श्री जगदीश काबरे
पुस्तकावर बोलू काही
☆ “सत्य असत्याशी मन केले ग्वाही” – लेखक : श्री जी. डी. पारेख ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆
पुस्तक : सत्य असत्याशी मन केले ग्वाही
लेखक : जी डी पारेख
प्रकाशक : गोल्डनपेज पब्लिकेशन, पुणे (पुस्तकासाठी संपर्क : ७७२२००५०८१)
एकूण पृष्ठे : १९६
किंमत : ₹ ३५०
संत तुकाराम महाराजांचे नाव महाराष्ट्रात सर्वांच्या ओठांवर आहे; परंतु त्यांच्या विचारांचे खरे आकलन मात्र दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहे. अभंगांचे पठण, वारीची परंपरा आणि ‘ग्यानबा-तुकाराम’चा जयघोष मोठ्या श्रद्धेने केला जात असला, तरी तुकोबांनी मांडलेली समता, बंधुता, मानवता, विवेक, नीतिमत्ता आणि अन्यायाविरुद्धचा संघर्ष यांचा मूळ आशय अनेकदा झाकोळला जातो. अशा वेळी जी. डी. पारेख लिखित ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ हा ग्रंथ संत तुकारामांचे केवळ भक्तिपर दर्शन घडवत नाही, तर त्यांच्यातील मानवतावादी तत्त्वज्ञ, समाजप्रबोधक आणि नैतिक क्रांतिकारक यांचे प्रभावी दर्शन घडवतो. संत तुकाराम महाराजांना महाराष्ट्राने डोक्यावर घेतले, त्यांच्या अभंगांना कंठस्थ केले, त्यांच्या नावाने लाखोंच्या संख्येने वाऱ्या केल्या; परंतु तुकोबांच्या विचारांचा आत्मा किती जणांनी स्वीकारला? हा प्रश्न आज पूर्वीपेक्षा अधिक तीव्रपणे उभा राहतो. कारण एका बाजूला तुकारामांच्या ‘भेदाभेद अमंगळ’चा जयघोष सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला समाजात द्वेष, जातीय विद्वेष, धार्मिक ध्रुवीकरण, असहिष्णुता आणि अंधश्रद्धांचे पुनरुज्जीवन होताना दिसते. अशा काळात जी. डी. पारेख यांचा ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ हा ग्रंथ केवळ तुकाराम महाराजांवरील आणखी एक पुस्तक म्हणून समोर येत नाही; तो तुकोबांच्या मूळ विचारांचे पुनराविष्कार घडवणारा आणि आपल्या सामाजिक विवेकाला जागवणारा वैचारिक दस्तऐवज म्हणून उभा राहतो.
‘भक्तीला नीतीचे वाहक बनवून मानवतेचा सोपान गाठू पाहणारा वारकरी रूपातील दार्शनिक’ हे या ग्रंथाचे उपशीर्षकच त्याच्या आशयाचे सार सांगून जाते. तुकोबांची भक्ती ही कर्मकांडी नव्हती, ती माणसाला माणसाशी जोडणारी होती. त्यांचा धर्म हा कोणत्याही जातीचा, पंथाचा किंवा सत्तेचा धर्म नव्हता; तो मानवतेचा धर्म होता. त्यांच्या अभंगांतून व्यक्त होणारा ईश्वर हा अन्याय, विषमता आणि दांभिकतेला मान्यता देणारा नसून सत्य, करुणा, समता आणि नीतिमूल्यांचा पुरस्कार करणारा आहे. लेखकाने या सर्व पैलूंचा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि समकालीन संदर्भात पुनर्विचार केला आहे.
या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो तुकोबांना वर्तमानाशी जोडतो. आज समाजात संविधानिक मूल्यांबद्दल वाढती उदासीनता वाढत असताना, ‘भेदभेद अमंगळ’ म्हणणाऱ्या तुकोबांच्या विचारांची नव्याने आठवण करून देण्याची गरज लेखक प्रकर्षाने मांडतो. समता, सामाजिक न्याय, बंधुभाव, करुणा आणि मानवतेची ही मूल्ये भारतीय संविधानाचा आत्मा आहेत, तीच मूल्ये संतांनी शतकांपूर्वी आपल्या अभंगांतून लोकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला होता, हे या ग्रंथातून प्रभावीपणे अधोरेखित होते. या ग्रंथाची खरी ताकद त्याच्या वर्तमानाशी असलेल्या संवादात आहे. आज वारीत संविधान, पर्यावरण, समता आणि सामाजिक न्याय यांचे प्रबोधन करणाऱ्यांवर संशय घेतला जातो; काही वेळा त्यांना ‘अर्बन नक्षल’ या अपमानास्पद विशेषणांनीही हिणवले जाते. अशा वातावरणात लेखक अत्यंत नेमकेपणाने दाखवून देतात की, भारतीय संविधानाचा आत्मा आणि संत तुकारामांचा विचार यांच्यात मूलभूत विरोध नाही, तर विलक्षण साम्य आहे. समता, बंधुता, सामाजिक न्याय, मानवी प्रतिष्ठा आणि सर्वसमावेशकता ही मूल्ये संविधानाने स्वीकारण्याच्या कित्येक शतके आधी तुकोबांनी आपल्या अभंगांतून लोकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला होता. म्हणूनच संविधानाची बाजू घेणे म्हणजे संतपरंपरेपासून दूर जाणे नव्हे; उलट तिच्या मूळ आत्म्याशी प्रामाणिक राहणे होय, हा महत्त्वपूर्ण संदेश हा ग्रंथ देतो. अशा पार्श्वभूमीवर ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’ म्हणणाऱ्या तुकोबांच्या वारीत पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देणे किंवा समता व संविधानाची आठवण करून देणे हे वारकरी परंपरेशी विसंगत नसून तिच्या मूळ आत्म्याशी सुसंगतच आहे, असा ठाम विचार हा ग्रंथ मांडतो. त्यामुळे वारीचा अर्थ केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक प्रबोधनाची लोकचळवळ म्हणून पुन्हा समजून घेण्याची प्रेरणा तो देतो. तुकोबांच्या वारीत पर्यावरणाचा संदेश नसेल तर तो कुठे असणार? समाजात समतेचा संदेश नसेल तर भक्तीचा अर्थ तरी काय उरतो? लेखक असे अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित करतो. त्यामुळे वाचक केवळ पुस्तक वाचत नाही, तर स्वतःच्या श्रद्धा, मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यांचाही पुनर्विचार करू लागतो.
तुकारामांचे धर्मयुद्ध हे कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नव्हते; ते अज्ञान, दांभिकपणा, बुवाबाजी, अन्याय, जातिभेद आणि धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या शोषणाविरुद्ध होते. भक्तीला विवेकाची आणि नीतिमूल्यांची जोड नसल्यास ती समाजाला मुक्त करण्याऐवजी गुलाम बनवू शकते, हा अत्यंत महत्त्वाचा संदेश लेखक तुकोबांच्या अभंगांच्या आधारे स्पष्ट करतो. त्यामुळे हा ग्रंथ संतसाहित्याचा तसेच आजच्या सामाजिक आणि राजकीय वास्तवाला भिडणारा वैचारिक हस्तक्षेप ठरतो. तुकारामांनी ज्यांच्याविरुद्ध संघर्ष केला, तो ब्राह्मणांच्या विरोधात नव्हता तर त्यांच्या वर्णवर्चस्ववादी प्रवृत्तीच्या विरोधात होता. धर्माच्या नावाखाली चालणारा व्यापार, अंधश्रद्धा, बुवाबाजी, जातिभेद, नैतिक अधःपतन आणि विवेकशून्यता यांच्या विरोधात त्यांनी उभे केलेले धर्मयुद्ध आजही तितकेच सुसंगत आहे. त्यामुळे तुकोबांना केवळ टाळ-मृदंगात किंवा दिंडीत शोधून चालणार नाही; त्यांना समाजाच्या विचारविश्वात पुन्हा प्रतिष्ठित करावे लागेल. जी. डी. पारेख यांचा हा ग्रंथ नेमके तेच कार्य करतो.
आज संतपरंपरेचे नाव घेऊन तिच्यात पुन्हा एकदा ब्राह्मणी विचार मिसळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भक्तीला विवेकापासून, धर्माला नीतिमत्तेपासून आणि वारीला सामाजिक प्रबोधनापासून वेगळे करण्याची धडपड होत आहे. अशा वेळी ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ हा ग्रंथ तुकोबांच्या मूळ मानवतावादी परंपरेची आठवण करून देतो. संतांचा वारसा जपायचा असेल, तर त्यांच्या नावाचा जयघोष करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा स्वीकार अधिक महत्त्वाचा आहे, हे तो ठामपणे सांगतो. संतपरंपरेवर जमा झालेली संकुचित विचारसरणीची धूळ झटकून तिच्यातील सार्वकालिक मानवतावादी तेज पुन्हा अनुभवायचे असेल, तर हा ग्रंथ नक्कीच वाचला पाहिजे. आजच्या महाराष्ट्रात संत तुकारामांचे नाव मोठ्या श्रद्धेने घेतले जाते; आता धार्मिक पुनरुज्जीवनवादाच्या काळात त्यांच्या विचारांनाही तितक्याच प्रामाणिकपणे समजून घेण्याची वेळ आली आहे. त्या दिशेने वाट दाखवणारा हा एक महत्त्वपूर्ण, चिंतनगर्भ आणि काळाची गरज ठरलेला हा ग्रंथ आहे.
हा ग्रंथ वाचून तुकोबांची प्रतिमा अधिक स्पष्ट होते. भक्तीतून नीती, नीतितून समता आणि समतेतून मानवतेचा मार्ग दाखवणारे तुकाराम आजच्या महाराष्ट्राला पुन्हा या ग्रंथातून भेटतात. म्हणूनच हा ग्रंथ केवळ संतसाहित्याचा अभ्यास नसून, वर्तमानाला प्रश्न विचारणारा, समाजाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा आणि मानवतावादी महाराष्ट्राची दिशा दाखवणारा एक महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथ आहे. हा ग्रंथ लिहून जी डी पारेख यांनी प्रबोधनाला आणखी सशक्त केले आहे. जी डी पारेख यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम……
☆
परिचय : श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






