संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ “Reverse Counting…“ ☆ संध्या बेडेकर ☆
काल ताई कडे गेले होते. काहीही कारण नसताना, हक्काने जाण्यासाठी माझे एकमेव ठिकाण म्हणजे, माझ्या ताईचे घर. फोन करायची गरज नाही, काहीही संकोच न करता जाता येते. खरंतर ही माझ्यासाठी एक जमेची बाजू आहे.
“Count your blessings. ”
असं कोणी म्हंटल तर त्यात हे एक प्रमुख ‘blessing’ आहे. formalities नाही. मन हलकं करायला, काही सल्ला घ्यायला, काहीही न लपवता, रडायला, हसायला एक तरी हक्काची जागा असावी ना, ती माझ्या जवळ आहे. आजच्या जगात तर ही खूप मोठी जमेची बाजू आहे. नाही तर अकडून, आखडून जगून जगून थकायला होत. काय बोलायचे?? काय नाही?? याचे गणित मांडता मांडता घाबरायला होत. तसंही म्हणतातच ” नातं टिकवण्यासाठी गणित विषय कच्चाच असलेला बरा “. बरे असो.
काल भाऊजी खूप खुश होते. मी विचारलं आज काय विशेष?? खूप आनंदात दिसताय. ‘Sensex’ ने सत्तर हजार पार केले म्हणून का?? आज किती हजारांचा फायदा झाला तुम्हाला?
भाऊजी म्हणाले, छे! ग!! आता ते सर्व मी काही करत नाही. आता दोनाचे चार करायला मी जात नाही. तसेच कोणाशी चार हात करायची पण आता हिम्मत नाही, म्हणण्यापेक्षा करायचे नाही. अशा कोणत्याही भानगडीत पडायचे नाही. हे मी ठरवलंय. वादविवादात पडायचेच नाही.
अग!! काल मला चालताना त्रास होत होता. आज सकाळी उठल्यावर अगदी व्यवस्थित चालता आले. आहे की नाही आनंदी रहायचे कारण. अग!! आता रोज सकाळी प्रत्त्येक अगांकडे लक्ष द्यावे लागते. इतके वर्ष यांच्या कडे लक्षच दिले नाही. सर्वांना गृहित धरले, आता चांगलाच बदला घेतायेत सगळे. मी पण काही कमी नाही. मी म्हणतो, या! या!! मैदानात मी काही घाबरत नाही कोणाला??
आजकाल आनंदाची परिभाषा बदलली आहे ग.!! आता फक्त “अन्न, वस्त्र, निवारा आणि वायफाय ” एवढं मिळाले तरी खूप.. याच आवश्यक गोष्टी झाल्या आहेत.
झोप छान लागली, कार छान चालवली. जूना मित्र भेटला, फिरायला गेल्यावर चार ओळखीची माणसे भेटली. की तो दिवस आनंदात जातो.
आता ‘ Reverse counting ‘ सुरू झाले आहे ना.. तेंव्हा आता आयुष्याची व्याख्याच बदलली. ‘Priorities’ बदलल्या.
लहानपणी ‘ Reverse counting’ शिकताना १००, ९९, ९८ असं मोजत असू, पण आयुष्याचे तसे नाही ना. कोणता नंबर/ वर्ष /महिना / दिवस/वेळ आहे??? तो शेवटचा नंबर/ क्षण माहीत नाही.
म्हणून रोजचा दिवस उगवला की, अरे व्वा!!
‘Thank you God’ असं मी म्हणतो. आजचा दिवस काही तरी विशेष (चांगले) करायला देवाने दिला आहे. असं मी समजतो.
काल सकाळी फिरायला गेलो, तर ‘धुक’ (fog) होत. समोरचे काही स्पष्ट दिसत नव्हते. रस्त्याच्या त्या end वर काय आहे??? ते तर अजिबात दिसत नव्हते. रस्ता कुठे संपतोय??? हेही कळत नव्हते. तेंव्हा एक एक पाऊल पुढे टाकत गेलो, हळूहळू पूढचे दिसत गेले व मी चालत राहिलो..
आज धुक्याने एक गोष्ट शिकवली. खूप पूढचे दिसत नाही ना, तर मग जास्त विचार न करता एकेक पाऊल पुढे टाकावे. आता मी फक्त रोजच्या दिवसाचे ‘ planning’ करतो.
आयुष्यात प्रत्येक फेज मधे आपले ‘planning ‘ वेगळे असते. आता पुस्तकाचा शेवटचा चॅप्टर वाचायचा राहिला आहे. गोष्टींचा शेवट कसा होतो??? याकडे लक्ष आहे. मी आजकाल तीच पुस्तके वाचतो, ज्याचा शेवट हिंदी सिनेमा सारखा चांगलाच होईल, याची खात्री असते मला. जे होणार असेल ते होईल. पण गोष्ट तरी छान, आनंदी वाचावी नाही का??
” विनाकारण उदास खूपदा झालोय. आता विनाकारण आनंदी रहायला शिकतोय. ”
मागच्या वर्षीचा अनुभव खूप काही शिकवून गेला ग!! .
म्हणतात ना.
अनुभवाची एक ठोकर चांगल्या चांगल्या माणसांना सरळ करते.
हे बरोबर असले तरी,
“कोशिश ऐसे करनी चाहिए कि, हारते हारते भी कब जीत जाओ पता ही ना चले ।”
काल अजय म्हणाला, बाबा सर्व गोष्टी ‘on line’ होतात. मग का बाहेर जाता तुम्ही??
मी म्हंटल, अरे!! मला व्यवस्थित चालता फिरता येत. आपली काम करता येतात. स्कूटर चालवता येते. एकदा हे सर्व करण सोडलं, तर मात्र मग पुन्हा करता येणार नाही. तेंव्हा जाऊ दे मला. चार लोक भेटतात. बोलणं होतं. संपर्क राहतो. अरे! शेवटी चार माणसांचे महत्व नाकारता येत नाही. ते चार नेहमीच गरजेचे /महत्वाचे. नाही का??
ताई म्हणाली, अग! आजकाल वेगळ्याच मोडमधे आहेत. आता सर्व ठिकाणी मला घेऊन जातात. काल बॅंकेत गेलो होतो.
परवा डॉक्टर कडे गेलो होतो. त्याला म्हणाले, डॉक्टर साहेब, रात्री बेरात्री काही त्रास झाला, तर वेळेवर घेण्यासाठी काही औषध असेल का?? .
म्हणजे ‘first aid’ म्हणतात ना ते, द्या. अहो!! आम्हाला औषधांचे काही कळत नाही. वेळ सांगून येत नाही. आणि वेळेवर आम्हाला काहीही सुचणार नाही. हे पण नक्की. आम्ही दोघेच घरी असतो म्हणून विचारले.
मला भाऊजींचे कौतुक वाटले. आश्चर्य ही वाटले. जूने भाऊजी आठवले. त्यांचा नोकरीचा रूबाब, दबदबा आठवला. कोणाला त्यांच्या समोर बोलायची हिम्मत नव्हती. ताईला ही व्हायची नाही. भीती युक्त आदर होता सर्वांना.
मागच्या वर्षी एका आजारानंतर खूप बदलले भाऊजी. शरीरातील सर्व गाठी तर विरघळून गेल्याच. मनातील अहंकाराची, नोकरी तील पोझिशन ची गाठ तर पार नाहीशी झाली. आता बासरी सारखे आतुन पोकळ झालेत. आता एक वेगळेच व्यक्तिमत्त्व दिसतंय.
दहा चांगल्या गोष्टी कितीही वाचा, ऐका त्या लवकर समजत नाही. पण एक कठीण वेळ / अनुभव/ ठोकर उदाहरणासहित सर्व समजावून देते. आपला चेहरा, विचार, वागणे सर्व पार बदलते.
म्हणतात ना,
” अकड़ और अभिमान एक मानसिक बिमारी है। जिसका इलाज कुदरत और समय जरूर करते हैं ।”
भाऊजी म्हणाले,
अग! “चालता चालता कधी तरी ठेच लागणारच, जगायचं म्हंटल तर दुःख हे असणारच. ठेच लागणार म्हणून चालण सोडायचे का?? दुःखात ही आनंद शोधायचा.
भाऊजी पूढे म्हणाले,
काल मी माझ्या पायांना विचारले,
” काय रे?? इतके वर्ष माझा भार उचलून, चालून चालून थकला का तुम्ही??
पाय म्हणाले,
छे! छे! अजिबात नाही.
तू फक्त मनाने थकू नकोस. थोडे बदल कर. जे आवडतं ते कर. आयुष्यभर ‘perfection’ च्या मागे धावत राहिलास. आता मोकळेपणाने बिनधास्त जग. आम्ही आहोतच.”
So, Enjoy everyday as last day of life.
“प्रत्येक दिवस उत्सव म्हणून साजरा करा. ”
“जीवन एक पेन की भांति हैं।इंक खत्म हो उससे पहले अपनी कहानी लिख लो ।
लोग क्या कहेंगे???? ये सोचना बंद करो ।”
© संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





