नाही की मग बाहेर मारामाऱ्या होतात हे सगळे मोठे रॅकेटच होते त्यापैकी एका विद्यार्थ्याला ठार मारल्याचे ही मी वर्तमानपत्रात वाचले होते. अर्थात ही अन्य ठिकाणी घडलेली घटना होती… त्यानंतर वर्गात बसल्या बसल्या पटकन शेजारच्या मुलीचा हात पकडायचा नको त्या गोष्टी करायच्या आणि मित्राने त्याचा फोटो काढायचा हे तर अजूनच भयानक होतं… माझ्या कल्पनाशक्ती पलीकडचे सगळे खेळ चालले होते… त्या दिवशी ठरवलं ही शाळा आणि हा उपक्रम बंद करायचा कोणाचातरी भलं करायला जाण्यासाठी इतकी मोठी रिस्क आपण आपल्या आयुष्यात पत्करायची नाही. त्यानंतर कोविड मुळे हे काम आपोआपच बंद पडले मुलं नापास होण्यास बंद झाले आता ह्या अधोगतीला सुरुवात कुठून झाली पहा!
अनेक वर्षांपूर्वी पहिली ते चौथीपर्यंत कोणालाही नापास करायचे नाही असा शासनाचा नियम निघाला. शाळातून फतवा गेला आणि मग सुरू झाली अभ्यासाच्या अधोगतीला…! नापास होणार नाही म्हणल्यावर पालकांचे लक्ष कमी शिक्षकही तितक्या चांगल्या पद्धतीने काम करेनात कारण सगळे शेवटी रिझल्ट ओरिएंटेड असतं ना तो काय लागणार आहे नक्कीच माहीत होते त्यामुळे मेहनत करण्याची काही गरज भासली नाही. पालक निवांत… शिक्षक निवांत.. त्यामुळे विद्यार्थी बेदरकार बनत चालले. त्यापेक्षा चांगला शब्द होईल बेलगाम बनत चालले. चौथीतून आलेला गाळ वरती शिकवताना म्हणजे पाचवीच्या शिक्षकाला फारच त्रासदायक होऊ लागला. कारण त्याला लिहिता वाचताच येत नव्हते… लिहिता वाचता न येण्याची सुरुवात येथे झाली मग आम्ही वरती म्हणजे हायस्कूलला असे विद्यार्थी वेगळे करून तुकडी वेगळी केली आणि त्याच्यावरती वर्षभर विशेष प्रयत्नाने लिहा वाचायला शिकवायचे असे ठरले… पण तरी पाचवीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे होते ना त्यामुळे तिथे यथातथाच काम झाले. राजकीय लोकांना शिक्षणाने शहाणे झालेले लोक नकोच होते. त्यामुळे आठवीपर्यंत कोणालाही नापास करायचे नाही हा नियम निघाला. चौथीपर्यंतचे वाटोळे झाले होते आता आठवीपर्यंत झाले!
अभ्यासाची भीती नाही अभ्यासक्रम शिकवण्याचे वेगळेपण नाही सगळे निवांत झाले सरकारी काही कामात आठवीपर्यंतचे शिक्षण कंपल्सरी झाले माझ्या नापास शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला येणार्यांची संख्या वाढली शाळेत येऊ शकत नाही पण परीक्षाला 17 नंबर फॉर्म भरून बसतो असे सांगणारे खूप लोक येऊ लागले कारण गाडीचे लायसन रिक्षाचं लायसन अन्य काही ठिकाणी किमान आठवी पास पाहिजे हा नियम निघाला आता तुम्ही शाळेत आला नाही तर पास कसे होणार? त्यावर त्यांचे उत्तर काय तर… दहावी नापास झाल्याचे सर्टिफिकेट आहे म्हणजे आठवी पास आहेच की त्यामुळे आम्हाला लायसन मिळण्यास कोणती अडचण येत नाही. मी डोक्याला हात च लावून घेतला…! काही कर्ज मिळण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ लागला… हे सर्व गणित ग्रामीण भागातल्या शाळांवर असतं कारण ही सगळी तयारी ग्रामपंचायत पासून असते… मला आठवते मध्यंतरी आमदारकीला उभं राहण्यासाठी दहावी पास ची आवश्यकता होती आणि सोलापुरातील एक आमदार एका ग्रामीण सेंटरला जाऊन बसून पास झाले होते. शिक्षणाक्षेत्रातल्या या घडामोडी आणि बदल या घटना राजकीय क्षेत्राशी निगडित असतात. त्यामुळे आठवीपर्यंतची मजल पुढे सरकत सरकत… नववीला नापास होणाऱ्यांची पुनर्परीक्षा घ्यावी असे ठरले. म्हणजे त्यांना लगेच दुसऱ्यांदा संधी द्यायची महिनाभर त्यांचे वर्ग घ्यायचे. आता मला सांगा उन्हाळ्याची सुट्टी सोडून यांचे वर्ग कोण शिक्षक घेत बसतो? त्यामुळे नववीत हजर असणारे सर्व उत्तीर्ण घोषित होऊ लागले…! आता यांना रोखणारा एकच वर्ग उरला तो म्हणजे इयत्ता दहावी ची बोर्ड परीक्षा ती तरी त्याचं खरं परीक्षण करेल असं वाटलं होतं… पण बोर्डाने शंभर मार्काच्या पेपरच्या ऐवजी 80 चा पेपर आणि 20 मार्क तोंडी परीक्षा किंवा इतर काम याला द्यायला सुरुवात केली… शाळा कशाला त्याला कमी देतायेत वीस पैकी 20! मग पास होण्यासाठी उरले फक्त पंधरा मार्क ते तर पहिल्या गाळलेल्या जागा जोड्या लावा यात सहज मिळून जायचे आणि बोर्डाचा रिझल्ट लागला 98% दोन टक्के…! अनुपस्थित विद्यार्थी नापास म्हणजे तळापासून वर पर्यंत विद्यार्थ्यांचा पायाच उखडून टाकण्यात आला. त्यामुळे वाचायला न येणारे विद्यार्थी लिहायला न येणारे विद्यार्थी तुम्हाला आढळतील आणि मग सामान्य माणसं म्हणत राहतात दहावी झालाय पण वाचता सुद्धा येत नाही हे कसले शिक्षण…? काहीच शिकवत नाहीत शिक्षक…! सरकारी नियमच असे आहेत… फक्त दहा वर्षाची हजेरी लावा आणि सर्टिफिकेट घेऊन जा… पालकांनाही वाटत नाहीये की आपल्या मुलाला काही आले पाहिजे. आता जे पालक सुज्ञ आहेत त्याला मुलाचे खऱ्या अर्थाने भवितव्य घडवायचे आहे ते मात्र जाणीवपूर्वक त्या मुलावर काम करतात आणि ती मुलं हुशार निघतात शिक्षणात पुढे जातात.
माझ्या शाळेतल्या मुलांचे रेकॉर्ड आहे बरेचसेच विद्यार्थी हे कॉन्टॅक्टर् झालेले आहेत ठेकेदार झालेले आहेत मुकादम झालेले आहेत सरकारी क्षेत्रातली टेंडर यांच्या नावे फुटतात यातील काही राजकीय नेतेही झाले आहेत व्यावसायिक झाले आहेत अर्थात काही उत्तम नोकरदार व्यावसायिक सुद्धा झालेले आहेत पुढील शिक्षण नाही म्हणून त्यांचे काही अडले नाही… शिक्षणाने माणूस घडतो का? हा प्रश्न मला पुन्हा नव्याने पडू लागला… अर्थात त्याचे उत्तर माझ्यासारख्या विवेकी माणसाला मिळाले…! कारण तुम्ही कितीही मोठे झालात तरी शिक्षणाबरोबर मिळणारे ज्ञान आणि संस्कार यांनी तुम्ही खरे माणूस होता अर्थात ते योग्य दिले गेले असतील तर…! यासाठी शिक्षणाचा जो त्रिकोण सांगितला आहे पालक शिक्षक आणि विद्यार्थी त्या त्रिकोणामध्ये काम होण्याची गरज आहे. विद्यार्थ्याला शिक्षणाची लालसा पाहिजे… पालकांना वेळ काढून लक्ष देण्याची गरज आहे… आणि शिक्षकाला शिकवण्याविषयी आस्था हवी… हे तिन्ही घटकात कमी असल्यामुळे शैक्षणिक मूल्यांचा ऱ्हास होत चालला आहे. गुंड प्रवृत्तीची… खलनायकी वृत्तीची.. मुले तयार होत आहेत. आणि त्यामुळे समाजामध्ये गुंडगिरी बलात्कार खून मारामाऱ्या ह्या गोष्टी वाढल्या आहेत. यामध्ये समाजाचेही काम आहे सरकारचे हे काम आहे की आपण येणाऱ्या पिढीसमोर काय आदर्श ठेवतोय सरकार गुंडांना पाठीशी घालत असेल सत्तेत येण्यासाठी ठाऊक असलेल्या गुंडानाही प्रवेश देत असेल.. मूल्यावरची गणिते सोडुन आकड्यावरची गणिते मांडत असेल… तुरुंगातून सुटून आलेल्या गुंडांच्या मिरवणुका निघत असतील.. हार तुरे यांनी त्यांचे स्वागत होत असेल आणि आम्ही निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या शेजारी ते सन्मानाने बसताना दिसत असतील तर समाजातील आज निरागस असलेल्या मुलाने घ्यावे तरी काय सगळेच विचाराच्या पलीकडे चालले आहे!!! अर्थात सगळे संपले आहे असे कधी होत नाही भारतीय संस्कृतीत तरी नाहीच नाही… अजूनही काही दिलासादायक उदाहरणे आहेत तीच या देशाला तारतील आणि आमच्या अस्वस्थ मनाला दिलासा देतील अशी सद्भावना व्यक्त करण्यापलीकडे आपण तरी आता काय करू शकतो…? यासाठी समाजातील अनेक घटक ही जबाबदार आहेत सामाजिक परिस्थिती चित्रपट मोबाईल सोशल मीडिया पण या इतक्या सगळ्या घटकांवर एका लेखात लिहिणे शक्य नाही त्यामुळे फक्त पायाभूत गोष्टी मांडल्या आहेत.
© सुश्री शीला पतकी
निवृत्त मुख्याध्यापिका सेवा सदन प्रशाला आणि संचालिका नापास शाळा सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





