श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र २४ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
नास्त्येव तस्मिंस्तत्सुखसुखित्वम् ॥ २४ ॥
अर्थ : त्यात (जार प्रेमामध्ये व महात्म्यज्ञानावाचून होणार्या प्रेमामध्ये) प्रियतमाच्या प्रेमाने-सुखाने सुखी होणे हे नसते.
विवरण: काम व प्रेम यांतील भेद या सूत्राच्याद्वारे स्पष्ट केला जात आहे. कामामध्ये कामी स्त्री किंवा पुरुष स्वतःच्या सुखभोगाकडेच पाहत असतो. जारिणी जारापासून स्वतःला किंवा जार जारिणीपासून आपल्याला सुख व्हावे अशी इच्छा व प्रयत्न करीत असतो, व जोपावेतो ते सुख मिळत राहते तोपावेतोच अनुकूल संबंध राहतो. जर दुसर्याची सुख देण्याची शक्ती संपली किंवा प्रतिबंध आला तर परस्परांचा संबंधविच्छेद होतो, हे कामाचे स्वरूप आहे. पण प्रेमात स्वसुख-सुखित्वापेक्षा तत्सुख म्हणजे जो प्रेमविषय आहे त्याच्या सुखाने प्रेम करणारा सुखी होत असतो, किंवा स्वतःला सुखी समजत असतो. कामी पुरुष दुसर्याला भोग्य समजून स्वतःला भोक्ता समजतो. तसेच त्याचे प्रेम प्रेमविषयाच्या आत्म्यापेक्षा बाह्य स्वरूपावरच असते व त्या बाह्य विषयापासून ऐंद्रियिक सुखाचा भोग होत असतो. त्यासच तो श्रेष्ठत्व देतो. तो स्वतःला अंगी व ज्याच्यावर प्रेम करतो त्याला अंग समजतो. पण खरा प्रेमी स्वतःला अंग व प्रेमविषयाला अंगी समजत असतो; म्हणूनच त्याच्या ठिकाणी तत्सुखसुखित्व हे प्रेमाचे खरे लक्षण लागू पडते.
उद्धव गोकुळात श्रीकृष्णाचा निरोप घेऊन आला होता, त्याने तिथे काही दिवस वास्तव्य केले. परत जाताना त्यांना गोपींना विचारले की कृष्णाला काही निरोप आहे का?
त्यावर गोपी म्हणाल्या की कृष्णाला बोलावले आहे असे सांगा. कृष्ण इथे आला तर आम्हाला खूप आनंद होईल. पण इथे येण्यामुळे त्याला यत्किंचित ही त्रास होणार असेल तर तो जिथे आहे तिथेच सुखात राहू दे. आमच्यामुळे त्याला त्रास व्हावा असे आम्हाला स्वप्नात ही वाटणार नाही आणि आवडणारही नाही. आपल्या प्रियतम व्यक्तीला, आराध्य देवतेला जे आवडते ते करणे म्हणजे त्याच्यावर प्रेम करणे. अपेक्षा ठेवून जे केले जाते त्याला काम वासना (अर्थात इच्छा तृप्त करणे) असे म्हणता येईल.
राधा आणि कृष्णामधील एक काल्पनिक संवाद आहे. पण खरे प्रेम समजून घेण्यास तो पुरक आहे असे वाटते. कृष्ण राधेला भेटतो आणि जायला निघतो. राधा त्याला निघताना आडवत नाही. त्यावर कृष्ण म्हणतो तिला माझ्यावरील तुझे प्रेम अटल का? मी जातोय म्हणून तुला वाईट वाटत नाही. त्यावर राधा म्हणते तू चालला आहेस, अस तुला वाटतंय. कदाचित तू देहाने माझ्यापासून दूर जात असशील…..! पण तुला हे माहित नाही की मी तुला माझ्या मनात कायमच जपून ठेवलं आहे. प्रत्येक क्षणाला माझा तुझ्याशी संवाद चालू आहे, माझ्या प्रत्येक श्वासावर तुझ्या नामाची मुद्रा उमटत असते…..! मी जाणारा श्वास आणि आता येणारा श्वास एकच धून गात असतात….! त्यातून फक्त कृष्ण कृष्ण अशीच धून निर्माण होत असते……! अरे सावळ्या, तू कुठेही असलास, गेलास, तरी माझ्या मनातील तुझं स्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही…! जन्मभरीचे श्वास देऊन मी तुला खरेदी केलं आहे……! अशी भक्ति केली की देव भक्ताचा देणेकरी होतो, दासापुढे मान खाली घालून उभा रहातो, त्याच्या घरी श्रीखंड्या बनून पाणक्या होतो, मिरेचे विष पितो, सखूचे दळण दळतो, आवडीच्या पायातील काटा काढतो…… , काहीच नाही तर तो सोबत असल्याची अनुभूती देतो……!
*
गोपींनी अशी भक्ति केली…!
खरे प्रेम हेच सांगते…
मी नाही तूच…!!
*
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
नारद महाराज की जय!!!
– भक्ती सूत्रे क्र. २४.
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





