श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘हे, ही, हाय, हॅलो, नमस्ते, रामराम! अभिवादन – प्रतिअभिवादनाचे शिष्टाचार’ ☆ श्री दिवाकर बुरसे

🌼

प्रस्तावना:

दिवसभरात प्रथम भेटल्यावर परस्परांना अभिवादन – प्रति अभिवादन करण्याची पद्धत जगभरच्या सर्व देशात, धर्मात, मानवी समूहात, संस्कृतीत गेल्या सहस्रावधी वर्षांपासून पाळली जाते. देश- काल-धर्म – संस्कृतीपरत्वे अभिवादनाच्या रीति -प्रथा – पद्धती- संकेत भिन भिन्न असले तरी त्यामागीत मानवी भावना, शिष्टाचाराच्या संकल्पना सारख्याच आहेत.

अभिवादन म्हणजे आदर, सन्मान, स्नेह व सौहार्द्र व्यक्त करण्याची एक सुंदर पद्धत होय. मानव हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळे इतरांशी संपर्क साधताना नम्रतेने आणि आदराने वागणे आवश्यक असते. अभिवादन ही सौजन्याची पहिली पायरी आहे.  

अभिवादनाचे प्रकार विविध आहेत. काही लोक शब्दांनी अभिवादन करतात जसे, “नमस्ते”, “नमस्कार”, “ सुप्रभात”, “जय हिंद”, “रामराम” इत्यादी. काही लोक कृतीने अभिवादन करतात, जसे हात जोडणे, वाकून नमस्कार करणे, चरणस्पर्ष करणे, हस्तांदोलन करणे, आलिंगन देणे इ.

विविध धर्मांनुसारही अभिवादनाच्या पद्धती बदलतात, जसे, “सत् श्री अकाल”, “अस्सलामुअलैकुम”, “गॉड ब्लेस यू” इत्यादी. अलिकडे पाश्चात्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळे तरुण मंडळी “हे”, ” ही”, “हाय”, “हॅलो” अशा ‘ह’काराने एकमेकांना अभिवादन करताना दिसतात. तरीही भारतात ” नमस्ते” किंवा ” रामराम” हे सुटसुटीत अभिवादन अधिक लोकमान्य आहे.

अभिवादनाचे अनेक लाभ आहेत. यामुळे समाजात सौहार्द्र, प्रेम आणि आदर वाढतो. योग्य अभिवादनाने संभाषणाचा आरंभ चांगला होतो. त्यातून परस्परांतील स्नेहसंबंध दृढ होतात. यामुळे सामाजिक शिस्त राखली जाते, प्रसन्न आनंददायी वातावरण निर्माण होऊन पुढील संवाद ‘सुसंवाद’ होण्यास सहाय्य होते.

म्हणूनच, अभिवादन हा केवळ एक शिष्टाचार नसून, तो आपल्या संस्कृतीचा आणि सभ्यतेचा अभिन्न भाग आहे. प्रत्येकाने इतरांना भेटताना आदरपूर्वक अभिवादन करावे, हीच खरी सामाजिक सौजन्याची खूण आहे.

आपली प्राचिन भारतीय संस्कृती विनय, नम्रता आणि अनुशासन यांवर आधारलेली आहे. या संस्कृतीत अभिवादन म्हणजे केवळ एक सौजन्याचा संकेत नसून ते एक धार्मिक आणि नैतिक कर्तव्य मानले जाते. मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, रामायण, महाभारत यासारख्या धर्मशास्त्रग्रंथात अभिवादन कसे करावे, कोणाला करावे त्याचे प्रत्युत्तर कसे द्यावे, याचे सविस्तर मार्गदर्शन शास्त्रकारांनी केलेले आहे.

अगदी बालपणापासून घरात, गुरुकुलात ते मुलांना शिकविले जाई. सार्वजनिक जीवनात त्याचे काटेकोर पालन केले जाई. अशा प्रकारे अभिवादन आणि त्याला दिले जाणारे प्रत्युत्तर ही दोन्ही आचरणे भारतीय संस्कृतीत धर्माचे अविभाज्य घटक आहेत.

अभिवादनाचे महत्त्व – विनयातून धर्म

अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः।

चत्वारि तस्य वर्धन्ते – आयुर्विद्या यशो बलम्॥

(मनुस्मृती २. १२१)

या श्लोकात मनुमहाराज सांगतात की, विनम्र अभिवादन करणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य, विद्या, कीर्ती आणि बळ (सतत) वाढत रहाते. केवळ वयानेच नव्हे, तर विद्या, शील, आणि आचरणाने श्रेष्ठ असलेल्या व्यक्तींना अभिवादन करणे हे धर्माचे पालन आहे.  

कोणाला, कसे अभिवादन करावे?

जात्या वृद्धं गुरुं विद्या-वयो-शील-सम्भवम्।

अभिवादयितव्यं स्यात् पञ्चत्यागं न वै द्विजः॥

(मनुस्मृती २. १२२)

यात पाच प्रकार सांगितले आहेत. जन्म, वय, विद्या, शील, आणि गुरुस्थान. या पाचही गोष्टींचा विचार करून पात्र व्यक्तींना अभिवादन केले पाहिजे. केवळ वय हा एकमेव निकष नाही, तर आचार, विचार व ज्ञान देखील तितकेच महत्त्वाचे आहेत.

प्रतिअभिवादन करण्याचे शिष्टाचार

अभिवादन हे एक द्विपक्षीय सामाजिक धर्मकर्म आहे. ज्याप्रमाणे विनम्रपणे अभिवादन करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे त्याला योग्य, प्रेमपूर्वक आणि योग्य पद्धतीने उत्तर देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

प्रत्युत्थानं अभिवादनं सत्क्रियां चानुवर्त्तनम्।

एतान्येवाश्रमाणां स्यात् कृत्यं शुद्धिं च सर्वतः॥

(मनुस्मृती २. १२७)

यामध्ये चार आचरणे सांगितली आहेत:-

१) प्रत्युत्थानम्– उठून प्रतिसाद देणे

२) अभिवादनम् – शब्दांतून नम्र प्रतिसाद

३) सत्क्रिया – सन्मानपूर्वक प्रतिसाद

४) अनुवर्तनम् – आदराने त्या व्यक्तीच्या इच्छेप्रमाणे वागणे 

प्रति अभिवादन करताना योजायचे वाक्यप्रयोग

प्रकार उत्तर

१) ब्रह्मचारी/शिष्य:- “आयुष्मान भव”, “दीर्घायुषी भव”

२) विद्यार्जन करणारा:-     “यशस्वी भव”, “विद्यावान भव”

३) कनिष्ठ/स्नेही:- “शुभं भवतु”, “मंगलं भवतु”, “शिवं कुरु”

४) सामान्य प्रसंग:- प्रसन्न हास्य, सूक्ष्म संकेत, डोळ्यांनी स्नेह प्रकट करणे.  

प्रत्युत्तर देताना वाणी मधुर, प्रसन्न आणि प्रेमळ असावी. अभिवादन – प्रतिअभिवादन हा केवळ शिष्टाचार नाही तर मानवी संबंध सुधारण्याचे ते आद्य आणि अत्यंत महत्वाचे माध्यम आहे.

प्रत्युत्तर न देणे हा दोष

जर कोणी अभिवादन केले आणि त्याला उत्तर दिले गेले नाही, तर ते अहंकाराचे लक्षण मानले जाते. स्मृती सांगतात की तुम्ही केलेल्या अभिवादनाचा स्विकार न करणाऱ्या आणि प्रतिअभिवादन न करणाऱ्या व्यक्तीला, ती व्यक्ती आशिष्ट आहे असे समजून, तिला भविष्यात कधीही अभिवादन करू नये. त्याचे असे आशिष्ट वर्तन नीति व धर्मशास्त्रविरुद्ध आहे. असे वर्तन नातेसंबंधांमध्ये ताण उत्पन्न करू शकते. मनुस्मृतीनुसार, अभिवादनाला प्रतिसाद न देणे हा शिष्टाचारभंग आहे.

विशेष परिस्थितीतील आचरण

जर कोणी ध्यान, पूजा, जप इ. करीत असेल, कोणी रुग्णशय्येवर असेल तर तो प्रतुतर देण्यास असमर्थ असतो. अशावेळी संकेताने किंवा मौनाने प्रतिसाद दिल्यास, तेही योग्य मानले जाते. उत्तर देण्यासाठी स्वच्छता, मानसिक प्रसन्नता आणि नम्रता आवश्यक आहे.  

उपसंहार

अभिवादन आणि त्याला दिले जाणारे उत्तर हे केवळ सामाजिक सौजन्य नसून धार्मिक, नैतिक व आध्यात्मिक उन्नतीचे साधन मानले आहे. या परंपरेतून आपल्याला संस्कार, विनय आणि नम्रता यांचे बाळकडू मिळते.

आजच्या तंत्रज्ञानयुगात जरी नमस्काराच्या, अभिवादनाच्या पद्धती बदलल्या असल्या, तरी त्यामागची भावना, आदर, आणि मानवतेचा गाभा सदासर्वकाळ तसाच जपणे हे आपले कर्तव्य आहे.

वरील विवेचनाच्या पार्श्वभूमीवर आपण घरात, समाजात, सोसायटीत, ऑफीसात, कार्यालयात, उत्सवात, स्नेहसंम्मेलनात कसे वागतो याचा प्रत्येकाने विचार करावा, आत्मपरीक्षण करावे 

शास्त्राने सांगितलेले शिष्टाचार, अभिवादन – प्रति अभिवादनाचे संकेत दुर्लक्षिणे, टाळणे, त्याविषयी निष्काळजीपणा दाखवणे अशा कळत न कळत घडणाऱ्या कृतीतून समाजासमोर आपली कशी प्रतिमा उभी ठाकते याचे आत्मनिरीक्षण प्रत्येकाने अवश्य करावे.

समाजाने आपल्याला ‘एक चांगली, सभ्य, सुसंस्कृत, सज्जन व्यक्ती’ म्हणून ओळखावे अशी अपेक्षा बाळगणाराने वरील अभिवादन – प्रतिअभिवादचे संकेत व शिष्टाचार अवश्य पाळावेत.

अंती येवढेच म्हणता येईल की,

नम्रता हीच खरी विद्वत्तेची ओळख आणि योग्य साद – प्रतिसाद हीच सज्जनता समजावी!

 🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted