श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
नारद भक्ती सूत्र क्र. ३६
अव्यावृत भजनात् ॥ ३६ ॥
अर्थ : (ते भक्तिसाधन) अव्यावृत्त – अखंड भजनाने (सिद्ध होते.)
विवरण : मागील सूत्रात विषयत्याग व संगत्याग हे साधन सांगितले. आता या सूत्रात ती भक्ती सिद्ध होण्याचे ‘अव्यावृत भजन’ हे साधन सांगतात. भजन हे प्रसिद्ध साधन आहे. सर्वच भाविक कोणत्या ना कोणत्या प्रकारे भजन करीतच असतात. पण ते भजन अनन्यभक्ती निर्माण करीलच असे नाही.
भजन हे भक्तीचे महत्त्वाचे अंग आहे पण ते अव्यावृत-अखंड-झाले पाहिजे. भजनात खंड पडण्याची देहभोगप्रवृत्ती, विषयवासना, विकाराधीनता, अश्रद्धा इत्यादी अनेक कारणे असतात, ती दूर करून पूर्ण भावनेने ते भजन झाले पाहिजे.
आपल्याकडे खास करून भक्तिमार्गात अखंड अनुसंधानाचे महत्त्व सांगितले आहे. अखंडित नामस्मरण हा त्यातल्या त्यात सोपा मार्ग.
समर्थ आपल्या दासबोधाच्या चौथ्या दशकातील तिसऱ्या समासात याचे पुढील प्रमाणे वर्णन करतात.
*स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें । नामस्मरणें पावावें । समाधान ॥ २॥ नित्य नेम प्रातःकाळीं । माध्यानकाळीं सायंकाळीं । नामस्मरण सर्वकाळीं । करीत जावें ॥ ३॥ सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरूप असतां । नामस्मरणेंविण सर्वथा । राहोंच नये ॥ ४॥ हरुषकाळीं विषमकाळीं । पर्वकाळीं प्रस्तावकाळीं । विश्रांतिकाळीं निद्राकाळीं |नामस्मरण करावें ॥ ५॥ कोडें सांकडें संकट । नाना संसारखटपट । आवस्ता लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥ ६॥ चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां । नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥ ७|| संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती । नामस्मरणाची स्थिती । सांडूंच नये ॥ ८॥ वैभव सामर्थ्य आणी सत्ता । नाना पदार्थ चालतां ।उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥ ९॥ आधीं आवदसा मग दसा । अथवा दसेउपरी आवदसा । प्रसंग असो भलतैसा । परंतु नाम सोडूं नये ॥ १०॥”*
*इथे भजन याचा व्यापक अर्थ अभिप्रेत असावा. टाळ, मृदुंग घेऊन २४ तास कीर्तन करणे इतका प्राथमिक अर्थ इथे नक्कीच नसावा. अंतर्मनात सतत सद्गुरूंनी दिलेल्या नामाचे स्मरण होणे, आणि त्याची एक धून, एक नाद सतत मनात गुंजत रहाणे, बाहेरून कर्म करीत असताना जसा मनुष्य श्वासोश्वास करीतच असतो, त्याप्रमाणे हा नामाचा नाद गुंजत रहाणे म्हणजे अखंड भजन. *
अशा अखंड भजनानेच खरी प्रेमभक्ती उत्पन्न होते. ध्रुव-प्रल्हादादिकानी अव्यावृत भजनच केले. ‘भजनं-भक्ति. ‘ भजन म्हणजेच भक्ती असा भजन शब्दाचा अर्थ आहे. पण ‘तुका म्हणे नाम । मागे मागे धावे प्रेम ।’ असे श्रीतुकाराममहाराज म्हणतात. अंतःकरणात गुणकामनारहित परमप्रेम एकदम सहजासहजी उत्पन्न होणे कठीण आहे. ती भक्ती या अखंड भजनाने उत्पन्न होते ‘आई आई’ या नावाने हाका मारतामारताच बालकाच्या ठिकाणी मातृप्रेम वृद्धिंगत होत असते.
श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्था, जे भक्त विषयांना तिलांजली देऊन म्हणजे विषयांवर पाणी सोडून, सवासना विषयत्याग करून, यावत् प्रवृत्ती म्हणजे व्यवहाराचा निरोध करून मला अंतःकरणात साठवून माझ्या स्वरूपाचा भोग घेतात, त्यांचे माझ्या स्वरूपाचा कितीही भोग घेतला तरी समाधान होत नाही, ‘ जास्त काय, ‘भूक, तहान याचा त्यांना पत्ता नसतो. तेथे डोळे इत्यादी इंद्रियाकडे कोण पाहील? ‘ असा वरील ओव्याचा आशय आहे. व्यावृत म्हणजे तेथून परतणे. भजन करता करता कोणत्याही अन्य कारणाने भजनापासून परत न फिरणे.
श्रीभानुदासमहाराज सांगतात –
*”जैं आकाश वर पडों पाहे । ब्रह्मागोळ भंगा जाये । वडवानळ त्रिभुवन खाये । तरी तुझीच वाट पाहें गा विठोबा ॥०१॥ न करी आणिकांचा पांगिला । नामधारक तुझाचि अंकिला ॥०२॥ सप्त सागर एकवट होती । जैं हे विरुनी जाय क्षिती । पंचमहाभुतें प्रलय पावती । परि मी तुझाचि सांगातीं गा विठोबा ॥०३॥ भलतैसें वरपडों भारी । नाम न संडों टळों निर्धारी । जैसी पतिव्रता प्राणेश्वरी । विनवी भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा ॥०४॥”*
(अभंग क्रमांक ५७)
अशी असिधारा भक्ति करता आली तर भगवंत दूर नाही. माउली आपल्या हरिपाठात सांगतात,
*”तीर्थ व्रत नेम भावेंवीण सिद्धि|*
*वायाची उपाधि करिसी जना।।१।।*
*
*भावबळें आकळे येऱ्हवीं नाकळे।।*
*करतळीं आंवळे तैसा हरी।।२।।”*
*
जय जय रघुवीर समर्थ!!
– नारद भक्तीसूत्र ३६.
नारद महाराज की जय!!!
– क्रमशः लेख क्र. ३६
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






