सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ मंदोदरी – लेख क्र. १२ ☆ सौ. मंजिरी येडूरकर

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.) 

तेजस्वी चेहरा, भव्य स्वरूप, कुशल नेतृत्व पाहूनच माझे पिता मय दानवांनी माझा विवाह दशाननांशी संपन्न केला. पहिल्याच दृष्टी भेटीत मी मंत्रमुग्ध झाले होते आणि आपल्याला लंकेसारखं सासर मिळालं म्हणून खूप आनंदी होते. कां नाही होणार? मय श्रेष्ठ शिल्पी होते. त्यामुळे शिल्पकलेत लंका साऱ्या जगात प्रसिद्ध होती. तसेच मय दानवांना विमान रचना करता येत होती. त्यामुळे दशाननां जवळ विमान होते. सुषेणासारखा मंत्री होता. जो युद्धात मुर्च्छा आल्यास उपचार करणारा होता. औषधी वनस्पतींचे त्याला गुणधर्म माहीत होते व त्या मिळवण्याची ठिकाणे माहीत होती. श्रेष्ठ वृक्षायुर्वेद शास्त्री दरबारात होते. उत्तम रस्ते होते. नद्यांचे पाणी अडवून त्याचे व्यवस्थापन केले जात होते. नद्यांवर पूल बांधले होते. अशोक वाटिका नावाचे विशाल व सुंदर उद्यान होते. तशीच इतरही ठिकाणी उद्याने होती. अशी संपन्न लंका होती. त्याशिवाय वेद, पुराण, नीती, दर्शनशास्त्र, इंद्रजाल यात पारंगत, बुद्धिमान पती मला मिळाला होता. त्यांनी तर ब्रह्मदेव, महादेव यांच्याकडून निरनिराळ्या शक्ती प्राप्त करून घेतल्या होत्या. त्यांना तंत्रविद्याही माहीत होती. तुम्हाला माहित आहे? तांडव नृत्य हे देव क्रोधात असताना क्रोध शमविण्यासाठी करतात. पण दशाननांनी लिहिलेले स्तोत्र ऐकून महादेव म्हणाले आज पहिल्यांदा मी खूप आनंदी झालो आणि तांडव नृत्य केले. (म्हणूनच त्या स्तोत्राला शिवतांडव स्तोत्र म्हणतात) 

त्यांना खूप दुष्ट तरी कशी म्हणू? त्यांनीच लक्ष्मणाला नीतिशास्त्राचे धडे दिले. युद्धात लक्ष्मणाला मूर्च्छा आली तेव्हा सुषेणाला बोलावून घेऊन त्याच्यावर उपचार करवले. मला समजतच नाही जो माणूस घोर तपश्चर्या करून देवांना प्रसन्न करू शकतो, जो माणूस महादेवांची पूजा केल्याशिवाय पाण्याचा थेंबही घेत नाही. त्याला इतकी श्रद्धा इतकी भक्ती केल्यानंतर थोडा संयम, थोडी सत्यप्रियता, थोडा विवेक यायला हवा ना? क्रूरपणा, अहंकार थोडा कमी व्हायला हवा होता ना? एकाच शरीरात, नव्हे एकाच मनात दोन वेगवेगळ्या व्यक्ती कशा असू शकतात? एक देव आणि एक दानव! एक पित्याचा वारसा व दुसरा मातेचा वारसा! खरं म्हणजे पुलस्त्य ऋषींसारखे पितामह, विश्रवा‌ ऋषींसारखे पिता असा समृद्ध वारसा वरचढ ठरला असता व कैकसी मातेचा दानव वारसा दबला गेला असता तर जन्माने सुर होतेच व आपल्या बुद्धिमत्तेच्या, शौर्याच्या, कुशलतेच्या जोरावर त्रैलोक्याचा राजा झाले असते. पण आपल्या कर्माने असुरात गणले जाऊ लागले.

माझ्या बाबतीत उलटं होतं. माता अप्सरा हेमा होती तर पिता दैत्य कुळातील मयासुर, म्हणजेच मयदानव पण माझ्यात सौंदर्य, विद्वत्ता, विवेक, संयम, धर्मनिष्ठा, धैर्य, उदात्त विचार जन्मतःच होते. माझी माझ्या पतीवर खूप निष्ठा होती. मला प्रजेची काळजी होती. राज्यकारभारात मी कुशल होते. चांगल्या वाईटाची जाण होती. त्यामुळे एक पत्नीच नव्हे तर त्यांची कुशल सल्लागार होते. कर्तव्यनिष्ठ राणी होते. धर्म परायण स्त्री होते. मीच माझे कौतुक करते आहे असे नव्हे. सारेच म्हणायचे सौंदर्य असून शीलवती, शक्ती असून नम्रता असणारी व संकटे आली तरी संयम. विवेक व धर्म न सोडणारी राणी! पण म्हणतात नां विनासायास मिळालेल्या गोष्टींची कदर राहत नाही. तसं झालं होतं. त्यांच्या प्रत्येक चुकीच्या वर्तनाला मी नेहमीच विरोध केला होता. समजावून सांगत होते. पण अधर्मी वृत्ती भिनली की एरवी प्रजेच्या कल्याणाची सर्व कामे माझ्या सल्ल्याने करणारे इथे मात्र माझी एकही गोष्ट ऐकत नव्हते. सीता माऊलीचे अपहरण ही काय अपहरणाची पहिलीच गोष्ट नव्हती. अनेक युद्धे केली. अनेक राजांना अपमानित केले. त्यांच्या स्त्रिया, बहिणींना उचलून आणून आपल्या कैदेत ठेवले. अनेकांचे त्यामुळे शाप मिळाले. वास्तविक मी सीतामातेपेक्षा सुंदर होते. सीतामातेमध्ये असणारे दैवी गुण सोडले तर माझ्यातही पुष्कळ चांगले गुण होते. तरी यांना सीता मातेचा मोह का व्हावा?

पुरुषाचा अहंकार, जे जे काही सुंदर असेल, ज्या ज्या गोष्टी हव्या असतील त्या सर्व मिळवण्याचा अट्टाहास, सत्तेचा हव्यास यामध्ये माझ्यासारख्या किती स्त्रिया होरपळत असतील कोण जाणे! खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये या गोष्टी असाव्यात. कारण याच गोष्टी त्याला प्रगतीपथावर नेतात, पण सर्व गोष्टी मिळवण्यासाठी राजमार्ग असतो. त्याने जावं. हीन पातळी गाठून मिळवू पहाल तर त्याला महत्वकांक्षा म्हणत नाहीत, हव्यास, मुजोरी म्हणतात. सत्याने, धर्माने, न्यायाने जे मिळते तेच फक्त आपले असते आणि आपल्याजवळ कायम राहते. स्वतःचा विनाश स्वतःच्या हाताने करून दशाननांनी काय मिळवलं? स्वतःचं आयुष्य गमावलं, मुलांनी तर अजून आयुष्य अनुभवलच नव्हतं, त्यांना पणाला लावलं. आणि सगळे मला एकटीला सोडून गेले.

जेव्हा दशानन धारातीर्थी पडले त्यावेळी माझा राग अनावर झाला आणि मी अखेर त्यांना म्हटलं, “अनेक यज्ञांचा विध्वंस केलात, धर्म व्यवस्थेची छकले केलीत, देव, दानव, मनुष्य यांच्या मुलींचे अपहरण केलेत. या सर्व पापांमुळे आज तुमची ही अवस्था झाली आहे. ” माझा विलाप बघून, पती बरोबर अग्निप्रवेश करण्याची माझी इच्छा बघून श्रीराम तेथे आले. त्यांनी मला श्रीलंकेचा राजा विभीषण होतो आहे याची कल्पना दिली. मी श्रीलंकेच्या प्रजेची काळजी घ्यावी आणि लंकेला तिचं वैभव पुन्हा परत मिळवून द्यावं. यासाठी मी विभिषणाचा पती म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली. माझ्या मनातील शंका कुशंका पाहून त्यांनी सांगितले की विभिषण हे त्यांच्या पित्याप्रमाणे विद्वान, ऋषीतुल्य आहेत. या विवाहामुळे तुझ्या पातिव्रत्यात कोणतीही बाधा येणार नाही आणि एक आदर्श पतिव्रता म्हणून तू साऱ्या जगात आदरणीय राहशील. त्यामुळे नंतर माझी प्रजा हेच माझे अपत्य आणि त्याची काळजी, त्यांचा विकास हेच माझे ध्येय झाले.

आज आयुष्याकडे पाहताना एक गोष्ट जाणवते, शक्ती, सामर्थ्य, सौंदर्य याला काही मोल नाही जर विवेक, धर्माचा आधार नसेल तर! दशाननांची पत्नी म्हणून पतीबद्दल प्रेम, निष्ठा होती पण स्त्री म्हणून कायम मी धर्माची बाजू घेतली, सत्याची बाजू घेतली. माझे जीवन दुःखाने भरलेले होते पण माझे चारित्र्य हेच माझे वैभव होते.

– लेख क्र. १२.

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted