श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “मनाच्या वाड्यात गडबड झाली” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

मनाच्या वाड्यात गडबड झाली… जुन्या दुःखांची पंचायत भरली… आली आली ग आठवण बाई… आली ग आठवण बाई…

कोपऱ्यात बसलेले एक जुने दुःख उठले… डोळे चोळीत म्हणाले… अहो, आमचे काय ठरले? आम्ही अजून मनातच राहायचे का?

तेवढ्यात आनंदराव दारातून आत आले… हातात हास्याचे गाठोडे… खांद्यावर समाधानाचे उपरणे…

आनंदराव म्हणाले… काय रे, अजून हीच मंडळी? अजून हीच दुःखे? अजून हाच बाजार? दहा वर्षांपूर्वीचा अपमान… पंधरा वर्षांपूर्वीचा राग… वीस वर्षांपूर्वीचे अपयश… अहो, एवढा जुना माल अजून गोदामात ठेवला आहे?

तेवढ्यात एक दुःख फुगून म्हणाले… आम्ही खास आहोत… आम्ही भावनिक आहोत…

आनंदराव हसले… म्हणाले, भावनिक नाही रे बाबा… तुम्ही आता निर्माल्य झाला आहात… कालची फुले आज निर्माल्य होतात… मग कालची दुःखे आज ताजी कशी?

प्रश्न बरोबर होता… दुःखे गप्प बसली…

एवढ्यात श्रद्धाबाई पुढे आल्या… त्यांनी देवाच्या चरणी फुलांची परडी ठेवली… म्हणाल्या… ही फुले माझी होती… आता त्याची झाली…

मग दुःखांचे काय?

तीही त्याचीच…

देवा… हे राग तुझे… हे अपयश तुझे… ही चिंता तुझी… आता तूच सांभाळ…

हे ऐकताच मनाच्या वाड्यात कुजबुज सुरू झाली… अहो… आपण तर दुःखांना कायमस्वरूपी भाडेकरू ठेवले होते… आता त्यांना नोटीस मिळाली वाटते…

तेवढ्यात भारूड सुरू झाले…

मनाच्या वाड्यात गडबड झाली… जुन्या दुःखांची उचलबांगडी झाली… आली आली ग आनंद बाई… आली ग आनंद बाई…

एक दुःख पुटपुटले… आम्ही जाऊ कुठे?

आनंदराव म्हणाले… गंगार्पण व्हा… निर्माल्य घरात ठेवत नाहीत… मनातही ठेवत नाहीत…

जाता जाता एक जुनी चिंता म्हणाली… माझी आठवण येईल…

मन हसले… म्हणाले… नाही गं… तुझ्या जागी आता आनंदाची पेरणी करायची आहे…

तेवढ्यात शेतकरीबुवा आले… म्हणाले… जमिनीतील तण काढले नाही तर पीक येत नाही… मनातील दुःख काढले नाही तर आनंद उगवत नाही…

वा रे वा… मनाला मुद्दा पटला…

राग बाहेर… मत्सर बाहेर… अहंकार बाहेर… दुःख बाहेर…

आत फक्त प्रेम… आत फक्त विश्वास… आत फक्त आनंद…

तेवढ्यात समाधानराव टाळी वाजवून म्हणाले…

ठरले… ठरले… ठरले…

दुःखांचे निर्माल्य करायचे ठरले… आनंदाची पेरणी करायची ठरली…

मनाच्या वाड्यात पुन्हा उजेड झाला… आनंदाच्या घोषणा सुरू झाल्या…

जय समाधान… जय समाधान…

जय आनंद… जय आनंद…

आणि मनाच्या दारात बसलेला अनुभव नावाचा म्हातारा हसून म्हणाला…

“देवाला वाहिलेली फुले परत मागत नाहीत… मग त्याच्या चरणी ठेवलेली दुःखे पुन्हा उचलून का घ्यायची? “

 – दुःखांचे निर्माल्य करण्याचा सल्ला देणारा एक साधा निरीक्षक..

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted