श्री विश्वास विष्णु देशपांडे

✈️ मी प्रवासी ✈️

☆ उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास… भाग- ३ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे

आज आमच्या प्रवासाचा तिसरा दिवस होता. सकाळी लवकरच जाग आली. पक्ष्यांचे कूजन सुरु होते. भीमताल येथील ही दुसरी आल्हाददायक पहाट आम्ही पाहत होतो. लवकरच आम्हाला सगळे आवरून चेक आउट करायचे होते आणि पुढील प्रवासासाठी निघायचे होते. भीमतालचे हे सौंदर्य, समोरचे रम्य भीमतालचे तळे, त्यातील आरसपानी पाण्यात पडलेले भोवतालच्या झाडांचे प्रतिबिंब, डोंगरातून वर येणारा सूर्य असे सकाळचे नयनरम्य दृश्य नेत्रात साठवून घेत होतो. पुन्हा इथे यायला मिळणार नव्हते. जमेल तेवढे फोटो घेतले. कधी कधी खूप फोटो घेण्यापेक्षा जे समोर दिसते आहे ते हृदयात साठवून घेणे महत्वाचे वाटते. ते तर करीतच होतो. आपला डोळा हा असा एक सुरेख कॅमेरा आहे की ज्याची बरोबरी कोणत्याच कॅमेऱ्याने होणार नाही. नजर जाईल तिथपर्यंतच दृश्य हा कॅमेरा सदैव जसंच्या तसं टिपत असतो. या कॅमेऱ्यात रोल सदैव टाकलेलाच असतो. त्याला ना बॅटरीची गरज असते, ना चार्जिंगची! तुमचं मन फ्रेश असलं तर समोरचं दृश्य तुम्हाला फ्रेश वाटतं. आपलं मन किंवा हृदय ही अशी एक जागा आहे की जिथलं स्टोरेज कधी फुल्ल होत नाही. लहानपणीपासूनचा आठवणींचा चित्रपट हवा तेव्हा उलगडत जातो.

मनसोक्त नाश्ता आटोपून आम्ही बसमध्ये बसलो. आज आम्ही कौसानी या निसर्गरम्य  ठिकाणी जाणार होतो. हा प्रवास साधारणपणे १३५ ते १४० किमीचा होता. पण डोंगरातील रस्त्यांचा विचार करता या प्रवासासाठी आम्हाला पाच ते सहा तास प्रवास करण्याची तयारी ठेवावी लागणार होती. पण डोंगरातील हा प्रवास तसा जाणवत नाही. भव्य हिमालय पर्वत, हिरवीगार वृक्षराजी आपली सदैव सोबत करत असते. वाटेत ५० ते ६० किमी वर असलेल्या मुक्तेश्वर या ठिकाणी आम्ही जाणार होतो. मुक्तेश्वर हे छोटंसं गाव पहाडात वसलेलं आहे. अत्यंत शांत आणि निसर्गरम्य वातावरणात. इथे एक प्राचीन भगवान शंकराचे मंदिर आहे. मुक्तेश्वर धाम म्हणून ते प्रसिद्ध आहे. हे मंदिर उंच पहाडावर आहे. ते ३५० वर्षांपूर्वीचं आहे. परंतु येथील शिवलिंग जवळपास साडेपाच हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. एका पौराणिक कथेनुसार भगवान शंकरानी इथे एका राक्षसाचा वध करून त्याला मुक्ती दिली होती. म्हणून हे मुक्ती धाम! असेही म्हटले जाते की पांडवांनी आपल्या अज्ञातवासात या मंदिराची स्थापना केली होती. या ठिकाणी भगवान शंकरांसोबत पार्वती, नंदी, गणपती, हनुमान, ब्रह्मा, विष्णू आदींच्या पण मूर्तींचे दर्शन घडते. पण हे दर्शन घेण्यासाठी आपल्याला जवळपास शंभर सव्वाशे पायऱ्या चढण्याची तयारी ठेवावी लागते. पण या पायऱ्या चढून एकदा वर पोहोचलो की आजूबाजूचे दृश्य पाहून मन प्रसन्न होते. श्रम नाहीसे होतात. येथून हिमालयाच्या अन्य शिखरांचे पण दर्शन घडते.

हे दर्शन आटोपून आम्ही पुढील प्रवासाला निघालो. वाटेत एका ठिकाणी थांबून भोजनाचा आस्वाद घेतला. संध्याकाळी कौसानी इथे पोहोचलो. कौसानी हे शांत आणि नितांत सुंदर असे हिल स्टेशन आहे. आपल्याला नैनिताल माहिती असते. पण त्यामानाने कौसानीची माहिती आपल्याला फारशी नसते. ज्याला शांत निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायचा आहे, त्याच्यासाठी हे उत्तम ठिकाण! हे ठिकाण सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या नयनरम्य देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आमचा मुक्काम सुमन रॉयल रिसॉर्ट या हॉटेलमध्ये होता. हे दुमजली हॉटेल आहे. भोवतालचा परिसर निसर्गरम्य आहे हे वेगळे सांगायला नकोच. रूम साध्याच पण स्वच्छ होत्या. सर्व व्यवस्था उत्तम होती. तेथील कर्मचाऱ्यांनी आम्हा सर्वांचे अतिशय प्रेमाने स्वागत केले. स्वागतासाठी फळांपासून बनवलेली दोन तीन प्रकारची सरबते हजर होती. रात्री इथे छान जेवण मिळाले.

आता प्रतीक्षा होती ती सकाळच्या नयनरम्य सूर्योदयाची. सकाळी सूर्योदय पाहण्यासाठी कोणत्या पॉइंटला जावे लागेल अशी चौकशी करता असे समजले की आम्ही हॉटेलच्या ज्या रूममध्ये थांबलो होतो, तिथल्याच मागील बाजूच्या गॅलरीतून आम्हाला सूर्योदय दिसणार होता. सकाळी पाच सव्वापाचलाच उजाडले. आम्ही सुद्धा लवकर उठून पाठीमागच्या गॅलरीत येऊन बसलो. समोर हिमालयाची भव्य शिखरे दिसत होती. मध्ये कोणताही अडथळा नव्हता. साधारण साडेपाचच्या सुमारास उगवतीच्या रंगानी पूर्व दिशा उजळली. डोंगराआडून सूर्यदेव वर येत होते. सगळीकडे सोनेरी प्रभा पसरली होती. समोर हिमालयातील त्रिशूल, नंदादेवी आदी बर्फाच्छादित पर्वतशिखरांचे दर्शन घडत होते. सूर्योदयाचे हे सुंदर दृश्य आम्ही हृदयात साठवून घेतले. जंगलात एक दोन दिवसांपूर्वी मोठा वणवा पेटला होता. त्याचा धूर आणि थोडे धुक्याचे साम्राज्य होते. त्यामुळे समोरची हिमशिखरे स्पष्टपणे दृष्टीपथात येत नव्हती. पण तरी जे काही पाहिले ते सुंदरच होते! समोर दिसणारी हिमालयाची रांग आणि नंदादेवी, त्रिशूल आदी शिखरे पहाटेच्या वेळी एखाद्या शांत, ध्यानस्थ योग्यासारखी वाटत होती.

सहलीचा आमचा आजचा चौथा दिवस होता. आज कौसानी येथील अन्य ठिकाणे पाहण्यासाठी आम्ही जाणार होतो. अंघोळी, नाश्ता वगैरे आटोपून आम्ही साधारण साडेआठ वाजता बसमध्ये बसलो. आता आम्ही बैजनाथ मंदिर समूहाकडे निघालो होतो. बैजनाथ ग्रुप ऑफ टेम्पल्स म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यात गोमती नदीच्या काठी हा मंदिर समूह आहे. ही मंदिरे १२ व्या शतकातील असून त्यांचे दगडी बांधकाम अत्यंत प्रेक्षणीय आहे. ही मंदिरे भगवान शंकरांना समर्पित आहेत. त्यासोबतच इथे माता पार्वती, गणेश, कुबेर, चंडिका आणि सूर्यदेव आदी १७ मंदिरे आहेत. संपूर्ण परिसर अतिशय प्रसन्न, शांत आणि निसर्गरम्य आहे. मंदिराजवळून वाहणाऱ्या गोमती नदीचे पात्र अतिशय स्वच्छ आहे. मंदिराच्या समोर बैजनाथ लेक आहे. या तळ्याच्या भोवती गर्द झाडी आहे. तळ्यामुळे इथला परिसर खूप सुंदर आणि देखणा वाटतो.

ही मंदिरे पाहून आम्ही आता तेथील चहाच्या मळ्याला भेट देण्यासाठी निघालो. एका उंच अशा टेकडीवर हा मळा आहे. इथे सशुल्क प्रवेश आहे. डोंगर उतारावर चहाची सुंदर लागवड केली आहे. हा चहाचा मळा पाहण्यासाठी थोडे चढावे लागते. उत्तराखंड हा मुलुखच डोंगराळ असल्याने प्रत्येक ठिकाणी आपल्याला चालण्याची किंवा चढण्याची तयारी ठेवावी लागते. या चहाच्या बागेत वर गेल्यानंतर आजूबाजूच्या पर्वतशिखरांचे सुंदर दृश्य नजरेत भरते. डोंगराच्या कुशीत वसलेली छोटी गावे दिसतात. त्या गावांकडे जाणाऱ्या नागमोडी वळणे घेणाऱ्या पायवाटा नजरेत भरतात. अगदी एखादे रेखीव चित्र पाहावे तशी ही गावे आणि पायवाटा भासतात. ‘ ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा… ‘ या गीताच्या ओळी हटकून आठवाव्यात असे हे दृश्य! चहाच्या रोपांचा एक अनामिक सुगंध वातावरणात दरवळत असतो. इथे विक्रीसाठी ग्रीन टी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आणि फ्लेवर्सच्या चहा पावडर्स उपलब्ध आहेत. शिवाय काही मसाल्याचे पदार्थ देखील विक्रीसाठी ठेवले आहेत.

हा चहाचा बाग पाहून आम्ही खाली उतरलो. रस्त्याच्या पलीकडल्या बाजूस काही शॉल फॅक्टरीज आणि त्यांचे आउटलेट्स आहेत. आमच्यातील काही पर्यटकांनी या ठिकाणी खरेदीचा आनंद घेतला. आता आम्हाला आमच्या हॉटेलवर जाऊन जेवण करायचे होते. पण आमच्या बसमध्ये काहीतरी बिघाड झाला होता. बऱ्याच खटपटीनंतर बस सुरु झाली. हॉटेलवर जाऊन आम्ही जेवण घेतले. थोडा वेळ विश्रांती घेतली. संध्याकाळी बरोबर पाच वाजता पुन्हा बसमध्ये बसलो. हॉटेलपासून अनासक्ती आश्रम अगदी जवळ आहे. पाच मिनिटातच आम्ही तिथे पोहोचलो. इथूनच सूर्यास्ताचे दृश्यही छान दिसते. गांधीजींच्या वास्तव्यामुळे हे ठिकाण प्रसिद्धीस आले. त्यामुळे गांधी आश्रम म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते.

गांधीजी १९२९ मध्ये इथे आले होते. इथले निसर्गसौंदर्य पाहून ते या ठिकाणाच्या प्रेमातच पडले. ‘ हे भारताचे स्वित्झर्लंड आहे ‘ असे उद्गार त्यांनी काढले. इथे ते दोन आठवडे राहिले. या ठिकाणी त्यांनी ‘ अनासक्ती योग ‘ या पुस्तकाचे लेखन केले. त्यांच्या जीवनातील छायाचित्रांचे एक छोटे प्रदर्शन, एक वाचनालय आणि ध्यान केंद्र इथे आहे. आश्रमाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. विविधरंगी गुलाबांचे ताटवे फुललेले आहेत. ते पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते. समोर हिमालयाची शिखरे आपल्या दर्शन देत असतातच. आता सूर्यास्ताची वेळ होत आली होती. मावळतीच्या रंगांनी पश्चिम दिशा आरक्त झाली होती. समोरील पर्वतशिखरांवरून सूर्यनारायणाचे दर्शन होत होते. आपले दिवसभराचे कामकाज आटोपून नारायण आता स्वगृही जाण्यासाठी निघाले होते. लवकरच ते दृष्टीआड होणार होते. उगवतीच्या रंगाएवढेच मावळतीचे रंगही छान होते. मी मनोमन त्या ‘ मावळत्या दिनकराला ‘ प्रणाम केला.

कौसानीच्या निसर्गसौंदर्याने आम्हाला भरभरून आनंद दिला होता. या सगळ्या आठवणी जपतच आम्ही हॉटेलवर परतलो. 

– क्रमशः भाग तिसरा

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted