अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २४ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

समाज स्थितीचे वर्णन (२)

जनसामान्यांची साधारण अशी रीत असते की स्वतःतील दोषांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांचे दोष दाखवत फिरायचे. म्हणतात ना स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ मात्र चटकन दिसते. अशी माणसे सर्वकाळ असतात. तुकाराम महाराजांच्या काळातही समाजात असे भरपूर लोक होते. त्यांना उद्देशून महाराजांनी ही अभंग रचना केली आहे.

 तेचि करो मात/ जेणे होईल तुझे हित//

 काय बडबड निमित्य / सुख जिव्हारी सिणवीसी//

 जो मूळव्याधी पिडिला/ त्यासी देखोन हसे खरजुला//

 अरथ करी सोसी/ त्यासी हसे तो आळशी//

 क्षयरोगी म्हणे परता/ सरळ रोगीया कुष्ठिता//

 वडस दोन्ही डोळा वाढले/ आणिका *काने कोचे बोले

 तुका लागे पाया/ शुद्ध करा आपणिया//

 महाराज सामान्य जनाना सांगत आहेत, अरे माणसा उगीच जास्त वटवट करणे थांबव. तुझे हित कशात आहे तेवढे बघ, उगीच जास्त बडबड करून लोकांना त्रास का देतोस? सामान्य परिस्थिती अशी आहे की, जो कोणी मुळव्याधीच्या आजाराने त्रस्त आहे त्याला पाहून खरूज झालेला मनुष्य हसतो. अति श्रम करणाऱ्यांना आळशी मनुष्य नावे ठेवतो. कुष्ठरोग्यास पाहून क्षयरोगी त्याला दूर राहण्यास सांगतो. ज्याच्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंब पडली आहेत तो दुसऱ्याला चकणा म्हणतो.

 महाराजांचे म्हणणे असे आहे की जन हो तुम्ही स्वतःतील दोष, दुर्गुण ओळखून आधी स्वतः शुद्ध व्हा. दुसऱ्याचा धिक्कार करू नका. समाजातील स्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.

 तुकाराम महाराजांच्या वेळी समाजातील दांभिकता फार वाढली होती. महाराजांच्या हे लक्षात आल्यामुळे देवाला विनंती करणारा असा हा अभंग आहे.

 बोल नाही तुझ्या/ दातृत्वपणासी/

 आम्ही अविश्वासी/ सर्वभावे//

 दम्भे करू भक्ती/ सोंग दावू जना/

 अंतरी भावना/ वेगळीया//

 चित्ताचा तू साक्षी/ तुज कळे सर्व/

 किती करू गर्व/ आता पुढे//

 तुका म्हणे देवा/ तू काय करीसी/

 कर्मा दुस्तरासी/ आमुचिया//

 हे देवा तू उदार आहेस. दाता आहेस. यात काहीच शंका नाही. खरंतर आम्ही दोषी आहोत.

(तुकाराम स्वतःलाही या जनसामान्यातील एक समजतात.) आमचाच तुझ्यावर विश्वास नाही. दांभिकपणे लोकांना दाखवण्यासाठी आम्ही तुझी भक्ती करतो. मनात काहीतरी वेगळेच विचार चालू असतात. तू चित्ताचा साक्षी आहेस, म्हणून सर्व जाणतोस. तुझ्याकडे आम्ही गर्व तरी काय करणार? आणि आमच्या या दुस्तर कर्माला तू तरी काय करणार?

 कावळ्याच्या गळा/ मुक्ताफळ माळा/

 तरी काय त्याला/ भूषण शोभे//

 गजा लागी केला/ कस्तुरीचा लेप/

 तिचे तो स्वरूप/ काय जाणे//

 बकापुढे सांगे /भावार्थ वचन/

 वा उगाची सीण /होय त्यासी//

 तुका म्हणे तैसे/ अभाविक जन/

 त्यासी वाया सीण / करू नये//

समाजातील अज्ञानी, अभाविक जनांसाठी तुकाराम महाराजांनी या अभंगात जनावरे, पक्षी यांची उदाहरणे देऊन अशा लोकांना भक्तीचे महात्म्य काय सांगावे असा विचार मांडला आहे.

कावळ्याच्या गळ्यात मोत्याचे हार घालून काय शोभा? हत्तीच्या अंगाला कस्तुरीचा लेप लावला तरी त्याचा सुगंध हत्तीला काय कळणार? बगळ्यापुढे आयुष्याचे महत्त्व वाचून, भक्तीचा महिमा सांगून काही फायदा आहे का? विनाकारण त्या प्रवचनकाराला थकवा यायचा. तेव्हा भक्त म्हणून मिरवणारे पण मनात मुळीच भाव नसलेले, अशा लोकांना कोणताही उपदेश करू नये असे महाराज सांगतात.

तुकाराम बुवाना त्यावेळच्या समाजातील मंबाजीबुवांसारख्या लोकांनी खूप त्रास दिला होता. त्यांची गाथा इंद्रायणीत बुडवण्यापर्यंत मजल गेली होती. या संदर्भात हे अभंग महाराजांनी रचले असावेत.

ब्राह्मण म्हणजे वेदोक्त कर्म करणारे. तो त्यांचा अधिकार. तुकाराम महाराजांना भोजनाला बोलविणाऱ्या एका विद्वान ब्राह्मणाला उद्देशून तुकाराम बुवा म्हणतात,

 नये माझा तुम्हा होऊ शब्द स्पर्श/

 विप्र तुम्ही विद्वांस ब्राह्मणांसी//

 म्हणून या तुम्हा करितो विनंती/

 धावे शेष हाती उरले ते//

 वेदी कर्म जैसे बोलीले विहित/

 करावी ते नित विचारूनी/

 तुमचा स्वधर्म माझा अधिकार/

 भोजन उत्तर तुका म्हणे//

माझा तुम्हाला शरीराने किंवा शब्दानेही स्पर्श होऊ नये, कारण तुम्ही विद्वान, विद्यावंत ब्राह्मण आहात. वेदांमध्ये तुमचे जैविक कर्म सांगितले आहे त्याप्रमाणे आपण करावे. तुमच्या पंक्तीला न बसता तुमच्या भोजनानंतर जे काही उच्छिष्ठ उरले असेल तेवढेच खाण्याचा माझा अधिकार आहे. आणि वेदोक्त कर्म करणे हा तुमचा स्वधर्म आहे. उपरोधिक असे हे वरील अभंग आहेत.

माणसातील चांगले गुण बघावे, जात- कुळीला अवास्तव महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. समाजातील उच्चनीचता भाव दूर व्हावा यासाठी रोजच्या जीवनातील दृष्टांत देऊन या अभंगात महाराज काय सांगतात?

 आपणा लागे काम वाण्या घरी गुळ/

 त्याचे याती कुळ काय कीजे//

 उकीरड्यावरी वाढली तुळसी/

 गाईचा टाकावी ते कैसी ठाया गुणे//

 गाईचा जो भक्ष अमंगळ खाय/

 तिचे दूध काय सेवू नये//

 तुका म्हणे काय सालपटाशी काज/

 फणसातील बीज काढुनी घ्यावे//

वाण्याच्या घरचा गुळ आपल्याला हवा आहे, तर त्यासाठी त्याची जात कुळी का विचारावी? तुळस उकिरड्यावर उगवली तरी ती पवित्रच असते. गाय अशुद्ध वस्तू खाते, पण आपण तिचे दूध पितो ना? फणसाचे साल काटेरी असले तरी आपला मतलब आतील गोड गरे खाण्याचाच! थोडक्यात काय तर गुणदोष युक्त कोणत्याही वस्तूतील दोषांकडे दुर्लक्ष करून त्यातील गुण तेवढे घ्यावे हेच खरे.

ब्राह्मणांसारख्या श्रेष्ठ कुळात जन्म घेऊन कुळ भ्रष्ट करणारेही असतात.

 अंगी ब्रह्म क्रिया/ ख्रिस्ती चा व्यापार/

 हिंडे घरोघर / चांडाळाचे//

 अंतेजाची खिचडी/ घेता ती मागून/

 गाळीया प्रदान/ माय बहिणी//

 उत्तम कुळी जन्म/ क्रिया अमंगळ/

 बुडविले कुळ/ उभयता//

 तुका म्हणे ऐसी /कलियुगाची चाली/

 स्वार्थी बुडवली/ आचरणे//

काही ब्राह्मण असे असतात की, ब्रह्मकर्म न करता सावकारी करतात, आणि वसुलीसाठी चांडाळांच्या घरी जातात. महारांकडून कधीकधी पोट भरण्यासाठी खिचडी आणतात आणि व्यापारा निमित्त माय बहिणींवरून शिव्या देतात. असे ते उत्तम कुळात जन्मलेले असूनही त्यांचे कर्म अमंगळ असते. या कलियुगात अशी वागणूक सर्वत्र दिसून येते. स्वार्थ वाढला आहे, त्यामुळे शुद्ध आचरण भ्रष्ट झाले आहे.

 पापाचीया मुळे/ झाले सत्याचे वाटोळे/

 दोष झाले बळीवंत/ नाही ऐसी झाली नीत//

 मेघ पडो भीती/ पिके सांडीयेली क्षीती/

 तुका म्हणे काही/ वेदा वीर्य शक्ती नाही//

या कलियुगात पापे फार वाढली. सत्याचा ऱ्हास झाला. नीती भ्रष्ट झाली, दोष वाढले. दुष्काळ पडू लागले, निसर्ग कोपला. अधर्मामुळे वेदमंत्रातील बळ नष्ट झाले.

आज आपण अशाच परिस्थितीला सामोरे जात आहोत. आतंकवाद वाढला आहे. मुलगा वडिलांना विचारेनासा झाला आहे. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार चालू आहे. माणसातले माणूसपण हरवते आहे…

परिस्थिती सुधारणे आपल्याच हातात आहे, याचा आपण विचार केला पाहिजे.

क्रमशः… २४ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted