गौरी गाडेकर

 

? इंद्रधनुष्य ?

☆ पोशाख– माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : गौरी गाडेकर

त्या रात्री घरी आल्या आल्या शिवाने भागूला एवढंच सांगितलं, “मला राजांचा पोशाख घालायचा मान मिळालाय. “आषाढ महिना होता आणि पन्हाळगडाभोवती सिद्दी जौहरचा वेढा पडून चार महिने उलटले होते. गडाखालच्या नेबापूर गावात वेढ्याची झळ रोज पोहोचायची. बाजारात मीठ मिळेनासं झालं होतं, वाटा बंद झाल्या होत्या, आणि गडावर अडकलेल्या राजांचं पुढे काय होणार, या काळजीने गावातल्या चुली मंदावल्या होत्या. शिवा न्हावी होता. गडावरच्या माणसांची हजामत करायला तो लहानपणापासून वर जायचा यायचा. गडाच्या चोरवाटा त्याला अंधारातसुद्धा ठाऊक होत्या. राजे गडावर अडकल्यापासून तर त्याच्या गडाच्या वाऱ्या वाढल्याच होत्या.

भागूने चुलीवरची भाकरी उलटवत विचारलं,

“पोशाख? कसला पोशाख? “

“ते सांगायचं नाही. राजांचं काम आहे. तू नको काळजी करू. मला जेवायला वाढ, मग जायचंय परत. ”

तो जेवायला बसला. भागूला त्या रात्री तो नेहमीपेक्षा वेगळा वाटत राहिला. जेवण झाल्यावर त्याने अंगणातल्या पावसात हातपाय धुतले, आतल्या खोलीत जाऊन धुवून ठेवलेले कपडे घातले, आणि रोजची घोंगडी खुंटीवरून काढता काढता थांबला.

“राहू दे. पावसात भिजंल. “

मग तो झोपलेल्या पोरांजवळ गेला. बराच वेळ त्यांच्याकडे बघत उभा राहिला. धाकट्याच्या अंगावरचं पांघरूण त्याने सारखं केलं, आणि तो दाराकडे वळला. भागू दारापर्यंत आली.

“परत केव्हा याल? “

“काम झालं की. पोरं उठली की सांग, बाप राजांच्या कामाला गेलाय. “

“पाऊस लई आहे. जपून जावा. “

“भागू, ” दारातून बाहेर पडता पडता तो थांबला, “राजांचा पोशाख अंगावर चढला ना, की न्हावी राहत नाही माणूस. राजा होतो. आठवण ठेव. “

एवढं बोलून तो अंधारात दिसेनासा झाला. भागूला त्या वाक्याचा अर्थ तेव्हा कळला नाही. तो कळायला पुढचे दोन दिवस जावे लागले.

ती रात्र गावाने पावसाचा धुमाकूळ ऐकण्यात काढली. गुरुपौर्णिमेची रात्र होती, पण चंद्र ढगांआड होता आणि विजा गडावर कोसळत होत्या. पहाटेच्या सुमारास खालच्या वाटेने घोड्यांच्या टापा गेल्याचं कुणाकुणाला ऐकू आलं. सकाळी बातमी गावात उतरली आणि गाव हरखून गेलं. राजे निसटले. वेढ्यातून, पालखीत बसून, विशाळगडाकडे. सिद्दीच्या छावणीत धावपळ उडाली होती.

दुपारी दुसरी बातमी आली. सिद्दीच्या घोडेस्वारांनी एक पालखी पकडली होती आणि पालखीत राजे सापडले होते. गाव सुन्न झालं. पण संध्याकाळी तिसरी बातमी आली आणि गावाचा जीव भांड्यात पडला. पकडलेल्या पालखीतला राजा खोटा निघाला. खरे राजे केव्हाच पुढे निघून गेले होते. सिद्दीची माणसं एकमेकांची तोंडं बघत राहिली.

शिवा त्या दिवशी घरी आला नाही. गडाची वाट बंदच होती, म्हणून भागूने स्वतःची समजूत घातली. पण रात्री तिला झोप लागली नाही. दारातलं ते वाक्य परत परत आठवत होतं आणि छातीत धडधडत होतं. अंधारात देवाच्या कोनाड्याकडे बघून ती पुटपुटली, देवा, ते सोंग करणारा कुणी का असंना, त्याला वाचव.

गावात कुणीतरी हसून म्हणालं, कुणी केलं असंल रं हे सोंग? आणि भागूच्या हातातलं भांडं खाली पडलं.

तिला दारातलं वाक्य आठवलं. राजांचा पोशाख अंगावर चढला ना, की न्हावी राहत नाही माणूस. राजा होतो. आणि तिला स्वतःची रात्रीची प्रार्थनाही आठवली. ते सोंग करणारा कुणी का असंना. कुणी का असंना म्हणजे कोण? कुणाचा तरी धनी, कुणाचा तरी बाप.

चौथी बातमी यायला दुसरा दिवस उजाडावा लागला. पकडलेल्या खोट्या राजाला सिद्दी जौहरसमोर उभं केलं होतं. राजांना पाहिलेल्या फाजलखानाने जवळून बघताच ओळखलं, हा शिवाजी नाही. मग विचारपूस झाली आणि खरं बाहेर आलं. हा तर गडाखालचा हजामत करणारा न्हावी. सिद्दीने विचारलं, मरण समोर दिसत असताना हे सोंग का केलंस? आणि पोशाखातल्या शिवाने ताठ मानेने उत्तर दिलं होतं,

“माझ्या राजासाठी. आणि मरणाचं म्हणशील, तर शिवाजी म्हणून मरण्याचा मान पुन्हा कुणाला मिळणार? “

तलवार चालली तेव्हा म्हणे त्याच्या चेहऱ्यावरचं हसू तसंच होतं.

भागूने ती बातमी ऐकली आणि ती दारातून आत गेली. खुंटीवर त्याची घोंगडी तशीच होती. पावसात भिजंल म्हणून मागे ठेवलेली. तिने ती छातीशी धरली आणि त्या रात्री पहिल्यांदा ती रडली. गळ्यात हुंदका होता पण तोंडातून एकच वाक्य येत होतं. मान मिळालाय म्हणाला होता. मान मिळालाय म्हणाला होता.

त्याच सुमारास घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे खर्ची पडल्याची बातमीही आली. गाव म्हणालं, खिंडीत देशपांडे पडले आणि गडाखाली आपला शिवा.

पावसाळा सरला. तह झाला आणि वेढा उठला. आणि एके दिवशी नेबापूरच्या वेशीत राजगडाहून जासूद आला. शिवा काशीदच्या घराचा शोध घेत तो दारात उभा राहिला आणि म्हणाला,

“राजांनी बोलावलं आहे. सन्मानाने. पालखी धाडली आहे. “

भागू पोरांना घेऊन राजगडावर गेली. दरबार भरला होता. सरदार, कारभारी, मानकरी. एवढ्या मोठ्या माणसांसमोर भागू खाली मान घालून उभी होती आणि तिच्या हातात एक गाठोडं होतं. राजांनी तिला जवळ बोलावलं. इनामाचा कागद पुढे आला. जमीन आणि वर्षासन.

भागूने कागदाला हात लावला नाही.

“इनाम नगं महाराज. पोरं कष्टानं वाढवीन. एकच इचारायचं होतं.”

दरबार शांत झाला. राजांनी मान वर केली.

“त्या रात्री… पोशाख शोभला व्हता ना माझ्या धन्याला? “

क्षणभर कुणीच काही बोललं नाही. आणि मग सगळ्या दरबाराच्या देखत राजे बैठकीवरून उठले, खाली आले, आणि ज्या राजासमोर मोठमोठे सरदार मुजरा करून धन्य व्हायचे, तो राजा शिवा काशीदच्या विधवेसमोर मस्तक लववून उभा राहिला.

उत्तर मिळालं होतं. भागूने गाठोडं उघडलं. आत शिवाची घोंगडी होती.

“ही घ्या महाराज. माझ्या धन्याची. तुमचा पोशाख त्याने नेला, त्याची घोंगडी तुम्ही ठेवा. स्वराज्यात राहू दे ती. “

राजांनी ती घोंगडी दोन्ही हातांनी घेतली, आणि म्हणे पुढची कित्येक वर्षं ती राजगडावर राजांच्या शेजघरात होती.

 

माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक  संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted