प्रा.भारती जोगी
इंद्रधनुष्य
☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ७. ☆ प्रा.भारती जोगी ☆
तिनं एकवार बैठकीवर पाहिलं. ती चरकली. गोंधळली. बैठकीवर फक्त टाळ आणि चिपळ्या… बुवांशिवाय! तिला आठवले बुवांचे शब्द, ” आवले, ज्या दिवशी या टाळ-चिपळ्या माझ्या शरीरापासून वेगळ्या झालेल्या दिसतील, त्या दिवशी समज तुझा तुकाराम या जगात नाही “!
चरकली ती… टाहो फोडला… धनी… धनी… तिचा आकांत ऐकून विठ्ठलाच्या मूर्तीचा थरकाप झाला, पायाखालची वीट थरारली… इंद्रायणी क्षणभर वहायची थांबली!!
हो… हीच ती… टाहो फोडून कोसळलेली, मनानं ढासळलेली… तुकाराम महाराजांची द्वितीय पत्नी… जिजाबाई, जिला तुकोबा प्रेमाने आवली म्हणत!
… हीच ती आवली जिला तुकोबांनी कधीतरी मनाच्या तरल मनस्थितीत, ज्यात त्यांना वाटे… ” विठो तुझे माझे राज्य, नाही दुस-याचे काज”!… मग अशा वेळी त्यांनी एका अभंगात म्हंटले…
” स्त्री द्यावी गुणवंती, तरी तीते गुंते आशा,
म्हणून कर्कशा लावी पाठी”!
– – झालं… त्यानंतर सगळेच मग आवली कडे कर्कशा पत्नी म्हणूनच बघू लागले. आजही बघतात. पण त्याच तुकोबांनी अजून एका अभंगात म्हंटलंयं…
” तुका म्हणे शोधून पाह्य,
बायको नव-याची माय.
तिजविण विसावे नाही,
क्षणार्ध सुद्धा!
म्हणोनी संसार थोर! “
पण समाजधुरिणांनी, किर्तनकार, प्रवचनकार, सगळ्यांनीच आवलीवर ‘कर्कशा’… हे शिक्कामोर्तब केले ते केलेच! हाच शिक्का, हीच उमटवलेली मोहोर… पुसण्याचा हा प्रयत्न! तुकोबांच्या परमार्थ कार्य यज्ञात, आयुष्यभर… बोलंत-म्हणंत, त्याना जगरहाटी शिकवंत, लोकांपासून सावध रहाणं सांगंत, प्रापंचिक जबाबदा-यांची जाणीव देत… आणि स्वतः कोंड्याचा मांडा करून प्रपंच नेटका करण्याचा सतत प्रयत्न करंत… कधी पेटंत, कधी धुमसंत, तर कधी धगधगंत पण कुटुंब कबिल्यासाठी चेतती राहिलेली ही… समिधा!!!
पुण्याच्या गुळवे सावकाराची, खात्या-पित्या घरातली ९-१० वर्षांची लेक… जिजाई! लग्न होऊन तुकारामांच्या घरात येते आणि साखरे सारखी विरघळून जाते त्यांच्या संसारात. द्वितीय पत्नी म्हणून आलेली असूनही, सवतीवर… रखुमाबाईंवर अगदी मनापासून प्रेम आणि तिच्या तब्येतीची काळजी घेणं, तिच्या मुलावर अपत्यवत प्रेम करणं… मोठ्या जावेवर बहिणीसारखी माया केली तिनं! जावेच्या पती विरहाच्या अव्यक्त दु:खानं दु:खी होणारी ही आवली!! प्रपंच मात्र नेटाने आणि नेटका, निगुतीचा करत होती. मोठ्या आत्मविश्वासाने संसार केला तिनं!
पण तुकाराम मात्र एकापाठोपाठ एक पिता आणि माता यांचं छत्र हरवणं, मोठ्या भावजयीचं अकस्मात जाणं, मोठ्या भावाचं त्या दु:खात, विमनस्क अवस्थेत दूर कायमचं निघून जाणे, पहिल्या पत्नीचा मृत्यू आणि पहिल्या मुलाचा ही मृत्यू, पडलेला भयंकर दुष्काळ, होणारी उपासमार, बुडलेली सावकारी आणि प्रतिष्ठेचे निघालेले दिवाळे… या सगळ्या आपत्ती, विपत्तींच्या झंझावातात कोलमडून पडले. आणि परमार्थाची वाट धरली त्यांनी, प्रपंच जणू वा-यावर सोडून दिला. आणि दोघांच्या जगण्याच्या पातळ्याच भिन्न झाल्या. आवली ढासळली मनाने. हिंमत खचल्या सारखी झाली. आणि मग मात्र तिचा संयम कधी तरी संपला तर तिची चिडचिड होणं साहजिकच नाही कां? आपल्या नव-यानं चारचौघांसारखा संसार करावा असं त्या काळातल्या कुणाही बाईला वाटणाऱच ना? मग आवलीचं संतापणं, चिडणं, पराकोटीला ही गेलं असेल समजा… तरी तो उद्रेक तर घरा-घरांत आजही बघायला मिळतोच की! मग तिलाच ‘कर्कशा’ ठरवून, आणि तुकोबांनीच… तिच्या पतीनेच म्हंटलय़ं… असा पवित्रा घेत… आवलीचं पत्नी, सून, जाऊ, माता, गृहिणी म्हणून असलेलं समर्पण दुर्लक्षित नाहीच ना करता येणार?
तुकोबांनी एकच उरवून आणलेला ऊस… संतापात तिने, भावनेच्या उद्रेकात फेकला, भिरकावला असेल ही त्यांच्या दिशेने… पण त्याचा विपर्यास करून… पाठीत मारला… असं म्हणणं… ही किंवदंती, आख्यायिका ही असू शकते की कदाचित! हा ही एक विचार असूच शकतो ना? पण म्हणून तिच्या या धगी पेक्षा… तिची ऊब, तिची मायेची, पती प्रेमाची पाखर त्याचा तो अलवार स्पर्श ही कधीतरी जाणवून घ्यावा ना?
हीच आवली… भंडा-याच्या डोंगरात काटे-कुटे तुडवत तुकोबांच्या भुकेची भाकर झाली. तुकोंबावर मनापासून निरतिशय प्रेम केलं तिनं… म्हणूनच तर चिंतनासाठी कधी… भांबनाथ तर कधी भंडारा अशा विविध डोंगरावर, न सांगता गेलेल्या तुकोबांचा पत्ता तिला बरोबर कळे, आणि मग जाई ती थेट त्यांच्या पर्यंत भाकर घेऊन. तुकोबांच्या पोटात घास गेल्याशिवाय आवलीने कधीच एक घास ही खाल्ला नाही.
तुकारामा सारख्या तेजस्वी सूर्याची किरणे आवली पर्यंत नाही पोहोचू शकली. ती सतत त्यांची सावली बनून राहिली तरीही!! पण तरीही आवलीने एका अभंगात आपल्या आध्यात्मिक ज्ञानाची चुणूक, झलक दाखवलीच आहे असं वाटतं… बघा ना…
” तुकारामाची कांता सांगे लोकांपाशी
जातो पंढरीशी स्वामी माझा,
फुटकाची वीणा त्याला दोन तारा
घालितो येरझारा पंढरीच्या!”
– – – आवलीने आध्यात्मिक सत्यच सांगितले आहे ना यात… नऊ ठिकाणी छिद्रे असलेली ही देहरूपी वीणा आणि श्वास-उच्छवास या दोन तारा छेडीत माझा स्वामी पंढरीसी कां जातो? कळेना!!
आवलीने… “देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग! “… हेच तर सांगितलयं ना?
तुकोबांचं सांगणं… ” आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने! “… हे नसेल उमगलं तिला… पण तरीही तिनं तुकोबांच्या भक्तीचं वादळ पेललंच ना? आभाळ झेललं तिनं!! पण तिचं हे… पेलणं, झेलणं, घराचा सरा होऊन आख्खं घर तोलणं आणि कुटुंबाचा कणा होऊन ताठ उभं करणं… हे जगाने ओळखलंच नाही.
तुका आकाशाएवढा असेलही, आहे ही… पण आवली तर पृथ्वी सिद्ध झाली, जिच्या सोशिकतेने दगडाला ही पाझर फुटावा!!!
कविवर्य बोरकरांनी सुद्धा तिचा महिमा वर्णिला आहे… म्हणतात…
” तुक्याच्या पायाची व्हाया जिने वीट
केली पायपीट चौ-यांशीची.
*
पोचवाया त्याच्या भूकेला भाकर
काट्यांचे डोंगर पालाणिले.
*
न चुकावी त्याची पंढरीची वारी
म्हणून वोसरी नोलांडिली!! “
*
आणि पुढे कविवर्य लिहितात…
*
” सार्थक होऊन, तुक्याच्या जन्माचे
विमान देवाचे आले दारी,
*
असून गर्भार पाचा महिन्यांची
गाभण म्हशीची आई व्हाया,
*
आलीये मुक्ती ला लाविले माघारी
तुक्याहून थोरवी जिजाई ची!!
अशी ही आवली तुकयाची सावली, गोठ्यातील गाभण म्हशीची माऊली… स्वतः गर्भार असूनही पतीबरोबरच मुक्ती पांडुरंगाने सुचविली, पण तिने नाकारिली… असंही म्हंटलं जातं. ही आख्यायिका जरी असली तरी, एक गोष्ट तर खरीच ना… की… तुकोबांनंतर ही आवलीने संसाराचा गाडा पुढे नेला. पती विरहाचं दु:ख पचवलं आणि त्यानंतर ४ महिन्यांनी जन्माला आलेल्या नारायणा वर अतिशय सुंदर संस्कार केले. आवलीला पतीचे महात्म्य कळले होतेच. फक्त तिची इच्छा होती की तुकोबांनी प्रपंच सांभाळून परमार्थ करावा. पण तसे नाही होऊ शकले. पण तरीही आवलीने, नारायण बापा सारखा व्हावा म्हणून त्याला वारकरी पंथाची शिकवण दिली. नारायणाचा… नारायण महाराज झाला. वारकरी पंथाची पताका तुकोबारायांनंतर नारायण महाराजांनीच खांद्यावर घेतली. ” ग्यानबा-तुकाराम”… हा गजर, नारायण महाराजांनी लिहिला, सुरू केला आणि माऊली -तुकोबांची एकत्रित पालखी ही त्यांनीच सुरू केली. म्हणूनच ते… पालखी सोहळा जनक:- तपोनिधी नारायण महाराज म्हणून ओळखले जातात. दिंडी सोहळ्याचे रूपांतर पालखी सोहळ्यात करण्याचं श्रेय त्यांच्याकडेच जाते.
– – – या सोहळ्याची पताका फडकविणा-या हातांच्या पाळण्याची दोरी मात्र त्या आवली माऊली च्याच हाती होती… हे विसरून नाही ना चालायचं! तिचेच संस्कार भिडले ना, गजर बनून थेट आभाळाला!! या… तिन्ही लोकीं च्या गुंडा पुत्राची माता… आवली… ‘कर्कशा’ कशी असेल ना मग??
तुका वारकरी संप्रदायाचा कळस झाला, पण त्या कळसाच्या तेजाचं स्फुल्लिंग… पाया मात्र आवलीच ठरावी, मानावी… असं वाटतं!!
… ही बायको… तुकोबाची माय बनली, आपल्या लेकरांबरोबरंच, म्हणूनच तुकोबांच्या म्हणण्यानुसार च ते… प्रभु चरणी विसावू शकले.
हा विसावा देणारी त्यांची सावली… आवली… शेवटी त्या पांडुरंगाच्याच चरणी विसावली. खरं म्हणजे पांडुरंगाला तुकोबांपेक्षा तीच जास्त प्रिय होती… तिची विरोधी भक्ती, त्याच्या वरील रागामागचा भक्तीमय अनुराग… जाणला होता त्यानं… म्हणूनच तर ना… काटा निमित्त होते, घेई देव भक्ताचे पाय हाती!!
– – अशी ही थोरवी त्या आवली ची ! स्वयं दीप होऊन जळत राहणाऱ्या समिधेची !!!
– लेख क्र. ७.
© प्रा.भारती जोगी
पुणे.
फोन नंबर..९४२३९४१०२४.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈






