श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ चंचीत जपलेले मौल्यवान धन…  – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

जे कधीही प्राथमिक शाळेत सुद्धा गेले नाहीत साधी अक्षरओळख सुद्धा नाही पण ज्यांच्या नावाने विद्यापीठ आहे अशा दोन महान विभूती महाराष्ट्रात होऊन गेल्या.  त्या म्हणजे गाडगे बाबा आणि बहिणाबाई चौधरी.  गाडगे बाबा यांच्या नावाने अमरावती येथे विद्यापीठ आहे तर बहिणाबाई चौधरी यांच्या नावे जळगाव येथे विद्यापीठ आहे आणि कित्येक विद्यालयात आणि महाविद्यालयाच्या पाठ्यक्रमात बहिणाबाई यांच्या कविता शिकविल्या जातात आणि त्यांच्या साहित्यावर कित्येकांनी Ph D मिळविल्या आहेत.  

जळगाव जवळील एका खेड्यात त्यांचा जन्म झाला आणि त्या काळच्या परिस्थितीनुसार त्यांचे लग्न लवकरच म्हणजे त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी झाले.  त्यांना तीन मुले झाली पण वयाच्या ३० व्या वर्षी त्या विधवा झाल्या.  त्यांच्या ३ मुलांपैकी सोपानदेव चौधरी सुप्रसिद्ध कवी आहेत.  बहिणाबाई यांनी आयुष्यभर शेतात काम केले आणि काम करताकरता कविता रचल्या.  त्यातील फार थोड्या कविता आज उपलब्ध आहेत, त्या सोपानदेवांनी लिहून घेतल्यामुळे.  याबाबत सोपानदेव म्हणाले होते कि आई दिवसभर शेतात जाई आणि शेतात काम करता करता तिला कविता सुचत असत मग संध्याकाळी सर्वांची जेवणे झाली कि सोपानदेवांना..  त्या कविता सांगत त्या कविता सोपानदेव एका कागदावर लिहून ठेवत आणि तो कागद आईकडे देत आई तो कागद तिच्या कमरेला एक चंची असे त्यात ती ठेवून देत आणि ती चंची कागदाने भरली कि त्याच्या घरात जे आढे असे (आढे म्हणजे आडवे लाकूड असे ज्यावर छप्पर असते), त्या आढ्यावर खोचून ठेवीत. अशा अनेक चंची तिथे खोचून ठेवल्या होत्या.  मग सोपानदेव एम ए झाले आणि मुंबईला नोकरीला लागले ते सुद्धा कविता करत आणि त्या कविता त्यावेळी आचार्य अत्रे यांच्या ” दैनिक मराठा ” या दैनिकात प्रसिद्ध होत.  एक दिवस त्यांना मुबईला निरोप मिळाला कि घराच्या व शेतीच्या वाटण्या होणार आहेत तेव्हा तुम्ही गावी या.  तर ते गावाकडे आले.  गावचे पंच जमले होते आणि ते घराबाहेर खुर्च्या टाकून बसले होते.  सोपानदेव आल्यानंतर त्यांनी वाटणी करायला सुरवात करावी म्हणून त्यांच्या भावाने घरात जे काही असेल तर बाहेर आणायला सुरवात केली म्हणजे भांडी कुंडी वगैरे त्यात एक चंची होती तेव्हा सोपानदेव म्हणाले कि तेवढी चंची मला द्या मला बाकी काही नको.  पंचांना वाटले कि त्या चंचीत काही सोने वगैरे आहे काय? पण फक्त कागद निघाले ते सगळे जीर्ण झाले होते.  

मग ते ती चंची घेऊन मुंबईला आले आणि त्यांनी एका वहीत त्या कविता लिहून ठेवल्या आणि त्या कविता नेहमी त्यांच्याबरोबर त्यांच्या शबनम पिशवीत असत.

नेहमीप्रमाणे ते आचार्य अत्रे यांच्याकडे गेले पण ते “दैनिक मराठा” याचा अग्रलेख लिहीत होते म्हणून ते परत यायला निघाले वाटेत त्यांना आठवण झाली कि शबनम अत्रे यांच्या ऑफिस मध्येच राहिली आहे.  ती घेण्यासाठी म्हणून परत आले तेव्हा अत्रे त्या कविता वाचत होते आणि सोपानदेव आल्यानंतर त्यांना म्हणाले कि तुम्ही सोने लपवून ठेवले हा एक मोहरांचा हंडा आहे.  मग त्यांनी त्या प्रसिद्ध केल्या.  अत्रे यांनी बहिणाबाईंच्या कवितांवर दोन अग्रलेख दैनिक मराठ्यांत लिहिले.

सोपानदेव म्हणतात कि पाऊस आला की त्यांच्या आईला फार आनंद होत असे त्यात श्रावण महिना आला कि तिला आनंद होत असे.  सकाळी जात्यावर दळताना, तसेच धान्य पाखडताना, घरात केरवारे करताना ती स्वरचित कविता म्हणे 

तिला एकदा विचारले कि तुला कविता सुचते कशी?

तर तिने सांगितले…  

माझी माय सरस्वती, मला शिकविते बोली /

 एका बहिणीच्या मनी, किती गुपिते पेरली //

 अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी / (घरोटा म्हणजे जाते)

 तसे तसे माझे गाणे, पोटातून येते ओठी //

बहिणाबाईंना माहेरचे खूप प्रेम असे.  त्यांचेकडे नेहमी एक योगी येत असे.  नेहमी माहेर माहेर करणाऱ्या त्या बहिणाबाईंना पाहून तो योगी त्यांना म्हणाला – –

माझे माहेर माहेर, सदा गाणे तुझ्या ओठी 

 मग माहेरून आले मग सासरी कशापोटी //

तेव्हा बहिणाबाई उत्तर देते 

अरे ऎक हे रे योग्या, ऐक काय मी सांगते / 

 लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते //

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने तर बहिणाबाईंची गाणी हा त्यांच्या पाठ्यक्रम याचा भागच बनवला आहे.  माधुरी शानभाग यांनी ‘फ्रॅग्रन्स ऑफ द अर्थ’ या नावाने बहिणाबाई चौधरी यांच्या कविता इंग्रजीमध्ये भाषांतरित केल्या आहेत.  हे भाषांतरही बरेच प्रसिद्ध आहे.  त्यातील बऱ्याच कविता या लोकांना माहित आहेत.  त्यांच्या कवितांच्या ओळीचे वर्णन म्हणीत झाले आहे 

…  “अरे संसार संसार /जसा तवा चुल्ह्यावर /आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर /”

…  “मन वढाळ, वढाळ/ उभ्या पिकातलं ढोर /किती हाकला हाकला /फिरून येते पिकावर /”

…  “मन मोकाट मोकाट /याच्या ठाई ठाई वाटा /जश्या वाऱ्याने चालल्या /पाण्यावरच्या रे लाटा /”

 त्यांच्या कमी प्रसिद्ध असलेल्या (अर्थात माझ्या मते) कविता खालिलप्रमाणे –

बिना कपाशीने उले त्याला बोड म्हणू नई / (उले म्हणजे उलगडले)

हरिनामाविना बोले त्याले तोंड म्हणू नई /

 नही वाऱ्याने हलले त्याले पान म्हणू नई /

 नही ऐके हरिनाम त्याले कान म्हणू नई /

 पाटा विहिरीवाचून त्याले मळा म्हणू नई /

 नही देवाचे दर्शन त्याले डोळा म्हणू नई /

 निजविते भुक्यापोटी तिले रात म्हणू नई /

 आखडता दानासाठी त्याले हात म्हणू नई /

 नाही वळखला कान्हा तिले गाय म्हणू नई /

 जिते नही फुटे पान्हा तिले माय म्हणू नई /

 अरे, वाटच्या दोरीले कधी साप म्हणूं नई 

 इके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हणूं नई /

इमानाले इसरला त्याले नेक म्हणूं नई 

जल्मदात्याले भोवला त्याले लेक म्हणूं नई / 

*दुसरी कविता*

धरित्रीच्या कुशीमध्ये बियबियाणी निजली /

 वर पसरली माती जशी शाल पांघरली /

 बीज डरारे मातीत सर्व कोंब आले वर /

 गहिवरले शेत जस अंगावरती शहार /

ऊनवाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून /

प्रगटली दोन पान जशी हात ती जोडून /

 टाळ्या वाजविती पान दंग देवाच्या भजनी /

 जशी कार्टी करुणा होऊ दे रे आबादानी /

दिसामासा होय वाढ रोप झाली आता मोठी /

आला पिकाला बहर झाली शेतामध्ये दाटी /

 कशी वाऱ्याने डोलती दाणे आले गाडी गाडी /

 देव अजब गारुडी देव अजब गारुडी /

 

या महान कवियत्रीला विनम्र अभिवादन…  

┉❀꧁꧂❀┉

लेखक /लेखिका : अनामिक 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted