श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ वाढदिवस… – भाग – ३ ☆ श्री दीपक तांबोळी

(“आई एक गडबड झालीये. माझं एक कानातलं सापडतच नाहीये. मी तुझ्याकडे आले तेव्हा दोन्ही कानात होते. आता मात्र डाव्या कानातच आहे” ती रडकुंडीला येऊन बोलत होती.)

इथून पुढे – – 

“अरे बापरे!ते डायमंडचे कानातले ना? हो बरोबर. तू इथे आलीस तेव्हा तुझ्या कानात होते. पण घरातच शोध ना. तिथंच कुठतरी पडलं असेल”

“आई दोन तासापासून शोधतेय. घराचा सगळा कानाकोपरा शोधून झालाय” ती आता रडायला लागली होती

“विश्वासरावांना कळवलं का? त्यांनीच तुझ्या वाढदिवसाला घेऊन दिले होते ना? “

” हो. पण ते आता चेन्नईत आहेत. त्यांना कळवायचा धीर होत नाहिये. कळलं तर चिडतीलच ते माझ्यावर. अडीच लाखाचे होते आई ते कानातले. एक गेलं म्हणजे सव्वा लाखाचं नुकसान… “तिला पुढे बोलवेना

“जाऊ दे रडू नकोस. मी शोधते इथे. सापडलं तर तुला कळवते”

सुलक्षणेबाईंनी दोन तास घरात शोधाशोध केली पण काही तपास लागेना.

सकाळी उठल्या उठल्या त्यांनी सिक्युरिटीला फोन केला. झालेल्या घटनेची माहिती देऊन सोसायटीच्या आवारात शोध घ्यायला सांगितलं. घरातही त्यांनी परत शोधायचा प्रयत्न केला. या दरम्यान मुलीचे चारपाच फोन येऊन गेले. कानातलं सापडत नाही म्हणून ती कासावीस झाली होती. पोलिसात तक्रार देऊ या का असं सुलक्षणेबाईंना विचारत होती. सुलक्षणेबाई आणि त्यांच्या मिस्टरांनी तिला धीर धरायला सांगितलं कारण तक्रार केली की सोसायटीत पोलिस चौकशीला येणार. त्याचा सगळ्यांनाच मनस्ताप होणार होता.

दुपारी चार वाजता त्यांच्या दाराची बेल वाजली. त्यांनी दार उघडलं. बाहेर दिनू उभा होता.

“काय रे दिनू? “

दिनूने त्यांच्यासमोर हात उघडला. त्या हातावर ते डायमंडचं कानातलं होतं.

” हेच आहे का ते हरवलेलं?

सुलक्षणेबाईंचे डोळे विस्फारले. हो!तेच तर होतं ते. त्यांच्या लाडक्या लेकीने कौतुकाने त्यांना दाखवलेलं.

” हो. हेच आहे ते “त्या आनंदाने ओरडल्या”कुठं सापडलं हे? “हातात घेऊन त्यांनी विचारलं

“गेटच्या बाहेर. रस्त्यावर. सगळे सोसायटीच्या आत शोधत होते. पण ताईंनी गाडीत बसतांना स्कार्फ काढतांना मी पाहिलं होतं. म्हणून मला शंका आली की ते बाहेरच पडलं असेल. आणि खरंच ते तिथंच सापडलं” दिनू हसऱ्या चेहऱ्याने सांगत होता. सुलक्षणेबाईंनी ते घेऊन आपल्या पर्समध्ये टाकलं. पर्समधूनच त्यांनी शंभरची नोट काढली आणि त्याच्यासमोर धरली

“हे घे तुझं बक्षीस आणि थँक्यू व्हेरी मच. खरंच खुप गुणी मुलगा आहेस तू”

“नाही. नको”असं म्हणून दिनू वळला आणि निघून गेला. तो गेल्यावर सुलक्षणेबाईंनी मोबाईल उचलून लेकीला फोन लावला.

“अगं ज्योती सापडलं बरं का तुझ्या कानातलं”

ज्योती आनंदाने ओरडली

“कुणाला आणि कुठे सापडलं आई? “

सुलक्षणेबाईंनी दिनूचं नांव आणि कुठे सापडल्याचं सांगितलं.

“हा दिनू खरंच स्मार्ट पोरगा आहे. बरं तू त्याला काही बक्षीस दिलं की नाही? “

“मी त्याला शंभर रुपये देत होते त्याने घेतले नाही”

“काय आई!अगं सव्वा लाखाचं इयरिंग आहे ते आणि तू फक्त शंभर रुपये देत होतीस? अगं कमीतकमी हजार रुपये तर द्यायचेस. मी परत केले असते तुला”

“जाऊ दे गं! या लोकांना फार डोक्यावर चढवू नये”

“कमाल करतेस तू आई. सापडलं नसतं तर सव्वा लाख पाण्यातच गेले असते ना? “

सुलक्षणा बाई काही बोलल्या नाहीत.

दोन दिवसांनी पवार आपल्या कुटुंबासहित जयपूरला लग्नाला गेले. जातांना एकनाथला घरी राहिलेल्या आपल्या आईकडे लक्ष द्यायला सांगून गेले. पासष्ट वर्षांची त्यांची आई प्रवासाची दगदग सहन होणार नाही म्हणून घरीच राहिली. पवार सकाळी गेले आणि रात्री त्यांच्या आईच्या छातीत वेदना होऊ लागल्या. जीव घाबराघुबरा होऊ लागला.

त्रास जास्त वाढला तशी त्यांना दिनूची आठवण आली. त्यांनी एकनाथच्या रुममध्ये फोन करुन दिनूला पाठवायला सांगितलं. दिनू त्यांच्या फ्लॅटमध्ये गेला. आजींनी त्याला कपाटातली औषधं द्यायला सांगितली. ॲसिडिटीने अस्वस्थ वाटत असेल म्हणून पाण्यात इनो टाकून द्यायला सांगितलं. दिनूने त्यांनी जे जे सांगितलं ते केलं पण बऱ्याचदा ऐकून आणि वर्तमानपत्रात वाचून ही लक्षणं हार्ट अटॅकचीसुध्दा असू शकतात हे त्याला माहीत होतं. त्याला इमरजंसी नंबर्स तोंडपाठ होते. आजी नाही नाही म्हणत असतांना त्याने आजीच्या मोबाईलवरुन सोसायटीच्या डाॅक्टरला फोन लावला. तो फोन उचलेना म्हणून त्याने सरळ अँब्युलंस ड्रायव्हरला फोन लावला. सुदैवानं त्यानं तो उचलला. दिनूने त्याला लगेच सोसायटीत यायला सांगितलं. पाचच मिनिटांनी सोसायटीच्या डाॅक्टरचा फोन आला. दिनूने त्यालाही लगेच यायला सांगितलं. जवळच रहात असल्याने तोही लगेच आला. आजीचा बी. पी. चांगलाच वाढला होता. थोड्याच वेळात अँब्युलंस आली. दिनू आजीसोबत एखादी बाई असावी याकरीता आईला उठवून सोबत घेऊन गेला. आजीला हाॅस्पिटलमध्ये ॲडमिट केल्या गेलं. उपचार सुरु झाले.

बातमी कळताच सकाळी लोढाशेठ हाॅस्पिटलमध्ये आले. तिथे दिनूला पाहून त्यांचा जीव कळवळला. पोरगा रात्रभर जागा होता. मग त्यांनी पवारांना फोन लावून सगळी कल्पना दिली. पवारांचं संध्याकाळच्या गाडीचं रिझर्वेशन होतं. दिवसभरात इतर गाड्यात जागा मिळाली नाही तर ते संध्याकाळीच निघणार होते. त्यांनी लोढाशेठला दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत आईची काळजी घ्यायला सांगितलं. लोढाशेठनी ते मान्य केलं.

सात दिवसांनी पवारांची आई एंजिओप्लास्टी करुन घरी परतली. भेटायला येणाऱ्या सर्वांना ती दिनूने तिची किती काळजी घेतली याबद्दल भरभरुन सांगत होती. तोंड फाटेस्तोवर त्याचं कौतुक करत होती.

” अरे सुभाष त्या दिनूला काहितरी बक्षीस दे रे. फार गुणाचं पोरगं आहे. सख्ख्या आजीसारखी माझी काळजी घेत होता तो “

आईने असं म्हंटल्यावर पवारांच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

“आई मी त्याला पाचशे रुपये दिले होते. त्याने घेतले नाहीत. फार मातला आहे तो. आता काय त्याला लाख रुपये द्यायचे? नाही घेत तर गेला उडत “

” अरे लाख रुपये नाही म्हणत मी. कमीतकमी पाच हजार तर द्यायचे. दोन दिवस त्याने आणि त्याच्या आईने तुझी आणि सुनबाईची कमतरता भासू दिली नाही”

पवार काही बोलले नाहीत. फक्त नाराजीने त्यांनी होकारार्थी मान हलवली. अर्थात ते एवढे पैसे दिनूला देणार नव्हतेच.

एक दिवस एकनाथने लोढाशेठना फोन केला

” शेठजी मला एका कंपनीत नोकरी मिळतेय. वीस हजार पगार देणार आहेत. मी त्यांना पुढच्या महिन्यात येण्याचं कबुल केलंय. सिक्युरिटी एजन्सीला सांगून तुम्ही एखादा सिक्युरिटी गार्ड मागून घ्या “

लोढाशेठ काळजीत पडले. नवीन सिक्युरिटी गार्ड तर त्यांना केव्हाही मिळाला असता पण एकनाथ सारखा केयरटेकर मिळणं मुश्कील होतं. त्यातून दिनूसारखा सर्वांना मदत करणारा पोरगा मिळणं तर त्याहून कठीण होतं. त्यांनी हा विषय सोसायटीच्या मिटिंगमध्ये मांडायचं ठरवलं. दिनूच्या वाढदिवसाला आता सात दिवस उरले होते आणि त्याचा वाढदिवस साजरा करायचा विषय आता बंदच झाला होता. “कुणी नाही केला तरी मी दिनूचा वाढदिवस साजरा करेन”हे मिटिंगमध्ये तावातावाने म्हंटलेलं वाक्य आता लोढाशेठला सलत होतं. सोसायटीचे सदस्य मिटिंगमध्ये हा विषय काढून त्यांची टिंगलटवाळी करणार होतेच. त्यांना काय उत्तर द्यायचं याचाही विचार करणं भाग होतं. पण आता एकट्याने साजरा करायची शेठजींची इच्छा मरुन गेली होती. शेवटी एका सिक्युरिटी गार्डच्या मुलासाठी एवढे पैसे खर्च करणं त्यांच्या व्यवहारात बसत नव्हतं. पण त्यांनी ठरवलं. दिनूला घरी बोलावून त्याला शर्टपँटचं कापड देऊन टाकायचं. त्यासोबत एखादं कॅडबरीचं चाॅकलेट नाहितर मिठाईचा बाॅक्स. बस झालं. चांगुलपणाचा ठेका त्यांनी एकट्याने थोडाच घेतला होता.

१६ ऑक्टोबर. आज दिनूचा वाढदिवस. संध्याकाळची वेळ. क्लबहाऊसला लावलेली लायटिंग चमचम करत होती. हाॅलमध्ये खुप गर्दी जमली होती नव्हे झाडून सगळी सोसायटी हजर होती. सजवलेल्या स्टेजच्या मागच्या भिंतीवर “हॅपी बर्थडे दिनू”चा बॅनर झळकत होता. ठेवणीतली शानदार शेरवानी घातलेला दिनू प्रसन्न चेहऱ्याने स्टेजवर उभा होता. त्याच्या बाजूला त्याचे आईवडील, सोसायटीचे अध्यक्ष पाटीलसाहेब आणि लोढाशेठ उभे होते. समोरच्या गर्दीकडे आणि टेबलवर ठेवलेल्या भल्या मोठ्या केककडे पाहून दिनूचा वाढदिवस खरंच साजरा होतोय यावर लोढाशेठचा विश्वास बसत नव्हता. पाचसहा दिवसांपूर्वी झालेल्या मिटिंगमध्ये त्यांनी एकनाथला दुसरी नोकरी मिळाल्याचं आणि एकनाथ आणि त्याचं कुटुंब सोसायटी सोडून जात असल्याचं सांगितलं आणि चमत्कार घडला. एकनाथचा पगार वीस हजार करण्यापासून ते दिनूचा वाढदिवस साजरा करण्यापर्यंतचे सगळे मुद्दे धडाधड मंजूर होत गेले. लोकांना दिनू आणि त्याच्या कुटूंबाची किंमत अखेर कळली होती आणि आज तो दिवस उजाडला होता ज्याची ते मनापासून वाट बघत होते.

दिनूने केक कापायला सुरुवात केली आणि “हॅपी बर्थडे टू यू दिनू ” चा जोरदार जल्लोष झाला. लोढाशेठनी दिनूला उचलून घेतलं तसे सगळे स्टेजवर धावत आले. दिनूच्या तोंडात केक भरवण्याची जणू स्पर्धा लागली. केक भरवून झाल्यावर जो तो दिनूशी हात मिळवून, त्याला जवळ घेऊन शुभेच्छा देऊ लागला. मग त्याला गिफ्ट देण्यासाठी भली मोठी रांग लागली. कुणी एक हजार, कुणी दोन हजाराची पाकीटं तर कुणी कपडे देत होतं. जोशी आले. त्यांनी आठ हजाराचा मोबाईल त्याला गिफ्ट दिला. सुलक्षणेबाई आल्या. त्यांनी पाच हजाराची सोन्याची चेन त्याला दिली. मग पवार त्यांच्या आईसोबत आले तेव्हा त्यांच्या हातात होती एक चमचमती नवी कोरी सायकल. जिची किंमत होती बारा हजार.

सगळ्यांचे गिफ्ट्स देणं झाल्यावर लोढाशेठ बोलायला उभे राहिले.

“मित्रांनो खुप खुप धन्यवाद. आपण सगळ्यांनी मिळून आपल्या लाडक्या दिनूचा वाढदिवस साजरा केला. सगळ्यांनी त्याला स्वखुशीने गिफ्ट्स दिलेत. आता माझं गिफ्ट मी जाहीर करतो. दिनूच्या डिग्रीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मी अध्यक्ष असलेल्या “हेल्प” या फाऊंडेशनने स्विकारली आहे”

टाळ्यांचा कडकडाट झाला. मग अध्यक्ष बोलायला उभे राहिले.

” सगळ्यांनी इतके गिफ्ट दिनूला दिले आहेत की मी त्याला काय द्यावं हेच मला समजेनासं झालंय. जितकं दिनूचं कौतुक होतंय त्यापेक्षा जास्त कौतुक त्याच्या आईवडिलांचं व्हायला पाहिजे. कारण त्यांनी केलेल्या चांगल्या संस्कारामुळेच दिनू आपल्या सगळ्यांच्या मदतीला धावून येतो. तोही कसलीही अपेक्षा न ठेवता. अशा निरपेक्ष भावनेने कुणालाही मदत करण्याचे संस्कार आपणही आपल्या मुलांवर केले पाहिजेत. आजकालची तरुण पिढी मोबाईल, लॅपटाॅपमध्ये गुरफटून स्वकेंद्रित झाली आहे. त्यांनी दिनूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. अशा सुसंस्कारी मुलाला घडवल्याबद्दल माझं गिफ्ट मी दिनूच्या ऐवजी त्याच्या आईवडिलांना देणार आहे. त्यांची मोठी मुलगी आता लग्नाची झालीये. तिच्या लग्नाच्या खर्चाची सर्व जबाबदारी मी उचलणार आहे”

टाळ्यांचा परत एकदा कडकडाट झाला.

लोढाशेठनी माईक हातात घेतला.

“कुणाला दिनूबद्दल दोन शब्द बोलायचे असतील तर त्यांनी स्टेजवर यावं “

दिनूच्या वाढदिवसाला विरोध करणारे पवार स्टेजवर आले. दिनूच्या वाढदिवसाला आपण विरोध केला होता त्याबद्दल सर्वांची माफी मागून त्यांनी दिनूचे एकेक स्वभावगुण सांगून त्याची प्रशंसा सुरुवात केली. मग एकेक जण येऊ लागला. दिनूने केलेल्या मदतीचे प्रसंग सांगू लागला. अनुभव सांगतांना बऱ्याच जणांना गहिवरून येत होतं. सगळ्यांच्या तोंडून आपलं कौतुक ऐकून दिनू अवघडून बसला. त्याच्याच बाजूला बसलेल्या एकनाथच्या आणि त्याच्या बायकोच्या डोळ्यातून मात्र आनंदाश्रूंच्या धारा वहात होत्या.

समाप्त

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted