दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ अहंकार…  ☆ दीपा नारायण पुजारी ☆

संस्कृत मध्ये अहं म्हणजे मी. अर्थात अहंकार म्हणजे मी पणा. मी करतो तेच बरोबर असा विचार जिथं येतो, तिथं त्या क्षणापासून मीपणा पोसला जाऊ लागतो.

जी व्यक्ती अशी अहंकारी असते ती, स्वतःच्या विचारांना मतांना जास्त महत्त्व देते. इतरांचं मत, विचार किंवा त्या गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन समजून घेऊ शकत नाही. अशी व्यक्ती दुसऱ्यांना कमी लेखू लागते. कोणालाही न जुमानता आपण करतो तेच बरोबर असं वाटू लागतं. समोरच्या व्यक्तीला किरकोळ मानून त्या व्यक्तीकडं, दुर्लक्ष करणं सुरू होतं. दुसऱ्यांच्या भावनांचा विचार न करण्याची वृत्ती हे एक या मागचं कारण आहे. स्वतः विषयी अभिमान वाटणं हे जसं नैसर्गिक, तशी अहंकार ही देखील नैसर्गिक भावना आहे. स्वतःच्या यशाचा अती गर्व, मी इतरांपेक्षा श्रेष्ठ कसा हे सांगण्याची धडपड या गोष्टीतून ही भावना वाढीस लागते. काही वेळा असुरक्षितता, सतत आपलंच कौतुक व्हावं ही अपेक्षा अशा गोष्टींमुळे ही भावना मोठी होते. कधी कधी संपत्ती, रूप, बुद्धिमत्ता याला कारणीभूत ठरतात; तर कधी नोकरीत, कुटुंबात अधिकारामुळे आलेला गर्व वाढीस लागतो, तट्ट फुगतो आणि अहंकाराच्या फुग्यात रूपांतरित होतो.

आपणच तेवढे हुशार आपल्याला कोणाची गरज नाही मी समर्थ आहे अशा धुंदीत ही माणसं वावरत असतात. स्वतःच्या नजरेत स्वतःला मोठे समजू लागतात. अचानक कधीतरी या माणसांची फजिती होते. कुणालाही न विचारता मोठे मोठे व्यवहार करताना फाजील आत्मविश्वासनं मोठे निर्णय घेतले जातात. हितचिंतकांना बेदखल केले जाते. परंतु हा निर्णय चुकीचा ठरला तर फजिती होऊ शकते मोठे संकट उडवू शकते.

गर्व किंवा अहंकार हा माणसाचा शत्रू आहे. अहंकाराने उद्ध्वस्त झालेल्या माणसांची अनेक उदाहरणं आहेत. अहंकार हा षड्रिपुंपैकी एक रिपू आहे. शक्ती, बुद्धी, संपत्ती, रूप याचा माणसाला अभिमान जरूर असावा पण त्या अभिमानाचं रूपांतर गर्वात किंवा अहंकारात होणार नाही याची काळजी घेणं जरुरीच आहे आणि महत्त्वाचं आहे.

अहंकार कमी करण्याचा प्रयत्न करत राहायला हवा. त्यासाठी अंगी नम्रता हा गुण बाणवायला पाहिजे. नेहमी नम्र राहायला हवं. इतरांचं ऐकून घ्यायला हवं. सतत शिकण्याची वृत्ती ठेवायला हवी. आपली चूक झाली असेल, तर ती मान्य ही करायला हवी. दुसऱ्यांचा वेगळा दृष्टिकोन समजून घेतला तर, आपलीही समज वाढते. अहंपणा कमी करण्यास ही गोष्ट उपयुक्त ठरते.

विजय माझाच होणार, मीच जिंकणार, माझंच बरोबर असा हेका धरू नये. प्रत्येक वादात मीच बरोबर असं होणार नाही. कधी कधी दुसरा जिंकू शकतो, तर कधी समोरच्याचं म्हणणं ऐकून वाट वाद मिटवणं जास्त फायदेशीर ठरतं. असे समोपचारानं वागणं जमलं तर अहंकार कमी होण्यास मदत होते.

“जै जगा धाकुटे होईजे | तै जवळीक माझी ||” असे ज्ञानोबा म्हणतात.

जगाला मी जितका लहान आहे असे वाटेल तितके जग माझ्या जवळ येईल. समाजात मिसळायला, लोकांना आपलंस करायला पाहिजे असेल, तर आपण आधी लहान व्हायला हवं. साधेपणा अंगात असेल तर लोक संपत्ती वाढते. लोकसंग्रह वाढतो. अहंकाराचा लवलेश जिथे नाही तिथे, आपुलकी वाढ वाढते. जवळीक वाढते, स्नेहभाव वाढतो हाच खरा ज्ञानजन्य निरहंकार होय.

शरीराची तसेच मनाची कामं प्रकृतीच्या नियंत्रणाखाली चालतात. पण अहंकाराच्या आधीन गेलेला माणूस स्वतःला सर्व गोष्टींचा कर्ता समजतो. असा माणूस स्वतःला दु:खाच्या खाईत लोटून देतो. हे दु:ख नको असेल तर, भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील हा श्लोक आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

 प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः।

अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते॥

© दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted