मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “माझे वाचन” – लेखिका: शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

माझे वाचन खूप वेगवेगळ्या विषयांवर, पण फार विस्कळीत असते. माझ्या बेडसाईड टेबलवर एकाच वेळी चार ते पाच तरी वेगवगळ्या विषयांवरची आणि वेगवेगळ्या भाषांमधली पुस्तके असतात, आणि थोडे हे पुस्तक, थोडे ते पुस्तक असे चाखत माखत वाचन सुरु असते. फक्त मंदिर स्थापत्य, भारतीय वस्त्रकला आणि एकूणच कला हे तीन आवडीचे आणि अभ्यासाचे विषय सोडले तर माझे वाचन बरेचशे बेशिस्त, अघळपघळ आणि विस्कळीत आहे, बट समहाऊ, इट वर्क्स फॉर मी!

आता हेच बघा ना, शंकर रामाणींची कोकणी कविता मला थेट माझ्या बालपणीच्या गोव्यात घेऊन जाते. त्यांच्या प्रत्येक शब्दाला गोव्याच्या खाऱ्या वाऱ्याचा गंध आहे, तिथल्या तांबड्या मातीचा रंग आहे, तिथल्या जाई-सुरंगीचा परमळ आहे आणि तिथल्या आठवणींची आंबटगोड अमूरपिकी चव आहे. आता हीच, छोटीशीच कविता पहा ना,

खंयचो हो गांव?

पांचवेंचार सेम

अपरूपाचे ब्रह्म

चंवरता.

 

पालवली वात ;

फांतोडेची भूल

उजवाडाचो धुल्ल

म्हज्या दारां.

पहिल्या वाचनात ही कविता अगदीच साधी वाटते; पण थोडं थांबून विचार केला तर कळतं की रामाणी कुठली अध्यात्मिक जाणीव कवितेत जिवंत करू पाहतात.

‘खंयचो हो गांव? ’ हा प्रश्न साधा नाही, आपण कोण? कुठले? कुठे उभे आहोत? हे विचारणारा हा साधा पण अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. आयुष्याच्या ज्या वळणावर कवी उभा आहे, तिथे तो स्वतःलाच हा प्रश्न विचारतोय. पांचवेंचार सैम/अप्रूपाचे ब्रह्म ह्या ओळीत कवी आधीच्या प्रश्नाचे उत्तर देतो. सैम म्हणजे निसर्ग, जो स्वतःच जणू अप्रुपाचं ब्रह्म आहे. सगळं निसर्गचक्र एकमेकांत गुंफलेलं आहे. माती, पाणी, उजेड, वारा, आणि मानवी जीवन सारं एकाच धाग्यात ओवलेलं. समुद्राच्या पाण्यात अदृश्य रूपात मीठ असावं तसं हे ब्रह्मरूप आहे. म्हटलं तर हा साक्षात्कार सोपा आहे, पण जीवन इतकं सोपं, सरळ नसतं.

‘फांतोडेची भूल’ हा किती अचूक शब्द वापरलाय रामाणींनी. आयुष्यात किती तरी वेळा आपल्याला चकवा लागतो, पहाटेच्या धुक्यात पुढ्यात पुढ्यात रस्ता असूनही आपण कधी कधी चुकीच्या वाटा धरतो. ‘उजवाडाचो धुल्ल म्हज्या दारां’, म्हणजे प्रकाश आहे, पण तो स्वच्छ नाही. प्रकाशाचा धुरळा आहे. सत्य आपल्या पुढे आहे, पण ते स्पष्ट दिसत नाही. त्यासाठी नजर आधी स्वच्छ करावी लागते. मला रामाणींची कविता भाषेचं साधं सौंदर्य आणि तरीही त्या कवितेला व्यापून उरलेली एक प्रकारची अध्यात्मिक गूढता ह्यासाठी आवडते.

‘देखणा देहान्त जो’ हे वनिता पटवर्धन ह्यांचे पुस्तक सर्वांगाने मृत्यूविषयी भाष्य करते. जरा वेगळा विषय आहे, पण अध्यात्मिक, साहित्यिक, तात्त्विक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून घेतलेला मृत्यूचा धांडोळा वाचनीय आहे. तसेही कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला मृत्यू ह्या संकल्पनेबद्दल एक सुप्त आकर्षण असतेच.

नितीन वैद्य Neeteen Vaidya हे फेसबुकवरचे माझे एक आवडते लेखक. ते मुखत्वे पुस्तकांविषयी लिहितात. त्यांच्या वाचनात कमालीचे सातत्य आणि शिस्त आहे, जी बघूनच माझी छाती दडपून जाते. इतक्या शिस्तीने मी काहीच करू शकत नाही, पण ‘वाचून उरणारी पुस्तके’ हे त्यांचे त्यांच्या वाचनप्रवासाबद्दलचे पुस्तक खरोखरी छान आहे. ते म्हणतात तसे ‘पुस्तके तुम्हाला वेगवेगळ्या शक्यतांच्या तिठ्यावर आणून सोडतात’.

भैरप्पांचे सार्थ हे माझ्या अतीव आवडीचे पुस्तक. आठव्या शतकातल्या भारताचा प्रचंड भौगोलिक आणि सांस्कृतिक पट वाचकांपुढे उलगडणारे हे पुस्तक मी कितीही वेळा वाचू शकते. आता एक दीर्घ लेख लिहिण्याच्या निमित्ताने कितव्यांदा तरी परत वाचून काढले. भैरप्पांच्याच जास्त लोकप्रिय असलेल्या आवरणचं प्रिक्वेल म्हणून प्रत्येकाने सार्थ वाचावं असं मला वाटतं. भारताच्या ऱ्हासकाळाची सुरवात सार्थ मध्ये नोंदली गेली आहे तर मध्य आवरण मध्ये.

ह्यातलं ‘आर्ट ऑफ स्पेंडिंग मनी’ हे पुस्तक इतर पुस्तकांहून वेगळं आहे. बचत, गुंतवणूक आणि खर्च ह्या तिन्ही संकल्पनांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणारं हे पुस्तक पैश्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देतं. जवळचा पैसा खर्च करणं म्हणजे फक्त नोटा मोजून एखादी वस्तू विकत घेणे नव्हे, तर आपण पैसे केव्हा, कसा आणि कशावर खर्च करतो ह्यातून आपलं व्यक्तिमत्व आणि आपल्या प्राथमिकता परिभाषित होतात हेच हे पुस्तक विविध उदाहरणे देऊन सांगतं. पैशाला नाकारायचं नाही, तुच्छ लेखायचं नाही पण त्याला आपल्या आयुष्याचा राजाही बनवायचं नाही हेच हे पुस्तक सांगतं. अनुभवांवर, शिक्षणावर, आरोग्यावर, नात्यांवर केलेला खर्च ही उधळपट्टी नसते, ती आपल्या आयुष्यात केलेली गुंतवणूक असते हा महत्त्वाचा धडा हे पुस्तक देतं.

ही सगळी पुस्तकं एकाच वेळी वाचताना मला असं जाणवत होतं ही पुस्तकं वेगवेगळी असली, तीन वेगवेगळ्या भाषांमधली असली तरी कुठेतरी ह्या सगळ्या पुस्तकांना जोडणारा एक अदृश्य धागा आहे, तो म्हणजे वाचक म्हणून माझा दृष्टिकोन. रामाणींच्या कवितेतला “खंयचो हो गांव? ” हा प्रश्न, भैरप्पांच्या लेखनातून उमटणारी इतिहासाची जाणीव, वनिता पटवर्धनांची मृत्यूकडे पाहण्याची शांत, थेट नजर, नितीन वैद्यांचे ठासून सांगणे की पुस्तके मित्र असतात, जगण्याला आधार देतात पण जगावं मात्र आपल्यालाच लागतं आणि मॉर्गन हौसेलची पैशाकडे बघण्याची प्रगल्भ समज हे सगळंच शेवटी वाचक म्हणून आपल्यालाच आपली ओळख नव्याने करून देतं.

वाचन शिस्तीत करता आलं तर आनंदच आहे, पण तसं ते नसलं तरी जिवंत असावं लागतं. थोडं असं, थोडं तसं, कधी विस्कळीत, कधी नेमकं, पण सतत आपल्याला घडवत राहणारं. जसं समुद्राच्या वाऱ्यात मीठ असतं, तसं या सगळ्या वाचनात वाचक म्हणून आपल्या अनुभवांचं, आठवणींचं आणि जाणिवांचं एक सूक्ष्म पण कायम राहणारं अस्तित्व असतं. आणि मग लक्षात येतं, शंकर रामाणी शोधत असलेलं ‘गांव’ हे बाहेर नसून, या सगळ्या शब्दांमध्ये, त्यातून मिळणाऱ्या अनुभूतींमध्ये, स्वतःच्या आतच कुठेतरी शांतपणे वसलेलं आहे.

लेखिका:शेफाली वैद्य

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments